विद्यामान कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक

आजच्या धावपळीच्या आयुष्यात जो-तो स्वत:पुरतेच पाहण्यात गर्क आहे. आपल्याच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची विचारपूस करण्यासाठी कुणालाच वेळ नाही. अशा परिस्थितीत वृद्धांची होणारी मानसिक कुचंबणा आणि या समस्येवरील सोपे उपाय लीलाताई मावळंकर या ज्येष्ठ लेखिकेने सांगितले आहेत.

निबंधाचं शीर्षक वाचलं आणि सुनेत्रा ओक ह्यांनी लिहिलेल्या काहीं पंक्ती आठवल्या, ``रानोमाळ पसरलेल्या ह्या वाटा आपल्याला कुठे घेऊन जातात? त्यांना हवं तिथे की आपल्याला हवं तिथं? आपल्याला कुठे जायचं असते, त्यांना हवं तिथे की आपल्याला हवं तिथे? आणि ह्या वाटा दाट धुक्यात हरवल्या तर आपण तिथेच राहू का ? वाटा हरवतात की आपण हरवतो? आणि ही वाट आपल्याला कोण दाखवतो?''
मला वाटतं, आपली वाट आपणच शोधायची असते. वाट दाखवणाऱ्याला आपला स्वभावविशेष, कुवत माहीत नसतं. कदाचित दाखवलेली वाट चुकीचीही असू शकते, इच्छाशक्ती, जिद्द असल्या शिवाय काहीच घडत नसतं. पूर्वी चाकोरीबाहेर जाऊन काही करणं, इच्छा असली तरी खूप बंधनं पाळावी लागत असत. घरातून प्रोत्साहनही फार कमीच मिळत असे, सतत समाजाचा विचार, मनाची होणारी कोंडी- आणि गोष्टींचा उतारवयात होणारा त्रास.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीच होती, त्यामुळे आचारविचारातील फरक, काही कारणांवरून एकमेकाशी पटत नसलं तरी एकमेकांना सामावून घेण्याची गरज व वृत्ती होती, किंबहुना तशीच शिकवण मिळालेली असे. घरातील कर्त्या पुरुषांच्या आज्ञेबाहेर कुणीही वागत नसे, प्रत्येक बाबतीत त्यांचा मान राखणं, कोणतीही गोष्ट विचारल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय न करणं ह्या गोष्टी आवर्जून पाळल्या जात असत. मुलांवरही तसेच संस्कार झालेले असत. तेव्हाचं राहणीमान आणि हल्लीचं, ह्यात खूप तफावत दिसते. पूर्वी लहानांना मोठ्यांचं ऐकावं लागत असे, आता मोठ्यांना लहानांचं ऐकावं लागतं, हीच मजा आहे.
काळाबरोबर शिक्षणाच्या बाबतीत तर कल्पनातीत फरक झालेला जाणवतो, विज्ञानात तर इतकी प्रगती झाली आहे की - ज्या काळी चतुर्थीचा उपवास चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय सुटत नसे, त्याच चंद्रावर शास्त्रज्ञ आपले पाय रोवून आलेले आहेत. आता मानवाची शारीरिक उंची आणि वयोमर्यादा वाढत आहे. प्रॉब्लेम्सही त्यामुळे वाढत चालले आहेत. आणि गंमत अशी की आकाश मात्र ठेंगणं झालं आहे.
हल्लीचं युग म्हणजे `कॉम्प्युटर युग' झालं आहे असं म्हणतात! आता जसं सुकर, तसं पूर्वीचं कसं, कष्टमय जीवन होतं! पुरुषांचे दैनंदिन व्यवहार, नोकरी इतर काही शेतीबागायतीसारखे व्यवसाय, घरांतील स्त्रियांचे घरकाम, मुलांना तयार करणं, देवधर्म, बेगमीची कामं, दळणकांडण आणि कधीतरी सारीपाट खेळण्यात वेळ कसा जात असे हे त्यांना कळतच नसे, अत्यंत समाधानी असं त्यांचं जीवन, कोणत्याच गोष्टींची त्यांना कमतरता भासत नसे. त्यांच्या मनातील भावना कुणी जाणून घेत असतील की नाही ह्याबद्दल शंकाच आहे.
आता मात्र सर्व चित्रच उलटं झालेलं दिसतं, हल्लीच्या राहणीमानातील फरक, दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण अशा अनेक कारणांनी पैशाची नितांत गरज भासते आणि निरनिराळया विषयांचं स्त्रियांनी शिक्षण घेतलं असल्यामुळे, घरातच बसायचं तर मग शिक्षणाचा उपयोग काय? असा विचार करून नोकरी किंवा अन्य काही व्यवसायानिमित्ताने स्त्रिया बाहेर पडतात. पण पैशाच्या अति हव्यासापायी घरातील मुलांकडे होणारं दुर्लक्ष, एक कायम स्वरूपी दुखणं होऊन बसतं. मुलांच्या संसारात वडीलधाऱ्यांनी ढवळाढवळ,
लुडबूड करायची नसते. आम्हांला पूर्वीचं काही सांगू नका, त्यात आम्हांला अजिबात रस नाही, हा मिळालेला मंत्र जपत बसण्याशिवाय गत्यंतरच नसतं.
काही ज्येष्ठ नागरिक आताच्या राहाणीमानात खूप सामावून घेतात. घरात कुणाच्याही वाढदिवसानिमित्त, इतर काही समारंभानिमित्त केलेल्या खाद्यपदार्थापासून कपडालत्ता, गाणीबजावणी, मुलांचे खेळ ह्या गोष्टींचा यथेच्छ उपभोग घेतात. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असतं. मात्र काही जण जुन्या चालीरीतींना चिकटून राहातात, कोणत्याच कार्यक्रमात ते मिक्सअप होत नाहीत. सर्वच गोष्टींना त्यांचा आक्षेप असतो. घरातील वृद्धांनी `जुनं ते सोनं' असं मानण्याचा हटवादीपणा न करता, नवीन वारे वाहाणारच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या वागणुकीतून मुलांवर संस्कार पोचवावेत.
बहुचर्चित सासू-सून हा विषय त्यांच्यातील मतभेद प्रकर्षाने जाणवतात. शिक्षण आणि अर्थार्जन ह्यामुळे मी आणि माझं ही भावना खोलवर कुठेतरी रुजलेली दिसते. वडीलधाऱ्यांची सेवाशुश्रूषा करणे प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून असतं. त्यामुळे ज्येष्ठांची होणारी कुचंबणा जाणवते, वृद्धांना वाटतं प्रत्येकाने आपण कधीना कधी म्हातारे होणार आहोत ह्याचं भान ठेवावं. एक तर पैशाची अगतिकता किंवा प्रकृतीची, त्यांचं कर्तृत्व, सोसलेले कष्ट एका क्षणात, पाण्याखाली जातात. एवढ्याकरता तरुण मंडळींनीही वृद्ध मंडळी हा एक कुटुंबाचा घटक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, केवळ खाणेपिणे कपडालत्ता पुरवून आपली जबाबदारी संपत नसते. तिथे थोडीशी आपुलकीची भावना असायला हवी. कौटुंबिक सौख्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्नांची आवश्यकता आहे. आणि हेही लक्षात ठेवायला पाहिजे, की `मान आणि प्रेम मागून मिळत नसतो, तो मिळवावा लागतो.'
ठरावीक वयापर्यंत काम करायचं नंतर आराम करायचा असं त्यांचं जीवनाविषयीचं गणित असतं. म्हातारपणाच्या बेगमीची कल्पनाच त्यांना शिवलेली नसते. कुणावर अवलंबून राहायला त्यांना नको असतं. संगीत, नाटक ह्यासारखे छंद जोपासले नसल्यामुळे आयुष्य कसं नीरस, रुक्ष वाटायला लागतं. काही नागरिकंानी नोकरी किंवा अन्य व्यवसायातून रिटायर्ड होण्याआधीच निवृत्तीचा काळ कसा घालवायचा ह्याचं नियोजन केलेलं असतं. बऱ्याच जणांनी काही छंदही आत्मसात केलेले असतात, त्याचा त्यांना निवृत्तीनंतर खचितच चांगला उपयोग होतो. त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा प्रश्नच त्यांच्यापुढे उभा राहात नाही. अन्यथा टीव्ही बघणं, थोडा फेरफटका मारून येणं किंवा पत्ते खेळत बसणं, ह्या पलीकडे ते काहीच करू शकत नाहीत. वेळ जात नाही म्हणून टीव्ही बघणं, वयोमानाप्रमाणे ऐकू कमी येतं म्हणून टीव्हीचा व्हॉल्यूम मोठा करणं, ह्याचा त्रास इतर मंडळींना होतो, वादावादी नको म्हणून मग टीव्ही बघणंच बंद केलं जातं. आयुष्यात काय महत्त्वाचं असेल तर `अॅडजस्टमेंट'. कोण बरोबर कोण चूक हे बघण्यात काहींच अर्थ नसतो. मग सगळयात सोयीस्कर मार्ग म्हणजे, `वृद्धाश्रम' अशा वेळी एक ग्राफिटी आठवते मला, अनुभव नावाचा कंगवा टक्कल पडल्यावरच मिळतो. ह्या सर्वाचं मूळ कारण काय असेल तर पैसा, आणि वाढत चाललेलं आयुर्मान.
अलीकडे एक त्र कुटुंबपद्धती असावी असा सूर ऐकायला मिळतो. घरात वडीलधारी माणसं असली की मुलानातवंडांना आजीआजोबांचं नातं काय असतं ते समजतं. त्यांच्याकडून छानछान गोष्टी, कथा ऐकायला मिळतात, लाड करून घ्यायला मिळतात. आणि घराला घरपण येतं वगैरे. परंतु या व्यतिरिक्त पाहाता बाहेर जाताना, कुठे जाताय? कधी परत येणार, या गोष्टी सांगायची तसदी कुणी घेतं का? वृद्धांचेही कुठे बाहेर जायचे बेत असतील तर ते जाणून घेता का? त्यामुळे कुणी बाहेर जाताना आणि येताना, दार बंद करणे आणि उघडणे ह्या पलीकडे वृद्धांचा फारसा काही उपयोग करून घेतला जात नाही. खंत हीच आहे.
साधारणत: चाळिशीपन्नाशीच्या दरम्यान स्त्रियांना थोडासा मोकळेपणा मिळालेला असतो, कारण मुलंसुद्धा मोठ्ठी झालेली असतात. कुटुंबही `हम दो, हमारे दो' असंच असतं. मग पत्तेग्रुप, भिशी, कधीतरी सहलीला जाणं, असे भरगच्च नाद मागे लावून घेतले जातात. असे काही छंद मागे लावून घेतले पाहिजेत की घरातील सुना, मुलंनातवंडं त्याचं अनुकरण करू शकतील, अर्थात आवड ही हवीच. छंद असे हवेत की ह्याच्याही पुढच्या आयुष्यात त्याचा चांगला उपयोग हाईल. उतारवयात आयुष्य कसं सुसह्य होईल. कोणतीही कला शिकायची असेल तर वयाचं बंधन कधीच नसतं मग ती संगीतविषयक असो किंवा अन्य. त्याचा अर्थार्जनासाठीही उपयोग केला जातो. वेळ चांगला जाणं आणि ह्याही वयात आपण काही कमवू शकतो हा विचारसुद्धा सुखावून नेतो, त्याच्यासारखं समाधान कोणतंच असू शकत नाही.
असा सगळा विचार करणं म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच असतं ते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध कंगोरे असतात, ते जास्त टोकदार न करता घासूनपुसून स्वच्छ केले तर त्याचं व्यक्तिमत्त्व अधिकच चकाकू लागतं. म्हणूनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी केल्या की वेगळया कीर्तन, प्रवचनाला जावं लागत नाही. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या काही अंशी कमी झालेल्या असतात तरी वेळ जास्तीत जास्त चांगला कसा घालवायचा याचा विचार आपल्या मनात असायला हवा. आजूबाजूच्या घरातील मुलांचे खेळ बघण्यात त्यांच्याशी त्यांच्याच वयाचं होऊन गप्पा मारण्यात वेगळीच मजा असते. म्हणून प्रत्येक दिवसाचे आपले वेगळेच टाईमटेबल होऊ शकते. प्रत्येक दिवस वेगळा, प्रत्येक दिवसाचा प्रत्येक अनुभव ताजा, टवटवीत राहातो.
- लीला मावळंकर, पुणे