म. फुले यांच्या ‘अखंडां’मधून ‘कौटुंबिक लोकशाही’चा पाया रचला गेला. आपल्या संसारात ही लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न प्रतिमा आणि किशोर मनापासून करत आहेत. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ती, लेखिका आणि चांगली अभ्यासक आणि मासिक ‘सत्यशोधक जागर’ची संपादक असणारी प्रतिमा प्राध्यापकी करत पुण्यात घराची आणि चळवळीच्या कार्यालयाची आघाडी सांभाळत आहे. तर ऊसतोडणी कामगारांच्या हक्कासाठी, आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी, पाणी-नैसर्गिक संसाधनं वाचवण्यासाठी किशोर अक्षरशः जीवाचं रान करत नंदुरबार-धुळे या भागात पाय घट्ट रोवून काम करत आहे. दोघंही पर्यायी संस्कृतीचा आग्रह धरतात.