Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

तरुणपणीचे धाडस

बऱ्याच वेळा कारखान्यातून सुटल्यावर जवळ पडते म्हणून मी कॉलनीच्या बाजूने गेट होते, त्याने येत असे.
त्यावेळी गणपती हॉलमध्ये भरणारी माँटेसरी शाळा सुटलेली असे. लहान लहान मुले आपले कडीचे डबे हातात सांभाळत रस्त्याकडेनं रमतगमत, एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून किंवा एकमेकाला ढकलत घरी निघालेले असत. क्वचित त्यांच्यासोबत पालक असत.
काही वेळेला शाळेच्या `नवीन' पळसुलेबाई माझ्या मागेपुढे असत.
त्या खूप उंच होत्या. गोरा रंग, किरकोळ बांधा, वरचे दात किंचित पुढे, वेणीचा शेपटा मागे पाठीवर सोडलेला, त्यात फुलांचा गजरा माळलेला, खांद्याला पर्स व हातात छत्री अशा त्या दिसत. क्वचित कुलकर्णीबाई त्यांच्याबरोबर असत. मी त्यांना ओळखत होतो तसे त्या दोघी मला ओळखत. पण आमचे बोलणे कधी झाले नाही.
असाच त्या रस्त्याने मी एकदा घरी आलो. अंगावरचे कपडे बदलून हात-पाय, तोंड धुऊन पाटावर बसलो.
सुलभाने चहाचा कप माझ्यापुढे ठेवला. चहाचा घोट घेता घेता सहज मी सुलभाला म्हणालो, `नवीन आलेल्या पळसुलेबाई दिसतात मला घरी जाताना. मुलेही रमतगमत चाललेली असतात. त्यावरून आठवलं, तू एकदा शाळेत जाणार होतीस ना गं ? त्या दिवशी कुलकर्णीबाइंर्ना म्हणाली होतीस -'
सुलभा `माझ्या' समोरच पाटावर बसली होती. तिच्या पुढ्यात स्टोव्ह मंद चालला होता. त्यावर दूध तापत होते.
तिने हलकेच मान उचलून माझ्याकडे पाहिले मग खाली पाहत स्टोव्हची किल्ली फिरवली. स्टोव्हचा मंदसा होणारा आवाज एकदम थांबला. शांत झाले.
`नाही गेले !' विझलेल्या स्टोव्हकडे खाली पाहत ती म्हणाली.
`का गं, नव्या बाई आलेल्या आहेत, भेटून ये एकदा त्यांना !'
तरी ती बोलली नाही. तिची नजर खालीच होती.
मी पुन्हा विचारले, `होय गं ? तुझ्या जागी त्या आल्या आहेत. चांगल्या दिसतात. वाईच्या आहेत म्हणे !'
`हं !' असे म्हणून तिने सुस्कारा सोडला. तिची नजर खालीच होती.
थोड्या वेळाने म्हणाली, `खरं सांगू, त्यांना भेटायला मला संकोच वाटतो ! लाजच म्हणाना !'
`का बरं, तुझी शाळा आहे ती !'
`माझी नाही आता !' पहिल्याच `खिन्न' स्वरात ती म्हणाली, `मी सुरू केलेली शाळा, बाळंतपण आलं म्हणून चारच महिन्यांत सोडली. राजीनामा दिला. आता पुन्हा बाळंतपण आहे - दुसरं ! दिसणारच त्यांना ! मग लाजल्यासारखं होईल नाहीतर काय ? त्यापेक्षा न गेलेलं - भेटलेलं बरं !' ती म्हणाली.
तिच्या बोलण्यात खंत होती मलाही ते ऐकताना वाईट वाटले.
मी गप्प झालो. सहज म्हणून बोलायला गेलो, पण बोलणं कुठल्या कुठे गेले. पण तिचे म्हणणे अगदी खरे होते. तसेच झाले होते.
मी उठून बाहेरच्या खोलीत गेलो. वर्तमानपत्र तोंडासमोर धरून बसलो.
सुलभा कपबशा विसळून हात पुसत बाहेर आली.
माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मी असा एकदम गप्प झालो म्हणजे तिला बरे वाटत नाही. मी दुखावला गेलो अशी शंका तिच्या मनाला येते.
वर्तमानपत्रातली नजर काढून मी तिच्याकडे पाहिले. ती किंचित् हसली. म्हणाली, `अनिल आता छान खेळतो बघितलंत ना ? सुधीरचंपण त्याच्यावर चांगलं लक्ष असतं. तो आजारातून उठला आहे म्हणून तो त्याची काळजी घेतो. वाटलं नव्हतं मला अनिलची तब्येत इतक्या झपाट्याने सुधारेल ! किती काळजीत पडलो होतो आपण ! पण आमच्या भिलवडीच्या डॉक्टरीणबाइंर्च्या औषधोपचाराला यश आलं.'
मी तिच्याकडे हसून पाहिलं. मला बरं वाटावं म्हणून तिने विषय कसा सहजगत्या बदलला तोही पुन्हा मनाला समाधान देणारा.
- तसा मी पुरोगामी विचारांचा होतो. थोडेबहुत वाचले होते - वाचत होतो त्याचा परिणाम असावा.
आम्ही दोघे नोकरीसाठी सातारारोडला आलो. माझी कारखान्यातली नोकरी चालू झाली. सुलभाला कंपनीने कॉलनीत माँटेसरी शाळा काढण्यासाठी घेतले. तिचे शिक्षण, तिचा अनुभव उपयोगी पडला. ती बोर्डीला अनुताई वाघ यांची विद्यार्थिनी होती. ताराबाई मोडकांची लेक्चर्स तिच्या वर्गावर होत. अशी शैक्षणिक बैठक असल्यामुळे शाळेची सुरुवातच उत्तम झाली. पुढे तिला खूप करायचे होते.... नि बाळंतपण आले ! तिने राजीनामा दिला. कंपनीचे अधिकारी तिला रजा घ्या म्हणत होते. पण तिने त्यांचे ऐकले नाही. लहान मूल घेऊन मला शाळेचे काम व्यवस्थित होणार नाही या सबबीवर तिने शाळा सोडली. कर्तव्यात कसूर करणे तिला अजिबात
मान्य नव्हते. तिचा तो स्वभाव होता.
ते बाळंतपण झाले. आम्हांला मुलगा झाला. आता तिसरे बाळंतपण उभे राहिले. म्हणतात तसे वर्षा-सव्वावर्षाचा पाळणा होता.
मी विचार करू लागलो. आता विचार करण्याची माझी पाळी होती.
मला माहिती हवी होती. पण ती कोण देईल ? कंपनीचा दवाखाना होता. तिथले डॉ. भद्री माझ्या ओळखीचे होते. पण मी त्यांना विचारणार नव्हतो. कॉलनीत कुणालाच विचारणार नव्हतो. मला बभ्रा होऊ द्यायचा नव्हता.
हा विषय त्याकाळी फार नाजूक समजला जाई. त्याची उघड चर्चा होत नसे. त्याबाबत गुप्तताच पाळली जाई.
दरम्यान मी मायणीला गेलो. अधूनमधून जात होतो तसा.
बऱ्याच दिवसांनी गेलो. बरे वाटले. जुनी ओळखीची मंडळी भेटली. इकडचे - तिकडचे विषय निघून गप्पागोष्टी झाल्या, नवे-जुने समजले.
विठ्ठल गरवारे भेटला. त्याचे घर आमच्या घरामागेच, रस्त्याला लागून. पण तो आता तिथे राहत नव्हता. तो मळयात राहायला गेला होता. अंग मेहनतीने शेती स्वत: कसत होता. त्याने तिथे घर बांधले होते.
तो मला म्हणाला, `बंडू, जेवायला ये मळयात, माझं घर पाहायला मिळेल.'
मी `बरं' म्हणालो. नाहीतरी मला जेवायला कुठेतरी जायचेच होते.
मी ओढा ओलांडून विटे-रस्त्याने विठ्ठलच्या मळयावर पोचलो.
रानात त्याने स्वत:पुरते छान घर बांधले होते.
वहिनी समोर आल्या. त्यांनी माझे हसून स्वागत केले. `या !' म्हणाल्या.
त्यानी पाण्याने भरलेले तांब्याभांडे माझ्या समोर केले. मी चूळ भरून टाकली. घोटभर पाणी प्यालो. तिथे ओसरीवर अंथरलेल्या घोंगडीवर बसलो.
नि मला एक धक्कादायक गोष्ट दिसली.
तिथेच ओसरीवर मोठा मुलगा बसला होता. असेल अठरा-वीस वर्षांचा. तो संपूर्ण नागडा होता. अंगावर कसलेही वस्त्र नव्हते.
ते पाहून मला कसेसेच वाटले. चांगलाच हादरलो. नजर दुसरीकडे वळवली.
विठ्ठल माझ्याजवळ येऊन बसला. माझ्या खांद्यावर हात ठेवून त्या मुलाकडे पाहत म्हणाला, `बंडू, नशीब म्हणायचं ! भोग आहेत रे, ते भोगतोय ! जन्म दिला आहे ना, आता त्यातून सुटका नाही !'
मला फार वाईट वाटले. काय बोलणार ?
वहिनींनी आतून `धोतर' आणले. त्याच्या अंगावर टाकले. ते त्याने भिरकावून दिले.
वहिनी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, `असं नाही करायचं ! पाहुणे आलेत ना आपल्याकडं ? दिलीप % !'
वहिनीनी परत त्याच्या अंगावर धोतर टाकले तेही चेहरा वेडावाकडा करीत काढू लागला. वहिनी कडाडल्या, `थांब, विस्तू आणू का, चुलीतला विस्तू आणू ?'
त्यासरशी उजव्या हाताची मूठ तोंडावर घेऊन तो बोंबलू लागला.
मी म्हणालो, `वहिनी, राहू द्या ना ! बसलाय तो तिकडे बसू द्या! उगीच सक्ती नका करू !'
विठ्ठलने उजव्या हाताची मूठ कपाळावर मारून घेतली. `रोजचंच चाललंय आहे रे हे, बंडू ! काय करावं आई-बापानी ?'
विठ्ठलच्या मुलाचे मतिमंदत्व मला जरा जास्तच वाटले. अवघड होते खरे !
`विठोबा, तुला आणखी....' पण माझे बोलणे पुरे होण्याआधीच विठ्ठल म्हणाला, `आहेत रे बाबा, एक मुलगा, एक मुलगी ! ईशकृपेने दोघं चांगली आहेत. हा एवढाच आमचं आई-बापाचं रक्त शोषून घेतोय ! काय आमचं पूर्वजन्मीचं पाप असेल त्याची ही शिक्षा ! आता ही परीक्षा आणखी नशिबाला नको म्हणून मीच संतती नियमनाचं ऑपरेशन करून घेतलं ! काय करणार रे ?' विठ्ठलने अगदी सहजगत्या सांगून टाकलं.
`काय सांगतोस ?' मी विठ्ठलकडे आश्चर्याने पाहत विचारले.
`होय बाबा ! ते त्यातल्या त्यात सोपं असतं' विठ्ठल म्हणाला.
मायणीसारख्या आडवळणी गावात राहणाऱ्या विठ्ठलने किती अवघड वाटणारा निर्णय घेतला होता. मला त्याचं कौतुक वाटलं.
`विठोबा, माझाही विचार चालला आहे' मी हळू आवाजात म्हणालो.
`बंडू, खुशाल करून घे ! काही फरक पडत नाही. चारचौघात कळलं तर थोडी कुचाळकी होते. पण आपण तिकडं लक्षच द्यायचं नाही. शेवटी काय आपल्या हिताचं ते आपण केलं पाहिजे तू तर शहरात राहतोस.'
माझ्या विचलित मनाला विठ्ठलच्या बोलण्याने बळकटी आली. आता कुणाला काही विचारत बसायचं नाही. मी ठरवून टाकलं.
मी सातारारोडला परत आलो.
सुलभाजवळ आधीच विषय काढला होता. नंतरही अधूनमधून आमचे बोलणे झाले होते. एखाद्या गोष्टीचा मी किती पाठपुरावा करतो हे तिने मागेही अनुभवले होते. तो माझा स्वभाव होता.
सातारला गीते बिल्डिंगमध्ये डॉ. मालशे म्हणून होते. ते त्यांच्या दवाखान्यात या शस्त्रक्रिया करतात असे मला समजले.
मी त्यांची गाठ घेतली.
ते म्हणाले, `तुमचे वय कमी आहे -'
`माझी तयारी आहे.' मी म्हणालो.
डॉक्टर माझ्याकडे पाहतच राहिले.
त्यावेळी मला अठ्ठाविसावे वर्ष लागायचे होते.
त्यांनी मला क्रॅलेंडरवर पाहून दिवस दिला.
`या दिवशी बरोबर नऊ वाजता या, आदल्या दिवशी संध्याकाळी
जेवण घेऊ नका. सकाळी एकदा चहा घेतला तरी चालेल.'
मी `हो' म्हणत मान हलवली.
`एक वाजता तुम्हांला घरी जाता येईल.' डॉक्टर म्हणाले.
`मला सातारा रोडला एस्. टी. ने जायचे आहे.' मी म्हणालो.
`चालेल. काही त्रास होणार नाही.' डॉक्टर म्हणाले.
त्यानी मला सगळे समजावून सांगितले. माझ्या शंकांना उत्तरे दिली. इतके झाले तरी मला त्यादिवशी आपल्या बरोबर कुणीतरी असावे, असे वाटले. एरवी मी कुणालाच सांगितले नसते. सांगणार नव्हतोच. पण सुलभाचे म्हणणे पडले, बरोबर कुणीतरी असू द्या. म्हणून मी विचार केला. जनरल ऑफिसमध्ये थिटे टायपिस्ट होते. त्यांचा माझा चांगला स्नेह होता. ते पंढरपूरचे. पंढरपूर गावाबद्दल मला प्रेम होते. माझे सगळे बालपण तिथल्या गल्ली-बोळात गेले होते. तेवढ्यावरून थिट्यांशी माझे छान जमले. ते माझे चांगले मित्र झाले.
थिटे सातारला राहत होते. कंपनीच्या बसने ते रोज जात येत होते. त्यामुळे मला त्यांचा चांगला उपयोग झाला असता.
त्यांना ऑफिसच्या बाहेर नेऊन एका बाजूला घेऊन सगळे सांगितले. माझे बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, `काय हे माधवराव, तुमचं वय अजून लहान आहे. इतक्यात -'
मी थिट्यांना थांबवीत म्हटले `नाही, विनायकराव, माझे नक्की झाले आहे. त्यात आता बदल नाही. तुम्ही फक्त त्या दिवशी माझ्याबरोबर यायचे. शिवाय ही गोष्ट तुमच्या-माझ्यातच राहील. उगीच फाटे फुटायला नकोत.'
थिट्यांनी कबूल केले. `काही काळजी करू नका' म्हणाले. पण त्या दिवशी त्यांच्याकडे काहीतरी धार्मिक कार्य होते. पण ते मी `अॅडजस्ट' करतो म्हणाले. मला फार बरे वाटले. मला योग्य माणूस भेटला.
मला आता अधिक विचार करण्याची आवश्यकता नव्हती.
नेहमीप्रमाणे कारखान्यातून सुटून मी घरी आलो.
चहा झाला. सहजगत्या मधल्या खोलीतल्या कॉटवर पडलो होतो.
सुलभा आतले आवरून माझ्याजवळ आली. मी कॉटवर थोडे सरकून तिला बसायला जागा दिली. ती बसली.
तिने माझा हात हातात घेतला. `काय हो, तुम्ही हे सगळं मनापासून करता आहात ना ?' तिने मला विचारले.
`हो, अगदी मनापासून ! माझ्यावर कोण सक्ती करणार ? आणि तुला माहीतच आहे, मी कुणाचं ऐकत नसतो. मनाला पटतं तेच करतो. पण तू कां असं विचारतेस ?' मी तिलाच प्रश्न केला.
`नाही आपलं असंच - मला वाटलं !' माझा हात सोडत ती म्हणाली, `कुठला निर्णय घाईघाईनं घेतला असं व्हायला नको.'
`तसं काही होत नाही - निदान माझ्या बाबतीत तरी ! तू काही काळजी करू नकोस ! बाळंतपणाच्या फेऱ्यातून तुला मला सोडवायचं आहे.' मी म्हणालो.
माझे बोलणे ऐकून तिला समाधान वाटले. ती हसली.
`तुम्ही एवढे विचार करीत असाल असं मला वाटलं नव्हतं.' ती म्हणाली.
थोडा वेळ आम्ही कुणीच बोललो नाही.
`आता माझं एक ऐकाल, काय हो ?' सुलभाने विचारले.
`काय ?'
`पूर्वी तुम्ही गोष्टी लिहीत होता, तशा गोष्टी लिहायला लागा ! तुम्हांला गोष्ट लिहायला चांगली जमते. विषय सुचतात. भाषा छान लिहिता येते -'
तिला थांबवत मध्येच मी म्हणालो, `काय गं, पण तूच तर बोर्डीला असताना म्हणाली होतीस, लेखक असण्यात किंवा होण्यात मला काही विशेष वाटत नाही. उगीच लिहीत बसत जाऊ नका !'
`ते माझं मत आता बदललं आहे.' सुलभा म्हणाली, `तुम्ही लिहावं. चांगल्या चांगल्या गोष्टी लिहाव्यात. त्या छापून याव्यात, असं आता मला वाटतं.'
`बरं बघू ! प्रयत्न करू ! आता लिहायचं मी विसरलो आहे.' मी हसून म्हणालो.
त्या दिवशी आमचे असे अगदी मनमोकळे बोलणे झाले.
डॉ. मालशे यांच्या दवाखान्यात बरोबर नऊ वाजता पोचलो. थिटे माझ्याआधी येऊन थांबले होते.
सकाळची वेळ होती. मन उल्हसित होते. कसली भीती वाटत नव्हती.
अर्ध्या-पाऊण तासात डॉक्टरांचे काम झाले. त्यांच्या हाताखाली एक नर्स फक्त होती. डॉक्टर मला काहीबाही विचारून बोलण्यात गुंतवून ठेवत होते. दुसरीकडे त्यांचे काम चालले होते.
नर्सने ड्न्ेिंसग केल्यावर मला बाहेर आणले.
तिथल्या वॉर्डमध्ये कॉटवर झोपवले. अंगावर चादर टाकली. थिटे उशाशी येऊन बसले.
सुमारे अर्ध्या तासाने थिटे म्हणाले, `माधवराव, मी जाऊ का ? डॉक्टरांना विचारले, ते म्हणाले गेलात तरी चालेल. घरी जरा गडबड चालली आहे.'
`जा, जा तुम्ही ! मी पडून राहतो.' मी म्हणालो.
`एक वाजता परत येईन, त्या वेळी तुम्हांला घेऊन जाईन.' थिटे म्हणाले, `या इथल्या नर्सबाई माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत. त्यांना सांगून ठेवलं आहे. काळजी करू नका !' असे म्हणून थिटे निघून गेले.
बरोबर एक वाजता थिटे परत आले. तोपर्यंत मला झोपही लागली होती.
डॉक्टरांनी येऊन पाहिले. `उत्तम' ते म्हणाले.
त्यांनी मला उठून चालायला परवानगी दिली. आणखी काही सूचना केल्या. रजेसाठी सर्टिफिकेट दिले.
मी उठून उभा राहिलो.
थिट्यांनी माझा हात धरला. दारात रिक्षा उभी होती. आम्ही
दोघे रिक्षात बसलो.
थिट्यांनी रिक्षावाल्याला सांगितले, `सावकाश घे रे बाबा, पेशंट आहे.'
रिक्षा एस्. टी. स्टँडकडे जाण्याऐवजी गावाकडे वळली.
मी थिट्यांना विचारले, `अहो, इकडं कुठं ? स्टँडवर नाही का जायचं ?'
थिटे हसून म्हणाले, `आमच्या घरी जायचं. जेवण करायचं. मग संध्याकाळी तुम्हांला पोचवतो स्टँडवर.'
`अहो पण थिटे, मी पेशंट आहे -'
पण माझे बोलणे पुरे होण्याआधीच थिटे म्हणाले, `मी डॉक्टरांना विचारलं आहे. ते म्हणाले, `जेवू द्या, काही हरकत नाही. त्यांची तब्येत चांगली आहे. माधवराव, पुरणपोळी खायची. तसे मी तुम्हांला कसे सोडीन ? पंढरपूरचे लोक आपण. पुरणपोळी आपल्याला फार आवडते.'
`अहो, विनायकराव, पण माझं ऑपरेशन झालं आहे !'
`चालते हो ! मी डॉक्टरना विचारलं आहे. चला, तुम्ही मुकाट्याने!'
माझा नाइलाज झाला.
थिटे गुरुवारात राहत होते. पहिली पंगत उठून जेवणे झाली होती. आम्हांला उशीरच झाला होता. मी व विनायकराव दोघेच जेवायला बसलो. ते माझ्यासाठी थांबले होते.
शेवटी पुरणपोळी खाल्ली. व्यवस्थित जेवलो.
विनायकरावांनी मला माडीवर नेले. मला म्हणाले, `झोपा आता इथं ! चांगली विश्रांती घ्या ! बरोबर पाच वाजता मी तुम्हांला सातारा रोडला एस्. टी. त बसवून देतो.'
मी त्यांचे मुकाट्याने ऐकले. जेवण छान झाले होते. झोप लागली.
ही सगळी हकीगत सुलभाला सांगितली, त्यावेळी तिला आश्चर्य वाटले. `काही त्रास झाला नाही ?' तिने विचारले.
`काही नाही. उलट छान वाटले.' मी म्हणालो.
मी येणार म्हणून तिने आधीच टाकून ठेवलेल्या गादीवर पडून राहिलो माझ्या उशाशी बसून ती माझ्या कपाळावरून, केसांवरून हात फिरवीत राहिली. मी डोळे मिटले. मला झोप लागली.
(आगामी `सहचरी' या आत्मनिवेदनपर पुस्तकातून)
- माधव पिटके, सातारा

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.