आज निकालाचा दिवस. घरातून तयारी करून क्रॅालेजकडे निघाले. मुलीलाही मुद्दाम नटवून सोबत घेतलंय. मनात खात्री आहे तरीही धाकधूक वाढतंच आहे. कॉलेजच्या पायऱ्या चढतानाही पाय लटपटायला लागलेत. तग धरून गेल्यासारखी मी क्लार्कसमोर जाऊन उभी राहिले. त्यानं नाव शोधून हसत माझ्याकडे पाहिलं नि म्हणाला, `पेढे'. त्याच्या त्या शब्दाबरोबर माझं सर्वांग उचंबळून आलं. त्याला काहीतरी बोलले नि बाहेर पडले. मार्क्समेमोवरचे मार्क्स पाहिले.माझ्यासारख्या वेडीला इतके चांगले मार्क्स. डोळयांतून खळखळ पाणी आलं. समोरचे गुणपत्रक दिसेना झाले. काहीच कळेना. पोरीला कडकडून मिठी मारली. तिचे `पापे' घेतले. तिला एवढंच म्हटलं, ``पोरी आपण जिंकलो.!'' तिथेच खुर्चीवर बसकण मारली. डोळयांसमोर विस्तीर्ण पसरलेलं छोटंसं आयुष्य. या आयुष्याचे किती पाट निघाले. मनस्ताप, तडफड, मरमर, अवहेलना, अपमान, मानहानी, चीड, जिद्द, स्वाभिमान, अस्तित्व या सगळया गोष्टी एवढ्या छोट्याशाच पण विस्तीर्ण आयुष्यात आपल्या वाट्याला आल्या. आज या सगळया गोष्टी माझ्या उद्ध्वस्त आयुष्यासोबत लख्ख दिसायला लागल्यात. आपल्या आयुष्याला आपण आकार दिला. पण याची सुरुवात कुठून झाली असेल बरं ?
अशा आयुष्याची सुरुवात नेमकी कुठून झाली म्हणावं. बालपणी तर आई-वडिलांच्या पूर्ण प्रभावाखाली होते. पण तेव्हासुद्धा मी भावंडात वेगळी असावी असं आता वाटतं. कदाचित हा गर्वही असेल. पण काही गोष्टी आठवतात. आम्ही पाच भावंडं. मी चौथ्या नंबरची. मोठ्या दोन बहिणी, एक भाऊ आणि माझ्यानंतर एक भाऊ. घरची परिस्थिती बरी. वाईटही नाही आणि चांगलीही नाही अशी. वडील मधून मधून बाजाराला गेले म्हणजे कधी आठवण झाली आणि खिशात पैसे शिल्लक असले की आमच्यासाठी म्हणून चिवडा, जिलेबी घेऊन यायचे. आम्ही ते येणार म्हणून दारातच वाट पाहात बसायचो. तेव्हा मी जेमतेम दुसरी तिसरीला असेन. मोठ्या बहिणीनं चौथी पास होऊन शाळा सोडून दिली होती. वडिलांनी सांगितलं की ती आता मोठी झाली. त्यामुळे गावात शाळा असली तरी बरं दिसत नाही. दुसऱ्या नंबरची कशीतरी सहावीपर्यंत पोचली होती. सातवीला बोर्डाची परीक्षा असते आणि चार दिवस केंद्रावर जाऊन राहायचं नि परीक्षा द्यायची, त्यामुळे तिचीही परीक्षा रद्द केली होती. ती सुद्धा घरीच होती. बाकी आम्ही कसेतरी शाळेत जात होतो. वडील आले की हातातलं धोतराचं गाठोडं माईजवळ द्यायचे. त्या धोतरात बांधून आणलेले एक एक पुडे माय चाचपून पाहिजे तो सोडायची आणि जिलबी-चिवड्याचे वाटे घालायची. पाच वाट्यांत मोठ्या दोन्ही बहिणींच्या वाट्याला थोडं थोडं आणि आमच्या तिघांच्या वाट्यातही मला कमीच वाटा असायचा. ते पाहिलं की राग यायचा! ``मला काऊन कमी?'' माय मात्र चिडून म्हणायची ``पर्रदिसे, तुला काय लागलंय कितकालंबी मागायला. खाय रे बापू, तूव्ह तू खाय, त्या रांडला बोंबलू दे.'' मला त्याचाच राग यायचा. त्यामुळे आईचाही. माझ्या दोन्ही बहिणी मात्र निमूटपणे समोर आलेलं संपवून टाकायच्या. त्यांचं तसं निमूट असणं तेव्हा मोठ्या झाल्याचं लक्षण वाटायचं. आता नाईलाजेचा स्वीकार वाटतो. माझ्या रडण्याकडे तसं कुणाचंच लक्ष नसायचं. कधीमधी मायच म्हणायची, ``पोरीच्या जातीला काय करायचाय इतका चवणा? देला तितकं खावं आन् गप बसावं. उद्या सासरी गेल्यावर ती रांड मह्या नावानं बोंबलंल की, पोरीला ह्येच शिकवलंस का म्हून.'' तेव्हा काही कळतही नव्हतं आणि वळतही नव्हतं. पण हळूहळू लक्षात येऊ लागलं. मोठ्या बहिणी त्यांना जेवढं उमजलं तेवढ्यापुरतं सांगायच्या. त्यांचं तरी वय कुठं वाहत चाललं होतं. नकळत्या वयात त्यांनी समजून घेतलं होतं.
बहुतेक भांडणाची अशीच कुठूनतरी सुरुवात झालेली असावी. पण तेव्हापासून भावांचा राग यायचा. आता सगळयाच नात्यातल्या स्वार्थाविषयी मनात अढीच आहे.
मला एका गोष्टीचं नवल वाटतं की, बापानं मला सातवी पास झाल्यावर, कोसभर लांब शाळेत आठवीला येणंजाणं करण्याची परवानगी देऊन दाखल केलं. ज्या बहिणीला सातवीला तो चार दिवस बाहेरगावी राहू द्यायला तयार नव्हता आणि आता मात्र मी दिवसभर बाहेर राहणार होते. आणि त्यांच्या हिशोबाने कळतीही झाले होते, पण बापाचं काही कळत नाही. कदाचित ती सहावी पास झाली तेव्हा दुष्काळ पडला, आणि खाण्यापिण्याची आणि घराण्याच्या मोठेपणाची आबाळ होऊ लागली. ती झाकण्यासाठी म्हणून बापानं तिला सरळ शाळेतून काढलं नि खंटीच्या कामाला जुंपलं. वरून तो रोज तिला रागवू लागला. ``मायझे, कारटी तीनदा सांगायलो की रोजदारावाणी खंटीच्या कामाला जाऊ नगं त, आयकनं झाली.हिच्या दोस्तीनीचंच घरात येणं बंद करावं लागतंय.'' पण घरातून माय जबरदस्तीनं पाठवायची. म्हणायची, ``ते काई बी मनोत तुव्ह तू जाय. त्यायला काय लागलंय रिकामं बोंबलायला. दारात बोंबलतेत आन् घरात गेलीका म्हून इचारतेत.'' ती बिचारी गुपचूप जायची, सोबत गोरगरिबाच्या मैत्रिणी होत्या. त्यांच्यापेक्षा आमचं घर बरं होतं. त्यामुळं बापाला आपली इज्जत गेल्यासारखं वाटायचं पण गरज होती आणि नाईलाज होता.
मी दुष्काळानंतर सातवी झाले. तेव्हा बऱ्याच मुली शिकायला जाऊ लागलेल्या. वर्ष सहा महिने शिकायच्या आणि मग त्यांचं लग्न ठरायचं. लगन कधीही होवो, त्या क्षणापासून त्यांचं शिक्षण बंद व्हायचं. मग त्या घरातच डांबल्यासारख्या राहायच्या. त्यांच्यावर साडी नेसण्यापासून वागण्याबोलण्यापर्यंतचे सासरच्यांना खूष करण्याचे संस्कार व्हायचे. या सगळया गोष्टींचा पगडा आमच्यावरही होताच. बापाचं मोठेपण एवढंच की त्यानं मला शाळेत जाण्यायेण्याला परवानगी दिली. कदाचित माझ्या मोठ्या भावाच्या संदर्भातली ही एक प्रतिक्रिया असेल. मोठा भाऊ जेमतेम दिवाळीपर्यंत शाळेत गेला. त्याचं शाळेत लक्षच नव्हतं. शाळेच्या रस्त्यावरच आखर होता. गुरुजींनी अभ्यास सांगितला की शाळा बुडवून आखरावर गुराखी मुलांसोबत दिवसभर त्यांची गुरं चारायचा. पुन्हा शाळेत गेला की मार खायचा. त्याला गावातल्या शाळेसारखं वाटत होतं. इथं बापाच्या भीतीनं शाळेतले मास्तर त्याला काही म्हणत नव्हते, तिथं परगावच्यांना काय देणं घेणं आणि बापाची तरी काय ओळख होती. त्याचा परिणाम असा, शेवटी त्यानं माईला सांगितलं की, ``मास्तर मला निस्त मारायलेत. म्या काई शाळंत जाचा न्हाई. आन् तुमी जर मला ज्याजती करून शाळंत झाल्ड, त म्या पुना वापस यायचा न्हाई. म्या मह्या जीवाचं काईबी करून घेईन.'' त्याच्या तशा निर्वाणीच्या बोलण्यानं माय घाबरली. मला लक्षात आलं. हा माझा मोठा भाऊ त्याला पाहिजे असलेली कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर अशाच प्रकाराचा वापर करायचा. बापानं त्याला नाही नाही त्या शिव्या दिल्या. त्याच्यासोबत आईनंही खाल्ल्या. पण ती बापाला बधली न्हाई. तिचं एकच म्हणणं होतं,
``शाळा शिकून तरी काय व्हणार हाय ? लोकावानी नौकऱ्या करायला का आपून भिकारी हायत का ? मह्या लेकानं बसून खाल्लं तरी जलमभर सरायचं न्हाई. उगी लोकायची ताबेदारी कोण करायलंय? जळू दे मेली ती शाळा. काई गरज न्हाई.''
माईच्या अशा बोलण्यानंच तो बराचसा मग्रूर झालेला होता. बापाचं त्यानं ऐकलं नाही. कधी नाही ते बाप शिकवीत होता. त्याचा परिणाम माझ्यावर असा झाला. बापानं माझा दाखला परगावच्या शाळेत आठवीत टाकला.
मोठ्या भावाचं आणि माझं जन्मात कधी पटलं नाही. त्यावेळी तर सारखीच मारामारी. मला वाटायचं, मी मायबापाचं काम ऐकेन. तुझं काय म्हणू ऐकू ? त्यो मला सारखं काही न काही सांगायचा. कधी कंगवा-दे, भींग दे, कधी पाणी दे. मी म्हणायची, तुला हात न्हाईत का ? का तुह्या हाताला लखवा झालाय ? असं बोललं की माय चिडायची. जवळ असली की पाठीत दणका बसायचा.
``पर्रदिसी रांड, कव्हा नादर बोलायची न्हाई. तुझा मोठा भाऊ हाय नं. मंग त्याचं काम केलं त तू झिजशील का ? तेच काम करायचं की जलमभर. पोरीच्या जातीनं कसं राहावं काई कळतंय का ?''
माईच्या तोंडी कायम पोरीची जात होती. मला नवल वाटायचं की हिला दिसत नसंल का की त्यो निस्ता ठेसून खालाय आन् बसून राहायलाय. तरीबी त्याच्या म्या पुढी पुढी करायचं. म्या कोसभर जाणं-येणं करते आन् ह्यो पुन्हा मला तरास द्यालाय.'त्यावेळी त्याचा रागही येत होता. एकतर त्याला आमच्यातला सगळयात चांगला हिस्सा मिळायचा आणि सगळयात कमी काम असायचं. त्याचा मला राग यायचा आणि मग मारामारी ठरलेलीच. माझं मारणं तसं मारतानासुद्धा वाटायचं की उगी मरत्या अंगी लागलं.. तर... त्यामुळं मी विचारपूर्वक, तो मात्र आडभाड मारायचा. कुठंही मार लागो, त्याला चिंता नसे. त्याच्या मारण्याची नंतर नंतर भीतीच वाटू लागली. आणि त्या भीतीपोटीच मनात चीड असूनही मी त्यानं सांगितलेलं काम ऐकू लागले. हळूहळू तो घरातलं प्रस्थ बनू लागला. मी जर काम ऐकलं नाही तर आता आता तो मला तिथून रागानं येऊन एक रट्टा पाठीत द्यायचा नि मारीतच सांगितलेलं ऐकायला लावायचा!
सगळयांच्याच घरात हे असंच चालत असल्याने कुणालाही त्यात काहीच चुकीचं वाटत नव्हतं. पण त्या नकळत्या वयात मात्र भावाविषयी प्रचंड राग साठून राहिलेला होता. मला तर मारायचाच. पण त्याच्यापेक्षा मोठ्या बहिणीलाही तो मारायला कमी करायचा नाही. माईला मात्र त्याचं काहीच वाटत नव्हतं. तो अत्यंत महत्त्वाचा आहे याची जाणीव सारखी होत राहायची. त्यामुळं या दोघांविषयीचा राग मनात ठासून भरलेला होता.
दररोज सकाळी शाळेत जाताना आखर भरलेला असायचा. आमचा जाण्याचा रस्ता आखराजवळून जायचा. तिथले काही गुराखी फारच आगाऊ होते. जाताना काही न् काही तरी म्हणायचे. माझ्यासोबत गावातल्या दोघी आणि बौद्धवाड्यातल्या चौघी होत्या. गावातून निघताना आमची भेट व्हायची नाही. पुढे गेल्यावर मग एकमेकींची वाट बघायचो. मुलं घोळक्या घोळक्यानं चाललेली असायची. आमच्या पुढं चाललेला एखादा घोळका असेल तर तो आमच्यासमोर काहीतरी बहादुरी गाजवण्याचा प्रयत्न करायचा. कुणी कुपाटीवरून उडी मार, कुणी कुणाच्या पाठीवर बस, मोठ्याने बोलून आम्हांला ऐकवण्याचा प्रयत्न कर असं काहीतरी चाललेलं असायचं, पण आमचं त्याकडे लक्ष नसायचं आणि तेही त्यांची पायरी सोडून वागत नसत. हे गुराखी आम्हांला पाहून कधी अचकट विचकट बोलायचे, कधी हावभाव, हातवारे करायचे, आमच्या कपड्यांवर बोलायचे. बाकीचे फिदीफिदी हसायचे. त्याच्या मनातून राग यायचा पण त्यांना खडसावण्याची कधी हिंमत झाली नाही. उगीच भीती वाटायची. एकतर घरची भीती आणि शिवाय शिवारातून जाताना रस्ता ज्वारी तुरीच्या मधून जायचा. वाटायचं आपण आज बोललो आणि यांनी डूख धरून आपल्याला अशा ठिकाणी अडविलं तर... त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं ! असंच चाललं होतं.
मला तो दिवस चांगला आठवतो. कधी नाही ते मी दोन वेण्या घातल्या होत्या आणि फुगा करून वळण घेतलं होतं. आम्ही आखराजवळून शाळेकडे निघालो तर एक पोरगं मोठ्यानं म्हणालं, ``आरं, आज खिलारीनं फुगा केलाय. आय हाय कसी लसलस दिसायली.''
त्यानं असं म्हटल्याबरोबर तळपायाची मुंगी मस्तकात गेली. सोबतच्या मुली कावरंबावरं होऊन माझ्याकडेच पाहू लागल्या. माझ्या डोळयाला टचटच पाणी आलं. एका अनामिक भीतीनं अंग शहारलं आणि तिनंच विरोध करण्याचं बळही दिलं. मी उभी राहून, चिडून त्याला म्हटलं, ``पर्रदिसा, तुह्या मुखाची माती होऊ दे. पुन्हा जर थोबाड इचकीलंस त मपल्या बापालाच सांगीन पाहाय, मेलं माय, मला चिडवायलंय.'' त्याला बोलून मी पुढं निघाले. ते पोरगंही पुन्हा काहीच बोललं नाही. फिदीफिदी हसणारेही गप्प झाले. आम्हीसुद्धा निघून गेलो. पुढं गेल्यावर बौद्धवाड्यातल्या पोरी भेटल्या. आम्ही सगळया वाटेनं तीच चर्चा करीत चाललो. सगळयाच जणींचं म्हणणं आलं, `तू त्याला शिव्या द्यायच्या नसत्यास. आसे रोजच भेटतात. त्याला कोठं तोंड देणार ? आपल्याच्यानं काय होतंय. बाईच्या जातीनं जास्त करू नये.' मला तेव्हापासूनच बाईची जात हा शब्दच अडचणीचा वाटू लागला. आपल्याला काहीच करता येऊ नये. ही खरी खदखद होती.
दिवसभर शाळा करून घराकडे आले. भाऊ घरातच बसलेला होता. मी दप्तर टेकवून आज शाळेत जाताना काय घडलं ते सगळं आईला सांगण्याचा विचार केला होता. मला नीट दप्तरही टेकू दिलं नाही की भाऊ तटकन उठला नि तरातरा चालत माझ्यापर्यंत आला. मी एकदम भेदरून उभी राहिले. त्यानं ताडकन कानशिलात भडकावली नि म्हणाला, ``गुरख्या पोरायला बोलतीस. तू काय सोताला देसमुखीन समजायलीस का?'' माझा काहीच गुन्हा नसताना असं संकट अंगावर आलेलं पाहून मला काहीच सुचेना. गाल चोळीत मी कसंबसं म्हणाले, ``ते पोर जाता-येता चिडवायलेत, मंग म्या काय करू?'' तसं त्यानं माझ्या केसात हात घातला आणि समोरचे केस कचकच उपटीत म्हणाला, `` हे हे आसे नखरे कमी करावं नं. नाचणीवणी ऱ्हाऊ लागल्यावं कोण बोलायचे सोडीन. शालमंधी हेच शिकवतात का ? अशानं शाळा बंद करून टाकीन. मंग कळंन. चाल्ली शानपना करायला.'' एका हातानं केस धरलेले. तोंडाचा पट्टा चालू आणि डोकं खाली वाकवून पाठीत एक रट्टा. आई मधे पडली म्हणून वाचले. म्हणाली, ``जाऊ दे रे, बाप्पा ! लेकरू नेमकंच थकून भागून शाळंतून आलंय. आल्या आल्याच काय लावलंस. ज्यानं तिला बोलला त्याचं थोबाड फोड नं काऊन, हिला काय मारायलास?'' भाऊ थोडा चपापला आणि म्हणाला, ``त्याला तं म्या बगतोत. पनीक आपली वस्तू धड पाह्यजे नं. इथं आमच्याच गाडग्याला दहा चिरा असतीन त लोकायला काय मना.'' माईनं मला मिठीत घेतलं होतं. तिच्या प्रेमळ बोलण्यानं मला भडभडून आलं. मी हामसू-हामसू रडू लागले. सगळा बांध फुटल्यासारखं. भाऊ रागात माईला म्हणाला, ``तिला सांग.साळंत जाचं त नीट जाय म्हनावं. न्हाय त सांगितलं न्हाय मनशीन.'' आणि तणतण करीत निघून गेला. तो गेल्यावर सगळयाजणी माझी समजूत घालू लागल्या. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. दुसऱ्या नंबरची बहीण माझी समजूत घालत होती.
``काई करू नगंस गं, माय. गड्या मान्साच्या नजरंत आलीस तं कसीतरी देवा देवा करता शाळंत चाल्लीस ते बी बंद व्हईन. या मान्सायला तू वळखीनंस का ? कसीबी येडी वाकडी ऱ्हाय, पनीक शाळा सीक. काईतरी पदरात पडलंच की.''
मी रडत होते. भावाची चीड येत होती पण आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता मनात खळबळ माजवीत होती.
रात्री शेतातून बाप आल्यावर गोष्ट त्याच्याही कानांवर गेली. तोही मलाच वाकडं-तिकडं बोलला. माझ्याबरोबर भावालाही शिव्या दिल्या. ``पाटीलकी करीत गावात हिंडायलाय रानात याचं नाव होत न्हाई. म्याच कव्हर करू. कव्हा भाकरीसुदीक आणायचं नाव घेत नाही. आसे कसे समदे मव्हाच जीव घ्याला बसलेत की.'' मला एकच भीती होती. म्हटलं म्हातारं माझी शाळा बंद करतंय का काय की? पण या सगळयातून वाचले. पुढे काय झालं नक्की माहीत नाही. पण गुरख्यांंचं बोलणं थांबलं. आम्ही दिसलो की त्यांच्या तोंडाला कुलूप लागू लागलं. बहुतेक बापानं त्यांच्या बापांना सांगितलं असावं. लहान्यातली कळ मोठ्यात नको म्हणून त्यांनी आपापल्या पोरांना चांगलं सुताडलं असेल. माझा भाऊ नाचत घराबाहेर पडला होता, पण मला पक्की खात्री होती की हा काहीच करायचा नाही. त्याचं सगळं घरातंच चालायचं. बाहेर तोंड उघडायची हिंमत नव्हती. जर त्यानं गुरख्यांना मारलं असतं तर गावात कोणाला तरी कळलं असतं आणि ते माझ्यापर्यंत आलं असतं. पण तसं काहीच घडलं नाही.
सकाळी तांबटात उठत होते. उठल्याबरोबर भांडं चुलीवर चढवायचं. पाण्याला जाल लावायचा आणि जर रात्री भांडे घासले नसतील तर गडबडीन सकाळी रात्रीचे खरकटे भांडे घासून घ्यायचे. शक्यतो रात्रीचे भांडे मी कितीही अभ्यास असला तरी लगेच घासून घ्यायची. त्यामुळं सकाळची धावपळ वाचायची. थोडा वेळ मोकळा मिळायचा. जर माईला वाटलं तर ती मला कधी-कधी चूल-स्वयंपाकघर सारवायला सांगायची. नाहीतर मग बाहेरच्या चुलीच्या जवळची कामं करावी लागायची. माय सारवणाला लागायची, मोठी बहीण चहा-पाणी बघायची. न्याहारीच्या भाकरी शिळया नसतील तर थापाव्या लागत. मला डबा लागायचा. ``ह्या पर्रदिसीची रोजचीच कर्बसा हाय.'' म्हणून माय टुणटुण करून भाजी-भाकरी करून द्यायची. पाणी नेमकं तापलं की, बाप गडबडीनं आल्यासारखं करायचा नि मोठ्यानं ``आंघोळीला पाणी टाका बरं.'' म्हणायचा. झालं. नेमकं मला वाटायचं आघोळीला पाणी तापलंय.आपण आपलं आटोपून घ्यावं. पण बापानं सांगितल्यावर नंबर त्याचाच लागलायचा. कधी कधी भाऊसुद्धा मधे घुसायचा आणि आमच्या शाळेला उशीर होत राहायचा. मला वाटायचं, ``यांना कसं काहीच वाटत नसेल. ला तिकडं छड्या खावावं लागतात. आन मह्याबरोबर बाकी पोरीलाबी उशीर व्हतंय.'' शेवटी माझा नंबर. धावपळ करून कशीतरी शाळा गाठायची. इकडं उशीर झाला की तिकडं चालण्याचा वेग वाढवायचा. पायाला गोळे येऊ लागले तरी चालत राहायचं. पण मग वर्गातसुद्धा पाहिल्या तासाला लक्ष लागायचं नाही. सारखा घाम येत राहायचा आणि नुसतं गुदमरल्यासारखं व्हायचं. पुन्हापुन्हा घरची आठवण येऊन स्वत:चीच चीड यायची.
एक एक वर्ष पदरात पडू लागलं. शाळेतली सगळी शिक्षक मंडळी माझ्याकडे कौतुकाने पाहू लागली. त्यांच्या दृष्टीने जाणं येणं करून चांगला अभ्यास करणारी मुलगी म्हणून कौतुक झालं होतं. वर्गातल्या वीस-पंचवीस मुलांत मी पहिल्या तीनमध्ये हमखास राहात होते. माझ्या सोबतची मुलगी माझ्या खालोखाल राहायची. एक एक परीक्षा मी माझी परीक्षाच पाहात आहे असं वाटून माझी आणि सोबतच्या माझ्या वर्गमैत्रिणींची तयारी असायची. ज्या जाऊन-येऊन अभ्यास करण्याचं आमच्या गुरुजींना कौतुक वाटायचं, तेच जाणंयेणं आम्ही सोयीचं करून घेतलं होतं. जाताना तरी सगळया वर्गातल्या मुली सोबत असायच्या आणि जाण्याची धावपळ असायची. अशावेळी वर्गात सरांनी काय पाठ करायला संागितलंय आणि आज काय विचारणार त्याचीच उजळणी व्हायची. पण येताना मात्र रात्री पाठ केलेली उत्तरे आम्ही दोघी एकमेकींना विचारत यायचो. येताना थोड्या थोड्या अंतरावर आपापल्या वर्गातले ग्रूप असायचे. आमचं बरचंस पाठांतर असंच येताना व्हायचं. घरी आल्यावर तर बाकीची कामं होतीच. कितीही तणतण केली तरीही त्यातून सुटका नसायची. तेवढं करून बाकीचं तुमचं पहा.
आमच्या जाणं-येणं करण्याचा आणि शाळेतल्या अभ्यासाचा थेट परिणाम गावावर होऊ लागला. आता सातवी पास झालेली मुलगी आठवीला आमच्याबरोबर येऊ लागली. अगोदर ज्या धाडस करून येत, त्यामध्ये सहजता आली. पण त्यातही मधेच लग्नामुळं शिक्षण अर्धवट थांबायचं. शिवाय कुठलं तरी एखादं निमित्त त्यासाठी पुरे होतं. एखाद्या बापाला वाटलं की आपली पोरगी उफाड्याची आहे, जरा टोणगी दिसतेय. असं वाटलं की शिक्षण बंद व्हायचं. अशीच एक शिक्षण बंद होण्याची वेळ विनाकारण माझ्यावर आली. ते माझं दहावीचं शेवटचं वर्ष होतं. आमच्या सेाबतच्या नववीच्या मुलीकडे त्या गावचा एक मुलगा सारखा पाहायचा. आमची वाट गावातून गावाबाहेर असलेल्या शाळेकडे जायची. तो मुलगा गावातल्या अलीकडच्या कोपऱ्यावर थांबलेला असायचा आणि आमच्या मागेमागे शाळेपर्यंत यायचा. गावातल्याच एका श्रीमंताचा, कॉलेजला शिकणारा होता. जिल्ह्याच्या ठिकाणीच राहायचा. पण अशात त्याचं गावाकडे येणं वाढलेलं वाटत होतं. तो शाळेपर्यंत येई. मुलींच्या वर्गात चकरा मारी, परतताना गावाबाहेरपर्यंत सोडवायला येई. आम्ही आपलं भीतीपोटी मान खाली घालून निघत असू. एका वेळेला तो त्या मुलीला बोललाही. त्यानं कुठूनतरी नाव माहीत करून घेतलं. होतं. काय चाललंय ? किती वेळ लागतो जायला ? वगैरे असे जुजबी प्रश्न त्यानं विचारले होते. तिनं त्याला तेवढ्यापुरतं उत्तर दिलं होतं. माझ्या पोटात भीतीनं खड्डाच पडला. सगळया रस्त्यानं ती पोरगी रडत होती. आम्ही तिची समजूत घालत होतं. माझं म्हणणं होतं, ``तुझी काय चूक हाय ? त्वा काई गुन्हाच केला नसंल त भ्याचं काऊन ? तू तुझ्या बापाला सांग, भेऊ नगंस.''
पण बाकी मुलींचं म्हणणं ते जर आपल्या गावचं असतं तर गोष्ट येगळी. आपल्याला रोज त्यायच्या गावात जायचंय. आपल्या घरच्यायचं काय. एकदा येईन आनं हाजिंदा करून जातीन. उंद्या वरीसभर आपल्याला त्यायच्याशी संबंध ठेवायचाय. कसं व्हईन उंद्या त्यानं अजून काई केलं त. आपली शाळा बंद व्हईन. आमच्या सगळयाच मुलींना सगळयात मोठी भीती शाळा बंद होण्याची होती. चूक कोणाची जरी असली तरी परिणाम आमच्यावर होणार. त्यामुळं हे कोणालाच कळू नये असं सगळयाच मुलींचं मत होतं. सगळया जणी एकाच वाटेवर होतो. सगळयांनी मिळून ठरविलं होतं की, गोष्ट कुणालाच कळू द्यायची नाही. त्या मुलाला पुन्हा हिच्याशी बोलू द्यायचं नाही. आपण घोळक्यात घेऊन जायचं आणि आणायचं, आणि शाळेत गुपचूप सरांना सांगून त्याचं येणं बंद करायचं, आणि त्यानुसार आम्ही वागायला सुरुवात केली.
मला या प्रकरणाची सगळयात जास्त भीती वाटत होती. एकतर माझ्या बरोबरीच्या कुणी मुली शिल्लक राहिल्या नव्हत्या. शाळेत तर नव्हत्याच, पण शेजारीपाजारीही नव्हत्या. एकीनं तर मुलाला जन्म दिला होता आणि गावातल्या बायांच्या दृष्टीनं तिच्या जन्माचं भलं झालेलं होतं. भाऊ अधूनमधून म्हणत होता, ``आपल्या समाजात पोरी इतकं शिकतच न्हाईत. जिथं शिकलेले पोऱ्हंच न्हाईत तं अशा पोरीशी कोण लगीन करीन. त्यापरता शिक्षन बंद केलं. पोरगी उजवून टाकली की काम झालं.'' त्याच्या बोलण्याची मला भीती वाटत होती. त्याच्या लग्नासाठी आलेले पाहुणे त्यानं नाकारले होते. बापाला स्पष्ट सांगितलं होतं, `एवढी पोरगी घरात ठेवून म्याच भवल्यावर चढू व्हय ? बरं दिसतंय का ? लोकं शेण घालतीन तोंडात. तिचं लगीन व्हवस्तर म्या काई लगीन करायचा न्हाई.'' त्याच्या ह्या निश्चयामुळे बापाला अगोदरच माझ्या लग्नाची काळजी पडली होती. मधलीचं लग्न झाल्यावर खरं तर आता त्याचं लग्न व्हायला हरकत नव्हती, पण त्यानं तिसरीच शाक काढली. त्याचा ताण माझ्यावर पडलेला. त्याच्यात हे प्रकरण घडलं. मला मनातून वर्ष पदरात पाडून घ्यावं वाटत होतं. यांचे असे विचार पाहून आपण सगळयांच्या पुढीपुढी करायचं. चुका करायच्या नाहीत हे ठरवून होते.
जे प्रकारण आम्ही आमच्या परीनं दाबून टाकायचा प्रयत्न केला होता ते फिरून फिरून आमच्या अंगावर येऊन कोसळलं. काहीही चूक नसताना त्या मुलीनं बेदम मार खाल्ला अन् तिचं घराबाहेर पडणं बंद झालं. त्या मुलीच्या आईचा रोष माझ्यावर झाला. तिच्या विचारानं मी सगळयात मोठी, समजदार आणि हुशार मुलगी होते तर ! मग हिनं तरी काय चाललंय ते सांगायला पाहिजे होतं. मी त्यांना पटवून देत होते की तसं काहीच नाही म्हणून. पण त्यांना ते पटत नव्हतं. त्यांचं म्हननं एकच की `जर काईच न्हाई झालं त इतकी कलकल झालीच कसी. ते पोरगं हिला बोललं न्हाई का ?'' मी नाही म्हणणं शक्य नव्हतं. ``मंग तुमच्या समक्ष ते तिला बोलायलंय आन तुमी लपून ठेवायल्या, मंजी काय? मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की फक्त एकदाच असं घडलंय. पण त्यांचं उत्तर होतं, ``एकदा काय आन दहादा काय ? आमाला एकदाबी कळलं नाही. इश्वास कसा ठेवात. तसं काई झालं बी नसंल. मही लेक लय आदर हायं. पनी गावात इनाकारण कलकल झाली नं. कोणाच्या तोंडाला हात लावावं ? उंद्या लगन पाण्याचं आवघड व्हऊन बसतंय त्याचं काय ?'' तिच्या आईच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. ज्या समाजात राहायचं त्याच्या नियमानुसार ही गोष्ट अवघडच होती. मधल्या काळात त्या मुलानं हिला मी पटवलंय असं सगळयांना सांगितलं होतं आणि ते पाझरत त्या गावातून या गावात आलं होतं.
संध्याकाळी भाऊ घराकडे आला, आणि सुटताच मला म्हणाला, ``तुम्ही त माजल्या, आता चांगली म्हणता म्हणता दिवेच लावायला निघाल्या की,आपल्या पिढीत कधी रक्तात दोस निघाला न्हाई. आन ह्ये नासकं रगत आलं कोठून ह्येच शिकवितात का शाळंत.'' एकदमच भसंभसं बोलायला सुरुवात केली. मलाही त्याच्या बोलण्याचा रागच आला. नाहीतरी दहावीला गेल्यापासून त्याचं मारणं कमी झालं होतं. मीही त्याला थेटच बोलले.``काई पन बोलं नगंसं, म्या काय इतकं पाप केलंय त तू आसं बोलायलास. जे काय झालंय तेत म्या सांगितलंयंच की. मव्हा काय गुन्हा हाय.''मी असं म्हणाले तसा तो वाकड्यात शिरला.`` तुमचा काईच गुन्हा न्हाई. समदा आमचाच हायं. आमीच शाळा शिकाय ठेवलंय. तुमी त्याचं पांग फेडणारंच की. बसं झालं आता आमचं लय पांग फेडलेत. जगू द्या आमाला इजतीनं. तुमची शाळा टाका जाळून. राहा आपलं घरीच. थापा भाकरी. सुखानं सासरी जा. आन मंग शिका काय शिकायचंय ते.'' त्यानं सरळच असं सांगितल्यावर माझ्या पायाखलची वाळूच सरकली. तरीही धाडस करून म्हणाले.``म्या शाळंत जाणार हायं. एवढंच वरीस हायं.'' मी जसं म्हटलं तसा तो एकदम अंगावरच आला.``काय मनालीस? पुना मन बरं. मन की पुन्हा मन, तू शाळंत जाणार हायंस. आँ? लय शहाणी झालीस, देऊ का थूतरीत एक. माणूस उगं जाऊ द्या मनायलांय. तं लयंच शाणपणा सुचायलाय. काढ तू शाळंचं नाव पुन्हा. मंग सांगतो. उगी टरटर लावली.'' तो अंगावर आला की काळजाचं पाणी पाणी झालं. मला काहीच सुचेना. सर्वांग बधिर होऊन गेलं. एवढूशा घटनेचं त्यानं केवढं मोठं भांडवल केलं होतं. त्याची चीड येत होती पण त्याक्षणी काहीही बोलणं धोकादायक होतं. याची क्षणातच जाणीव झाली. मी केविलवाण्या नजरेनं माईकडं पाहिलं. तशी ती जवळ आली. ``जाऊ देरे बाप्पा जात न्हाई ती उद्यापासून. हायंच काय तेच्यात उगी बदनामी झाली त जलमाचा डाग लागून बसंन. चल बाई तू घरात.'' मी मोठ्यानं रडतंच मधल्या घरात निघाले.
मधल्या घरातल्या कोपऱ्यात जाऊन बसले. नाना विचार मनात येत होते. भावाच्या डोक्यात दगड घालावा वाटू लागलेला, जेव्हातेव्हा त्याचं असंच चाललेलं. आता काहीही होवो. शाळा बुडवायची नाही. मग मेलं तरी कबूल. काय काय करता येईल याचे विचार डोक्यात, रडायचं, पडायचं, उपाशी राहायचं. लयच वेळ पडली तर गुरुजीला बोलावून घ्यायचं. गावातले चार लोकं आपल्याला चांगलं म्हणतात त्यांना बोलायचं. मनात एक आशा होती, ``ह्यो टिकोजीराव काईबी मनाला तरी बाप काई आपल्याला शाळा सोड मनायचा न्हाई.'' त्याचं कारणंही तसंच होतं. कधीकधी शाळेतले शिक्षक त्याला भेटायचे आणि पोरीच्या प्रगतीचा आलेख सांगायचे. बापाला बरं वाटायचं. गुरुजी आदरानं बोलवायचे सन्मानानं वागवायचे त्याच्या माझ्याविषयीच्या वागणुकीतून दिसायचां घरी आलं की मला तो इत्थंभूत सांगायचा. अगदी मोठ्या मानसाशी बोलतात तसं माझ्याशी बोलायचा `बाई असं, बाई तसं, बाई पाणी आण, बाई भाकर वाढ.' मी त्याच्या आजूबाजूलाच रेंगाळायचे. कोणी पाहुणे आले तर माझ्या शिक्षणाविषयी भरभरून बोलायचा.यंदा मॅटि्न्कला कसा नंबर काढते ते पाहा हेही सांगायचा. त्यामुळं मला त्याचीच आशा होती. माझं गाऱ्हाणं त्यानंच ऐकलं असतं. त्यामुळं त्याच्या येण्याची मी वाट पाहू लागले.
घराचा दरवाजा वाजला. मी कानोसा घेऊ लागले. मधल्या घरात अस्ताव्यस्त पसरलेली मी. डोळे किलकिले करून पाहिलं. माय चिमणी लावून गेली होती. बापानं मला आवाज दिला. माईनं होकार दिला. बापाचं रानात काय ते स्वत:शीच सांगितल्यासारखं माईला सांगत होता. ताट वाजले. माईनं समोर ताट ठेवलं असावं, आणि मग खुसफूस होऊ लागली. मी कानात जीव आणून ऐकू लागले. पण काही म्हणता काही कळत नव्हतं. एकदा वाटलं. उठावं आणि अंधारानं पुढं सरकावं. पण विचार बदलला. तशी पडून राहिले. शेवटी बापानंच आवाज दिला. मी काही तो ऐकला नाही. आणखी एक आवाज दिल्यावर शेवटी माय घरात आली. म्हणाली ``ते कव्हरचे बलंवायले की गं, ऐकू येईना का?'' मला हलविलं. मग नाइलाजांनं उठल्यासारखी मी उठले. बैठकीत जाऊन कंदिलाच्या ओलसातलीला जाऊन बसले. बापानं सुरू केल.``ते काई न्हाई. तुह्याबद्दल आमच्या पोटात बी काई न्हाई, पनीक लोकं इनाकारण आल्डायलेत, पोरीच्या जातीला बरं दिसत न्हाई.म्हून आमी इचार केलाय की तुही शाळा बंद करायची.'' आता तर मला काहीच सुचेना. सगळ्यात जास्त विश्वास त्याचाच होता. आता हिंमत धरणं आवश्यक होतं. मी म्हणाले.``मही चुकी काय ते सांगा,आबा.'' ``तसं काई न्हाई बाई, पनीक चार तोंडं बोलणारे बरं दिसनं झालंस.'' मग मात्र मी म्हणाले.`` मही जर चुकी नसंल त मला काउन शिक्षा करायले.लोकायच्या नाकात टिचून एवढी बार मला जाऊ द्या. मंजी त्यायलाबी कळंन हिची काई चुकी न्हाई म्हून. आन आता राह्यलेतच किती दिस चार-सा मैन्यासाटी कशाला घरात ठेवता. एकदा मॅटि्न्क झाल्यावर पुन्हा थोडंच मला कोठं शिकाया ठंवणार हायत.'' मी बोलत होते. पण बापाच एकच पालुपद, ``बरं दिसत न्हाई.'' त्यांना सारखी माझ्या चारित्र्याची भीती वाटत होती. आणि त्याची गॅरंटी मीही देऊ शकत नव्हते, कारण माझ्यावर, त्यापेक्षा समाजावर विश्वास ठेवायला ते तयार नव्हते. शेवटी `काही दिवस करते. त्यानंतर सराव सुरू होतो. त्यानंतर जाण्याची गरज नाही.'असं सांगितल्यावर बाप नाखुषीनंच राजी झाला, पण आता त्याला भीती वाटू लागली हे स्पष्टच होतं. एकदा नाव झालं तर कोणी करायचं नाही. मग पोरीला का घरात थोडंच ठेवता येतंय ? आता माझ्यावर वेगवेगळी बंधनं आली.
या प्रकरणानं मला खूप शिकवलं. त्या वयात आणि नंतरच्याही आयुष्यात ते खूपच महत्त्वाचं राहिलं. समाजाला अत्यंत महत्त्वाची वाटणारी, ईर्षा, मत्सर वगैरे निर्माण करणारी ही गोष्ट आहे. तिला किरकोळ म्हणून कधीही सोडू नये. तिला पुरण्याचा प्रयत्न केला तर ती जमीन उकरून आपल्या समोर ठाकते. त्यापेक्षा, त्या क्षणीच कचकन तुकडा पाडला की सोपं होतं. काही काळ त्रास होतो. तेवढा सहन करण्याची तयारी ठेवायची. पुन्हा ते भूत होऊन मानगुटीवर बसत नाही. त्याक्षणी जे होईल ते त्रास सहन करायचा. पण त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. आयुष्यभर मी तेच पाळत आले.
या प्रकरणाचा माझ्यावर परिणाम झाला तसा गावावरही परिणाम झाला. आणखी दोन मुलींची शाळा बंद झाली. मला शाळेची परवानगी मिळाली, पण बापानं भीती घेतली. आणि तो जोर खाऊन सोयरकीच्या मागे लागला. भावाचं मी ऐकलं नाही म्हणून तो रागाने माझ्याकडे पाहू लागला. बोलणं पूर्ण बंद झालं. गावात चावचाव झाली आणि सगळया गावाचं लक्ष माझ्याकडे लागलं. दररोज शाळेला जाताना लोकांच्या नजरा पाहूनच भीती वाटू लागली. त्यामुळे तर त्यावेळी माझं मलाच आपण शाळेला उगीच चाललो असं वाटू लागलं. शाळेत गेल्यावर, मात्र सगळं विसरून जायचं.
एका बाजूनं शाळेचा अभ्यास, दुसऱ्या बाजूनं बापानं आणलेले पाहुणे, अशा कात्रीत मी सापडले. बापाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. पाहुणे येणार म्हटलं की दोन दिवस शाळा बुडायची. रविवारी पाहुणा कधीच आला नाही. हमखास गुरुवार धरून यायचा. चारदोन पाहुणे येऊन परत गेल्यावर मात्र बापाला भीती वाटू लागली. तो गांगरल्यासारखा कुणाच्याही मागे जायला लागला. या गोष्टीची घरात चर्चा व्हायची, भावाच्या विधानामुळं ताण पुन्हा माझ्यावर यायचा.मला वाटत होतं, त्यांना पाहायचा तर कुणी शिकलेला, नोकरीवाला पाहावा, पण हे सरळ सांगणार कसं. जर सांगितलं तर `पोरगी माजली' असं घरचेच म्हणणार. तसं मी माईला आडपडद्यानं सुचवूनही पाहिलं होतं. पण कोणी चांगलं शिकलेला बापाला सापडत नव्हतं. एकतर ज्याला बऱ्यापैकी शेती आहे असे मुलगे शिकलेले नव्हते आणि जे शिकलेले आहेत त्यातले बहुतांश गरीब घरातले आहेत. शिकलेलेे आणि लहान-सहान नोकऱ्या करणारे `वकील' होणे ही त्या काळात प्रचंड प्रतिष्ठेची बाब होती आणि असे वकील माझ्या बापासारख्या साधारण माणसाची पोरगी करणं शक्य नव्हतं. मास्तराच्या बाबतीत बाप फारच चिडून होता. ``खाय भाकरी अन् कर चाकरी' याच्यापलीकडे काय असे त्याला वाटत होते. या सगळयात माझ्या मनाचा कोंडमारा होत होता. `मला शिकू द्या' म्हणण्याची तर सोयच नव्हती. मला कितीही वाटत असले तरीही. माझ्यासमोर तरी आहे ते मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. बौद्धवाड्यातल्या दोन-तीन मुली चांगल्या नोकरीवाल्यांच्या बायका झाल्या होत्या आणि संसार करीत करीत शिक्षणही घेत होत्या. त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार होता. मलाही तसंच वाटत होतं. पण सुरुवातीला जरी शक्यता वाटत होती तरी आता बाप गांगावल्यामुळे मला तरी शक्य वाटत नव्हतं. आणि झालेही तसेच. एका नववीला शाळा सोडून दिलेल्या मुलानं मला पसंद केलं. `मेसाईला नाही नवर आन म्हसोबाला न्हाई बायको' अशा थाटात त्याचा बाप मेल्यानं त्याला त्यावर्षी लग्न करायचं होतं, म्हणून त्याची धावपळ चाललेली. घरात कर्ता कुणी नाही म्हणून त्याच्या घराकडे कुणी पाहुणे फिरकत नव्हते. लग्न यावर्षी नाही केले तर तीन वर्षं थांबावं लागणार होतं. अशा वेळी बाप बरोबर त्याच्या दारी पोचला आणि हे लग्न ठरले. या सगळयांनीच विरोध केला, पण मी परीक्षा द्यायची थांबले नाही. बाप जेव्हा शाळाच बंद कर म्हणू लागला, कारण पोराचं शिक्षण माझ्याएवढं नव्हतं म्हणून, त्यावेळी मी सरांना मध्यस्थी घातलं आणि कशीतरी दहावीची परीक्षा दिली. म्हटलं पुढचं पुढं पाहू.
ज्या घरात मला दिलेलं होतं. त्या घरात पसारा जास्तच होता. माझा नवरा सगळयात मोठा. त्याच्यापेक्षा मोठ्या बहिणीचं लग्न बापाच्याच काळात झालेलं. नवऱ्यापेक्षा लहान एक बहीण आणि आठदहा वर्षांचा एक भाऊ आणि त्याची आई, अशी सगळी कुळी होती. घरात गेल्यानंतर सुरुवातीची अवस्था जरी भांबावलेली होती तरी नंतरच्या काळात एक गोष्ट लक्षात आली की घराचा सगळा कारभार सासूच्या हातात आहे. सासूची नि माझ्या नवऱ्याची चर्चा व्हायची आणि चर्चेतून पुढच्या गोष्टी ठरायच्या. सासू माजघरात बसून असायची. इकडचा तांब्या तिकडं करीत नव्हती. थोडंसं काही असेल तर ती मला हाक मारायची. अगोदर तिच्या तोंडी लेकीचंच नाव येत होतं, आता माझं नाव तिनं पक्कं केलं. दिराला माजघरातली एखादी वस्तू जरी द्यायची असेल तर ती मला हाक मारायची. मग मी कुठेही असो. बरेचदा मी मागे शेणगोळा करीत असलेली असायची. तिच्या हाकेसरशी मला धावत यावं लागायचं. कारण नवऱ्यानं रात्रीच्या एकांतात मला तीनतीनदा बजावलं होतं, की `घरच्या माणसाचं तू न ऐकलेलं मला चालणार नाही, त्यातही माईचं. तसं जर घडलं तर तू हायंस आन मी हायं.' लग्नामधेच नवऱ्याचा हेकाडपणा लक्षात आला होता. लग्नातच वाजंत्रीवरून त्यानं माणसं बेजार केले होते. त्याला पाहिलं की मला वाईट वाटायचं आणि मनातून चीड यायची. पण आता इलाज नव्हता. बापानं त्याच्या दावणीला बांधलं होतं. त्याची किळस करतच जन्म काढायचा होता. त्यामुळं सासूचं ऐकावंच लागणार. मी भरलेल्या हातानं घरात घ्यायचे तेव्हा ती सांगायची, ``आगं, ह्या देवळीतला गाडा त्याला काढून द्यायचाय, दे बरं.'' ``माझे हात भरलेले आहेत'' असं मी म्हटलं तर ती काहीच बोलली नाही.मी अर्थ समजले. हात धुवून गाडा काढून दिला नि पुन्हा शेण काढू लागले.
नवरा हेकाड, लहान दीर त्यापेक्षा हेकाड, आणि सासू तशी. एकवेळ तर मी भाकरी थापतेय आणि लहाना झोका खेळतोय. मी चूल फुकून बेजार आणि तो ओरडतोय, ``माय, मला झोका दे.'' त्यानं तसं ओरडलं की सासू म्हणायची, ``कमल, पहाय माय ते काय मनायलंय ते.'' मी एकदोनदा कानाडोळा केला पण पुन्हा उठावंच लागलं. ते पोरगं झोका दे म्हणू लागलेलं. बैठकीत त्याला झोका दिला नि इकडे भाकरी थापायला बसले की पुन्हा त्याचा आवाज. आता थेट माझ्या नावानं. आणि पाठोपाठ मोठ्यानं भोंगा पसरल्याचा आवाज. सासू मला आवाज देई पण माजघरातून उठत नव्हती. नणंदेला तर जणू आवाजच ऐकू येत नव्हता. पुन्हा पळाले. पुन्हा झोका, पुन्हा भाकरी, पुन्हा रडणे, पुन्हा झोका, भाकरी या सगळयात चूल विझतेय तर कधी ढणढण जाळ लागतोय आणि भाकरी करपतात. मी चिडून त्याला शेवटी म्हटलं, ``तुम्ही तुमचा झोका घ्या, न्हायतं राहू द्या. म्या आता काई याची न्हाई.' तर त्यानं मोठा भोंगा पसरला. मी `मरू दे' म्हणून तशीच भाकरी थापत असले. सासू गप्प, नणंद जणू आवाज येत नाही, आणि नेमका नवरा हजर. त्यानं लाडानं त्याला विचारलं तर त्यानं सरळ झोका देत नाही म्हणून सांगितलं आणि नवरा सरळ सगळं सोडून माझ्याकडे. ``तुह्या मायचा,'' असातसा म्हणून शिव्या देतच त्यानं माझे केस धरले नि जोरदार हिसका मारला. त्याबरोबर मी दारापर्यंत आले. पाठोपाठ एक लाथ, ``तुला पोरगं रडायलेलं दिसनं झालंय? लय शिकलीस म्हणून तुला शिंग फुटलेत का ? दम धर मायझे. तुजा माज काढतो.'' तशी मी पण चिडूनच म्हणाले, ``एकाच टायमाला दोन दोन कामं म्या कसे करायचे. घरात का दुसरे मान्स न्हाईत का त्यायला हेबी काम नगंत का ?'' तसा नवरा चिडला, ``फिरून बोलतेस, मह्या माईला बोलतीस ? दम, तुव्हा जीवच घेतो.'' आणि फाडफाड कानशिलात बसल्या. ``तुला इथं महाराणी कराय आणलं का ? रांड ? शानपणा करायलीस. ``चल आताचे आता झोका दे. न्हायतं सांगितलं न्हाई मन्शीन.'' त्यानं मला ढकलीतच बैठकीत नेलं. त्याची माय तोंडापुरतं, ``आरे राहू दे' म्हणत राहिली. पण जवळ आली नाही. मला माझी लायकी लक्षात येऊ लागली नि चीड येऊ लागली.
त्यानंतरची ती रात्र माझ्यासाठी भयाण होती. रात्री एकांतात नवऱ्यानं काढू काढू मला मारलं. मारही असा की मी मोठ्यानं ओरडू नये. अगोदर तोंड दाबायचं आणि मग कोवळया जागी चिमटा काढायचा, एकाच जागेवर सारख्या चापट्या मारायच्या. उत्तररात्रीपर्यंत त्याचा तो खेळ चाललेला मी सहन करत होते. त्या रात्रीपासून मात्र रात्र झाली की अंगाचा थरकाप होऊ लागला आणि सकाळ झाली की आपण अजूनही जिवंत आहोत याचंच नवल वाटू लागलं. घरातल्या सगळयाच माणसांचं वागणं सारखंच होतं. त्यांच्यातलं कुणीच बदलायला तयार नव्हतं. हौदाच्या जवळ उभं राहून, गरम पाण्यात विसान टाका म्हणत होते. तिथले तिथं घेत नव्हते. नवरा तर मुद्दामच पाण्यात पाहात होता.
आता नवऱ्याच्या त्या भूमिकेकडे पाहिल्यावर वाटतं, कदाचित ती त्याची प्रतिक्रिया असावी. एकतर मी त्याच्यापेक्षा दोन वर्ग जास्त होते. त्या काळात शिकलेल्या मुली ह्या जास्त शहाण्या असतात असाच भ्रम होता. गावातले त्याचे जे समवयस्क मित्र होते, ते त्याला चिडवत असत हे माझ्याही कानांवर तेव्हा आलं होतं. ``न्हाई तुला तुह्या बायकोनं भाकरी बडवाय लावल्या तं मला म्हण. आता तू बायल्या झालास म्हून समज.'' अशा प्रतिक्रिया, त्याचा हेकट स्वभाव आणि शिक्षणाचा अभाव. त्याचा परिणाम माझ्यावर होत होता. काय असेल ते असो पण माझे हाल वाढत होते.
लग्नाचं पाहिलं वर्ष होतं. माझं माहेरी जाणं, तिथं रडणं, काय पाहिलं म्हणून ओरडणं चालू होतं. माय तोंडावरून हात फिरवायची. बाप आजचं उद्या होईल कमीजास्त, म्हणून सुस्कारा टाकायचा. भाऊ चिडायचा पण आपले केस त्यांच्या हातात हायतं म्हणायचा. सगळेच गप्प. चार दिवस सुखात जायचे. मग सांगितलेल्या दिवशी निघावंच लागायचं. एकदा एक दिवस उशिरा गेलो होतो तर मला नि भावाला तीन तास घरातच येऊ दिलं नव्हतं. त्यामुळे दिवस कुणीच चुकू देत नव्हतं. मी आपली दावणीला बांधून मार खाणाऱ्या जनावरासारखी होते. त्याचा न्यूनगंड आणि हेकटपणा मी कमी करू शकत नव्हते.
दिवस येत होते. थरथरत्या रात्री जात होत्या. कधी कधी जीवाच्या भीतीनं रात्र रात्र जागी राहात होते. गायीच्या शेजारी वाघाचा बिछाना. सकाळ मात्र प्रसन्न असायची. कामाची कमी नव्हती. त्याच्यात वाढ झालेली होती. माझीही अवस्था हळूहळू बदलत होती. दिवस गेले होते. वजन वाढत होतं. आता त्यांच्या घरात नवा वंश वाढणार होता. पण त्याच्या आईचं काम कमी नव्हतं. मारही कमी नव्हता. थापडबुक्की चालूच होती. सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता. तसा दिसतही नव्हता, बरेचदा सहनही होत नव्हतं. मी भावालाही विषय काढून पाहिला होता की मी आता सासरी जातच नाही. पण त्यानं टाळलं. म्हणाला, ``बरं दिसतं का ? लोकं काय म्हणतील ? तुला जावंच लागणार. तुव्ह घरच हाय ते.'' त्याच्या आधाराविना काहीच कळत नव्हतं.
यथावकाश, महिने भरल्यावर माहेरी आले. एका सुंदर मुलीला जन्म दिला. ते चार महिने माझे सगळयात सुखात गेले. बाळंतपणानंतर तीन महिने पूर्ण माहेरीच होते. याच काळात भावाचं लग्न ठरलं. आणखी मुहूर्त ठरायचा राहिला होता. पोराचं लग्न आहे म्हटल्यावर बापानं विचार केला आता हिची बोळवण करा आणि पुन्हा लग्नाला बोलवावंच लागणार. तीनच महिन्यात दोनदा खर्च करण्यापेक्षा एकदाच लग्नातच त्यांना बोलवू. चार-पाच दिवस ठेवून घेऊ आणि बोळवण करून पाठवून देऊ. त्या विचारानं त्यानं माझी तयारी केली. मी तरी माईला म्हणाले, ``माय, मला तरास करतीन बरं. तुमची व्हाली बचतत पनीक मव्हना जाळ व्हईन.'' पण माझं ऐकण्याची मानसिकता त्यांची आर्थिक परिस्थिती देत नव्हती. त्यांचे हाल दिसत होते. विचार केला, म्हटलं बोळवण होतेच आहे की, चार दिवस मागं पुढं. तेवढे दिवस व्हईल काईतरी.
बोळवणीविना आमची गाडी निघाली. सोबत भाऊ, वाड्यातला चुलता पडणारा एकजण असे आम्ही घरी पोचलो. निरोप अगोदरच पोचला होता. नवरा घरीच होता. मी मान खाली घालून लेकरू घेऊन घरात गेले. पोरगी झाली म्हणून कुणीच तिला पाहायला आलं नव्हतं. म्हणून मी सरळ सासूजवळ जाऊन सासूच्या मांडीवर पोरीला दिलं. तीसुद्धा तिच्यासोबत खेळू लागली. आणि मी माझ्या कामाला लागले. डमणीमधे पाच तास बसून अंगाचा अगोदरच बुग्गा पडला होता. आता इथं मी आल्यापासून सगळीच कामं करावी लागणार होती. दाळीची वेळ टळून गेली होती तरी दाळ शिजवायला टाकली नव्हती. आम्ही येणार हे त्यांना माहीत होतं तरी त्यांनी मुद्दामच केलं होतं. मला राग आला पण सांगणार तरी कोणाला ?
पण तेवढ्यात बैठकीतून जोरात बोलल्याचे आवाज मला ऐकू येऊ लागले आणि त्याबरोबर मी घाबरले. नीट लक्ष देऊन ऐकू लागले. नवरा माझ्या भावाला बोळवण केली नाही म्हणून शिव्या देत होता. ``तुम्ही हालकट हायतं. लाजा न्हाईत. लोकं आमाला हासायलेत. आता शिदोरी म्हून का चपात्याचे तुकडे वाटावं का ?'' असं काहीबाही बोलत होता. थोडा वेळ गप्प बसलेला माझा भाऊ नंतर चिडून त्याला उत्तरं देऊ लागला आणि मला वाटू लागलं की त्यानं काहीच बोलू नये. तो जसाजसा बोलू लागला तसातसा माझ्या काळजाचा थरकाप उडू लागला. शेवटी व्हायचं तेच झालं. नवऱ्यानं त्याला पाणीसुद्धा न देता घराबाहेर काढलं. भाऊसुद्धा गडबडीनं `आता पुन्हा म्या काई याचा न्हाई' असं सांगून निघून गेला आणि नवरा माझ्यावर येऊन कोसळला. म्या म्हणाले, ``याच्यात मही काय चुकी ? तुमी मला काऊन मारायले?'' तर तो मला म्हणाला, ``तुव्हा तं जीवच घेतो गं, पहाय की तू.'' आता मात्र मी त्याच्या तोंडाला तोंड देऊ लागले. मनात विचार होता आता वाघ्या म्हटलं काय अन् वाघोबा म्हटलं काय. हा काही सोडणार नाही. शिवाय ही एक खात्री वाटू लागली की ह्यो आता सोडणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या माराची सवय झाली होती. शिवाय भ्यायचं तरी कुठपर्यंत ? नाहीतरी कैदखान्यात राहण्याची इच्छाही नव्हती. माहेरी होते त्या काळात मैत्रिणींशी पत्रव्यवहार झाला होता. रिकाम्या, निवांत डोक्यात पुन्हा शिकण्याचे विचार डोकावत होते. त्या काळात पहिल्यांदा मी माझा मार्क्समेमो पाहिला. शाळेतून दाखलाही काढून आणला होता. विचार होता नवऱ्याला गोड बोलून पटवून पाहावं. पटला तर ठीक पुन्हा अडचणी नकोत. नाहीतर त्यातच वेळ जायचा नि नवऱ्याचा विचार बदलायचा.
भावाच्या लग्नाची तारीख निघाली. मला न्यायला मुराळी आला. यानं पाठविली नाही. मी जागीच तळमळत बसले. त्याच्या लग्नाला पाच-सहा दिवस शिल्लक असताना आमचं लग्न ज्यानं ठरविलं, तो मध्यस्थ आला. तो सासूच्या नात्यातला होता. त्यानं तिला खूप समजावून सांगितलं. लहान्या पोराला कुणी पोरगी देणार नाही हेही सांगितलं. तिचा छळ, त्याचा लहान्याचा त्रास या सगळयाच गोष्टी त्यानं सांगितल्या आणि माझ्यासोबत पाठवा म्हणून सांगितलं. बापानं बरोबर पीन फिरवली होती. कुणालाच काहीच बोलता आलं नाही. नवरासुद्धा शब्दानं बोलला नाही. त्यानं लगेच बोळवणीचंही संागितलं. ते न्यायला आले तर नाही म्हणू नका. लग्नाच्या अगोदर ते मानानं गाडी पाठवितील तर जा, असंही म्हणाला नि माझी सुटका झाली.
इथं भावाचा राग अजून गेलेला नव्हता. ``काय हलकट नवरा हाय तुव्हा. मायझ्याला, सोयऱ्यासंगं कसं बोलावं ते कळंना झालं. तुला जाळभाज हाय ते हाय आन पुना वरून आसं ? जाऊ दे. त्याला जे करायचंय ते करू दे. दे म्हनावं तुला आमच्याकडं धाडून. आमी दोघंजण हायतं आमाला तीन भाऊ असते त काय केलं आस्तं ? देलं अस्तं का न्हाई त्याचं त्याला वाटून. आता बी तसंच समजू. आमी तिघं भाऊ होऊत, असंच समजू. त्याच्या दावणीला मरण्यापरीस इथं काय व्हालंय.'' भाऊ रागारागानं बोलत होता. मी मनात म्हणत होते की, `मी बी कंटाळले. पनीक काय करू ? आधारंच गवसनं झालाय. आता कसं बरं वाटलंय, भाऊ आपला पाठीराखा वाटायलाय.'
लग्नाला गाडी पाठविली. त्यांचं कुणीच आलं नाही तेव्हा मला शंका आली. म्हटलं यांचा काही वेगळाच विचार दिसतोय. आता तिथं जायची इच्छा होत नव्हती. म्हटलं लग्न तर छान पार पडेल. परंतु लग्नाला नवरा हजर झाला. प्रचंड तुंबलेला. कुणालाच बोलत नव्हता. रात्री त्याची झोपण्याची व्यवस्था केली. राहण्याची विनंती केली. काहीच बोलत नव्हता. दुसऱ्या दिवशी साड्याची तयारी झाली आणि त्यानं निरोप पाठविला, आत्ताचे आत्ता निघ. आपल्याला जायचं. मी बापाला निरोप सांगितला. म्हटलं, त्यांना सांगा की इकडं नवरी पाठवू. इकडं आपण जाऊ. बाप गेला, बापाचा व्याही गेला. गावातले इतर माणसंही गेले. त्याला विनवू लागले. माझ्या लक्षात आले. आता हा गोंधळ घालणार. इथं पाहुण्या-ऱ्हाव्हण्यात गोंधळ होण्यापेक्षा आपणच पटकन बाहेर पडलेलं बरं. माझ्या अंगावर सूनमुखाची साडी होती. माईनं रडत रडत मला साडी नेसायला सांगितली. मी ती तशीच कोंबली. डोळे पुसले. माईच्या गळयाला पडले. धडधड रडले नि निघाले.
डमणी निघाली. गाडी चालवायला आमच्या वाड्यातलाच माझा नात्यानं चुलत सासरा. डमणीत आम्ही तिघे. नवरा, मी आणि माझी सहा महिन्यांची पोरगी. त्याला त्या पोरीविषयी चुकूनही देणंघेणं नव्हतं. कधी प्रेमानं जवळ घेतलं नव्हतं. ती माझ्या मांडीवर झोपली होती आणि यानं सुरू केलं, ``पारोग झाला तुही वाट पाहायलो. तुला चल मनल्याबरोबर निघता येत नाही ?'' मी थोडं मोकळया मनानं उत्तर देऊ लागले, ``अहो, भावचं लग्न...'' फटकन त्यानं झापड कानशिलात लगावली. ``काय भावाचं लग्न, तुव्हा नवरा तुला चल मनायलाय, आन तू तुह्या माईच्या नवऱ्याला धाडतीस ?'' आता माझ्या लक्षात आलं. सर्वांगाचा थरकाप झाला. त्याचा रागरंग पाहून मी सावरून बसले. त्याच्याकडे किंचित पाठ सरकवली. त्यानं झपकन चापट पाठीत मारली. मला त्याचं बोलणं आवडत नव्हतं. विशेषत: आमच्या वाड्यातलाच माणूस होता. त्याच्यासमोर असा अपमान नको वाटत होता. माझ्या माहेरच्याला तो टाकून बोलत होता. त्याचीही चीड येत होती. तरी त्याला जरा रागानंच म्हटलं, ``आता म्या तुमच्या संगच आले नं. वाटंनं कशाला भानगडी करता ? घरी गेल्यावर काय करायचं ते करा.'' पण त्याचं काही संपत नव्हतं. थोडा वेळ झाला की त्याच्या लक्षात यायचं नि, ``म्या बलवायलो अन् ही रांड माईच्या नवऱ्याला धाडायली. धाडतीस का ? सांग.'' की फटकन चापट. विचारल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं, उत्तर तरी काय देणार ? ``नाही धाडणार बापाला'' असं म्हटलं तर पुन्हा मार. ``मंग काऊन धाडलंस?'' बापाला धाडते म्हणायची सोयच नाही. असं बराच वेळ चालणारा खेळ त्याचा. आपला जीव जाणार. मला अपमान वाटत होता. यानं घरात जीव घ्यावा. पण दुसऱ्यांसमोर काही नको. पण हा ऐकायला तयार नाही. काही बोलायची सोय नाही. एका पारगाचा रस्ता. आणि सगळया रस्त्यानं हा फटाफट मारणार. माझी अवस्था अत्यंत दयनीय झाली. फिरून फिरून तसेच प्रश्न, तसाच मार चाललेला.
एक वेळ पोरगी रडायली, तिला शांत करण्यासाठी मी तिला पाजतेय, थोडा आडोसा घेतलेला आणि त्याला अचानक उबळ आली, नि प्रश्नाबरोबर फटकन माझ्या मोकळया पाठीत बसली. त्याबरोबर भीतीनं पान्हा चोरला गेला. एक विलक्षण तिडीक मस्तकात बसली. याला जर याच्या लेकराची दयामाया नसंल तर करायचं तरी काय याचा मार खाऊन. असा विचार मनात आल्याबरोबर मी धुरकऱ्याला आवाज दिला, ``कारभारी, डमणी थांबवा बरं.'' त्यानं एकदम कासरे आखडले आणि पहिल्यांदाच मागे फिरून पाहिलं. आमच्या वाड्यातला नवऱ्याचा लांबचा खुलता पडणारा माणूस, गरीब असला म्हणून काय झालं. आपल्या समोर घडू नये एवढंच तर संागावं. `जाऊ दे रे पोरा, व्हतंच अस्तंय, चालतंच अस्तंय, असंच बोलत होता आणि नवरा, ``कसं चलंतंय आबा, किंवा व्हाला काय व्हाचं, मला रांड वाट पाहाय लावायली'' असं म्हणू म्हणू मला मारत होता. त्यानं गप्प बस म्हटला असता तर तो थांबला नस्ता का? मी गाडी थांबवली, खाली उतरले नि म्हणाले,``तुली चलू द्या पुढी, म्या येते वजंवजं.'' आता नवऱ्याच्या लक्षात आलं मी का उतरले ते. त्यानं एकदम डोळे फिरवले. आपल्या बायकोनं असं म्हणावं याचा त्याला राग आला. तसा पटकन खाली उतरत म्हणाला, ``इथं का तुव्हा शिक्षणवाला लठ्या येणार हाय का ? चाल्ली उतरून निघायला तुहीत माय मी, बसतीस का न्हाई डमणीत.'' त्यानं माझ्या केसाला धरून हिसका मारला तशी मी एकदमच बाजूला गेले. तितकीच जोरात चिरकले, ``अंगाला हात लाऊ नका. लेकरू पडंल.'' तसा नवरा म्हणाला, ``पडतंय कसं. आताच पाड त्याला.'' त्यानं खसकन पोरीला ओढून घेतलं आणि एका हातानं तिला दंडाला धरून त्यानं हात उंचावला. पोरगी रडू लागली. ``बसतीस का न्हाई गाडीत ? का देऊ फेकून ? मी भीतीपोटीच डमणीत बसले. नि त्यानं पोरीला माझ्या मांडीवर आदळलं. गाडीवान या सगळयात त्याला धरायला होता. त्यानं मलाही समजून सांगितलं आणि त्यालाही समज दिली. निदा घरी जावोस्तोर तरी हाजिंदा करू नगंस, बापू. न्हायतं मलाच जाऊ दे आन् तुमी दोघं एकमेकांचे जीव घ्या. मला काई गरज न्हाई.'' मी ज्याची वाट पाहात होते ते तो आता बोलला होता. मग मात्र नवरा गप्प झाला, पण तंुबल्यासारखा. माझी धडधड वाढली. आता घरी गेल्यावर आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय, काहीच सांगता येत नव्हतं. नवऱ्याचं काहीच कळत नव्हतं. लेकरू झाल्यावर कमी होईल असं वाटलं होतं. पण उलट ते वाढलं. सासूकडून काही अपेक्षा करणं चुकीचं होतं. तिचं बोलणं गोड होतं, पण ती कशालाच हात लावत नव्हती आणि सारख्या अपेक्षा करायची. तिच्या बोलण्यात लोकांच्या सुना, मायबापांची करणी, अशी तुलना असायची. नवरा तिच्या बोलण्याच्या पुढे नसायचा. शेतातले गडी हिच्या मर्जीने ठरायचे. बाया हिच्या मर्जीने ठरायच्या. मला नवऱ्याचं एक कळत नव्हतं. शेतात कामं ह्याला करून घ्यायचे होते. कोण काम करतं, कोण नाही, ते त्याला जास्त माहीत असणार, पण सासू काहीतरी सांगायची आणि हकलपट्टी व्हायची. मी बरेचदा असंच बोलले तर नवरा म्हणाला, `` चुरूचुरू बोलायली. जास्त शिकलीस तर माजलीस का ?'' त्याला माझ्या शिक्षणाचाही राग होता आणि हळूहळू एक शंका येऊ लागली की याला माझ्याशी लग्न नाईलाजातून करावं लागलं असावं. कुणी देत नव्हतं आणि माझा बाप चार-दोन पाहुण्यांतच गांगारलेला. शिवाय त्याला माझ्या मागच्या न केलेल्या प्रकरणाची शंका होती का काय देव जाणे. ते त्यानं कधी बोलून दाखविलं नाही. असं आडपडद्यानं ते बोलल्यासारखं जाणवला.
कारणं कोणतीही असोत, पण मी त्यात भरडली जात होते. शाळेत शिकविलेलं सगळं वाया जात होतं. अशा क्षणी काय करायचं तेही कळत नव्हतं. मनात नाना विचार येत होते. एक विचार जीव देण्याचा होता. पण मुलीकडे पाहून शक्य वाटत नव्हता. जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत करावं असाही विचार होता. आतापर्यंत तेच करीत आले होते, आणि पुढचं भविष्य मला तसंच दिसत होतं, आणखी एक वाटत होतं. भाऊ म्हणालाच होता की तुझा भाऊ म्हणून सांभाळ करू तिथंच जावं, निदान छळ तरी होणार नाही. आणखी बरेच विचार वास्तवात नसलेले होते. पण अशावेळी नेमकी स्वप्नं खरी होत नाहीत.
डमणी दारात सुटली नि मी घरात शिरले. कधी नाही ते सासू दारात आली होती. लहानं पोरगं घरात धिंगाणा घालत होतं. ननंद सासूसोबतच चिकटून उभी राहिली होती. माझे सुजलेले, लाल झालेले डोळे तिला दिसलेच नाहीतं. तिनं गडबडीनं लेकरू घेतलं नि एकदम आवाज वाढवून म्हणाली. ``मा%%य आन आताबी लेकरू उघडंच आलं की गं माय. कायबाई माणसं हायतं, परदिस्यावानाचे. नादार बोळवणं करायची त राह्यली बाजूला, निदान लेकराच्या आंगात तरी काई घालावं.'' माझ्या डोळयाला खळखळ पाणी. तिच्या बोलण्याचा मलाही राग आला. माझ्याशी तिला देणंघेणंच नव्हतं. मी रडत रडतंच म्हणाले.``तुमच्या लेकानं घंटाभर तरी मला थांबू देलं का लगनात. तसंच पळवीत आणलं. आन् उशीर काऊन केलास म्हून समद्या रस्त्यानं मारीत आणलंय. त्याचं काईच वाटनं झालंय का तुमाला? बोळवण का भावजयीच्या माहेरी करता का मही. गावाकडं जावावं लागंन. नं. तुमी त आल्या न्हाईत. लेकाला काय सांगितलं कोणाला ठावं. त्यो त राकेसंच हायं. मारण्याशिवाय काई म्हाईत नाही. मही पाठ लाल झाली दिसनं का? '' सासू दबल्यासारखी झाली, आणि फटकन म्हणाली.``मला आसं चारंचारं बोलू नगंस, माय. म्या काई त्याला सांगितलं बी न्हाई आन काई न्हाई. ऊगी मह्या आळ घेऊ नगंस.'' मी तणक्यात नाहणीत निघून गेले. हातपाय धुऊन तोंडावरून पाणी फिरविलं. तोपर्यंत नवरा बैल बांधून आला. तसंच सुजलेल्या तोंडानं त्याला चरवी भरून दिली. त्याचा राग डोळयांतून जाणवत होता. भीती वाटत होती.
सासूनं त्याला इत्थंभूत माहिती विचारली. माझ्या समाधानासाठी बायकोला का मारलं हे ही विचारलं आणि सोबत `किती चारंचारं बोलायची' हेही सांगितलं आणि असं बोलणं तिला कसं पटत नाही तेही सांगितलं. नवरा सुटताच म्हणाला, ``हिची माय मी, मायझीरचे तुकडे कराय पाहिजे. निस्ते नखरे कराय पाह्यजेत. म्या तिला बोलावलोय, त ती मायचा नवरा मह्याकडं धाडायली, तिला कळलं इतकं घाईनं बलविलंय. निघाय सांगितलंय म्हणजे आपला नवरा कातावलाय, त आपून बिगीन निघाय पाह्यजे, तं ती मला वाट पहाय लावायला. हिला त नांदर दावतो, आता तू पाहायचं.'' माझ्या काळजात धस्स झालं. मी चहा केला. कधी नाही ते ननंद न्यायला आली. तिकडं मायलेकरं खुसखुस करीत होती. माझी धडकी वाढत होती. संध्याकाळ झालेली. मला रात्रीची आठवण झाली आणि काळजाचं पाणी पाणी झालं. रात्रभर निर्वस्त्र, नुसती फुसफुस, डोळयांतून खळखळ पाणी, ओरडण्याची सोय नाही. तोंड दाबलेलं. बाहेर पळणं शक्य नाही. कोणाला बोलवणं शक्य नाही, बोलावणार तरी कसं ? मला ती रात्र पुन्हा अनुभवण्यापेक्षा जीव दिलेला बरा वाटू लागला.
ननंद माझ्याजवळ बसलेली, म्हणजे मी त्यांचं बोलणं ऐकू नये. म्हणजेच त्यांचं बोलणं फक्त माझ्याविषयीच चाललेलं. मी कांदा चिरू लागले तो हातातला गळून पडला. पिठलं करायचं होतं. भाकरी थापायच्या होत्या. कशातंच चित्त लागत नव्हतं. सर्वांगाची थरथर. चटणी आहे तर मीठ नाही. पीठ आहे तर पाणी नाही. माझी अवस्था बिघडलेली. काय करायचं ? काहीच माहीत नाही. सासू तेल ओतणार. रात्रभर सासूला फक्त डोकं जमिनीला, भिंतीला मारल्याने दणदण आवाज तेवढे येणार. आता ती काय सांगते की ?
दिवेलागण झाली. नवऱ्यानं तुंबूनच भाकरी खाल्ली आणि तो घराबाहेर पडला. सासू लेकरं घेऊन कंदिलाच्या उजेडात माजघरात बसली. मी पोरीला पदराखाली घेऊन स्वयंपाकघरात बसले. विचार करीत असताना एका झटक्यातच विचार आला, आता नाही जगायचं. रात्रीचा त्रास सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं. त्या झटक्यातच झोपलेल्या पोरीला खांद्यावर घेतलं. ``हाड गाई, यु कुतू' करीत मोठ्या दारापर्यंत गेले. इकडं तिकडं पाहिलं आणि रात्रीचा अंधार तुडवीत झपझप करीत रस्त्याला लागले. मला तो क्षण अजूनही जसाच्या तसा आठवतो. त्या क्षणी माझ्या मनाची काय अवस्था असेल ती माझी मलाच माहीत. कुठल्याही क्षणी घरच्यांना कळंल तर ते धावतच माझ्यापर्यंत पोहोचतील ही प्रमाथी भीती मनात होती. उन्हाळयाचे दिवस, रात्रीचा अंधार, माणसं बहुतांश घराबाहेर. सोबत लेकरू, लेकराच्या रडण्याने अंदाज घेणार. मला कुणीही पाहू शकतं. अशा अनंत अडचणी. गावाबाहेर पडेपर्यंत जणू मी परसाकडला चाललेय असा आव आणत बिदाडीच्या दिशेनं गेलं आणि अंदाज आल्यावर पांदीनं जेवढी ताकद असेल नसेल तेवढ्या ताकदीनं रस्ता तोडत राहिले. अगोदर मला होता होईल तेवढं गावापासून दूर जायचं होतं, आणि त्यानंतर काय करायचं त्याचा विचार करू. त्याक्षणी तरी मला वाटते माझ्या डोक्यात असाच काहीतरी विचार होता. नेमकं काय करायचं ते माहीत नव्हतं. फक्त नवऱ्यापासून दूर पळायचं होतं.
तास दोन तास सारखी चालत होते. ती अंधारी रात्र. सगळे मोकळे झालेले. काले रान चांदण्या पायाखालचा गाडी रस्ता, सोबतीला सहा महिन्याचं कोकरू. आज मला तिचं नवल वाटतं. घरातून बाहेर पडल्यापासून पोरगी उठली नव्हती. रडली नव्हती. माझाच खांदा दुखू लागला तर मी खांदेपालट करी. ती तेवढ्यापुरतंच मचमच करी आणि झोपून जाई. मी सारखी चालत होते. नवऱ्याच्या भीतीसमोर बाकी कुठलीच भीती त्या क्षणी तरी जाणवत नव्हती. सवयीनं पायाखालची पांढरी वाट अंधूकशी दिसून लागलेली. तिचाच तेवढा आधार वाटत होता. मला जेव्हा खात्री पटली तेव्हा एका ठिकाणी मी रस्त्याच्या बाजूला बसले आणि लेकराला पदराखाली घेतलं. पाठीमागे निरखून पाहिलं. कुणीच दिसत नव्हतं. आता मात्र मला भीती वाटू लागली. आपण एकटेच आहोत. मनातून अनेक देवांची नावे घेतली. सोबत धुडकंसुद्धा नव्हतं. पिण्यासाठी पाणी नव्हतं. लेकरानं मागितलं तरीही नव्हतं. आता विचार सुचू लागले. काय करायचं ? एक आशा होती, माहेरी जायचं. बघू या पुढं काय होतं ते. आज तरी एकमेव आधार तोच होता.
ती रात्र. चोर पकडू शकतात. गावाशेजारून जाताना लेकरू रडू शकतं. गाव जागं होऊ शकतं. कुत्र्यांचं भुंकणं. कसंतरी गाव ओलांडलं की बरं वाटायचं. रानात नेमकी भीती वाटत नव्हती. नशीब इतकं चांगलं की पोरगी रडत नव्हती. जणू तिला अफूची गोळी दिलीय. बाकी सगळीच दु:ख वाट्याला येत होती. रस्ता जरी ओळखीचा होता तरी अंधारात काही कळत नव्हता, आणि कुणाला विचारण्याची सोय नव्हती. मी सारखी चालत होते. आत्तासारखी हापशाची व्यवस्थाही तेव्हा कुठंच दिसत नव्हती. विहिरीचं पाणी इतक्या रात्री कसं काढणार ? एक नदी आडवी आली. प्रदीर्घ काळानंतर मला प्यायला पाणी मिळालं. सगळया वाटेनं नदीचीच आस मला लागलेली होती. पाणी मिळालं आणि गाव जवळ आल्याचं समाधानही. इथून पुढं दोन कोसावर माहेर. आकाशातलं खाटलं चांगलं झुकलं होतं. आणखी कासराभर झुकलं की तांबडं फुटेल. कदाचित त्याअगोदर घरी. वाळूवर टाकलेल्या पोरीला उचललं. चालणे, थकणे, पुन्हा चालणे. बराच वेळ चालल्यावर गावात शिरले. कुत्र्याच्या गोंधळात घरापर्यंत पोचले आणि जोरजोरात दार वाजविले. वाडा माणसांनी भरलेला. सगळेच जागे झाले नि एकच गोंधळ झाला.
सासरचा माणूस शोध घेत येऊन गेला. आमच्या लग्नाचा मध्यस्थ येऊन गेला. माझी समजूत घालून निघून गेला. मी त्यांना समजून सांगतो म्हणाला पण माझा नकार कायम होता.कारण आतापर्यंत दोनदा त्यांना समजून सांगितल होत. मग आताच काय फरक पडणार? गावातल्या सगळया आयाबाया `आसं व्हतंच आस्तय नवरा मारीतच आस्तंय त्यानं न्हाई मारावं त मंग माराव कोणी.'असं समजावून सांगत होत्या.माईला माझ्याविषयी कळवळा वाटत होता तरी मी सुखानं नांदावं अशीच तिची इच्छा होती. नांदायाला माझाही विरोध नव्हता पण ज्याच्यात सुखच नाही ते नांदणं काय कामाचं? माझं दु:ख मलाच माहीत. कुणाला उलगडून सांगताही येत नव्हतं. कसं सांगणार ? सांगायचीच लाज होती. त्याचीच सगळयात जास्त दहशत होती. त्यामुळं मी नकार देत होते. त्यांच्याविषयी मला थोडाजरी जिव्हाळा वाटला असता तर मी मारही सहन केला असता. पण उत्कट सुखाचा एक क्षणही नव्हता. फक्त अत्याचार. पोरगीसुद्धा त्या अत्याचाराचंच अपत्य, हे सांगणार कुणाला ? सांगावं त माजली म्हणाले असते.
माझ्या गावातले चार प्रतिष्ठित माणसं येऊन आम्ही सोबत येतो म्हणाले, पण मी त्यांनाही दाद दिली नाही. त्यामुळे भाऊ चिडला, ``तुला का इथंच आमच्या उरावं राहायचंय ? इतकी माणसं मुला मनायलीत अन् तू न्हाई म्हनायलीस ?'' मी त्याच्याकडे चमकून पाहिले. तो आपलं तत्त्वज्ञान मला ऐकवत होता. बाप बाजूलाच बसलेला, तो बोलत होता, ``कितीबी झालं तरी आमाला घरी कसं ठेवता येईन ? एकदा लगीन झाल्यावं तुला देजलंय तेच तुव्ह घर. तुला तिथंच राहावं लागंन. एकदा लगीन झालं म्हंजे तू आमाला मेलीस आन् आमी तुला मेलो. तुला इथं ठेवून आमी आमच्या तोंडाला काळ कसं लावावं ? उद्या चार लोकं काय बोलतील ते सांगता येतंय का ?'' मी बापाकडं पाहिलं. तोही मला पटवून सांगण्यासाठी मान हलवीत होता ! माय तोंडाला पदर लावून रडत होती, पण बोलत नव्हती. माझी अपेक्षा या दोघांकडूनही होती. आता मला माझं अस्तित्व माझ्या लक्षात येत होतं. `तू जीव दे' असंच सांगताहेत असं वाटत होतं. क्षणभरच विचार केला. म्हटलं आत्ताच असं आहे. उद्या जन्म काढायचाय, कसं व्हायचं ? इथं टिकणं अशक्य आहे. आणि मग भावाला म्हणाली, ``तुला तसं वाटत असंन त घाल मला नेऊन.'' तसा भाऊ चपापल्यासारखा झाला. म्हणाला, ``तसं न्हाई, मला आडवं होऊ नगंस. मी आपला सांगी सांगायलो.'' मी म्हणाले, ``न्हाय रे, तुव्ह मन्न खरंच हायं. तुमी उद्या मही सोय करा. आन दोन दिसानं तुम्ही समदे एकदा त्याला नादर सांगायला या.'' भावाला एकदम हुरूप आला. वडिलांनाही बरं वाटलं. आता ते दोघेही हिरिरीनं बोलत होते. आईसुद्धा सगळेच जण मला सासरचं मोेठेपण संागत होते आणि मी शेवटचा एक जुगार खेळू पाहात होते. शिकलेली होते त्याचा परिणाम. तो जर यशस्वी झाला तर ठीक. नाहीतर दोघीही मायलेकींनी इंडरेल घ्यायचं तेही ठरवून टाकलं होतं.
तयारी झाली. मी तयारीनं सगळया सामानासहित अंगावरच्या दागिन्यासहित माईजवळच्या पैशासहित निघाले. गाडीतून सोडवायला चुलतभाऊ निघाला. भाऊ आला नाही. भांडणं झालेत म्हणाला. सगळयांचाच सुंठेवाचून खोकला जात होता. माय तेवढी रडत होती. माझी पेटी सोबत होती. गाडीत बसले. माईनं माझे पाय धुतले. हळदी-कुंकू लावलं. पाणी फेकून दिलं. गाडी हाकारली. माझ्याही डोळयाला खंड नव्हता. आपण सगळेच आधार तोडून टाकत आहोत असंच वाटत होतं. गावाच्या शिवेवर गाडी रेलली आणि मी भावाला सांगितलं. ``म्या काई सासरी जाची न्हाई. मला जाचं बी न्हाई. तू मला रेल्वे-ठेसनावर नेऊन सोड.'' त्यानं एकदम कासरे आखडले. आणि धक्का बसल्यासारखा माझ्याकडे पाहू लागला. आमचा जोरदार संघर्ष. ``तू नाही सोडत त म्या उतरते. तू गाडी वापस घेऊन जाय.'' त्याची भीती की मी जीव देणार आहे. तो मला पटवून सांगत होता आणि मी त्याला. मायबापासकट सगळयांची त्यानं नावं घेंतली. मी ऐेकली. शेवटी जेव्हा त्याचा नाईलाज झाला तेव्हा मग मी तुला गाडीत बसवून देतो म्हणाला. मी तयार झाले. गाडी येईपर्यंत तो मला धरूनच होता. मला बसवून दिलं आणि रडत रडत घराकडे निघाला.
थेट औरंगाबाद. तिथं पोचले तेव्हा सकाळ होऊ लागलेली. माझ्यासोबत गावातल्या मैत्रिणीचा पत्ता. सगळी धडधड. सकाळ होईपर्यंत तिथंच थांबले. सगळी अंग रेल्वेनं काळी झालेली. कोळशाचा परिणाम. मैत्रिणीनं संागितलेले सगळे अनुभव विशेषत: शहराविषयीचे, मला आता चटचट आठवू लागले. जवळच्या पत्त्याविषयीची माहिती पोलिसांनाच विचारली. नीट माहिती करून घेतली आणि सराईतपणे वावरल्यासारखी करीत ऑटोनं मैत्रिणीच्या घराकडे निघाले. जणू मी इथलीच राहणारी आहे. आपलं शहाणपण कसं उपयोगी पडतं याचा मी पुरेपूर अनुभव घेतला. तिच्या दारात जाऊन उभे राहिले तरीही तिचं लक्ष नाही आणि लक्षात आल्यावर `ही बया इकडं कशी?' म्हणून एकदम स्तंभितच झाली. तिला बोलताही येईना.
तिचा नवरा मला भला माणूस वाटला. मी केलेल्या आंधळया धाडसाचं त्याला कौतुक वाटत होतं. विशेष मी त्यांच्यावर एवढा विश्वास टाकला त्याचं समाधान वाटत होतं. आपल्या बायकोकडे तो जिव्हाळयानं पाहात होता. मी सगळेच संबंध तोडून आले होते. आता केवळ त्यांचाच आधार होता. मी तिच्या नवऱ्याला म्हटलं, ``दादा, मला चार दिसासाठी आसरा द्या. मोठ्या आशेनं तुमच्याकडे आलेय. मला जास्ती काई नगं. मला कोण वळीखतंय. तुमीच पोटापाण्याची सोय करा. मला एखाद्या कामाला लावा. आन् तुमच्या शेजारी घर करून द्या. म्या तुमच्या आधारानं कसंतरी जगते. एकदा लेकरू मोठं झालं की मंग काई फिकीर न्हाई. तसा तो उचंबळून आल्यासारखा म्हणाला, ``ताई, आता तुमी काईच काळजी करू नका. इथं राहायची सोय झाली नं. घर तुमचंच आहे. बाकी होइन हळूहळू. मैत्रिणीलाही बरं वाटलं. तिची चिंता मिटली.
स्त्रियांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या दुकानात, मी कामाला लागले. आजच्या काळात सेल्सगर्ल म्हणून. काऊंटरवर मालकीन बसलेली असायची. मी एकमेव नोकर. दुकानाच्या वरंच राहणाऱ्या एका मारवाड्याचं ते दुकान होतं. त्यांचा मुलगा गावातच दुसरं दुकान थाटून होता. इथलं छोटंसं असणारं हे दुकान म्हातारा-म्हातारी चालवत होते. लागणाऱ्या सामानाची व्यवस्था म्हातारं करायचं आणि बायको काऊंटरवर बसलेली असायची. अधूनमधून सूनसुद्धा येऊन बसायची. कौटुंबिक दुकानात मी येऊन पडले होते. काका स्वभावानं अतिशय चांगला माणूस होता. आस्थेनं विचारपूस करायचा. काकी मात्र थोडीशी खडूस वाटत होती. सातत्यानं आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवून द्यायची. मी कितीही लांब असो. मला बोलावून तिच्या बाजूलाच असलेलं पाणी द्यायला लावायची आणि मला सासरची आठवण व्हायची. घरी ते दारी. सारखंच. अर्थकारण सत्ता गाजवणार. काकी मला एरवी गोड बोलत पण कधी रिकामं बसू देत नसत. सातत्यानं काही न काही काम सांगतच राहायची. मारवाड्याचा नोकर कामं करूनच खंगतंय म्हणतात. त्याचाच अनुभव मी घेत होते. पण मला ते बरं वाटत होतं. एक तर पुरुष ग्राहक इथे येत नव्हते. घरात कोणी पुरुष नव्हते. मला असुरक्षित वाटावं असं काही नव्हतं. त्या काळात तरी मला याचीच गरज होती. एकदा जग कळल्यावर मग कुठंही गेले तरी चाललं असतं.
त्यांच्या शेजारीच मला त्यांनी रूम करून दिली. काकाकडून अॅडव्हान्स उचलून माझी तयारी झाली. पोरीला दिवसभर पाळणाघरात सोडावं लागे. बारा तास तिची माझी भेट नसायची. सुरुवातीला वाईट वाटलं पण नंतर सवय झाली. हळूहळू जगण्याच्या एक एक कला कळून येऊ लागल्या. आता परत जावसं वाटत नव्हतं. मनातला एक कोपराच फक्त ठुसठुसत होता. त्या दोघांनी मोलाची साथ दिली. मला जेवढी अपेक्षित होती तशी. त्यांच्यामुळेच मला जग पाहता आलं.
मनातून कधी वाटायचं, माहेरच्यांना सांगावं. सासरचे काय करायलेत ते पाहावं. आपला कोणी शोध घेतंय का ? नवरा काय करीत असेल ? त्याला धक्का बसला असेल का ? माझी वाट पाहात असेल का ? पोरीची त्याला आठवण येत असेल का ? जरी त्यानं तिला कधी जवळ घेतलं नसेल पण त्याचाच वंश होती ती. आई काय म्हणत असेल ? तिच्या दृष्टीने मी वाया गेलेली पोरगी होते. जीव दिला असता तर अधूनमधून आठवण काढता आली असती. आता तर तिला जाहीर म्हणताही येत नसेल. मनातल्या मनात कुढत असेल. त्यांना एकदा पत्र पाठवून कळवावं की मी सुखात आहे म्हणून. पण मी तसं करू शकले नाही. मनावर दगड ठेवून गप्प बसले.
एक दिवस अचानक भाऊ दारात येऊन उभा राहिला. त्याचं असं झालं की मैत्रिणीचा बाप एक दिवस येऊन गेला आणि मला पाहून चकित झाला. मी त्याला परोपरीनं विनवलं की कुणाला सांगू नका. पण हे त्याला पटलं नाही. माईला आपलं लेकरू सुखात राहावं वाटतंय मायमाऊलीची माया असते म्हणून त्यानं मुद्दाम माईला जाऊन खुशाली संागितली म्हणे. लगेच त्याला सोबत घेऊनच भाऊ दारात आला. लांबूनच घर दाखवलं आणि लेकीकडं थांबला. हा दारातूनच सुटला, ``आमाला वाटलं तुमी नांदाय जाला. तुमी त न्याराच झेंडा लावला आन लावला त लावला इथं येऊन त्या गावातल्याच महारणीसंग राहिलात. समदं गाव आमच्या तोंडात शेण घालायलंय. तुमाला काय ? तुमी खुशाल इथं.'' आल्याबरोबर सुरुवात. मी कशी आले ? काय झालं ? ते तर संगळंच बाजूला. त्याला आपलंच सुचतंय. मी म्हटलं, ``भाऊ, तोंड सांभाळून बोल, तुह्यासाठी त मी मेले नं मंग इथं काय ?'' ``तसं मनल्यानं भागत असतंय व्हय. आमी का तुला जगविन गेलो का ? तुला सासरी जाचंच नव्हतं त तसं सांगायचं. तिकडं लोक काईचे काई बोलायलेत. म्हंतात, हिला नांदायचंच नव्हतं त्या घरी. आता आपल्या लठ्यासंगं गेली निघून.'' मला चीडआली. ``लोकांचं नको सांगूस. तूव्ह सांग. तुला कोण लठ्या दिसायलाय तेबी सांग.'' आणि मला रडूच कोसळलं. मी रडतच सांगू लागले, ``आरे, मी किती जीव तोडून सांगू लागले, मला धाडू नका म्हणून, तुम्ही सगळे मिळून मव्हां जीवच घ्याला टपल्यात. काय करावं मानसानं ? कोणाचा तरी आधार व्हता का ?'' मग मात्र भावाचा आवाज कमी झाला. आणि तो परत घेऊन जायची तयारी दाखवू लागला. मी आता स्पष्ट नकार दिला. मला इथं आल्यापासून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचे काय फायदे असतात ते स्पष्ट जाणवू लागले होते. आता मी परतणार नव्हते. भावानं गोंधळ केला. विनवण्या केल्या. लेकीची, माईची आण घातली. ``तुला रान देतो म्हणाला. मी नाहीच म्हणाले. पुन्हा चिडला. तोंड पाहणार नाही म्हणाला नि गेला.
भाऊ येऊन गेल्यावर मी थोडी घाबरले. उद्या एखादेवेळी नवरा जर चिडलेला असेल तर गाडी घेऊन यायचा आणि मला उचलून न्यायचा. मी माझी भीती मैत्रिणीला बोलून दाखवली तर तिचा नवरा म्हणाला, ``ही का मोगलाई आहे का ? कोणीही कुणाला उचलून न्यायला! येऊ द्या बरं त्यायला. ते का गाव वाटलं का, ताई त्यायला. इथं फोन केला की बेड्या पडतात. फुकट आहे का ? तुम्ही घाबरू नका. मग आम्ही कशाला आहोत ? '' मला धीर आला. इथं तेही शक्य आहे असं वाटू लागलं. मग मीही निवांत झाले. म्हटलं आता धीटपणे जगायचं. जे होईल ते पाहू. कोणाला भ्यायचं नाही. उद्या माझी मैत्रीणही कदाचित इथे नसेल पण मला इथं राहावे लागेल. सगळं आपल्याला जमलंच पाहिजे.
भारत काळे
बी-३२०, स्नेहनगर,
वसमत रोड, परभणी - ४३१४०१



cialis
mzdhgoap cialis :-O kamagra cialis cialis apcalis =-] viagra >:-[ buying viagra iqlODJ viagra =-] cialis >:-[
alternatives to cialis
ovyssdqt alternatives to cialis tzFVP cialis 8]]] buy viagra cheap >:-[ viagra =-] cialis cheap 4278 viagra 8]]]
viagra
adpmvf http://meqnce.com/ eatfbtud [url=http://qscrtz.com/]eatfbtud[/url]
viagra
ojklezgl http://qsgnqj.com/ tmvjqyxq [url=http://bbkbxr.com/]tmvjqyxq[/url]
OIvVxMiEaXEFox
Cheap valium without a prescription - valium without prescription
mIOUPhIyOQDpTuJUMB
Buy valium online wthout prescription - Buy valium online canada
YUEnFvlLSHNbIHN
tramadol online - order cheap tramadol
lbqyecYXAMzC
buy cheap tramadol - discount tramadol
qLnXCocaaTtFnN
valium buy online - Purchase valium overnight delivery
bMkzEKCvjAw
xanax drug - Best xanax price
viagra
bftsyd http://aiqcad.com/ mfysnzxe [url=http://agdhbk.com/]mfysnzxe[/url]
DNxgcOuDnTX
valium online pharmacy - order valium
NLnfsuQMiinWOQkfR
xanax no prescriptions - Canadian generic xanax
WXKRttiqCfCtw
buy tramadol 100mg - discount tramadol
tpoNpvNDZLNvdByav
valium to buy - Cheap valium usa
zMQzbZaVxpRshXf
cheap valium online - Cheap canadian valium
qITVKgDMfryBJOfbh
buy cheap valium - cheap valium
ZaoXGzZNrHIf
tramadol order - online tramadol
YAJYpVVNypqkIoeeU
order valium - order valium online
mbcvOcfNMuKF
tramadol no prescription - next day tramadol
LAsaZDJwvYK
ambien to buy - Low price ambien
AjTNCIuMHQhPdVVYo
cheap xanax - buy cheap xanax
fDLqMkwxWQSgKjgtPD
ambien delivered overnight - Cheap canadian ambien
VCsoWqJbUNWZTtQx
tramadol hcl - buy tramadol
AbxLPBuEdaXnxcttpA
Purchase xanax overnight delivery - xanax delivered overnight
HvsjRLHvHfR
Buy valium uk - generic valium online
zNOntxmdcY
Low price xanax - xanax discount
kUNPOJTFGIyC
ambien buy - Cost ambien online
RqkXWRSTMdOVRSD
order cheap ambien - Discount ambien online
nntDtgLJOZKdmSvKiEc
ambien online pharmacy - Cheap ambien without a prescription
BmluHBXTQUqTEZa
buy cheap ambien - Cheap ambien without a prescription
FhPWTMIehPtrmSfET
generic xanax online - buy discount xanax
RRneRzpHvnEpKEV
cheap tramadol online - tramadol online
EpOGcaslJi
order xanax xr - generic xanax online
zRRxqgxplJdCoD
buy cheap tramadol - tramadol without prescription
kuEtpCPpeja
Buy cheap xanax usa - buy xanax
OXDhYzTMjdMwepCDjW
xanax cheap - buy xanax online
GYBwgBYlru
buy valium online - Cost valium online
klFZOwixOVCftisMH
order xanax - Buy xanax online wthout prescription
yrtvfo
kwsvjwz
yhmjiwo
nwaohe
DcSPdnHClXbWWu
xanax online canada - Buy cheap canadian xanax
GtulxQOjRBJRRiyUZpi
xanax lowest price - Generic xanax overnight
GTtyeyuYHB
valium online no prescription - Discount valium online
jhOnhVBYkavnfY
valium - valium lowest price
GFcnWqJHyR
ambien - Cheap ambien usa
SmDhoMzRKOsyaABgQf
klonopin online no prescription - brand klonopin online
qjQQcKyrGGvXznmh
buy klonopin online - online no prescription cheap klonopin
TZGngkNYQPtHbqGFcz
buy percocet online no prescription cheap - buy percocet online legally
WuBnVUWXNWwPLHE
buy percocet mexico - purchase percocet online