देवाचा लिंब

- एक -

आपल्या आजोबाच्या समाधीचं दर्शन घेऊन बारकू आंब्याखाली बसला. त्या डेरेदार झाडाच्या सावलीनं त्याच्या थकल्या-भागल्या जीवाला बरं वाटलं. समाईकातला हा आंबा म्हणजे त्या शिवारातलं थोरलं झाड होतं. बारकूचं बालपण याच झाडाच्या अंगाखांद्यावरती गेलं. सूरपारंब्या खेळताना तो कित्येकदा पडलाही. पण शेंदऱ्यावरचा त्याचा जीव काही कमी झाला नाही. पन्नास वर्षांपेक्षाही जास्त वयोमान असलेल्या झाडाचा गोतावळाही तसाच मोठा होता. डोंगरातल्या या आंब्याच्या कोया पार गंगा-मांजराच्या काठाला जाऊन भिडल्या होत्या. बयाजीआण्णानं आपल्या पाव्हण्या-रावळयांना हा आंबा न चुकता वानवळा म्हणून दरसाली दिला होता.

माळावरून पाहिलं की डोंगरझाडीतला शेंदऱ्या उठून दिसत होता. त्याला लागूनच, त्याच्याहीपेक्षा थोरलं झाड म्हणून `देवाचा लिंब' उभा होता. त्याच्या खालीच बारकूचा आजा आप्पा शेजाळाची दगडी समांध. म्हातारा मरून आता वीस वर्षे लोटली होती. तरीही बयाजी त्या समाधीवर येऊन बसत होता.बारकू आपल्या वडिलांकडे पाहात आपल्या आजोबांचं समाधीच्या दगडात कोरलेलं नाव वाचीत होता. `कै. आप्पाराव भाऊसाहेब शेजाळ' असं एका दगडात कोरून मृत्युदिनांकही लिहिला होता.

समाधी जुनाट झालती. लिंबाचा पाला, लिंबूळया तिच्यावर पडल्या होत्या. तर खाली आजूबाजूला आंब्याच्या वाळलेल्या पानांचा खच साचला होता. कदाचित आपल्या आज्यामुळंच या झाडाला `देवाचा लिंब' हे नाव पडलं असावं असं बारकूला नेहमी वाटायचं. गेल्या आठवड्यात दोनदा हे झाड त्याच्या स्वप्नात आलं होतं. हा लिंब समाईकातला असल्याने दुसऱ्या हिस्सेकऱ्यांनी विकायचा घाट घातला होता. `ऐन पेरणीच्या वक्ताला चांगला पैका हाती लागन् बयाजी... उगीच समांधीपाई आम्हांला नडवू नकूस!'' म्हणून सखाराम कोळपे त्याला बजावून गेलता. तेव्हापासून बारकूची झोप उडालती. शेंदऱ्यातला तिसरा हिस्सा घेतानाच सखारामने या लिंबाबाबत वाद घातला होता. पण बयाजीनं काननिराळं टाकलं होतं.

देवाचा लिंब तुटला तर आपल्या बापाच्या समाधीचं काय व्हणार? उन्हं पाऊस खात ती समांध उघडी पडंल! तिची वज ऱ्हाणार नाही, कुठलं बी कुत्रं-मांजर तिच्यावर बसंल! या चिंतेनं बयाजीचं काळीज पोखरलं जात होतं. म्हणून तो इळानीमाळ त्या समाधीवर बसून ऱ्हात होता. कुणी कुऱ्हाडी घेऊन आलं तर झाडाच्या खोडाला मिठी मारून म्हणायचा, ``आदुगर माझं खांडुळं करा आन् मंग ह्यो लींब तोडा!''

``आण्णा, मारती कोळप्या आलाय तुम्हांकडं, त्यो कोट्यावर बस्लाय्'' बारकूनं त्याची तंद्री तोडली. तो दचकून उभा राहिला. आंब्याचा पाला तुडवीत कोट्याकडं येताना तो अचानक थांबला आणि मागे वळून पाहात म्हणाला, ``बारकू, तू हीतच् बस्. कुणी यील लिंबाचा सौदा कराय..! बारकूने नुस्ती होकारार्थी मान हलविली आणि समाधीला पाठ देऊन बसला. डोईवरचा फेटा बगलात मारीत बयाजीआण्णा तरातरा कोट्याकडं आला. त्याला पाहताच दावणीला सकाळपासून बांधलेला हिऱ्या हंबरला आणि बयाजी बायकूवर खेकसला, ``आगं, बैलाला पाणी घातलंस की नाही? जनावर मगापासून तरसायलय् की पाण्यासाठी!''

``चार-चार रोज बांधून ठिवल्यावर ते दावणीलाच मरून न्हाय का पडायचं?'' कौसा कंबरेवर हात देत नवऱ्याच्या डोळयाला डोळे भिडवीत बोलली. मारुती कोळपे गळयातला गमज्या खाली टाकून त्यावर बसला.

``का रं आण्णा? चार रोज आन कशापाई?''

``काई नाही बघ मारती, ऊठसूठ बापाच्या समाधीची राखणच चाल्लीया आठ रोजापासून... कोण खायालया त्या दगडाला?''
``ह्ये%% तिरसिंगाबाई , आपलं काम बघ..!'' म्हणत तो तिच्यावर कावला.

आणि मारुतीकडे हसून पाहात त्याला विचारलं,

``कारं मारुती, नांगरट त् झाली वाटतं?''

``व्हय पर पाळी-पेरणी व्हयाचीया आजूक.''

``मंग माज्याकडं काय काम काढलंस..?''

``मला एकच बईल नव्हं का? तुज्या बरं सावड घालावा मंन्ल.'' तसा बयाजी खाली बसला आणि कपाळाला हात लावीत म्हणाला.
``आंबा तर पाडाला आलाय्, पर कावळयाला मुख रोग झालाय मर्दा!'' त्याचं हे सहजावारी बोलणं मारुतीच्या ध्यानात आलं नाही.
``पावसानं चांगले ढेकळं मुरल्यात, पाळी घालून ठिवावा मंन्लं.'' मारुतीने आपली अडचण सांगितली. तशी कौसा फणकारत म्हणाली,
``त्वा तरी नांगरूनल ठिवलस्, आमचं तर आजूक तसंच पडलंय.. त्या लिंबापाई!''

खरंच काय झालंय कौसावैनी त्या लिंबाचं..? सखाराम बी म्हणीत व्हता...'' मारुतीनं सखारामचं नाव घेताच बयाजी ताडकन उठून उभा राहिला. बगलातला पटका त्याने डोईवरती ठेवीत विचारलं.

``काय मंन्ला सखाराम? त्योच आमच्या लिंबामाघं लागलाय.. त्यानंच सम्दे वाटेकरी भरविलेत..!''

`कशापाई?''

``लिंब इकून आपापला हिस्सा घ्या म्हणून!'' तो सतत इकडून तिकडं चकरा मारीत होता. मध्येच त्या देवाच्या लिंबाकडे पाहात होता. तर लिंबाखालून बारकू आपल्या बापाकडे पाहात होता. लिंबाच्या गऱ्हाण्यानं वैतागलेली कौसा चुलीत तुराट्या घालीत म्हणाली.

``बरं, मी म्हंते आपल्या वाटणीत अजूक बक्कळ लिंबत्.. मंग त्यो एक तुटला म्हणून काय झालं?''

``आगं बाये%%! माजा बाप निजलाय त्या लिंबाखाली... तुव्हा सासरा!''

कौसा गप्पगार पडली. तिला काय बोलावं ते कळेना. पेटलेल्या तुराट्या पुढे सारीत तिने भगूनं चुलीवर ठेवलं. काळयाशार पडलेल्या त्या भगून्यात तिने पाणी ओतून पत्ती टाकली. डब्यातली साखरही घातली. बैलाच्या आशेनं आलेल्या मारुतीचा मध्येच चेपारा झालता. स्वत:चा एक बैल नि बयाजीआण्णाचा एक बैल जुपून औत धरायचं त्यानं मनात पक्कं केलं होतं. पण झाडाचं खूळ लागलेल्या बयाजीआण्णानं त्याला सपशेल उडवून लावलं होतं. तांेंडाला पट्टी लावल्यावाणी तो गप्प बसला होता.

- दोन -

बैल न मिळाल्यानं मारुती कोळपे आपल्या खोपटापुढे नाराज होऊन बसला होता. कोट्यापुढे बैल बांधलेला असतानाही बयाजी शेजाळनं त्याला धुडकावून लावलं होतं. ही सल त्याला सारखी बोचत होती. याचा कडता घेतलाच पाहिजे! बयाजीनं आपली आडणूक करून चांगलं केलं नाही! त्यालाबी गरज पडल्याबिगर ऱ्हातीया व्हय? मुंगीवाचून माणसाचं आडतया. ह्यो का दुसरा बईल आनायला वाड्या-खेड्या पालत्या घालणारय् व्हय? माझ्या बरं वाद घालून फसलास याजी तू%%! म्हणत तो गुडघ्यावर दोन्ही हाताचे पंजे मारीत उठून उभा राहिला. तोवर त्याची म्हातारी माय डोईवर दळण घेऊन आली. तिच्या डोक्यावरचं दळण घेत तो म्हणाला,

``आई, तुला मन्लं व्हतं की, माघारी आल्यावर मी दळण आनिन् म्हणूनशानं.''

``मारती, त्वा एकट्यानं तरी कुठवर करावं रं लेकरा? त्यायामुळं म्हनतेय येडी-वाकडी का व्हयना पर बायकू कर!'' त्यानं दळणाचा डब्बा घरात नेऊन ठेवला. म्हताऱ्या इंद्राबाईला आता काम होत नव्हतं. तरीही बसल्याजागी होईल तेवढं काम करी. चुलीपुढे बसल्यावर म्हतारीनं लेकाला विचारलं.
``दीला का रं बयाजीनं बईल..?''

``अं हं%%!'' त्याने रागातच नाकातून हुंकार दिला. म्हतारीनं चटकन त्याच्याकडे वळून पाहिलं, ``पण त्याचा बईल दावणीलाच बांधूनय् की?''
``देवाच्या लिंबानं येडं केलंय् त्याला.. स्वोताचीबी जमीन नांगरली न्हाई आजूक त्यानं.'' त्याने शेळयाच्या खांडात बसलेल्या कुत्र्याला खडा मारला. तसं कुत्रं क्यॅक्-क्यॅक् करीत पळालं. आडापस्तोर जाऊन पुन्हा गोंडा घोळीत माघारी आलं. त्याच्याकडे पाहात मारुतीने म्हतारीला विचारलं.

``आई, देवाच्या लिंबात किती वाटंकरीत्?'' त्याने डोळे लहान करीत म्हतारीकडे पाहिलं. दमखात बोलणाऱ्या म्हतारीच्या बोलण्याकडेच त्याचे कान लागले होते. कुत्र्यागत तो कान टवकारून बसला होता. तगारीतलं पाणी चुलीपुढे टाकीत म्हातारीनं कपाळाला हात लावले आणि लेकाकडे पाहात म्हणाली,
``बयाजीआण्णा, त्याचा थोरला भाऊ लिंबामास्तर, कोळप्याचा सकाराम आन् तुज्या बापाचा बी तिसरा हिस्साय् बघ त्येयात... पण देवाचा लिंबय् म्हणून आपूण कवाच त्या झाडात हिस्सा मागितला नाही. न्हायतर नुसत्या लिंबूळया इकल्या असत्या तर पाळी पेरणीचा खर्च्या निघाला आसता!'' म्हातारीच्या या माहितीनं मारुतीच्या डोळयांतली झाक गेली. आपणही त्या झाडात वाटेकरी आहोत हे त्याला आज पहिल्यांदाच कळलं होतं. त्या झाडाखाली कित्येकदा बसलोत् पण बयाजीच्या धाकानं लिंबूळीलाही कवा हात लावला नाही. बयाजीनेही आपण वाटेकरी असल्याचंही कधी कळू दिलं नाही. तो भुईवर पडल्या-पडल्या आभाळाकडे पाहात होता. देवाच्या लिंबाबाबत आता बरीक बयाजीला कातरीत पकडायचा! म्हणत त्यानं सुसकारा टाकला. तशा दोनचार शेळया ब्यॅ...ब्यॅ करीत ओरडल्या. मारुतीनं त्यांना पाणी घातलं.

गावात आलेला मारुती दिवस मावळता पुन्हा रानात गेला. गरबाडाच्या पायथ्याला असलेल्या आपल्या तालीत उभं राहून देवाच्या लिंबाकडे पाहिलं. राळीगत दिसणारं ते झाड स्वत:भोवतीच झट्या-झोंब्या घेत होतं. भ्यारची भ्यार दिसणारा तो लिंब कित्येक चांगल्या-वाईट गोष्टीचा मूक साक्षीदार होता. कित्येक उन्हाळे-पावसाळे खाऊनही ते झाड जशास तसं होतं. काळपट पडत चाललेली त्याची साल मात्र झाड म्हतारं होत असल्याचं चिन्हंच होतं. काही ठिकाणी भिरूड लागल्यानं ते जमिनीकडे झुकल्यावाणी दिसत होतं. पाखरांच्या कित्येक पिढ्याला त्याने आसरा दिलता. त्याच्याकडे एकटक बघत मारुती उभा होता. तेवढ्यात पांढऱ्याधोट बगळयांची माळची माळ लिंबाच्या शेंड्यावरती बसली. आन् ते झाड अपाशाचं शांत झालं. पंख हालवीत अलगद बसलेले बगळे जणू झाडाचा शेंडा झालते. या झाडाची दोन चांगली लाकडं जरी आपल्याला आली तरी आपलं भागतंय... खोपट मोडूनश्यानं त्या जागी चांगलं घर बांधता यील आपल्याला... घरादाराची दैनाच हाटून जाईल आपली..! हे म्हतारं झाड भुईला लोळविलंच पाह्यजी! झाडाकडे बघत मारुतीच्या मनात एक-एक विचार येत होता. पण लागलीच त्याला, हातात कुऱ्हाड घेऊन उभा असलेला बारकू शेजाळ दिसला. थोरला आंबा `शेेंदऱ्या'पासून तो आपल्या आजोबाच्या समाधीपर्यंत हातात धारदार कुऱ्हाड घेऊन येरझरा घालीत होता. तर बयाजीआण्णा हापशावरून पाणी आणून बैलापुढे ओतीत होता. जोडपिंपळ सळसळल्यावरच त्याची तंद्री तुटली.

देवाचा लिंब म्हणजे सगळयात जुनाट खोड. रात्री त्याच्याकडं जाण्याचीही भीती वाटायची. आप्पा शेजाळानं याच लिंबाखाली आपलं अर्धअधिक आयुष्य काढलं. शिवूरात घर आणि या झाडाखाली त्याची कोपी. याच कोपीत त्याला लिंबाजी-बयाजी ही पोरं झाली. रझाकाराच्या जमान्यात हा लिंब तरणाताठा होता. तसाच आप्पा शेजाळही रगदार होता. रझाकारं त्याच्यावर दात खावून होती. रात्रीबेरात्री त्याचा पिच्छा करीत ते गावातली सगळी घरंदारं धुंडाळीत, पण आप्पाचा पत्ता लागत नव्हता. अशा टायमाला आप्पा याच `देवाच्या लिंबावर आसरा घेई. आप्पारावानं सगळं गाव राखलं. गावातल्या सगळया जातीतल्या पोरांच्या फलटणी उभ्या केल्या. या तरण्या पोरांना तो नाना पाटलाच्या पत्री सरकारच्या गोष्टी सांगायचा. क्रांतिसिंहांनी गोऱ्यांच्या पायात कशा पत्र्या ठोकल्या तेही तो सांगत होता. रझाकारच्या पोलीस फलटणीतला एक जण आप्पानं आडवा केलता. त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन त्याची वाचा बंद केली होती. तेव्हापासून भेदरलेली रझाकारं आप्पारावाच्या मागावर होती. त्याच्या या जबरीमुळे गावातल्या, बाया-बापड्यांच्या इज्जतीवर हात टाकणारी रझाकारं त्याला चांगलीच वचकून होती. त्यांनी शिवूर गावाशी खेळणं बंद केलं होतं. फार झालं तर एखादं कोंबडं-बकरं ते ओढून नेईत. गावातून राच्चं-इराच्चं याच देवाच्या लिंबाखाली आप्पा शेजाळाच्या भाकरी-कोरड्यास येत होत्या आणि तेव्हापासून या झाडाला `देवाचा लिंब' हे नाव पडलं होतं.

- तीन -

चांगला अंधार पडल्यावरच बयाजीआण्णा गावात आला.

बारकूला राखणीसाठी रानातच ठेवला, साडेतीन एकर जिरायतावर त्याचं घर भागत नव्हतं. नाही भागलं तर मारवाड्याकडून व्याजानं पैसे घ्यावे लागायचे. नाहीतर मुकादमाकडून दोन कोयत्याचे पैसे घेऊन फॅक्टरी खेटायची.

बयाजीच्याही अगोदर घरी येऊन बसलेल्या कौसाने नवरा आल्याचं पाहून कंदिलाची वात वाढवली. त्याच्या जोड्याच्या आवाजाने डालीवर डोळे मिटवून बसलेल्या कोंबड्या दचकल्या. काही तशाच मानात-माना घालून निजल्या. वाशाला टांगलेला कंदिल भुईवर ठेवीत कौसा म्हणाली,
``मारत्या तुमची वाट बघून गेला, काय काम व्हतं त्याचं कुणाला ठावं?''

``तुझ्यापाशी न्हाय सांगितलं व्हय?'' पान्हईवर बसत त्यानं तोंडावर पाणी मारलं. धोतरानं तोंड पुसलं आणि तसाच पान्हईवर मांडी घालून बसला. मारुतीच्या घराकडे त्याने पाहिले. पण त्याच्या खोपटापुढे नुस्ता अंधार दिसत होता. गावाच्या टोकाला असलेलं त्याचं हे खोपट दोन वेळा नदीच्या पुरात वाहून गेलतं. तरी तो पुन्हा बांधून नदीकाठीच राही. त्याची वाट पाहात बसलेल्या बयाजीआण्णानं घरात पाहिलं. तो मोठ्या आवाजात म्हणाला -

``झालं आस्लं तर आन उल्सं कोरड्यास भाकर..''

``झालंय की यदूळाच्...आन् बारकूचं भाकरी कालवण कोण घेऊन जाणाराय्?''

``मीच जातो की %%! आनिक कोण जाईल?'' म्हणत जरा रागातच बोलला. गळयातलं उपरणंही पुन्हा पुन्हा बदलून-बदलून खांद्यावर टाकीत होता. भाकरीचा घास तोंडात घालीत मनालाच बोलत होता.

``एक एकाचा मुडदा पाडतो कुऱ्हाडीनं...निघालेत लिंबात हिस्सा मागाय! म्हणं समाईक झाडय्. समाईकातले धाबारा झाडं माधलदी तोडले तवा मागितला का आम्ही हिस्सा? सम्दे पैसे एकटा सखाराम कोळपेच खावून बसला... त्याचं चाळीस हजार कुठं गेलं? साल्याला झेलातच घालतो!'' पवान्हईवर बसल्या-बसल्या तो तावं=तावं बोलत होता. आता काहीबी केलं तरी देवाचा लिंब तुटू द्यायचा नाही. आन् आपल्या बापाची समांध उघडी पडू द्यायची नाही. अशी शपथ घेतल्यावाणीच तो बोलत होता. त्यासाठी त्यानं आपल्या प्राध्यापक भावालाही बोलावून घेण्याचं ठरवलं होतं. ताट पुसून शेवटचा घास घेत तो म्हणाला,

``कौसे, लिंबामास्तरलाबी तत्काळ बोलून घेतो.. मंग बग त्याच्यापुढं कसं सम्द्यांचे दाभाडं बसतेतं?''

``व्हय, घेवा दादालाबी बोलावून म्हंजी मंग जरा समद्यांच्या त्वांडाला कुलूप लागंल..!''

``बयाजी.. लेकरा, झाडासाठी कशापाई काठ्या कुराड्या करायलास..? आपलं दुसरं झाड लावावारं!'' भागा म्हातारी घरातनं थरथरत्या आवाजात बोलली. आईचं काकुळतीला येऊन बोलणं बयाजीला पहिल्यापासून पटत नव्हतं. म्हतारीचे नि त्याचे नेहमी भांडणं व्हायचे पण ती आता थकून पार गळाली होती. घरात जाऊन आईजवळ बसत तो म्हणाला, ``म्हातारे, नवऱ्याच्या समाधीवर्लं झाड तोडाय् लावतीस व्हय?''

``त्याकरता लिंबाजीला बोलवून घी... आपला हिस्सा वाटून घी, आन माज्या डोळयांदेखत माझ्या नातवाचं लगीन कर..!'' म्हणीत म्हतारीनं त्याच्या अंगाखांद्यावरनं हात फिरवला. तिच्या बोलण्यानं बयाजीआण्णाही जराशीक भावूक झालता. बारकूचं उरकलं पाहिजे असं त्यालाही वाटत होतं. पण एखादं स्थळ चालून येत नव्हतं. एखादी पोरगी बगाय जावं तर `पोरगं काय करतंय? कोणच्या नवकरीलाय?' म्हणून पाव्हणे विचारीत होते. त्यावर बयाजीचा चेहरा पडायचा. शेती करतोय म्हटल्यावर माणसं विषय बदलायचे. सगळया कुणब्याच्या पोरीलाबी नौकरदारच पाहिजे होते. पोरींचे बापच नौकरदाराच्या माघं लाखोंच्या थैल्या घेऊन पळत होते. बारकू बारावी होऊनही काही फायदा नव्हता. आपल्याला शेतीच करायची म्हणून घरच्यांना त्याने सांगून ठेवलं होतं.
नांगरटीच्या तयारीनं निघालेला बयाजीआण्णा बैल मागण्यासाठी मारुती कोळपेकडं आला. तर तोही आपल्या एकुलत्या बैलाकडे पाहात उभा होता. बैलाने पांगवलेला कडबा, चघळ-चाथा तो एकाजागी गोळा करून ठेवीत होता. बयाजी समोरून येताना दिसताच त्याने हातातलं काम बाजूला ठेवलं. तो दिसताच त्याला `देवाचा लिंब' आठवला.

``मारती, एकच बईल पर हात्तीवाणी ठिवलास की?'' बैलाच्या पाठीवर हात मारीत बयाजी बोलला. तशी मारुतीची छाती फुगली. अंगावर मूठभर मास चढल्यावाणी वाटलं. त्याच्या बैलाचं गुणगान गात बयाजी म्हणाला,

``माझा हिऱ्याबी काई कमी नाही, मारती. आपले हिऱ्या-मोत्या एक झाले तर आपल्या दोघांचेबी वावरं उलते-पालथे व्हतेलं की!'' बयाजी आपल्या कचाट्यात आल्याचा पाहून तो डोक्यावरची टोपी मोठ्या ऐटीत झटकीत म्हणाला.
``माझ्या गरीबाबरं तुजी सावड कशी जमायची रं आण्णा?''

``मारती, वावराची नांगरट ही आपल्या दोघांचीबी गरज आहे... ह्यात कुठं जात-पात, अमिरी-गरिबी येतीया..?''

``आता कसा आलास मर्दा वाटंवर%%! मुंगीवचूनबी माणसाचं आडतंय..!'' तो ओठातल्या ओठात पुटपुटला, तसा बयाजी पुढे होत म्हणाला, ``काय बोलतूस मनालाच? सोड बईल आन चल रानात माझ्या संगट.'' आपल्याबिगर ह्याचं भागत न्हाई आन् ह्याच्याबगैर आपलंबी भागत नाही हे मारुतीनंही ओळखलं होतं. पण काल ज्या थाटात आपल्याला बयाजीनं हाकलून लावलं त्याचा कडता आज काढायचा. देवाच्या लिंबात हिस्सा मागायचा. तसा मारुतीचा मोत्या फुरफुरला. शेपटी जोरजोराने पाठीवर मारीत तो णू आपल्या धन्याला दावणीचं सोड म्हणीत होता. त्याची ती घाई पाहून मारुतीने मोत्याला सोडला. हवेत फूत्कार मारून ते जित्राब डरकाळी फोडू लागलं. मान गदागदा हलवून बयाजी-आण्णाकडे डोळे रोखून पाहू लागलं.

भाकरीचं गठुडं बांधून मारुती वावराच्या वाटेला लागला. त्या दोघांच्या मागे-मागे मोत्या चालत होता. आणि त्याच्या पायात घोटमाळत मारुतीचं कुत्रं जिभल्या चाटीत पळत होतं. रानात आल्यावर बयाजीचा हिऱ्याही मोत्याला पाहून डरकाळया फोडू लागला. हिऱ्याने कासऱ्याला जोरदार हिसका मारला. तशी मेख ढिली झाली. बयाजी दोन्ही बैलाकडे पाहात म्हणाला,

``चल लगीच, आज सांजटाक्तोर माझं नांगरून घेवूत आन् लगेच उद्या तुझी पाळी घालू.''

``पर आण्णा, मला एक बोलायचं होतं.''

``आरं, बोल की!'' त्याच्याकडे वाकडी मान करून पाहत बयाजी म्हणाला, ``लागल्यात् तुज्या मोत्याला कडब्याच्या सताड पेंड्या दील की! कामून हेवडा जीव ल्हान करायलास?''

``तसं नव्हं आण्णा, मी रातीच् तुज्याकडं आलतो... देवाच्या लिंबाबाबद...''

``सखारामानी तुला काई सांगितलं व्हय?''

``अं.. हं..%% माज्या बापाचा बी हिस्सा व्हता म्हणं झाडात?''

``तर्र%% % हाय की! मंग हिस्सा जातुय कुठं?'' त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न करीत मारुतीच्या हाताला धरून आपल्या रानात आनलं. मारुती बळं बळं बांध ओलांडून त्याच्या मागे आला. बैलाचा कासरा मात्र त्याच्या हातातनं सुटता सुटेना. त्याची ही तगमग पाहून बयाजीच म्हणाला, ``मारती, आपुण चार वाटंकरी हायतं त्या लिंबात...'' त्याने पुढलं बोलण्याच्या आतच मारुती काकुळतीला येत म्हणाला.

``माझा, गरिबाचा हिस्सा मला मिळाला म्हंजी, यंदाच्या पावसाळयात तरी मला पाण्यात ऱ्हाव्हा लागायचं नाही... खोपटं मोडून मी चांगलं पक्कं इटामातीचं घर बांधीन् म्हंतोय.'' त्याचं हे बोलणं ऐकल्यावर बयाजीने त्याचा पक्का धरलेला हात हळूहळू ढिला सोडला. आन् खालमानेनं बोलला, ``तुज्यासारख्यानं आशी आडणूक केल्यावर आम्ही कुणावर भरूसा ठिवायचा?'' त्याने हात कपाळाला लावीत आभाळाकडे पाहिलं, आणि रानातली ढेकळं तुडवीत कोट्याकडे निघून गेला.

- चार -

`देवाचा लिंब तोडायसाठी वाटेकरी सरसावलेत.. तू पटदिरीनं गावाकडं यी...' म्हणून बयाजीआण्णानं थोरल्याला फोन केला. त्याचंही कॉलेज दोन दिवसात सुरू होणार होतं, म्हणून गावाकडं जावं की नाही या विचारात दोन दिवस मोडले. लिंबाजी प्राध्यापक झाल्यापासून त्याचं गावाकडे येणं-जाणं कमी झालतं. त्यात यंदा महेश बारावीला होता. त्याचा निकालही तोंडावर आलता. आपल्या वाटणीची पाळी-पेरणी कुणाकडे द्यावी? की दरवर्षीप्रमाणे बयाजीआण्णाकडेच बटईने राहू द्यावी? या साऱ्या प्रश्नानं त्याच्या डोक्याचं खोबरं झालतं. झाडाचं निमित्त करून बयाजी, गावी गेल्यावर बैलासाठी पैसे मागतोय की काय? पेरण्या जवळ आल्या की दरसाली बयाजी अशी मागणी मागल्या पाच वर्र्षांपासून करीत होता. हिऱ्याला जोडी पाहिजे म्हणून हट्ट धरीत होता. कौसावैनीही बैलासाठी तंडत होती. यंदा काहीही करून त्याला बैल घेऊन द्यायचा म्हणून लिंबाजी शिवूरला निघाला होता. जातानी त्याने आनंदाच्या भरात बायकोलाही सांगितलं.

``आगं,..लवकर आटप मला शिवूरला जायचंय.''

``पण इतक्या लवकर कशाला? बयाजीआण्णाला बोलावून घ्या, पाळी पेरणीचं त्यान्लाच सांगावं.''

``पेरणीला बैलं नकोत का?''

``आहे वाटतं एक बैल!''

``एका बैलावर भागतय् व्हय? त्याला दुसरा बैल घेऊन द्यावा लागतोय..''

``तेवढ्यासाठी गावाकडं जायचंय तर!'' चहा देत ताराबाइंर्नी डोळे मोठमोठाले करीत नवऱ्याकडे पाहिलं. बायकूचा हा संताप लिंबाजी दोन वर्षांपासून पाहात होता. बैल, शेती म्हटलं की ती काहीतरी आडफाटा घालीत होती. आजही तेच झालं. सोफ्यावर बसत तिने टी-पॉयवरचा पेपर उचलला आणि तोंडापुढे धरीत म्हणाली,

``महेशचा सीईटीचा निकाल जवळ आलाय... त्याच्या खर्चाचाही थोडा विचार करा. वेळ आली तर डोनेशनही भरावं लागेल. तो डॉक्टर-इंजिनिअर झाला तर आपल्याला कशाचीच कमतरता भासणार नाही. हे गाय, बैल, शेत काय देणाराय? माती अन् शेणमूत!'' ताराने झटक्याने पेपर सोफ्यात टाकला. सोफ्यावरचं बेडशीट रागाने झटकीत ती किचनमध्ये गेली. चहा पिऊन कपबशी खाली ठेवत लिंबाजी म्हणाला.

``त्यालाबी बी.एस्सी. ऍग्रीला लावणारय. त्यासाठी तर मध्यंतरी परभणी कृषी विद्यापीठात जाऊन आलतो.''

``अॅग्री करून का त्याला नांगूर धरायचा की बागायती करायचीय?''

``घरची शेती असल्यावर त्यात त्याला काहीही करता येईल..त्याचे द्राक्षे लॉस एंजलिस किंवा डेन्मार्कच्या बाजारपेठेतही जाऊ शकतील..!'' त्याच्या या बोलण्यावर किचनमधून काहीच प्रतिक्रिया आली नाही. सोफ्याखालची चप्पल बाहेर काढून त्याने पायात दाबली. टेबलवरचा जाड चष्मा डोळयावर लावून तो बाहेर पडला.

गावात आल्यावर मारवाड्याच्या कृषी सेवा केंद्रातून सरकीच्या दोन बॅगा घेतल्या. आन एक पिशवी तूर, बाजरी, असं बेवड त्याच्याकडून घेतलं. नाकावर येणारा चष्मा वर सारीत खांद्यावर ते बेवडाचं ओझं घेऊन तो घराकडे निघाला. पंचायतीत बसलेल्या बयाजीआण्णानं आपल्या प्राध्यापक भावाला पाहिलं. त्याची ती अवघडली अवस्था पाहून ताडकन् उठला. माणसातनं रस्ता काढीत त्याच्याजवळ आला.

``हेवढं वझं घेऊन चलत आस्तेतं व्हय? कुण्याबी पोराला सांगितलं असतं तर मी आलो आस्तो की दुकानीपस्तोर.'' म्हणत त्यानं बी-बियाण्याचं ते ओझं स्वत:च्या डोक्यावर घेतलं.

``पोरं-बाळं कसेंत. वैनीलाबी आनायचं आस्तं की. तेवढेच हातंपायं मोकळे व्हतेतं... रानाला येडा बी मारनं व्हतया!'' घामाने थबथबलेला चेहरा दस्तीने पुशीत लिंबाजी म्हणाला.

``देवाच्या लिंबाचा वाद मिटला नव्हं?''

``कशाचा मिटतुय? सम्दे हिस्सेकरी झाड तोडाय बस्लेत! आन् मी तोडू दीइना म्हणूनशान माझी जागजागी आडणूक करायलेत. मारत्यानं बईल दिला नाही, सखाराम कोळप्यानं चाडं आसून घरात लपवून ठिवलं.. भाईरचं कमी झालं म्हणून का काय, घरच्यानं बी ताणून धरलंया!''

``घरच्यांनी कुणी?'' दुसरीकडेच कुठं तरी मग्न असलेल्या लिंबाजीनं मोबाईलचा टॉवर न्याहाळीत विचारलं. तसं डोईवर्ल बी-बियाण्याचं ओझं खांद्यावर घेत बयाजी म्हणाला.

``बारकू म्हणतोय,'' पीककर्ज काढायला बँकीच्या फाईलवर अंगठा मारा म्हंजी जिरायतीची बागायती करून दावतो! मंग तरी माजं लगीन व्हईन... हुंडा-भांडा येईल.''

``त्याचं आजुक जमविलं नाहीस का कुठं?''

``त्याचं लगीन आन देवाचा लिंब ह्या दोन्ही झंजटीचा तूच निपटारा कर, दादा!'' दोघं भाऊ-भाऊ बोलत घरापर्यंत आले. इथवर येईस्तोवर बयाजीआण्णानं थोरल्याला सगळया गोष्टी खुलासेवजा सांगून टाकल्या होत्या. घरात बसल्यावर त्याने कौसावैनीशी थोडावेळ गप्पा मारल्या, पण त्याला आता रानाची आस लागली होती. कधी एकदा रानात जाऊन आप्पाच्या समाधीचं दर्शन घेतोय आणि त्या समाधीजवळ बसून स्वत:चं रान न्याहाळीत बस्तोय असं त्याला झालं होतं.

रानात आल्यावर त्याला निराळंच नदरी पडलं. सगळं शेत पडक पडल्यावाणी दिसत होतं. बयाजीनं वावर नांगरलं नव्हतं. शेजाऱ्यांची वावरं नांगरून उलती-पालती झालती. त्यांच्या गुळाच्या ढेपीवाणी ढेकळातून चालणंही अवघड जात होतं.

आपलं रान मात्र तसंच. आणखी पळाट्याही उपटिल्या. लांडग्याच्या दातावाणी वर आलेले तुरीचे धसकटं आणखी तसेच होते. लिंबाजीचा हिरमोड झाला. सोबत आलेल्या बारकूला त्यानं विचारलं, ``आण्णानं वावराची अशी टाळाटाळ का केली रं?''

``दादा, ह्याला सम्दा ह्यो देवाचा लिंब कारणीभूत बगा.''

``पण आतापर्यंत या झाडाबाबत कुणी काही बोलत नव्हतं?''

``हिस्सेदारांनी झाड तोडायचा धायटा लावल्यापासून आण्णाचं कामावरनं ध्यानच उठलंय बगा.''

``आता मग त्यावर इलाज?'' लांब पल्याडल्या वावरात पाळी घालणाऱ्या औताकडे पाहात लिंबाजीनं विचारलं.

``एक उपाय हायी, संमद्या हिस्सेदाराची तुम्मी एक बैठक घ्या आन ह्यो देवाचा लिंब तोडायचा की नाही ते सम्दे मिळवून ठरवा... ादा, तुम्ही हितं हायतं तवर हे घडलं..''

``पण लिंब तोडला तर आप्पांची समाधी उघडी पडतीया?'' लिंबाजी समाधीला पाठ देवून बसला. तसा बारकू चुलत्याला समजावून सांगत म्हणाला.
``आन् दादा, उंद्या समजा हे म्हातारं झाड वाऱ्या-कावदानात कोसळलं म्हंजी मंग?''
``हं... नाहीतरी आता झाड म्हतारं झालंय. साल गळू लागलीय्- शेंड्याचे फाटे वाळून चाल्लेतं...'' लिंबाजीने उभं राहून सगळा लिंब निरखला. त्याच्या बोलण्याला टेकू देत बारकू म्हणाला.

``आन् दादा, चारपाच वर्सांत दुसरं मोठ्ठं झाड समाधीजवळ यील की! मीच लिंबाचं न्हायतं वडाचं झाड लावतो बगा!''
बारकूची झाड तोडण्याची ही लगबग मात्र लिंबाजीच्या ध्यानात येत नव्हती. विशेष म्हणजे बयाजीनं झाडाच्या राखणीला म्हणून त्याला ठेवला होता. त्याच्या हातात एक फर्शी कुराड दिलती.

आंब्याच्या गार सावलीत दुपारी जेवायला बसल्यावर बयाजीआण्णानं सालाबादप्रमाणे बैलाचा विषय काढला. कौसावैनीने घट्ट दही लिंबाजीला वाढलं. आन बाजरीची भाकर त्याला देत म्हणाली,

``व्हय दादा, हिऱ्याला जोडी मोत्या फायजीच बगा. मंग बघा वावर कसं गुळावाणी दीस्तया..''

``मोत्या आनायचा म्हंजे बाजारात जावं लागंल?''

``काय गरजय? हीतच मारती कोळप्याकडून घेऊ की... त्यो इकायचा म्हणतोय त्याचा बईल.'' कौसावैनीनं झटक्यात सांगितलं.

``पर त्यो मोप पंधरा हजाराशिवाय बैलाला हात लावू देणार नाही म्हणतोय. बारकूने घास चावीत संागितलं.

``कमी-जास्ती करून आठ-दहा हजारा पस्तोर देईल बघ, लिंबा.'' बयाजीआण्णानं मांडीवर भाकरी ठेवीत कांदा फोडला.

``पर आपल्याला देईल का आता?'' कौसानं शंका विचारली.

``का नाही द्यायचा?''

``देवाच्या लिंबात वाटंकरी झालाय् त्यो!''

``देवाच्या लिंबाचा अन् बैलाचा कुठं समंध येतोय?''

``तर %% दीला का त्यानं नांगरटीला बईल?'' कौसाच्या बोलण्यानं बयाजी गप्प पडला. कांद्यामुळे डोळयांतनं पाणी येत होतं. जीभही पोळली होती. तो तसाच उठला अन् समाधीवर ठेवलेल्या केळीतलं गारचीक पाणी ढसाढसा ढोसू लागला. तरीही ल्हा-ल्हा करीतच होता.

लिंबाजीला येऊन दोन दिस लोटले तरी झाडाचं खेंगटं मिटत नव्हतं. त्याने बारकूला पाठवून सगळया हिस्सेकऱ्यांना बोलावून घेतलं. सखा कोळपे, मारुती कोळपे यांना त्याने गावभर हिंडून धरून आनलं. बयाजी आणि लिंबाजी दोघेही पुढच्या कुडात बसले होते. बयाजीची नेहमीची पान्हईची जागा आज म्हतारीनं घेतली होती. लिंबाजीने झाडाचा विषयच काढला नाही. सरळ मारुतीला विचारलं, ``केवड्याला द्यायचा तुजा मोत्या?'' तसं त्याने सख्या कोळपेकडे पाहात सगळयांचे चेहरे न्याहाळले. आणि मुरमुशा हासत म्हणाला, ``गरिबाची थट्टा करता व्हय दादा?'' तसा सखा कोळपे सावध होत म्हणाला.

``आरं इच्यारतोय त्यो तर सांग की सौद्याचा दाम!''

``तसा मला बईल इकायचा नव्हता. पर त्याचा जोडी घेयला बी माज्याजवळ दाम नायतं की!''

``दाम बी येतेल की रं, मारती, देवाच्या लिंबात तुजा वाटा हाई की जणू?''

पान्हईवर आलेल्या भागाबुढीने तोफ डागली. सगळयांनी पाठीमागे वळून पाहिलं. बीडी शिलगावून काडी लांब फेकीत सखाराम म्हणाला,
``मोप वाटेकरीत आम्ही, पर लिंबाचं सर्पणच न्हेवा लागतय् आम्हांला घरी!'' तवर बयाजीआण्णा हात लावू देत नाही झाडाला.''
``सखाराम बात झाडाची नव्हं बैलाची चाल्लीया.. उगच मधी खुसपट घालू नकू.'' बयाजी दोन्ही पायाच्या पंज्यावर बसत तादरून बोलला. ``आर्रा%% आम्ही का उपलनीन् व्हस म्हणून तू दाब देयालास?'' सखारामही रगीलपणावर येऊन ठेपला. मुळातच दंडेल असलेल्या सखाने सगळे वाटेकरी पेटवले होते. आताच लिंबातला हिस्सा मागा नायतर झाडाला भिरूड लागलं तर आपल्याला भुशाचे पोते भरून न्हेवा लागतील..!'' म्हणून सखाने सगळयांच्या मनात भरविलं होतं. हे बयाजीआण्णा जाणून होता.

``वादानी वाद वाढवू नका..'' कौसानं त्या दोघांचं बोलणं वाढण्याच्या आत थांबविलं होतं. तरीही नाक फुगवीत सखाराम म्हणाला, ``वादाचाच इशेय केलाय बयाजीनं ह्यो!''

``आता विषय फक्त मारुतीच्या बैलाचाय्.. त्यानं इक्रीला काढलाय् का नाही ते बोलाव!'' लिंबाजीनं तंबाखू मळून ओठाखाली घातली. झाडासाठी सखाराम कोळपेचा जीव तळमळत होता. ``बैलाचाच सौदा ठरवायचा होता तर मला कशापाई ह्या बैठकीत बोलविलं होतं? असंही बोलण्यासाठी त्याचे ओठ थरथरत होते. पण त्याने तसंच मनात दाबून ठेवलं.

देवाच्या लिंबासाठी टपलेल्या ह्या सखाराम कोळपेला पाहिलं की बयाजीआण्णाच्या डोळयांत रक्त उतरत होतं. झाडाचं नाव निघालं की त्याची जीभ छाटून टाकावी! त्याचा आवाजच कायमचा बंद करावा, असं त्याला वाटत होतं. बापाच्या समाधीआडून बयाजीआण्णा सगळयांना मुद्दाम वेठीस धरीत असल्याचं सखाला वाटत होतं. बयाजीच्या उरावर बसून हा लिंब तोडलाच पाहिजे! अशी जणू त्याने आन घेतली होती. त्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता. त्यासाठी त्यानं वनखात्यातील काही माणसंही हाताखाली धरली होती. सरकारी कचाट्यातनं त्यानं रस्ता काढला होता. सखाराम कोळपेच्या या धूर्तपणापासून बयाजीआण्णा कोसो दूर होता. पांडुरंगाचं नाव घेऊन तो `देवाचा लिंब' वाचवण्यासाठी आषाढी कार्तिकी करीत होता.

बराच वेळ बैलाच्या सौद्यावर रंगलेली बैठक शेवटी उठली. रोख आठ हजारात आपला `मोत्या' देण्यास मारुती कोळपे तयार झाला. इसारापोटी लिंबाजीने त्याला हजार रुपये देऊ केले. आपली टोपी मागे-पुढे सारीत थरथरत्या हाताने त्याने ते पैसे घेतले. आपला लाडका मोत्या आपल्याला सोडून जाणार याच्या काळीजकळा त्याच्या तोंडावर दिसत होत्या. ऐन पेरणीच्या तोंडावर आपल्या घरातून हे धन चालल्याचं पाहून त्याच्या काळजाला पीळ पडला होता. बयाजीआण्णा मात्र हिऱ्याला तसलाच देखणा जोडीदार मिळाल्यानं जाम खूष होता. त्याच्या काळजाला जणू पंख फुटले होते.

- पाच -

पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला मृगाच्या पहिल्याच पावसाने दिलासा दिला. पावसाच्या रीपरीपीने देवाचा लिंब चिंब झाला. वाटेकरीही पेरण्यांच्या कामात गुंतले. सरकी लावता-लावता त्यांचं कुबड गेलं. त्यामुळे लिंबात हिस्सा मागणारे मारुती, सखा शांत झाले. तरीही बारकूला बयाजीनं राखणीला बसवलंच होतं. चार रोजात एकट्या बयाजीआण्णानं सगळं वावर नांगरून पाळी घातली. लिंबाजीनं बैल घेऊन दिल्यावर त्याच्या अडीच एकराच्या दोन-तीन पाळया घातल्या होत्या वावराची दैनाच फिटली.

मृगाच्या पावसानं विश्रांती घेतली. आन् आठव्या दिवशी वारंकावदान सुटलं. गावभर नुस्ता धुरुळा उठला. गोरगरिबाची खोपटं उडाली. वारं सुटलं तसं आभाळही गर्जू लागलं. गावातली दोन-तीन जुनी झाडं कडा-कडा करीत मोडली. भुईभांड झाली. शेत शिवारात गेलेले शेळके-मेंढके आपली जित्राबं हाकीत गावात परतू लागली. गाई-बैलांच्या खुरातून उठणारा धुरळा शिवारभर पांगू लागला. वारं काही केल्या कमी होत नव्हतं. बारकू रानात एकटाचय् म्हणून कौसाने धायटा लावला होता. तर, त्याला काई व्हणार नाही! म्हणून बयाजी तिची समजूत घालीत होता. तरीही ती सारखी रानाकडून येणाऱ्या वाटांकडे पाहात होती. बयाजीने, मोकळया पटांगणात बांधलेले हिऱ्या-मोत्या लिंबाखाली नेऊन बांधले. वाऱ्यामुळं त्यांचा सारखा तोल जात होता. लेकाची वाट पाहणारी कौसावैनी तशीच कुडात बसून होती. तिला लवणातून वर येतानी कोणीतरी दिसलं. त्याच्या अंगावरचे पांघरूण फडफडत होते. त्यानं आपल्या सदऱ्याच्या गुंड्या गच्च धरल्या होत्या आणि दुसऱ्या हाताने एक लांबलचक लाकूड हातात धरून ओढत होता. तसा बयाजीआण्णा लगबगीने त्याच्याकडे पळाला. बारकूच्या हातातला लिंबाचा फाटा घेत त्याने विचारलं,

``लिंबाची फाटी कुणी मोडली रं?'' त्यानं काळजावर हात ठेवला. सुसाट वाऱ्यामुळं दोघांचंही बोलणं एकमेकाला ऐकू येत नव्हतं. डोंगरकपारीतून येणाऱ्या सू..सू...अशा आवाजाने काहीच कळत नव्हतं. घरी कुडात फाटी ठेवल्यावर बारकू तिच्यावर डोक्याला हात लावून बसला. तो काय सांगतोय याकडं जीव लावून बसलेल्या माणसांच्या तोंडाकडे पाहात तो म्हणाला, ``आण्णा आपला देवाचा लिंब वाऱ्यात सम्दा मोडून पडलाय..!'' हे ऐकून बयाजीआण्णा थोडावेळ गपचीप झाला. डोकं दोन्ही हाताने दाबून धरीत खाली बसला. त्या फांटीकडे पाहात म्हणाला, ``पांडुरंगाच्याच मनात व्हतं...तितं मी कोण अडविणार?'' देवाचा लिंब वाऱ्याकावदानात पडला म्हटल्यावर सखाराम कोळपेला आभाळ ठेंगणं झालं. तो दुसऱ्या दिवशी सकाळीच रानात आला तर भ्यार ची भ्यार ते झाड राक्षसावाणी भुईवर आंग टाकून निजलं होतं. आणखीही त्याचा हिरवागार पाला वाऱ्याच्या झुळकीवर थरथरत होता. त्याची झळाळी खुलून दिसत होती. बुडातून उखडलेल्या झाडाचं खोड कवेत मावत नव्हतं. त्याच्यावरतीच बसून राहावं, असं बयाजीला वाटत होतं. पण दहा-बारा दिवसात तर सगळया वाटेकऱ्यांनी आपापल्या वाट्याची लाकडं तोडून नेली. ज्याला जमंल तसा लिंब तोडून काढला, गिधाडानं मेलेल्या जनावरांचे लचके तोडावात तसा.
देवाचा लिंब तुटून सहा महिने झाले. आप्पा शेजाळाची समाधी उन्हं-पाऊस खात उघडी पडली. पावसाने ती धुवून निघालती.

बारकूचं लगीन दिवाळी होऊन झालं आणि आपल्या नव्या नवरीला घेऊन तो आजोबाच्या दर्शनासाठी रानात आला. सोबत कौसा-बयाजीआण्णाही होते. समाधीचं दर्शन घेऊन तो उठला. समाधीला उजव्या हाताकडून चकरा मारू लागला. त्याच्या मागे त्याची नवरीही चालू लागली. लिंबाच्या लालपट पडलेल्या बुडाजवळ ती थांबली. डोळे मोठाले करीत खाली बसली. आपल्या सासूकडे पाहात म्हणाली,

``आत्या हे लिंबाचं झाड पुन्हा फुटलंय की!'' तसे ते दोघंही धावून आले. बयाजीआण्णानं डोळे फाडीत त्या कोवळया धुमाऱ्याकडे पाहिलं. त्याच खोडातून नवीन नवती फुटलेला लिंबाचा फोकारा वरी आलता. त्याची विटकरी रंगाची कोवळी पानं हाताला लुसलुशीत लागत होते. कौसावैनीनं लागलीच एक कुपाटी आणून त्या कोवळया झाडावर ठेवली. समाधीकडे पाहत हात जोडून उभं राहात बयाजीआण्णा म्हणाला, ``आप्पा, तुमची ही सावली कवाच हाटायची नाही... देवाचा लिंबच तुमच्या पाठीशी उभाय्... जसे तुम्ही आमच्या पाठीशी आयुष्यभर उभे ऱ्हायलात...!''

Hiphop, Rap, Türkçe rap