संवाद

प्रिय वाचक,
गेल्या महिन्यात मी कुठे कुठे जाऊन आले पण याविषयी मी तुमच्याशी काहीच बोलले नाही. माझ्या मनात, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे, मिळून साऱ्याजणी आणि तुम्ही सारे वाचक, माझ्या आठवणीत असता. म्हणूनच मी जिथे जाते तिथलं थोडंफार तरी तुमच्याशी बोलल्याशिवाय मला बरं वाटत नाही.
डिसेंबर महिन्यात औरंगाबादला, कुसुमताई चौधरी यांच्या स्मृती जागवणारं, कुसुमांजलीच्या वतीनं एक स्त्रीकथाकारांचं संमेलन झालं. त्याच्या अध्यक्ष होत्या ज्येष्ठ लेखिका कमलताई देसाई. पूर्वाध्यक्षा पुष्पा भावे यांनी नव्या वर्षाची सूत्र कमलताइंर्ना देताना खरीखरी कुसुमांजलीच त्यांच्या हातात दिली. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी, उद्घाटक होत्या दिल्लीच्या सुप्रसिद्ध लेखिका चित्रा मुद्गल. दोन दिवसांच्या `स्त्रीकथी' च्या कार्यक्रमात कथालेखिकांचा ऐतिहासिक आढावा घेतला गेला. त्यांच्या कथांचा विचार गंभीरपणे करणारे परिसंवाद झाले. कथाकथनाचाही कार्यक्रम झाला. `अनुभवकथन' हा निरक्षर किंवा कमी शिकलेल्या कष्टकरी स्त्रियांचा कार्यक्रम हे त्या `स्त्री कथी' च्या संमेलनाचं सर्वात उल्लेखनीय पर्व ठरलं. स्नेहजा रुपवते आणि त्यांची विलक्षण मेहनती तरुण कार्यकर्ती मंडळी यांनी हा कार्यक्रम फार नीटस आणि अगत्यपूर्ण पद्धतीनं साजरा केला.
डिसेंबरातच मी अहमदनगरच्या ज्येष्ठ नागरीक संघाच्या स्नेहसंवर्धन मेळाव्यालाही जाऊन आले. ज्येष्ठांचा उत्साह, त्यांच्या वयाला लाजवणारा आणि विसरायला लावणारा होता!
माझा ताजा प्रवास आहे रत्नागिरीचा. जानेवारी च्या ५ आणि ६ तारखांना, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने, महिलांचं साहित्यसंमेलन योजलं होतं. त्यातल्या एका सत्रात सहभागी होण्यासाठी, मी आणि प्रेमाताई पुरव पुण्याहून गेलो होतो. प्रेमाताइंर्चं नाव आणि काम अनेकांना माहीत असणारच. पण नसेल त्यांच्यासठी एवढंच म्हणीन की `अन्नपूर्णा महिला मंडळ' या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत आणि मुंबईत बेकार झालेल्या गिरणी कामगारांच्या कुटुंबांना, त्यांनी सुरू केलेल्या खाणावळीमुळे फार मोठा आधार दिला. त्यांचं काम केवळ `खाणावळ' या उद्योगाच्या मर्यादेत अडकून पडलं नाही. कामगारांचे, स्त्रीपुरूषांचे कौटुंबिक प्रश्न सोडवण्याचं काम करत, अनेक अर्थानं, अन्नपूर्णेचं काम विस्तारत आणि स्त्रियांचं जीवन समृद्ध करत राहिलं आहे. अशा प्रेमाताई आणि मी खूप वर्षांनी भेटलो. पुणे रत्नागिरी प्रवास गप्पांनी भरून गेला, मोहराच्या वासांनी घमघमला आणि त्यामुळे प्रवासाचे तास कधी संपले कळलंच नाही. को.म.सा.प. चे संस्थापक आहेत श्री. मधुमंगेश कर्णिक. त्यांच्याच सहकार्याने, महिलांचं साहित्य संमेलन पहिलं आवास (जि. रायगड) इथे झालं आणि आता हे दुसरं रत्नागिरीला. महिलांची वेगळी साहित्यसंमेलनं असावी का यावर बऱ्याच चर्चा अजूनही होतात. पण `स्त्रीकथी' आणि आताचं रत्नागिरीचं हे महिला साहित्यसंमेलन अनुभवल्यावर मला वाटलं की या चर्चा आता करायची गरज उरलेली नाही. या संमेलनांचा स्त्रीपुरुषांच्या संमिश्र साहित्य संमेलनावर बहिष्कार नाही. तसंच स्त्री विरूद्ध पुरुष साहित्यिक असा सामनाही त्यांना रंगवायचा नाही. उलट एकाच अफाट आणि अवाढव्य साहित्यसंमेलनापेक्षा ही विकेंद्रित स्वरुपातली संमेलनं मला अधिक आटोपशीर, अधिक संवादी आणि अधिक अर्थपूर्ण वाटली. यातून स्त्रियांना संधीही अधिक मिळते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
रत्नागिरीच्या या साहित्य संमेलनात आम्ही पोचलो तेव्हा पहिला दिवस संपत आला होता. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षा वीणा गवाणकर यांचं उद्घाटनाचं भाषण, त्यानंतर एक परिसंवाद या कार्यक्रमांना आम्ही मुकलो. संध्याकाळचं कविसंमेलन आम्ही ऐकलं.
रात्रीच्या जेवणानंतरचं तुळसुंदे या छोट्या गावच्या मुलींनी केलेलं समईनृत्य विलक्षण सुंदर होतं. खऱ्या तेलवातीच्या समया डोक्यावर आणि दोन्ही हातात दोन निरांजनं असा दीपभार सांभाळत, गाण्याच्या पार्श्वभूमीवर या ८/१० मुली अचूक, अप्रतिम हेलावत, तरंगत, जागा बदलत वातावरण उजळून टाकत होत्या ! त्यानंतरचा कार्यक्रम स्त्रियांनी सादर केलेला दशावतार हा नाट्यप्रकार, साथसंगत पुरुषांची बाकी नाट्यभाग सिंधुदुर्गाच्या स्त्रियांचा असा हा ही कार्यक्रम चांगला होता.
सजावटीमध्ये व्यासपीठावरचा देखणा मोर आणि सोनेरी पिंपळ लक्ष वेधून घेत होता. व्यासपीठासमोरची रांगोळीही वैशिष्टयपूर्ण होती. देखण्या मंडपाचं वर छत आणि त्याखाली, उत्तम उपस्थितीत हे संमेलन रंगत होतं.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष वीणा गवाणकर यांची प्रकट मुलाखत आणि त्यांचं समारोपाचं भाषण यांनी या साहित्यसंमेलनाला एक वेगळंच परिमाण दिलं. वीणा गवाणकर या मुख्यत: त्यांच्या अनुवादित पुस्तकांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यासाठी निवडलेल्या व्यक्तीही वेगवेगळया प्रकारचं संशोधन, सेवा, अभ्यास करणाऱ्या आहेत. या लेखनासाठी वीणाताइंर्नी अपार अभ्यास आणि कष्ट घेतले आहेत. लिहिता लिहिता त्यातला विचार, त्यातली जीवनशैली त्यांच्या स्वत:च्या आचारविचारात झिरपत गेली आहे. या साऱ्या परिणामातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एका साधेपणाची, निर्मळपणाचीच झळाळी लाभली आहे, हे त्यांच्या रेखा नार्वेकरांनी घेतलेल्या मुलाखतीतून फार थोड्या वेळातच स्पष्ट झालं. त्याच मनमोकळया संवादात त्यांच्या सहजसंुदर, समजदार सहजीवना विषयीही त्या बोलल्या आणि त्यामुळे ऐकणाऱ्यांना त्यांच्या लेखनात आणि नित्यजीवनात असलेला पती, मुलं यांचा सहभाग थेटपणे पोचला.
वीणाताइंर्चं अध्यक्षपद आणखी एका कारणासाठी माझ्या मते वैशिष्ठ्यपूर्ण ठरलं. त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणाचा सूर आणि सत्त्व समजलेल्या अनेक सुजाण कार्यकर्त्यांनी, त्यांना रत्नागिरी परिसरातल्या जयगड सारख्या विकास प्रकल्पां विषयीची अस्वस्थता लिहून कळवली. वीणाताइंर्नी दोन दिवसांच्या या साहित्यसंमेलनाचा समारोप करताना, इतर साहित्यविषयक चर्चा/परिसंवाद इ. मधल्या विचारांचा परामर्ष घेतलाच, पण त्याचबरोबर मानवी जीवनाची किंमत मोजून आखल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. साहित्य हा समाजाचा केवळ आरसा नाही तर त्यातल्या व्यक्तिगतपासून ते समाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा सर्व घटना घडामोडींवर प्रकाश टाकत, त्याचा वेध घेण्यासाठीचं ते एक साधन आणि माध्यम आहे. मानवी जीवन आणि त्याच्या भोवतीचं सर्वंकष पर्यावरण हे खऱ्या साहित्यामध्ये केंद्रीभूत होतं, अशीच वीणाताइंर्ची धारणा असावी असं अप्रत्यक्षपणे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. हे परिमाण साहित्याला देण्याचं महत्त्वाचं काम या महिला साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी केलं.
को.म.सा.प.चं. हे संमेलन, विभागीय पातळीवरचं असलं तरी त्यानं अनेक पायवाटा दाखवल्या ज्या भव्यदिव्य संख्येच्या उपस्थितीमध्ये हरवून जातात. नियोजनात कुठेकुठे काही बोट ठेवण्यासारखं होतंही पण एकूणात त्यात उण्यापेक्षा अधिक खूपच मोठं होतं. स्वागताध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष सुनीता जोशी, कार्यवाह डॉ. राजेश्री आणि असंख्य कार्यकर्ते या महिला साहित्यसंमेलनासाठी कसून काम करत होते. त्या सगळयांचं योजनेपासून अंमलबाजाणीपर्यंत कौतुक करायला हवं !

Hiphop, Rap, Türkçe rap