विशेष ओळख - वसीम मणेर

वसीमला मी पहिल्यांदाच भेटत होते. तो घरी आला होता. त्याला विचारलं, `वसीम, आधी आपण चहा घ्यायचा का?' तो `हो' म्हणाला, त्याच्या चेहऱ्यावरून कळलं की ओळखीची ही सुरुवात त्याला मनापासून आवडली. चहा आवडणाऱ्या माणसांशी माझंही लगेच जमतं. मग चहा घेता घेता आमच्या गप्पा इतक्या रंगत गेल्या की आम्ही पहिल्यांदाच भेटतोय हे विसरूनच गेलो.
`वसीम, हे सिनेमॅटोग्राफर म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. हे पहिलं मला सांग'. तो म्हणाला `फोटोग्राफर आपल्याला माहिती आहे. तो स्थिर चित्रण करतो (म्हणजे थोडक्यात फोटो काढतो) तर सिनेमॅटोग्राफर (बाप रे!) चलत्चित्रण करतो. म्हणजेच सिनेमाची फोटोग्राफी करणारा. मी डॉक्युमेंटरीज, छोट्या फिल्म्स तयार केल्या आहेत, करतो आहे. आणि आता सिनेमा काढायचा विचार आहे'.
`एकदम तू सिनेमात करिअर करायचं कसं काय ठरवलंस?' `नाही, नाही, तसं ठरवलं वगैरे काही नव्हतं.' वेगवेगळया कलांची मला आवड होती. लहानपणापासून आयुष्यात काही गोष्टी सामोऱ्या आल्या, प्रसंग घडत गेले. वेळोवेळी मला फार चांगली माणसं भेटत गेली आणि कुणीतरी आपलं बोट धरून आपल्या मंझिलपर्यंत घेऊन यावं तसा मी या क्षेत्रापर्यंत येऊन पोचलो आहे'.
वसीमच्या सांगण्यावरून हे सगळं सहजपणे झालं असं वाटलं तर तो त्याचा नम्रपणा आहे.
त्याला चांगली माणसं भेटली हे जरी खरं असलं तरी त्या माणसांनी त्याच्यातले गुण हेरले. त्याची हुशारी, तल्लखपणा जोखला, कामातला प्रामाणिकपणा आणि कष्ट करायची तयारी बघितली, हेही तितकंच खरं.
तो लहान असताना आई-वडिलांची सतत होणारी भांडणं इतकंच घरातलं वातावरण त्याला आठवतं. वडील आणि वडिलांच्या घरचे सगळेच आत्या वगैरे कट्टरपंथी मुसलमान. वडिलांनी तर धर्माच्या नावाखाली घराच्या सगळयाच जबाबदाऱ्या नाकारल्या. वसीमने मदरसामध्ये शिक्षण घेऊन मौलवी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. वसीमची आई, नजमाबाई मात्र फार धीराची बाई. रात्रंदिवस कष्ट करून, बांगड्या भरणं, कुराण शिकवणं अशी कामं करून
त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवलं, मुलांनीही - वसीम आणि वसीमचा धाकटा भाऊ ताहीर लहानमोठी कामं करून आईला आणि स्वत:च्या शिक्षणालाही हातभार लावला. आई-वडिलांच्या विचारसरणीतल्या फरकामुळे घरात एकंदरच सतत वादावादीच असायची, पण आईचा कष्टाळू स्वभाव आणि मुलांना शिकवायची जिद्द यामुळे अतिशय गरिबीच्या परिस्थितीतही शिक्षणावर परिणाम झाला नाही. वसीम नगरपालिकेच्या शाळेत होता. तो आता दुसरीतून तिसरीत जाणार होता.
अशात एक दिवस रस्त्यावर उनाडक्या करणाऱ्या वसीमला डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी बघितलं. त्यांनी नुकतीच एक शाळा सुरू केली होती. त्या वसीमच्या आई-वडिलांना जाऊन भेटल्या आणि या चुणचुणीत मुलाला त्यांनी आपल्या शाळेत दाखल करून घेतलं. या शाळेत वसीमला पुन्हा दुसरीच्याच वर्गात बसावं लागलं कारण शाळेत तिसरीचा वर्गच नव्हता. आता विचार करताना हे वर्ष वाया गेलं असं वसीमला मुळीच वाटत नाही. उलट त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. ही शाळा होती फलटणची `कमला निंबकर बालभवन'. वसीमच्या पुढच्या यशस्वी आयुष्याचा दणदणीत पायाच इथे घातला गेला. या शाळेत त्याला भेटल्या डॉ. मंजिरी निमकर. म्हणजे खरं तर त्यांचीच होती ही शाळा.
या मंजिरीताई आणि ही शाळा यांचा विलक्षण प्रभाव वसीमवर पडला. त्याचं आयुष्यच या शाळेनं घडवलं. त्याच्या विचारांवर प्रभाव पाडला. त्याच्याशी बोलताना क्षणोक्षणी हे जाणवतं.
`मी जो काही आहे तो शाळेमुळेच आहे. इतर शाळांपेक्षा ही शाळा वेगळी आहे. हे मला तेव्हाही जाणवायचं. तिथं अभ्यासाची सक्ती नव्हती. चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, कविता करणं यासाठी खूप प्रोत्साहन मिळायचं. वर्गात मुलं अगदी थोडी म्हणजे माझ्या वर्गात फक्त १४ मुलंच होती, आणि शाळा माझ्याबरोबरच वरच्या वर्गात जात होती.
`शाळेतल्या आशाताई रुद्रभट या बाइंर्मुळे मला कविता करण्याची गोडी लागली. शाळेमुळे इंग्लिश भाषा पक्की झाली. चांगली लिहायला बोलायला यायला लागली. आमच्या शाळेत त्यावेळी खूप परदेशी पाहुणे भेटी द्यायला यायचे. आम्हांला त्यांच्याशी भेटायची, बोलायची मोकळीक असायची. त्यामुळे कुणालाही भेटायचं असेल तर आता दडपण वाटत नाही उलट भेटायची उत्सुकताच असते.'
`शाळेनं खूप काही दिलं, कॉलेजने काय काय दिलं ? कॉलेजच्या शिक्षणाच्या खर्चाचं कसं काय जमवलं? लहानमोठी कामं करत, शाळेच्या सहकार्यामुळे १० वी पर्यंतचं शिक्षण झालं. अॅप्पलटन इथे राहणाऱ्या नसरीन माजीद यांची स्कॉलरशिपही त्यावेळी मला मिळत होती. कॉलेजचं शिक्षण खर्चीक असणार होतं, त्याचा प्रश्न होताच. त्याच वेळी मंजिरीताइंर्मुळे एक काम मिळालं. भारती विद्यापीठाच्या पर्यावरण शिक्षण व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. भरूचा हे माळरानावरचं (सीरीीश्ररपव) वाईल्ड लाईफ आणि लांडग्यांच्या सवयी यावर संशोधन करत होते. फलटण जवळच्याच माळरानावर काम करण्यासाठी त्यांना एका असिस्टंटची आवश्यकता होती. मंजिरीताइंर्नी सुचवल्यावरून डॉ. भरूचांनी माझी मुलाखत घेतली आणि हे काम मला मिळालं. माळरानावर भटकून, निरीक्षण करून माहिती पुरवण्याचं काम माझ्या आवडीचं होतं. २-३ वर्षं मी हे काम केलं. या कामाचे पैसे मिळाले त्यामुळे पुढच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला. आणि महत्त्वाचं म्हणजे डॉ. भरूचांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळालं. याचा परिणाम म्हणजे कॉलेजात झूआलॉजी हाच विषय घेतला.
`कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना आपणही डॉ. भरूचांसारखं संशोधन करावं असं वाटून मी डॉ. मिलिंद वाटवे यांच्याकडे जायला लागलो. डॉ. वाटवे यांनी पुस्तकांची एक मोठी थप्पी माझ्यापुढे ठेवली आणि ते सगळं वाचून काढायला सांगितलं. संशोधनाची पण एक शिस्त असते आणि संशोधन म्हणजे फक्त रानोमाळ भटकणं नाही हे लौकरच माझ्या लक्षात आलं. साधारण १०-१२ दिवसानंतर `ये अपने बसकी बात नही' असं वाटून मी ते सोडून दिलं.
`आता कॉलेज म्हणजे माझ्यासाठी एक व्यापक विश्व खुलं झाल्यासारखं होतं. (मी फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये होतो) मी जरी सायन्स घेतलं होतं तरी रमलो मात्र जास्त कलाविश्वात. शिल्पकला, चित्रकला, मातीकाम, लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळयात हिरिरीने भाग घेतला आणि भरपूर बक्षिसंही मिळवली.'
`कॉलेजच्या नाट्यमहोत्सवात एका मूकनाट्याचं दिग्दर्शन
करायची संधी मला मिळाली. हे मूकनाट्य यूथ फेस्टिव्हलच्या स्पर्धेत उतरवायच्या तयारीने आम्ही काम करत होतो. ही नॅशनल लेव्हलवरची स्पर्धा असते. आणि टप्प्या-टप्प्याने जिंकत तुम्हांला तिथपर्यंत पोचावं लागतं.'
`सुरुवातीला जिल्हा पातळीवर सातारा जिल्ह्यातून या नाटकाची निवड झाली. जिल्हा पातळीवर फक्त दोन नाटकांची निवड होते. त्यात एक आमचं होतं. कोल्हापूर-सातारा-सांगली-सोलापूर इथल्या प्रत्येक विद्यापीठातून सेंट्न्ल यूथ फेस्टिव्हलसाठी दोन कॉलेजेसची निवड होते. आणि मग या ८ नाटकांमधून एक टीम (नाटक) वेस्ट झोनसाठी निवडली जाते.'
`वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्न्-गोवा-राजस्थान-गुजरात-म.प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातली विद्यापीठं भाग घेतात. आमच्या वेळी अशा पद्धतीने ७२ नाटकांची स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यातून २ नाटकं नॅशनलसाठी निवडली जातात. नंतर इस्ट-वेस्ट-नॉर्थ-साऊथ अशा झोनमधून आलेल्या ८ नाटकांची शेवटची स्पर्धा होते. आमचं नाटक प्रत्येक टप्प्यावर पहिलं येत नॅशनलपर्यंत पोचलं. पण नॅशनलला आम्ही जिंकू शकलो नाही.
`पण नॅशनलला आम्हांला बरीच प्रसिद्धी मिळाली. मला स्वत:ला हा अनुभव खूपच मोठा होता. इतर टीम्सना भेटता, बघता, बोलता आलं. संपूर्ण देशातल्या नाटकांचा आणि खरं म्हणजे माणसांचा अनुभव मिळाला. हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता. माझ्या कॉलेजला, शिवाजी विद्यापीठाला राष्ट्नीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. मला वातावरण भलतंच `क्लिक' झालं. आणि मी याच क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवून टाकलं.
`याच दरम्यान मला `कमला निंबकर बालभवन' आणि `रेवाचंद भोजवानी अॅक्रॅडमी' याच्या संयुक्त प्रकल्पात को-ऑर्डिनेटरचं काम करायची संधी मिळाली. डेव्हलपिंग आर्ट एज्युकेशन प्रोग्रॅम असं या प्रकल्पाचं नाव होतं. बेंगलोरच्या आय एफ ए (इंडिया फाऊंडेशन फॉर आर्ट) या संस्थेने हा प्रकल्प स्पॉन्सर केला होता.
`कलाविषयक प्रोग्रॅम शाळेत राबवायचे असं या प्रकल्पाचं स्वरूप होतं या संदर्भात भारतभरात काय प्रयोग चालू आहेत याची पाहाणीही करायची होती. या प्रकल्पाच्या निमित्ताने भारतभर फिरता आलं. कणवू, शांतिनिकेतनही याच काळात बघितलं. कलेची विविधांगी ओळख झाली. कुठल्याही विषयातून कला वेगळी काढता येत नाही हे लक्षात आलं.
`डॉ. भरूचांसाठी मी काम करत होतो तेव्हापासून क्रॅमेऱ्याबद्दलची एक प्रचंड उत्सुकता मला होती. फोटोग्राफीची आवड तर होतीच, त्यामुळे पैसे साठवून साठवून मी एक एस एल आर क्रॅमेरा खरेदी केला. सुधीर सप्रे यांच्याकडून काही प्राथमिक धडे घेतले आणि मग माझे क्रॅमेऱ्यावर प्रयोग सुरू झाले.'
`पण मग फोटोग्राफीचं काही शिक्षण घेतलं का नाही?' एफ टी आय आय साठी प्रयत्न केला होता पण जमलं नाही. त्यावेळी एफ टी आय आय मध्ये केदार औटी म्हणून म्युझिकचे प्रोफेसर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक वर्ष अभ्यास केला. खूप पुस्तकं वाचली. पण एफ टी आय आय च्या प्रवेश परीक्षेतच मला अपयश आलं.'
`मग प्रोफेसर ए.एस. कनल यांचं सिनेमॅटोग्राफीचं २० दिवसांचं वर्कशॉप मी केलं. प्रोफेशनल अॅप्रोच टू इलेक्ट्नॅनिक सिनेमॅटोग्राफी असं त्याचं नाव होतं. या वर्कशॉपचा मला खूप फायदा झाला.
`नंतर मात्र मी अनुभवाच्याच शाळेत नाव घातलं. बेंगलोरच्या सेंटर फॉर एज्युकेशन डॉक्युमेंटेशन (उएऊ) या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. तिथे काही डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी मी मदत केली.'
`सस्टेनेबल आर्किटेक्चर किंवा ग्रीन आर्किटेक्चर म्हणजेच थोडक्यात इकोफ्रेन्डली घरं, सिटी फार्मिंग असे त्याचे इंटरेस्टिंग विषय होते. याच काळात रमेश पानसे यांच्या `ग्राममंगल' या संस्थेचे संचालक निलेश निंबकर यांच्याशी गाठ पडली. त्यांना माझ्या शिक्षणविषयक काही फिल्म्स आवडल्या होत्या. त्यावेळी ते `युनिसेफ'साठी एक प्रकल्प करत होते. या प्रकल्पाअंतर्गत शिक्षकांसाठी ट्न्ेिंनग प्रोग्रॅम म्हणून एक फिल्म तयार करायची असं ठरलं.'
`मग `वाचूया-लिहूया' ही फिल्म मी तयार केली. माझं काम त्यांना आवडलं. मग त्यांच्यासाठी बऱ्याच फिल्म्स तयार केल्या.' `वसीम, तुझं बरंचसं काम शिक्षणक्षेत्रांशीच निगडित आहे.' `हो, मी माझी पहिली फिल्म केली ती माझ्या शाळेवर. शाळेने मला खूप काही दिलं, घडवलं. मंजिरीताई, मॅक्सिन बर्नसन यांचा सहवास मला मिळाला. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. मंजिरीताई, शी इज लाइक मॉम टू मी. आज मी जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. त्या भेटल्या नसत्या
तर मी मौलवी होऊन बसलो असतो. योग्य वयात योग्य विचार तुमच्यापर्यंत पोचणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. तुमचं सगळं आयुष्यच बदलतं त्याच्यामुळे. म्हणून शिक्षणक्षेत्राबद्दल मला एवढी ओढ वाटते. मंजिरीताई माझ्या शिक्षक-गुरू-मार्गदर्शक आहेत. मी जो जो काही निर्णय घेतला त्याला त्यांनी मनापासून पाठिंबा दिला. मार्गदर्शन केलं, त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांपर्यंत पोचवलं, मानसिक बळ दिलं.'
`मौलवी होण्याची कल्पनासुद्धा तुला नको वाटते. तू धर्माचा विचार कसा करतोस?'
`धर्माचं अवडंबर माजवलेलं मला आवडत नाही. पण समाज मला सतत माझ्या धर्माची जाणीव करून देत असतो. माझ्याकडे संशयानं बघितलं जातं. माझं भारतीयत्व सिद्ध करायची जबाबदारी माझ्यावर टाकली जाते. हे बदलायचं असेल तर धर्माबद्दल गप्प बसून चालणार नाही. धर्माची चिकित्सा केली गेली पाहिजे. परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे, तरच या समाजात सुधारणा होणं शक्य आहे.'
वसीम मणेर - कुठून कुठपर्यंत आला आहे हा मुलगा!
मौलवी होता होता सिनेमॅटोग्राफर झाला.
आज साधारणपणे सुखासीन आयुष्य लाभलेल्या मध्यमवर्गीय घरातली तरुण मुलं मॉल्स-मॉडेल्स-मीडिया आणि चित्रपटांच्या झगमगत्या दुनियेच्या आकर्षणाने झपाटलेली दिसतात. काही अपवाद सोडले तर ही तरुण मुलं-मुली समाज त्याच्या प्रती आपलं काही कर्तव्य, जबाबदारी, राजकीय समज, सामाजिक उत्तरदायित्व याबाबतीत अलिप्त असलेली आढळतात. अंधश्रद्धांच्या चटकन आहारी जातात. धर्माच्या बाबतीत कट्टर भूमिका घेतात. या संदर्भात सगळयाच धर्माची मुलं सारखीच आहेत. या पार्श्वभूमीवर वसीमचं वेगळेपण उठून दिसतं. तो तरुण आहे. लघुपट चित्रपटांची झमगमती दुनियाच त्याने करिअरसाठी निवडली आहे. आणि या माध्यमाचा उपयोग करून तो काही वेगळं सांगू, सुचवू बघतो आहे.
शिक्षण, पर्यावरण, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचं चित्रण, लघुपटांसाठी त्याने निवडलेले विषय, त्याचं वेगळेपणच अधोरेखित करतात.
वसीमला सामाजिक वातावरण, त्यातल्या समस्या, ताणतणाव, त्यावरच्या उपाययोजना यांची चांगली जाण आहे. आणि यात काही परिवर्तन आणायचं असेल तर त्यासाठी सिनेमाचं माध्यम खूप प्रभावी आहे असा त्याचा विश्वास आहे. लगान, स्वदेस, चक दे-इंडिया या सारख्या चित्रपटांनी समाजातल्या सर्व थरांवर पाडलेला प्रभाव तो अनुभवतो आहे, त्यामुळे असंच काहीतरी करून दाखवण्याची त्याची इच्छा आहे.
मुलाखत आणि शब्दांकन :
अंजली मुळे, पुणे.

Hiphop, Rap, Türkçe rap