बिहारची सासुरवाशीण

आपल्या अवतीभवती आपण चिमुकल्यांच्या छोट्या बालवाड्या बघतो. छोटुकली मुलं कशी मस्त खेळत, गात असतात आणि त्यांच्या बाई त्यांना त्यांच्या कलानं गाणी, गोष्टी शिकवत असतात. पण हे सगळं चित्र आत्ता अगदी गेल्या २०-२५ वर्षातले. छोट्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत ३० वर्षांपूर्वी तरी बिहारमध्ये (आताचं झारखंड) चांगली सोय अशी नव्हतीच.

बिहारसारख्या रांगड्या प्रांतात `हॅपी चाईल्ड नर्सरी' ही बाळगोपाळांची शाळा ३० वर्ष सातत्याने चालवणाऱ्या मंगला गर्दे या एक मराठी स्त्री आहेत ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे.

मंगला मूळ बेळगावची. लग्नानंतर काही दिवसांतच `व्होल्टास' कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्यासह मंगला धनबादला आली. धनबाद कोळशाची आबादीआबाद! खाणीतून व्होल्टासची मशिनरी बसवण्याचं त्यांचं काम! आणि कामानिमित्ताने सारखी फिरती! मंगला बी.ए. झालेली. वेळ चांगला जावा यासाठी तिने शिक्षिकेची नोकरी धरली. पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिला नोकरी करणं जमेना. दुसरी मुलगी जरा तब्येतीनं नाजूकच होती. धनबादला त्यावेळी पाळणाघरं वगैरेची सोय तर नव्हतीच. त्यातूनच मग आपणच छोट्या मुलांसाठी क्रेश किंवा प्लेस्कूल काढावं हा विचार मनात आला. बाहेरची मुलं येतील मग आपली सोनाली पण त्यांच्यात रमेल, तिचं रडणं कमी होईल एवढाच हेतू त्यावेळी मंगलाच्या मनात होता.

पण मनात कितीही बेत केले तरी मुलांची संख्या वाढल्यावर मुलांना कुठे बसवायचं? हा प्रश्न होताच. तोपर्यंत शाळा काढायची हा निर्णय या नवरा बायकोचा पक्का झालेला होताच. गावापासून जरा दूर एक प्लॉट त्यांनी बघितला होता. तेथेच शाळेची इमारत आणि राहण्यासाठी घर बांधावं अशी त्यांची कल्पना होती. पण ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मात्र मंगलानं स्वत: दिवसरात्र उभं राहून जातीनं देखरेख करून स्वत:ला हवं तसं बांधकाम करून घेतलं आणि २-२ ।। वर्षात सुंदर टुमदार इमारत उभी राहिली. राहण्यासाठी तीन खोल्या ठेवून बाकीच्या भागात शाळेचे वर्ग भरवायचे. गेटपाशीच `कृष्ण-कुंज' हे मंगलाच्या सासऱ्यांचं नाव घराला दिलं आणि शाळेच्या एका हॉलला अनंत-छाया हे तिच्या वडिलांचं नाव दिलं. शाळा सुरू करताना या भावदर्शी कल्पनेनं तिनं जणू या वडिलधाऱ्यांचे शाळेसाठी आशीर्वादच मिळवले.

मुलांना शाळा आकर्षक वाटावी यासाठी मागच्या बाजूला तिनं बाग करून घेतली व मुलांना खेळण्यासाठी छोटे झोपाळे, घसरगुंड्या, चक़्राकार फिरणाऱ्या खुर्च्या. ५-६ सायकली अशी छान खेळण्यांची सोय करून घेतली. मुलांचे आईवडील आपले शाळेच्या ऑफिसमध्ये फॉर्म वगैरे भरताहेत आणि मुलं मात्र बागेत रमलेली. शाळेच्या पहिल्या दिवशीसुद्धा एकही मूल रडलं नाही. शाळेतलं फेर्नचर छोट्या मुलांना सोयीचं होईल असंच बनवून घेतलं आहे.
मोठ्या हॉलमध्ये एका मोठ्या चौकोनी कमानीत मोठी सुरेख सरस्वतीची मूर्ती, तिच्याच उंचीची समई ठेवलेली. हॉलमध्ये रंगीत पताका लावलेल्या, भिंतीवर मुळाक्षरांचे तक्ते, इंग्लिश हिंदी दोन्ही भाषेतले. मंगला मुलांच्या विवंचनेत होती. दुकान थाटून गिऱ्हाईकांची वाट पाहणारा दुकानदार, थाटलेल्या डिस्पेन्सरीत पेशंटच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला डॉक्टर, अगदी तस्संच मंगलाचं झालं होतं.

धनबादकरांना २ ।।-३ वर्षांपासून मुलांसाठी शाळा असते, `हॅपी चाईल्ड नर्सरी' काय आहे, हे तरी २५ वर्षांपूर्वी कुठं ठाऊक होतं?
मुलांच्या पालकांना घरी जाऊन कसं सांगावं? मंगलाला `बिहारी' भाषा तरी कुठं येत होती? त्यांच्या वेषावरून इंग्लिश त्यांना समजेल का? आशेला धुमारे फुटले तरी त्यांचं रोपटं तयार व्हायला, बहरायला हवं. इथं मंगलाची जिद्द कामाला आली. हळूहळू सात मुलांची सत्तावीस मुलं झाली. बिहार रेल्वेत नवीन अधिकारी अगदी मराठी, महाराष्ट्नतलीच मंडळी यायला लागली. इथे या प्रांतात मुलांना शाळा? त्यांना प्रश्नच पडला होता. एक मराठी बोलणारी बाई एक `प्ले-स्कूल' चालवतेय असा त्यांना शोधच लागला. `हॅपी चाईल्ड नर्सरी'चा बोर्ड घराच्या दारावर, उंच असा लावला. बघता बघता आता २५० मुलं आहेत. ४ शिफ्ट होतात.

सकाळी आठलाच पहिल्या शिफ्टची मुलं यायला सुरुवात होते. ४ खोल्यांत विभागलेली १२५ मुलं! `गुड मॉर्निंग आन्टी', `गुड मॉर्निंग अंकल' म्हणत येणारी. एका युनिफॉर्ममधली, गळयात पाण्याची पेलेल एवढीच छोटी बाटली, थंडीचे दिवस, एकसारख्या, युनिफॉर्मला साजेशा कानटोप्या, २ । ।-३ वर्षांची थोडं बोबडं बोलणारी बछडी, लुटूलुटू चालणारी, पायातल्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत आपापल्या वर्गाकडे जातात.

नंतर १० ।। ला दुसऱ्या शिफ्टची मुलं. ती १ वाजेपर्यंत असायची. पहिल्या ४ शिक्षिका मुलांना जाणाऱ्या गाडीत बसलेली पाहून निघायच्या.

हो, मधल्या खाण्याची व्यवस्था शाळेतच. ८ दिवसाचा मेन्यू ठरलेला. मोड आलेले कच्चे दाणे चिमूटभर, छोट्याशा बत्ताशाएवढ्या इडल्या, नूडल्स, छोटी सँडविचेस, तर एक दिवस उपम्याची मूद, फळं म्हणून सफरचंदाच्या २ फोडी, कधी द्राक्षं. मंगला लवकर उठून नाश्त्याचा उपमा, पोहे करून ठेवते. सकाळी ८ वाजल्यापासून मुलं यायला सुरुवात होते. १२५ ताटल्या भरायच्या असतात. शिक्षकांनाही न्याहरीची बशी दिली जाते. सगळं खेळीमेळीनं चालतं.
हो, २-३ मुली कामाला असतात दिवसभर. सकाळी शाळेतल्या मुलांना वाढणं, छोट्या चटया साफ करणं, ताटल्या धुणं ही कामं त्यांना २ वाजेपर्यंत पुरवतात. मंगलानं मदतनीस म्हणून आणलेल्या या मुली जंगलातील आदिवासी आहेत.त्यांना आपल्याकडे ठेवून घेण्यासाठी मंगलानं धनबादमधल्या चर्चमधील फादरकडून रीतसर परवानगीचं पत्रं घेतलं आहे. या मुलींना श्रीगणेशापासून काम शिकवावं लागतंच. पण मुली प्रामाणिकपणे, निष्ठेनं काम करतात.
मंगलाच्या स्वत:च्या दोन्ही मुली चांगल्या शिकलेल्या आहेत. त्यांची आता लग्नंही झाली आहेत. पण या बागडणाऱ्या बालचमूमुळे घरात एक चैतन्य नांदतंय.