`द अदर फेस ऑफ दी मून' ही आशा मायरो या लेखिकेची कहाणी वाचणे हा एक आगळाच अनुभव होता. मी अनेक वर्षे भरपूर वाचन केले असल्यामुळे गेली काही वर्षे कोणत्याही ललित पुस्तकाची ५०-६० पाने वाचली की त्यानंतर लेखकाने काय लिहिले असेल याचा मला अंदाज येतो. परंतु हे आत्मकथन वाचताना मात्र माझी उत्सुकता शेवटपर्यंत कायम होती.
आशा ही राधु घोडेराव आणि सीताबाई या नाशिकजवळच्या एका खेड्यातील शेतकरी दांपत्याची, १९६७च्या नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली, मुलगी. तिच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात तिच्या आईचे निधन झाल्यामुळे आशा तीन महिन्यांची असताना राधूने तिला नाशिक येथील देवमाता कॉन्व्हेंट या अनाथालयामध्ये काम करणाऱ्या निर्मला या नन्च्या स्वाधीन केले. या अनाथाश्रमात मदर निर्मला यांनी तिचा तीन वर्षे प्रतिपाळ केला. नंतर तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मदन निर्मला यांनी `रेजिना पासी' या मुंबईमधील त्यांच्याच संस्थेच्या अनाथाश्रमात मदर अॅदेलिना हिच्याकडे तिला पाठविले. तेथे मदर अॅदेलिना आणि अन्य नन्स यांनी तीन-साडेतीन वर्षे तिला सांभाळतानाच तिला काही शिक्षणही दिले. आशा सात वर्षांची असताना स्पेनमधील बार्सिलोना येथील जोसेफ मायरो आणि इलेक्टा व्हेगा या दांपत्याने तिला दत्तक घ्यायचे ठरविले आणि मदर अॅदेलिना यांनी तिला बार्सिलोना येथे पाठविले. आशाच्या तिला दत्तक घेणाऱ्या आई वडिलांनी तिला सुखात वाढविले आणि उत्तम शिक्षणही दिले. या आई वडिलांनी आशाला तिचा जन्म भारतात झाला होता हे सांगितले होते. मात्र यापेक्षा अधिक काही माहिती त्यांना नव्हतीच.
१९९५ साली आशाला भारतात येण्याची पहिली संधी मिळाली. स्पेनमधील एका अशासकीय संस्थेने (एन.जी.ओ.) तरुण मुलींचा एक वर्क क्रॅम्प मुंबईत आयोजित केला होता. त्या गटात काम करण्यासाठी आशाची स्वयंसेविका म्हणून निवड झाली होती. मुंबईत काही दिवस स्वयंसेवी मुलींच्या लहानशा गटाने भारतीय कुटुंबात आठ दिवस रहायचे आणि नंतर अंधेरीमध्ये `जीवन निर्वाह निकेतन स्कूल' या िख्र्चाश्न मिशनने गरीब मुलांसाठी चालविलेल्या शाळेत काही दिवस काम करायचे, असे या वर्क क्रॅम्पचे स्वरूप होते. आशा अन्य सहकाऱ्यांसमवेत मुंबईत आल्यावर तेथील उष्ण हवा, गर्दी यामुळे तिला भांबावल्यासारखे झाले. परंतु फादर जोर्डी यांनी त्या सर्व मुलींना `भारत समजून घ्या, लोकांशी एकरूप व्हा, त्यांच्याबद्दल मत बनविण्याची घाई करू नका' हे सांगितले. आशाने याबद्दल लिहिले आहे, `फादर जोर्डी यांच्या भाषणामुळे एक नवीच खिडकी जणू उघडली गेली आणि आम्ही नव्या दृष्टीने सभोवताली पाहू लागलो.' आशाने तिच्या अनुभवाबद्दल थोडक्यात पण मार्मिकपणे लिहिले आहे. शिबिरातील या मुली रस्त्याने जात असताना अन्य स्पॅनिश मुलींच्या गटात भारतीय दिसणाऱ्या आशाला पाहून लोकांना कुतूहल वाटे. काही लहान मुले, बायका या रस्त्यात थांबून आशाशी बोलल्या. परंतु आशाला मराठी येत नसल्यामुळे संभाषण होणे शक्यच नव्हते.
रविवारी अंधेरीतील शाळेला सुटी असल्यामुळे शिबिरातील कामाला सुटीच असे. आशाने रविवारी ती पूर्वी राहात असलेल्या `रेजिना पासी' येथे जायचे ठरविले आणि त्याप्रमाणे ती तेथे गेली. मध्यंतरी वीस वर्षांहून अधिक काळ गेला असल्यामुळे मदर अॅदेलिना यांनी आशाला प्रथम ओळखले नाही. परंतु थोड्या संभाषणानंतर मात्र त्यांना आशाची ओळख पटली. हे लिहीत असतानाच आशा मारिओ हिने तिच्या `रेजिना पासी'मधील पूर्वायुष्याचे निवेदन केले आहे. आणि लिहिले आहे : `तिथल्या जीवनात फारसा बदल झाला नव्हता. मात्र येथे आल्यावर माझ्या भावना एकदम उचंबळून आल्या.' जुन्या आठवणींनी आशाच्या मनात गर्दी केली. आशा मदर अॅदेलिनांना म्हणाली, `मी कोणाची मुलगी होते हे मला जाणून घ्यायचे आहे.' मदर अॅदेलिना म्हणाल्या, `आशा, भूतकाळ उगाळत बसू नकोस. भविष्यकाळाकडे पहा.' पण आशा म्हणाली, `मला सगळं काही समजलं पाहिजे.' मदर अॅदेलिना तिला एवढेच म्हणाल्या, `तू गंगेची मुलगी आहेस' (यू आर दी डॉटर ऑफ दि गँजेस.)
अंधेरीच्या शाळेतील मुलांनी एक दिवस करमणुकीचा कार्यक्रम सादर केला. आशाने लिहिले आहे, `गाणी, नृत्य यांच्याशिवाय म. गांधींच्या जीवनातील महत्त्वाची घटना यावर एक नाट्य सादर करण्यात आले.' आशा काही दिवस आजारी पडली पण हळूहळू बरी झाली. नाशिकला जाऊन ती जेथे तीन वर्षे राहिली त्या देवमाता कॉन्व्हेंटमध्ये तिला जायचे होते. त्यांच्या शिबिराचा एक कार्यक्रम दिंडोरीला होता. तेथून नाशिक जवळ असल्यामुळे आशाला तेथे बसने जाता आले. नाशिकच्या गोदावरीवरील घाटाचे आशाने लिहिलेल वर्णन चित्रमय आहे. अखेर ती देवमाता कॉन्व्हेंट येथे जाऊन पोहोचली. आशाने आधी कळवून ठेवले होते. त्यामुळे मदर निर्मला तिची वाटच पाहात होत्या. त्यांनी आशाला कवटाळले आणि त्या प्रेमाने म्हणाल्या, `आशा, किती मोठी झालीस ग तू ?' मदर निर्मलांच्याकडून आशाला तिच्या भूतकाळाबद्दल बरेच काही समजले. त्यांना सर्व काही नीट आठवत नव्हते, पण आशाला इतके समजले की तिचे वडील जवळच्या खेड्यात राहणारे शेतकरी होते आणि ती अगदी लहान असतानाच तिची आई वारली होती. इतक्या लहान मुलीला सांभाळणे शक्य नसल्यामुळे आशाच्या वडिलांनी तिला मदर निर्मलाच्या स्वाधीन केले आणि त्यांनीच देवमाता कॉन्व्हेंटमध्ये तीन वर्षे तिला वाढविले. मदर निर्मला आशाला चर्च ऑफ सेंट अॅनमध्ये घेऊन गेल्या, कारण तेथे तिचा बाप्तिस्मा झाला होता. त्या चर्चमधील फादर प्रकास्ट यांनी जुने रजिस्टर काढले आणि त्यामध्ये आशाला पुढील नोंद वाचता आली:
बाप्तिस्माची तारीख ७ मे १९६९ मुलीचे नाव आशा घोडेराव, तिची जन्मतारीख ७ नोव्हेंबर १९६७. वडिलांचे नाव : राधू काशिनाथ घोडेराव. आईचे नाव वाचताना आशाचे डोळे भरून आले. ते नाव होतं शेवबाई. आशाला आता तिच्या भूतकाळाबद्दल बरेच काही समजले होते. त्यानंतर आशा शिबिरातील अन्य मुलींच्या समवेत मुंबईला परतली आणि शिबिर संपल्यावर तो मुलींचा गट स्पेनला परत गेला. आशाने स्वत:च्या पूर्वायुष्याबद्दल जी काही माहिती मिळवली तिच्यावरून आणि स्पेन व भारत येथील जीवन शैलीतील फरक पाहिल्यावर, आपण भारतातच आपल्या घरी राहिलो असतो तर आपले जीवन कसे झाले असते याची तिला बरीचशी कल्पना आली.
पुनरागमन
यानंतर जवळ जवळ आठ वर्षांनी आशा मारिओ पुन्हा भारतात आली. ती त्यावेळी बार्सिलोनाच्या टेलेव्हिजनच्या विभागात काम करीत होती. जॉर्डी लॅम्पार्ट या दिग्दर्शकाच्या नेतृत्वाखाली भारतातील जीवनाच्या काही भागांसबंधी डॉक्युमेंटरी तयार करण्याच्या कामासाठी आलेल्या गटामध्ये आशा मारिओ ही एक प्रमुख तंत्रज्ञ होती. या खेपेला आपल्या पूर्वायुष्याबद्दलची
सर्व माहिती शक्य तितकी तपशीलवार मिळवायची असे तिने ठरविले होते. आशाने नाशिकला मदर निर्मलाला पत्र लिहिले आणि ती तेथे येण्यापूर्वी तिचे गाव, आईवडील, भावंडे यांच्यासंबंधी माहिती गोळा करण्याची विनंती केली. मदर निर्मला यांनी नाशिकच्या सेंट फिलोमेना हायस्कूल मधील शिक्षक फ्रॅन्सिस वाघमारे यांच्यावर हे काम सोपवले. वाघमारे हे आशाच्या जन्मगावाजवळच राहत असल्यामुळे त्यांनी हे काम करण्याचे कबूल केले आणि आशा नाशिकला येण्यापूर्वी त्या भागात फिरून आवश्यक ती माहिती मिळविली.
सारे दुवे आता नीट जुळले. या पुस्तकातील ङ्गर्एींशीू ींहळपस ळप ळींी िीेशिी श्रिरलशङ्ख (सारे दुवे आता नीट जुळले) हे प्रकरण फार महत्त्वाचे आहे आणि आशा मारिओने हे प्रकरण अत्यंत चित्तवेधक रीतीने लिहिले आहे. पूर्वी तिला समजलेल्या काही चुकीच्या गोष्टींच्या ऐवजी संपूर्ण सत्य जेव्हा तिला उमगले, त्यावेळी तिला काय वाटले हे आशा मारिओ यांनी तपशीलवर आणि उत्कटतेने लिहिले आहे. पूर्वीच्या नाशिकच्या भेटीत तिला असे समजले होते की तिचे वडील राधू घोडेराव यांना तिला वाढवणे शक्य नसल्यामुळे त्यांनी तिला दोन वेळा उघड्यावर नेऊन ठेवले होते पण तिला कोणी उचलले नाही आणि तिसऱ्या वेळी एका नन्ने उचलून तिला अनाथाश्रमात आणले. परंतु यावेळी फ्रॅन्सिस् वाघमारे आशा मारिओला म्हणाले, `कोणताही भारतीय पिता आपले मूल रस्त्यावर ठेवणार नाही. राधू घोडेराव यंाच्या गावाजवळ पाथरी येथे वाघमारे हे िख्र्चाश्न गृहस्थ राहात होते. त्यांच्याकडे निर्मला या नन् येत असत. राधू वाघमारे यांना तीन महिन्याची मुलगी घरी वाढविणे शक्य नसल्यामुळे वाघमारे यांच्या मदतीने त्यांनी ती मदर निर्मलाच्या स्वाधीन केली आणि राधूच्या विनंतीप्रमाणे मदर निर्मला यांनी त्या लहान मुलीला देवमाता कॉन्व्हेंटमध्ये नेऊन पुढे तीन वर्षे तिला सांभाळले. एक विलक्षण योगायोग म्हणजे राधू घोडेरावला या बाबतीत ज्यांनी मदत केली होती ते वाघमारे हे आशाला माहिती देणाऱ्या शिक्षकांचे - फ्रॅन्सिस वाघमारे यांचे वडील होते. फ्रॅन्सिस् वाघमारे यांनी राधू घोडेराव या आशाच्या वडिलांच्याबद्दल आशा मारिओला सांगितले की तिचे आईवडील शहा या खेडेगावात राहात असत. राधू शेती करत असे. आशाच्या आईचे नाव सीताबाई होते. आशाचा जन्म शहा या गावातच झाला. पहिल्या शेवबाई या बायकोपासून राधूला चार मुले झाली होती. राधूची थोरली मुलगी सकुबाई त्याच्या दुसऱ्या बायकोच्याच वयाची होती. सीताबाईने आशाला जन्म दिला आणि बाळंतपणातच ती वारली. तेव्हा त्याच वेळी माहेरी बाळंत झालेल्या सकुबाईने आपल्या मुलाबरोबर आशाला अंगावर पाजून तीन महिने वाढविले. सकुबाई सासरी गेल्यावर तान्ही मुलगी वाढविणे शक्य नसल्यामुळे राधूने तिला मदर निर्मला या नन्च्या स्वाधीन केले आणि मदर निर्मला जेथे काम करीत होत्या त्या देव-माता कॉन्व्हेंट मध्येच आशा तीन वर्षे वाढली. हे सर्व ऐकताना आशाच्या मनात भावनांचा कोलाहल कसा उठला हे आशा मारिओने तिच्या पुस्तकातील निवेदनामध्ये स्पष्टपणे परंतु संयमाने सांगितले आहे. फ्रॅन्सिस वाघमारे हे सांगत असताना आशाला भेटायला तिघेजण आले होते. त्यांच्यापैकी एक जण आशाच्या थोरल्या बहिणीचा नवरा, भिकाजी मेहेरखांब हा होता आणि दुसरे दोघेजण त्याचे चुलतभाऊ होते. आशाचा हा मेव्हणा कोळपेवाडी जवळच्या साखर कारखान्यात नोकरी करत होता. त्याने आशाला त्याच्या घरी बोलावले आणि तिने ते मान्य केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनला आशा मारिओ फ्रॅन्सिस वाघमारे यांच्या बरोबर कोळपेवाडीला जाताना, फ्रॅन्सिसने वाटेत एक रस्ता तिला दाखविला आणि तो म्हणाला, `हा रस्ता शहा या तुझ्या जन्मगावी जातो.' वाटेत त्यांना पाथरी हे फ्रॅन्सिसचे गाव लागले तेव्हा फ्रॅन्सिस् म्हणाला, `याच गावात तुझ्या वडिलांनी तुला मदर निर्मलाच्या स्वाधीन केले.' नंतर ते कोळपेवाडीस पोहोचले. आशा मायरोने लिहिले आहे, `मी गडबडून गेले होते. बहिणीशी काय बोलायचे ते मला सुचत नव्हते.' आशाची बहीण आणि मेव्हणा व त्यांचे कुटुंब जेथे राहात होते ती साखर कामगारांची वस्ती होती. आशाने लिहिले आहे, `माझ्या बहिणीचे घर म्हणजे विटांनी बांधलेली एक खोली आणि व्हरांडा होता. घरावर पत्र्याचे छत होते. माझ्या बहिणीने साधी गुलाबी रंगाची साडी नेसली हाती. ती माझ्याच सारखी सडपातळ आहे. मी तिच्याकडे जशी पाहात होते तशीच ती माझ्याकडे पाहात होती. आमच्या दोघींच्या भावना उचंबळून आल्या आणि आम्ही दोघींनी एकमेकींना मिठीच मारली. आम्हा दोघींना अश्रू आवरेनात आणि त्याच वेळी आम्ही मधून मधून हसतही होतो. तिचा नवरा आणि मुले आमच्याकडे आनंदाने पहात होती. आशा मायरोचे आई वडिलांनी ठेवलेले नाव `उषा' होते. परंतु राधूने तिला नन्कडे देताना या दुर्दैवी मुलीच्या आयुष्यात आशा असावी म्हणून तिचे नाव `आशा' असे सांगितले असावे. नंतर तिच्या दत्तक आई वडिलांनीही तिचे हेच नाव स्वीकारले. उषाच्या थोरल्या बहिणीचे नाव आशा होते आणि तिच्या नवऱ्याने ते बदलले नव्हते. त्यामुळे दोघी आशा नावाच्या बहिणी एकमेकीला अनपेक्षितपणे भेटत होत्या. आशा मायरोला मराठी येत नव्हते. ती इंग्रजी बोलत असे आणि फ्रॅन्सिस दोघी बहिणीच्या बोलण्याचे दुभाषा म्हणून भाषांतर करीत होता. शेजारच्या बायकाही तेथे आल्या होत्या. त्या वस्तीवरील सगळे जण चकीत झाले होते आणि आनंदितही झाले होते. बहिणीबहिणींना इतक्या वर्षांनी एकमेकीला भेटताना पाहून शेजारणींच्याही डोळयांत अश्रू आले होते. आशाच्या बहिणीने तिला खायला देण्यासाठी सकाळीच काहीतरी केले होते आणि इतरांबरोबर आशाने ते आनंदाने खाल्ले. आशाच्या भाच्यांनी शाळेत जाण्याचे निळे गणवेश घातले होते. त्यांच्यातली सविता प्रसन्नपणे सारखी हसत होती. ती आपल्यासारखीच दिसते हे आशाच्या लक्षात आले. थोडा वेळ थांबून त्या दोघीजणी फ्रॅन्सिसबरोबर त्यांच्या जन्मगावी म्हणजे शेजारच्या शहा या गावी गेल्या, शेतकरी शेतात जमीन नांगरत होते, हे पाहून आशाच्या मनात आले की तिचे वडील असेच शेतात काम करीत असणार. आशाने लिहिले आहे, `आम्ही दोघी जीपमध्ये एकमेकींचे हात घट्ट धरून बसलो होतो. आम्हांला एकमेकींशी जे बोलायचे होते ते आम्हाला परस्परांच्या स्पर्शातून कळत होते.' आशाची बहीण तिला म्हणाली, `या गावाच्या जवळच्या गोदावरी नदीचे पाणीच आम्ही पिण्यासाठी आणत होतो.' आशाने लिहिले आहे, `हे ऐकून माझ्या लक्षात आले की आम्ही दोघी गोदावरीच्याच मुली आहोत.' नाशिकला आणि आसपासही गोदावरी नदीला `गंगा' म्हणतात. मदर अॅदेलिना आशाला एकदा म्हणाली होती, `आशा, तू गंगेची मुलगी आहेस.' आशाने लिहिले आहे, `आम्ही दोघीजणी क्षितिजाकडे पहात होतो. आमची आई येथेच राहिली. येथेच वाढली. तिची रक्षा या शेतात पसरली असणार. मला आईची आठवण झाली आणि वाटले की ती आम्हा दोघींना पाहात असेल. आम्ही दोघी कायम एकत्र राहू असे तिला वाटत असेल.' आशाला तिच्या जन्मगावी तिचा सावत्र भाऊ राधू व शेवबाई यांचा मुलगा भेटला. आशाने लिहिले आहे त्याचा एक मुलगा माझ्याचसारखा दिसतो. माझ्या बहिणींच्या मुलीत आणि माझ्यातही साम्य आहे. आम्ही एकाच कुटुंबातले आहोत हे उघडच आहे.
नंतर दोघी बहिणी कोळपेवाडीला परत आल्या. तिच्या बहिणीचा नवरा तिला म्हणाला, `इतक्या लवकर का परत जाता?' गावातल्या फोटोग्राफरला त्याने बोलावले होते. त्याने आशाबरोबर सर्वांचे फोटो काढले. आशाने लिहिले आहे, `एकमेकींचा निरोप घेताना आम्ही दोघी बहिणी रडत होतो. मी फ्रँेन्सिसला संागितले, तिला सांग की मी परत येईन. मी तिला कधी विसरणार नाही.'
आशा मायरो नाशिकला परत आली. दिवसभरात जे घडले, ज्या गाठीभेटी झाल्या ते सारे तिने मदर निर्मलाला सांगितले. मदरने तिला तेथील रजिस्टर दाखविले. त्यात तिच्या आईवडिलांची नावेही लिहिली होती. आईचे नाव शेवबाई लिहिले होते. कारण रजिस्टरमध्ये पहिल्या बायकोचे नाव लिहीत असत. आशा मायरोने लिहिले आहे : `हे खरे आहे की शेवबाईने मला जन्म दिला नव्हता. पण तिची मुलगी सकुबाई हिच्या दुधावरच मी जगले. म्हणजे तिचे आणि माझे मायलेकीचेच नाते होते.'
दुसऱ्या दिवशी `सकाळ'च्या पहिल्या पानावर आशाचा आणि तिच्या बहिणीचा फोटो आला होता. आशा कितीतरी वेळ त्या फोटोकडे पाहात बसली होती. त्या दिवशी आशा पुन्हा कोळपेवाडीला गेली आणि दोघी बहिणी त्यांच्या सर्वात थोरल्या सावत्र बहिणीला सकुबाईला तिच्या गावी जाऊन भेटल्या सकुबाईने आशाला लगेच ओळखले. तिघी बहिणी एका खाटेवर बसल्या. आशाने लिहिले आहे, `सकुबाईने माझा हात तिच्या हातात घेतला आणि तिला रडू आवरेना. ती मला म्हणाली, मी तुला माझ्या अंगावर पाजलंय. मी तुला कशी विसरेन ?' सगळया पूर्वीच्या आठवणी निघाल्या सकुबाई जेव्हा आशाला तिच्या आईच्या मरणाबद्दल सांगायला लागली तेव्हा तिघी बहिणींना भावना अनावर झाल्या. सकुबाई आशाला म्हणाली, `तुझी आई शेवटी मला म्हणाली, माझ्या लेकींकडे लक्ष असू दे.' आणि मी तिला वचन दिले की मी तुझ्या लेकींची काळजी घेईन.
आशा मारिओने लिहिले आहे, `आपण भूतकाळात जगतो आहोत की वर्तमानकाळात राहतो आहोत तेच मला समजत नव्हते. सकुबाईच्या स्पर्शातील प्रेम मी जन्मात विसरणार नाही. सकुबाईला सगळया जुन्या आठवणी येत होत्या. ती मला म्हणाली, `तुझी आई फार प्रेमळ होती. ती माझी सावत्र आई नव्हतीच. माझी ती मैत्रीणच होती.' आशाने पुढे लिहिले आहे, `सकुबाईचा माझ्याबरोबरीचा मुलगा बाळू याचे सिन्नरला छोटेसे हॉटेल आहे. सकुबाई आम्हाला तेथे घेऊन गेली. बाळूने आम्हाला पकोडे आणि चहा दिला. आम्ही तो आनंदाने घेतला.'
त्यानंतर आशा मारिओ नाशिकला देवमाता कॉन्व्हेंटमध्ये परत गेली. ती तेथे काही दिवस राहिली. कोळपेवाडीच्या बहिणीला तिने काही दिवस आपल्याबरोबर राहायला लावले. आशाने लिहिले आहे, `एकमेकींच्या सहवासात आमचे चार दिवस सुखात गेले. माझ्या बहिणीने जेव्हा मला सांगितले की तिचा नवरा प्रेमळ आहे आणि तिचा संसार सुखात चालला आहे तेव्हा मला फार समाधान वाटले. माझी बहीण मला म्हणाली की फ्रॅन्सिसने ज्यावेळी, मी नाशिकला आले असून तिला भेटणार आहे असे सांगितले तेव्हा तिचा प्रथम विश्वासच बसेना. ती मला म्हणाली, पण तुला पाहिल्याबरोबर मी तुला लगेच ओळखले.' यावर मी म्हणाले, `आणि मीसुद्धा तुला ओळखले.' या पुस्तकातील आशा आणि तिच्या बहिणींची झालेली आक स्मिक भेट आणि भेटीत त्या काय बोलल्या याचे निवेदन हा भाग भावनेने ओथंबलेला आहे. या पुस्तकातील हृदयस्पर्शी प्रकरण वाचताना माझ्या डोळयांतही अश्रू आले.
आशा मायरोचे तिच्या बहिणीबरोबरचे दिवस सुखात गेले. पण आशाला ही पूर्ण जाणीव होती की तिला भारतात राहणे शक्य नव्हते. इथला उन्हाळा, इथली गर्दी, इथले खाणेपिणे हे तिला मानवणे शक्यच नव्हते. आशा स्पेनमध्येच वाढली, तेथेच तिचे कर्तृत्व बहरले. स्पॅनिश हीच तिची मातृभाषा झाली होती. आई वडिलांची जी माया तिला वर्षानुवर्षे मिळाली त्यातूनच ती घडत गेली होती. स्पेनमध्ये जन्म झालेला नसला तरी ती स्पेनवर मातृभूमीसारखेच प्रेम करीत होती. आशाने लिहिले आहे, `मी दोन वेळा भारतात आले. मला माझ्या जन्मापासूनची हकीकत कळली, माझ्या बहिणी भेटल्या यामुळे माझ्या आयुष्यातील
अपूर्णता नाहीशी झाली.'
या पुस्तकाच्या पहिल्या भागात आशाच्या आईच्या दैनंदिनीतील काही मजकूर आणि तिने आशाला लिहिलेली पत्रे आहेत. त्या पत्रांतून तिच्या आईच्या मनातील वात्सल्य भावना उत्कटतेने व्यक्त झाली आहे. जोसेफ मायरो आणि इलेक्टा व्हेगा हे आशाचे आईवडील. त्यांनी आशाला आणि तिच्यापेक्षा थोड्या लहान असलेल्या फातिमाला वाढविले. आशा स्पेनमध्ये उत्तम शिकली आणि तिचे कर्तृत्व बहरले. आशा लहानपणी त्यावेळी मुुंबईला `रेजिना पासी'मध्ये राहात असे त्यावेळी ती मदर अॅदेलिनाला म्हणत असे, `मला आई वडील पाहिजेत.' मदर म्हणत, `तू देवाची प्रार्थना कर. म्हणजे तुला आई वडील मिळतील.' ज्यावेळी जोसेफ मायरो आणि इलेक्टा व्हेगा यांनी `रेजिना पासी'च्या चालकांशी पत्रव्यवहार करून आशाला दत्तक घेण्याचे ठरवले त्यावेळी त्यांनी त्यांचे फोटो, आशाला देण्यासाठी मदर अॅदेलिनांच्याकडे पाठविले. मदरने ते फोटो आशाला दिले आणि त्या तिला म्हणाल्या, `हे बघ, तुझे आईवडील. तुला आता आम्ही त्यांच्याकडे पाठवून देऊ.' आशा तिच्या आईवडिलांचा फोटो खिशात ठेवू लागली. इकडे आशा केव्हा येणार हे कळल्यावर इलेक्टा व्हेगा यांनी जे लिहिले आहे ते उत्सुकतेने आणि वात्सल्य भावनेने ओथंबलेले आहे. २७ ऑक्टोबर १९७४ ला आशा बार्सिलोनाला पोहोचली. तेव्हा काय घडले, तिच्या आई वडिलांना किती आनंद झाला हे व्हेगा इलेक्टा यांनी भावपूर्ण शब्दांमध्ये लिहिले आहे. आशाने या पुस्तकात तिच्या आईची व्हेगा इलेक्टा यांची पत्रे उद्धृत केली आहेत. त्यांच्यामधून मातेच्या मनाचा उत्कट आविष्कार झालेला आहे.
आशा मायरो यांनी या पुस्तकात लिहिले आहे, `ज्यावेळी मी भारतात प्रथम जाऊन आले, त्यावेळी मला जाणीव झाली की माझ्या आई वडिलांच्यासारखे मुले दत्तक घ्यायला उत्सुक असणारे अनेक स्त्रीपुरुष असणार. त्यांनी माझे पुस्तक वाचले तर त्यांना मूल दत्तक घेणे हा अनुभव कसा असतो याची थोडीतरी कल्पना येईल म्हणून मी त्यांच्यासाठी पुस्तक लिहिले.'
`मी भारतात दुसऱ्या वेळी गेले तेव्हा मला मी कोणत्या कुटुंबात, कोठे जन्मले, माझ्या आयुष्यातील पहिली काही वर्षे कशी वाढले ही सारी माहिती मिळाली. त्यावेळी मला माझ्याप्रमाणेच जगातील एका लहानशा गावात जन्म घेतलेल्या आणि दत्तक गेल्यावर जगाच्या दुसऱ्या टोकाला, जन्मभूमीतील संस्कृतीपेक्षा अगदी वेगळी संस्कृती असलेल्या देशामध्ये शिक्षण घेऊन वाढणाऱ्या, अनेकांची आठवण झाली. तेही माझ्याप्रमाणेच त्यांच्या जन्माबद्दल, जन्मदात्यांबद्दल, मायभूमीबद्दल विचार करीत असणार. माझे पुस्तक वाचल्यावर त्यांच्या जीवनाचा अज्ञात असलेला भाग हुडकून काढावा असे त्यांना वाटेल आणि माझ्याप्रमाणेच त्यांनी ते केले तर त्यांच्या जीवनातील अपूर्णता संपेल असे मला वाटले.'
आशा मायरो यांनी लिहिले आहे, `आपले पूर्वायुष्य शोधण्याचा समजण्याचा हा अनुभव आगळाच असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतील हे सुटलेले दुवे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रगल्भ भागाशी जोडले गेलेच पाहिजेत.'
मी काही वर्षांपूर्वी एडवर्ड सैद या थोर विचारवंतांचे एुळश्रशी (हद्दपार) हे पुस्तक वाचले होते. सैद हे धर्माने िख्र्चाश्न. त्यांचा जन्म इजिप्तमध्ये झाला. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या आईवडीलांसमवेत लेबानन, पॅलेस्टाईन, युरोपातील काही देश येथे रहावे लागले. एडवर्ड सैद पुढे अमेरिकेत गेले. कष्टाने शिक्षण घेऊन त्यांनी पुढे न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये तीस वर्षे इंग्रजी साहित्य शिकवले. अनेक पुस्तकेही लिहिली. `एक्झाइल्स' (हद्दपार) या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी आजच्या जगातील अस्थिर राजकीय परिस्थितीत ज्या कोट्यवधी लोकांना त्यांची मातृभूमी सोडून अन्य कोठल्या तरी देशात रहावे लागते. त्यांच्या जीवनाबद्दल विवेचन केले आहे. अशा लोकांच्या जीवनाची मुळेच (ठेेींी) कशी उघडली जातात हे प्रा. एडवर्ड सैद यांनी अत्यंत भेदक रीतीने मांडले आहे. मात्र त्यांचे विवेचन आणि विश्लेषण विचाराधिष्ठित आहे. आशा मायरो यांचे पुस्तक अगदी वेगळया स्वरूपाचे आहे. त्यांनी त्यांच्या आत्मकथनात एका संस्कृतीत जन्म घेऊन दुसऱ्या अगदी वेगळया संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीच्या भाववृत्तीवर प्रकाश टाकला आहे.
ग. प्र. प्रधान, पुण
Posted in



无标题文档two watches that lasted