भेला

`` पोरचं जमून जाय तं त बरं व्हयीन माय%.. माघल्या वर्सीबी लयेच झनं पाहून पाहून गेले ; पण कोणच हाव म्हणलं नि.''
``काय हाव म्हणतीन ते. तिच्याइतकं शिकेलच व्हते नि ते.''
`` मी नायी म्हणत व्हती तुमाले, आपलं खेड्याचं काम हाये. तिले शिकाळा नको म्हणून.''
`` तुले अडाणचोटले काय समजते शिक्शनातलं ?''
`` नायी माय%.. मले काय समजते, तुमी त् लयेच शिकेल हाये.''
`` अरे%.. आपून शिकेल नि; म्हणूनच त् तिले नं भाऊले शिकोलनं आपुन.''
`` तुमी काय ऐकणार हाये माही कोणतीबी गोस्टं. तुमचं तुमचंच तापटतजा तुमी. पाव्हण्यायसमोरबी नको तापटतजा तुमची तुमचीच. हे मानेगांवचं थळ जावू नको देजा.''
`` आपल्या पोरचं जम्याले नको असं वाट्टे का कोन्या बापाले? पोरगा मास्तर हाये त्ं त्यानं फाडा लय मोठं तोंड मंग काय करशीन? आपले लोकंबी लयेच तोंड फाडू राहले आता.''
`` नायी त् काय माय%..पोऱ्हीच्या लगनायचं त् लगेच खराब काम व्हयेल हाये आता.''
`` बरं ते जावू दे...नको बडबड करू...सकायी लवकर उठनं हाये...जप आता...''
असं म्हणून कौतिक साळवेनं बायकोला झोपायचं सांगितलं. खरं तर त्याला आणि त्याच्या बायकोला झोप येणारच नव्हती. पोरच्या लग्नाच्या विषयानं दोघांचीही झोप उडून गेली होती. त्यांच्या एकुलत्या एका अनिताला मानेगांवचा शाळा मास्तर पाहून गेला होता. मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत होता. त्याचे मायबापही एकवेळा येऊन गेले होते. त्यांनाही `अनिता' पसंत पडली होती.
अनिता ही मागच्या वर्षी बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाली होती. तिला पंचाहत्तर टक्के पडले होते. तिचा गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या चांगदेव हायस्कूलमध्ये पहिला नंबर आला होता. पुढे शिक्षण घ्यायचं तर मुक्ताईनगरला लांब जावं लागेल. त्यातल्या त्यात एस.टी.चा प्रवास, रोजच्या दगदगी आणि तरुण पोरगी म्हणून तिचं शिक्षण कौतिक साळवेनं थांबवलं होतं. तिची डी.एड्. करण्याची इच्छा होती; मात्र ऐपत नसल्यानं डी. एड्. पेक्षा तिचं लग्नंच उरकवून टाकण्याचं त्यानं ठरवलं होतं.
मागच्या वर्षापासूनच तिला एक-दोन स्थळं येऊन गेली होती. एक मुलगा पुण्याला कंपनीत नोकरीला होता, तर दुसरा बारावीत दोन-तीन वेळा नापास झालेला होता. त्याचा बाप शेतीखात्यात साहेब होता. ``पेन्शनमधी गेलो की, माझ्या लेकाले मुक्ताईनगरले `कृषि विकास केंद्र' टाकून देईन'' असं सांगत होता. कौतिकनं या दोन्ही स्थळांकडे दुर्लक्ष केलं होतं. अनिताला नोकरी करणाऱ्यालाच देण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या बायकोला त्याचं हे वागणं खटकत होतं. तिला झटकीफट लेकबायचं लग्न करून मोकळं व्हावसं वाटत होतं.
कौतिकचं शिक्षण फारसं नव्हतं. पण आपली मुलं शिकून मोठी झाली पाहिजे, असं त्याला वाटायचं. त्यालाही त्याच्या बापानं खूप शिकवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याचं डोकं काही त्यावेळी चाललं नव्हतं. त्याच्यासोबत शिक्षण घेणारे आता नोकरीवर होते. ते अधून, मधून गावात यायचे. तेव्हा कौतिकला वाईट वाटायचं. त्याच्याकडे आठ-दहा एकर शेती होती ; पण पावसाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू जमिनीत फारसं पिकत नव्हतं. यावर्षी जरा बरी परिस्थिती होती. पैसाही हाती आलेला होता. त्यामुळे दोन पैसे इकडे की, तिकडे `मास्तरचं स्थळ' जाऊ द्यायचं नाही. हे त्यानं ठरवलं होतं.
कौतिक सकाळी उठून सगळया आजूबाजूच्या भावबंदायच्या घरी जाऊन आला. बायांनी एक त्रच स्वयंपाकाची तयारी केली. लग्न जवळ-जवळ जमल्यातंच होतं. थंडीचे दिवस असले तरी पाहिजे तशी थंडी पडत नव्हती. रात्री कडकडून थंडी पडत होती, तर दिवसा कडक ऊन पडत असल्यानं एक फट पाहुण्यायच्या सावलीसाठी कौतिकच्या वसाऱ्यापासून जनार्दन साळवेच्या वसाऱ्याच्या ठूनीपर्यंत लांबलचक बांधला होता. आजूबाजूची लहान मुलं त्याच्यावर मस्ती करत होते. सुपडू म्हातारा अधून-मधून त्यांच्यावर जोर-जोरात खेकसत होता.
घरात बायका पंधरा-वीस माणसांचा स्वयंपाक करताना घामाघूम होत होत्या. अकराच्या गाडीनं पाहुणे आले होते. पाहुण्यांना येताबरोबरच प्यायला पाणी दिलं गेलं. त्यांनी हात-पाय, तोंड धुवून घेण्यासाठी कौतिक पुढे पुढे करत होता. मास्तर पोरगा, त्याचे माय-बाप, दोन्ही बहिणी, त्यांचे नवरे, काही नातेवाईक आणि भावबंद असे मिळून आठ-नऊ जण आले होते. त्यांच्यातल्या बाया आल्या तशा कौतिकच्या वसाऱ्यात घुसून बसल्या होत्या. अनिताला खालून, वरून पाहात होत्या. तिला आज सकाळपासूनच साडी नेसवण्यात आल्यानं तिचं तारुण्य अधिक खुलून गेलं होतं.
पाहाता-पाहाता आपली लेक किती मोठी होऊन गेली. या विचारानं कौतिकची बायको हरखून गेली होती. एकीकडे तिचं लग्नं जमत असल्यानं तिच्या आनंदाला पारावार नव्हता. तर दुसरीकडे लहानाची मोठी केलेली पोर चिमणीसारखी आता भुर्रकन उडून जाईन या विचारानं तिच्या काळजात कालवाकालवी होत होती. अनिता मुलाकडच्या बायांजवळ राबराब-राबत होती. त्यांना पाणी दे, चहा दे, इच्छा नसताना पाया पड, डोक्यावरचा पदर पुन्हा पुन्हा घे. यातच ती थकून जात होती.
पाहुणे हातपाय धुऊन फटावर बसले होते. कौतिक भावबंदायच्या घराच्या चकरा मारत होता. ते एक-एक करून येत होते. सुपडू म्हाताऱ्याचं लहान मुलांवर मोठ-मोठ्यानं खेकसणं चालूच होतं. पाहुण्यायच्या आणि कौतिकच्या भावबंदायच्या इकडच्या तिकडच्या गप्पा-टप्पा रंगल्या होत्या. पुरातत्त्व विभागाच्या उत्खननात प्राचीन वास्तू सापडाव्यात तशी एकमेकांची नाती एकमेकात सापडत होती.
``काय ठरोयाचं हाये त्याले पहेले सुरुवात करा, बाकीच्या गोष्टी माघून करजा.''
असं म्हणून जनार्दनबुवानं चर्चेला तोंड फोडलं. तसे मुलाकडचे आणि मुलीकडचे शांत होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
``आता काय ठरोन पडते, पोरग्याले पोरगी नं पोरगीले पोरगा पसंत असल्यावर !''
मुलाचा बाप बोलला.
``नायी, तसं नि पाव्हणेबाँ, कसं हाये लगनाच्या पहेले सरवं ठरोयेल पाहजे, चार माणसायच्या कानंावर जायेल पाहजे.''
``बराबर हाये जनार्दनकाकाचं म्हणनं. सरव्यायसमोर काय ते बोला.''
कौतिकनं जनार्दनबुवाचं म्हणनं उचलून धरलं.
``सांगा, लगन कसं कऱ्याचं?''
जनार्दनबुवानं सर्वांसमोर मुलाकडच्यांना प्रश्न केला.
``हे पहा, आपल्यात भेला पद्धत हाये, भेला करा इस-इस हजाराचा!''
मुलाचा मेहुणा बोलला.
वीस- वीस हजार म्हणता बरोबरच मुलीकडचे एकदम हादरून गेले.
``एकदम इस-इस....!''
``मंग काय इशेष हाये?''
``तुमाले त्ं कायीच इशेष नि;पण पोरच्या बापाच्या जीवाचा त्ं इच्चार करना पडीन नं''
``कायी इशेष नि म्हणा आता, महागाईच तशी हाये''
``महागाई त्ं लय हाये, म्हणून आपूनंबी त्याच्यात कुदी मारुन घ्यायची का?''
जनार्दनबुवानं असं म्हणून
``कवतिक, सांग रे भो%..तू लेकीचा बाप आहे. तिह्यानं झेपत अशीन त्ं बोल.''
असं कौतिकला सर्वांसमोर विचारलं. त्याची घाबरगुंडी उडाली. त्याला काही बोलता येईना.
हे पाहून त्याची बाजू उचलत त्याचा लहान भाऊ त्र्यंबक बोलला-
``काय झेपीन तो''
``अरे%..आमी कायीबी बोलू. तुमी किती करसान ते त्ं सांगा.''
मुलाचा मामा बोलला.
``काय सांग्याचं..! सांग्यासारखं बोलूच नि राहले तुमी.''
त्र्यंबक पुन्हा बोलला.
``हत् तिच्या काय माणसं हाये गड्यायहो% भेल्यालेच झुरुनि राहले तुमी. त्ं वरून काय देसान बापा?''
मुलाच्या काकानं मध्येच चर्चेत दगड टाकून दिला. काही वेळ शांतता पसरली. इकडचे आणि तिकडचे एकमेकांकडे पाहत राहिले. कौतिकचा चेहरा तानला गेला.
``हे पहा, जरा रितीभातीनं बोला. इस-इस हजाराचा भेलाबी कऱ्याचं म्हणता नं अजून वरूनबी काय मांगता?''
जनार्दनबुवानं थोडासा तणाव कमी करून मुलांकडच्यांना त्यांच्याच शब्दात अडकवण्याचा प्रयत्न केला.
``रितीभातीनंच बोलून राहलो आमी. वरून त्ं कायीतरी देनंच पडीननं.''
जनार्दनबुवाच्या बोलण्यातून निसटत मुलाचा काका पुन्हा बोलला. त्याची बाजू घेऊन मुलाकडचे सर्वच बोलू लागल्यानं बैठकीतला गोंधळ वाढून गेला. मुलीकडचेही कौतिकची बाजू जोरदारपणे मांडू लागले.
``अरे%, जरा सरवे शांतता ठेवा. एक-एक बोला, त्या पोरगीच्या बापाचा त्ं इच्चार घ्यू द्या.''
जनार्दनबुवानं सर्वांना शांत केलं. आणि कौतिकला बैठकीच्या बाजूला नेलं. म्हणजे त्याच्या घरातच नेलं. तिथे त्याची बायकोही आली. नवरा-बायकोचं म्हणनं बुवानं ऐकून
घेतलं. आणि पुन्हा बैठकीत आले.
``बोल रे भो% कवतिक पटकन, काय बोल्याचं हाये ते.''
बराच वेळ शांततेनं बसलेल्या सुपडू म्हताऱ्यानं कौतिकला विचारलं.
``माह्याकडून एवढा भेला झेपनार नि काका.''
त्यानं सुपडु म्हाताऱ्याला सर्वांसमोर सांगितलं.
``तुमी सांगा त्ं खरा कितीचा भेला करसान ते''
मुलाचा मेहुना बोलला.
``जास्तीत जास्त पाच हजाराचा करू.''
जनार्दनबुवानं पुन्हा चर्चेची सूत्रं आपल्या हाती घेत म्हटलं.
``हे पाहा साळवेबॉ, थळ चांगलं हाये, पोर सुखात राहीन''
``ते सरवं समजते आमाले; पण पैश्याचं सोंग नि जमत पाव्हणेबॉ.''
``लेकबायसाठी करनं पडते भो% दुसऱ्या जातीच्या लोकायचं पहा जरा''
मध्येच मुलाचा काका फटकन बोलला. तसा -
``दुसऱ्या जातीचे लोकं एकमेकाले मदतबी करता, नाका-कानात चहावरबी लगनं करता.''
जनार्दनबुवानं मुलाच्या काकाला सुनवलं. तरीही पुढे -
``भेला सोडून त्ं वरून कायी ना कायी देनंच पडते नं.''
``आता दयूनच राहले भो% लोकं. बरं, पोरगा मास्तर हाये.''
मुलाकडचे एक-दोन जन अजून बोलायला लागले.
``असू द्या नं मंग ! कायी रितीभातीनं अशीन त्ं व्हईन तेबी.''
जनार्दनबुवानं कौतिकची बाजू घेत म्हटलं,
``बोलनं रे कवतिक, तू त्ं सांग तिही कढलोक ताकत हाये ते''
सुपडू म्हाताऱ्यानं कौतिकला पुन्हा बोलायला भाग पाडलं.
``तो जास्तीत जास्त सात हजारालोक करू शकतो.''
जनार्दनबुवानं कौतिकचा निर्णय सांगून टाकला.
``सात नं सात चौदा हजार व्हतीन, त्याच्यात काय जमीन भो%...? नवरा-नवरीचे कपडेबी बसनार नि,''
मुलाकडचा एकजण बोलला.
``बसतीन म्हणा. कपडे जरा हलके फाड्याचे.''
``हलके कशे काय फाटतीन ? पोरगा मास्तर हाये, त्याच्या इस्टापचे लोकंबी येतीन लगनाले, जरा चांगलेच घेनं पडतीन की नायी. पंधरा-पंधरा हजाराचा तरी करा.''
दोन्ही बाजूच्या लोकांनी आपापली मतं प्रदर्शित केली.
``जमनार नि माह्याकडून, इनाकारन चार माणसायीत हाव म्हण्याचं नं माघून झंझंट करून घ्याची, मले जमत नि ते.''
कौतिकनं जमिनीवर आंग टाकल्यासारखं केलं. त्याच्यावर-
``त्याचं पहेलच लगन हाये नं हो...% पोरगाबी शिकून राहला त्याचा. त्याच्याबी शिक्शानाले लयेच पैसा लागून राहला. आढीच उडवून टाकीन तो नं पुढे काय करीन मंग !''
``आता तेबी त्ं करनंच पडतेनं. आमच्याबी मास्तरचे भरले, की नि आमीनं पन्नास हजार नवकरीले.''
``आता जमानाच तसा हाये पाव्हणेबॉ. जढी-तढीच पैसे लागता. त्याच्याशिवाय जमत नि कोणतंबी काम.''
``हाव नं सालं आपल्या टायमाले त्ं निसता कोऱ्या कागदावर अर्ज केला, की नवकरीचा आडरच पयत येत जाये.''
``खरंच तशेच दिवस व्हते ते. आमचा भाऊबी सातवीवरच झाल्ता मास्तर.''
दोन्हीकडच्या लोकांनी पुन्हा एकदा भेल्यावरची चर्चा पांगवून टाकली. पाहुणे उठ-बस करायला लागले. काहींनी बसल्याजागीच बराचवेळ मांडी मारल्याने आखडलेले पाय समोर ताणून आळस आणि थकवा घालवण्याचा प्रयत्न केला. कौतिकही घरात बायकोबरोबर विचार-विनिमय करायला निघून गेला.
पुन्हा काही वेळानं पांगलेली माणसं चहा-पाणी पिऊन एकत्र बसली.
``हे पाहा कवतिक, तिहे सात हजार राहू दे नं येहचेबी पंधरा हजार राहू दे. आठ-आठ हजाराचा भेला करा.''
जनार्दनबुवानं दोन्हीकडच्या पाहुण्यांना मध्यम मार्ग सांगितला. बराच वेळ घास-पिट चालल्यावर मुलीकडचे आठ हजाराच्यावर चढत नव्हते. मुलाकडचे पंधराच्या खाली उतरत नव्हते. कौतिकला आठ हजारात शेवटी दोन हजार वाढवावे लागले. मुलाकडच्यांनाही तुटेपर्यंत ताणून न धरता आपला पंधरा हजाराचा हेका सोडून द्यावा लागला. दहा-दहा हजाराचा भेला ठरला . कौतिकला मोठ्या अग्निदिव्यातून सुटल्यासारखं वाटलं. विशेष म्हणजे अनिता आणि शाळामास्तर मनातून सुखावून गेले. त्यांची आंतरिक ओढ दोन पावलं पुढे सरकली. जणू लढाईचा एक टप्पा पार पडला. वसाऱ्यातल्या बायकांचीही कलकल वाढून गेली. बराच वेळ खाली मान घालून बसलेली अनिता लाजून घरात पळून गेली.
``आता भेल्याचं पार पडलं, पुढे हुंडा काय देसान ते बोला.''
बैठकीत पुढे चर्चा सुरू झाली. मुलाचा मेहुणा पुन्हा हुंड्यावर आला.
``हे पहा पाव्हणेबॉ, आपल्यात हुंडा नायी. वरून कायीच मांगू नका. दहा हजारच लय जड हून राहले त्याले.''
``नायी हो%... वरून त्ं कायी ना कायी देनंच पडीन नं.''
मुलाकडचा अजून एक जन बोलला.
``आता जावू द्या नं तुमीबी...दहा हजारात मोळानं साला तंटा...आमीनं समजोलंनं आमच्या माणसाले.''
जनार्दनबुवानं मुलाच्या बापाकडे पाहात त्याच्या मेहुण्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
``नायी नायी, भेलाबी कमी नं वरूनबी हुंडा नि. हे कसं
काय जमीन?''
मुलाच्या बापानंही आपली नाराजी तडकाफडकी बोलून दाखवत पुढे -
``वरून त्ं हुंडा देनच पडीननं.'' असा हेका धरला.
``एक त् सोनं द्या, नायी त्ं पैशे द्या.''
मुलाच्या काकानं बैठकीत तोंड खुपसलंच.
``पैश्याचं नं सोन्या-चांदीचं नाव काढा नको...ते भेटनार नि. वरून सोन्याची एखादी वस्तू-फिस्तू पाहिजे अशीन त्ं आमच्या मर्जीपरमानं देवूं.''
जनार्दनबुवा आणि सुपडू म्हतारा समजुतीच्या सुरात सर्वांना बोलले.
``तसं नि चालनार, आमीनं पोऱ्याच्या नोकवरीले पन्नास हजार भरेल हाये.''
``मंग आमी काय करतीन?''
``काय करतीन म्हंजे...! भेलाबी कमी नं वरून कायी नि. हे कसं काय जमीन?''
मुलाच्या बापानं काहीही मागचा, पुढचा विचार न करता हे पटकन बोलून दाखवल्याने जनार्दनबुवा एकदम भडकला -
``तुमाले हुंडाच पाहजे व्हता त्ं पोरले दोन-दोनदा पाहून गेले: तेव्हाच सपष्ट सांग्याचं व्हतं नं. कशाले ते धुतरमं केले. तिच्या हातात कशाले पैशे द्याची हाऊस केली. आमची एैपत नस्ती त्ं आमीनं तव्हाच नायी सांगलं अस्तं, घडी-घडी दुसऱ्या जातीचं उजगणं कशाले दयू राहले. आपल्या बाबासाहेबानं असंच सांगल्तं का आपल्याले? नवकरीले लावले, की माजून उठा... सरव्यायलेच लेक-बाय हाये. बरं आमची पोरं कायी चप्टी-नक्टी हाये का?..बारावीत पोर एक नंबरनं पास व्हयेल हाये. तिलेच डी. एड्ले का फि.एड्ले टाकली त्ं तेबी मास्तरीन व्हईन. पटत अशीन त्ं करा भो%... आमी हुंडा-फिंडा, सोनं-चांदी देणार नि. बाकीच्यायलेबी लेकी-बाई हाये. आमीच अशा परथा पाडतीन त्ं आमालेबी समाज कायी इच्चारीन की नायी?...''
जनार्दनबुवानं एका दमात सगळयांना झाडून टाकलं. ठरावाची बैठक गलबलून गेली... निराळीच खळबळ माजली...वसाऱ्यातली कलकलही वाढून गेली. चिमणीच्या पिलावानी अनिता जीव काढू लागली. मुलाकडचे उठून चालायला लागता की काय, असं वाटायला लागलं; पण बाबासाहेबांच्या विचारांपुढे त्यांनी हार खाल्ली. भेल्यावरच लग्नाला तयार झाले....आनंदाची नीळ उधळल्या गेली.
- दीपध्वज कोसोदे, जळगांव

Hiphop, Rap, Türkçe rap