Skip to main content

युवकोंमे गांधी कथा - कथन शिबिर

मी दहावीची परीक्षा दिली. सुट्टीत ब्रह्मविद्या मंदिर, पवनार आश्रमात गेले. तिथे मला रामभाऊकाका म्हणाले की तुम्ही पुण्याला होणाऱ्या गांधी कथा-कथन शिबिरात जा.
२३ मे २००७ ला, संध्याकाळी आम्ही गांधीभवन मध्ये पोहोचलो. तिथे अन्वरकाकांनी आम्हांला राहण्याची जागा दाखवली. आमचं सामान ठेवून आम्ही गांधीभवनचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षींना भेटायला गेलो. त्यांनी आमचं नाव, शिक्षण विचारलं आणि थोडी चर्चा झाली. ``गांधी फक्त ऐकायचा नाही, तर स्वत:मध्ये धारण करायचा'' हे कुमार सप्तर्षीकाकांचं वाक्य मी कधी विसरणार नाही. तिथल्या तरुण कार्यकर्त्यांशी भेट झाली. नंतर आम्ही हात-पाय वगैरे धुऊन गांधीभवनाच्या परिसरात फिरू लागलो. जवळच गुलमोहोराचं झाड होतं. जमिनीवर पडलेल्या लाल-पिवळया गुलमोहोराच्या फुलांनी माझं मन मोहून घेतलं.
गांधीभवन एक सुंदर, शांत वातावरणातील इमारत आहे. तिथे आजूबाजूला हिरवीगार झाडे आहेत. प्रवेश केल्या-केल्या समोरच एक गांधीजींचा पुतळा आहे. तिथलं ग्रंथालय छान आहे. वरच्या मजल्यावर गांधीजींविषयी प्रदर्शन आहे. तिथे पूर्ण इतिहास आपल्याला चित्ररूपाने पाहायला मिळतो.
शिबिरार्थींची संख्या वाढतच होती. आम्ही सर्वांशी ओळखी करून घेत होतो. आदरणीय नारायणभाई आले तेव्हा आम्ही नाश्ता करताना त्यांच्याशी बोललो. नंतर कार्यक्रम सुरू झाला. नारायणभाइंर्चा परिचय देण्यात आला. नारायणभाई २४ वर्षं गांधीजींच्या सहवासात राहिले. त्यांनी पुष्कळ ठिकाणी गांधीजींच्या कथा सांगितल्या आहेत. मी गांधीजींची अनेक पुस्तकं वाचली, पण पुस्तकातलं वाचन वेगळं आणि गांधीजींसोबत प्रत्यक्षात राहिलेल्या व्यक्तींकडून प्रसंग ऐकणं वेगळं. तो फार छान अनुभव होता. नंतर आम्ही आमचा परिचय दिला.
बाळ सरोदेकाकांनी वेगवेगळे गट करून दिले. प्रत्येक गटात वेगवेगळया जिल्ह्याचे लोक होते. आम्ही एकत्र बसून प्रश्नांची चर्चा केली आणि गांधीजींबद्दलचे प्रश्न लिहून नारायणभाइंर्कडे देण्यात आले.
सात दिवसांचे शिबिर होते. दिवसभराचे वेळापत्रक सभागृहात एका फळयावर लिहून ठेवले होते. त्याप्रमाणे रोज ठरलेल्या वेळी नारायणभाई मांडणी-विवेचन करीत, प्रश्नांची उत्तरे देत. भगतसिंगच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का ? फाळणीचे गुन्हेगार कोण ? अशा अनेक शंकांचे निवारण झाले. शिबिरात फक्त नारायणभाईच बोलले नाही, तर गांधीजींच्या जीवनातील प्रसंग सांगण्याची संधी आम्हांलाही दिली गेली. प्रत्येक गटातून रोज एक-एक जण ठरलेल्या वेळी कथा सांगायचे आणि नंतर इतर शिबिरार्थी त्यांची प्रतिक्रिया मांडायचे. काही चुका असतील तर सांगायचे. नारायणभाई आम्हांला समजावून सांगायचे की कोणत्या विषयावर प्रकाश टाकायचा. त्यासंबंधी कोणता प्रसंग असेल किंवा अपुरा प्रसंग सांगितला असेल, तर ते पूर्ण करायचे.
दुपारच्या जेवणानंतर संगीताचा कार्यक्रम असायचा. नारायणभाइंर्नीच गांधी कथेवर गीत लिहिलेले. तीच गीतं नरेन्द्रभैया, निहारीकादीदी आणि आरतीताई पटवर्धन आम्हांला शिकवायचे. आणि पेटी-तबल्याची साथ असल्यामुळे गाणी खूपच सुंदर व्हायची. आम्ही खूप उत्साही होऊन, मोकळया गळयांनी गाणी गायचो.
नंतर नारायणभाई आम्हांला गांधीजींच्या जीवनातील प्रसंग सांगायचे. लहानपणीचा मोहन, विदेशात शिकायला गेलेला मोहन, त्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती, सत्याग्रह, सत्य, अहिंसा ह्या सर्व विषयांवर चर्चा झाली. ९ वर्षांचे असताना गांधीजी म्हणायचे, की
मीच का, पूर्ण समाजच `हरिश्चंद्र' का बनू शकत नाही. लहानपणापासून गांधीजी फक्त स्वत:पुरताच नव्हे, तर पूर्ण समाजाचा विचार करायचे म्हणूनच ते महात्मा, रट्निपाष्ता बनू शकले. मध्ये - मध्ये नारायणभाई स्वत:च्या जीवनातील विनोदी प्रसंग सांगायचे, तेव्हा आम्ही खूप हसायचो.
आमचे बाबा नेहमी मला हेमभाईबद्दल सांगायचे. ह्या शिबिरात आमची आसामच्या हेमभाइंर्शी भेट झाली. हेमभाई काहीच मागत नाहीत, ते म्हणतात, ``मला पैसा नको, संपत्ती नको, फक्त तुमचा एक जन्म पाहिजे. `माणूस द्या रे, माणूस द्या,' म्हणणारा हा माणूस माझ्या मनात एक वेगळीच छाप निर्माण करून गेला.
संध्याकाळी मी आणि माझे नवीन मित्र-मैत्रिणी, जवळच्याच निसर्गोपचार केंद्रात काढा पिण्यास जायचो. तिथे राहणारे दिपांकरभैया रोज सकाळी आम्हांला योगासनं शिकवायचे. डॉ. गोविंद जैसवाल आम्हांला निसर्गोपचार व आहाराबद्दल खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगायचे.
काढा पिऊन झाल्यावर लगेच आम्ही सभागृहात यायचो. ती वेळ मूल्यांकनाची म्हणजे आजचा दिवस कसा गेला, काय आवडलं, काही तक्रार आहे का ? ह्या विषयांवर चर्चा व्हायची. मग प्रार्थना आणि आम्ही जेवायला जायचो. जेवण खूप चवदार, रोज जेवणात गोड पदार्थ असायचा म्हणून मला खूप आवडलं. रात्री गांधी-विचारांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. त्यामध्ये नरेन्द्र खैरनार-सरांनी केलेलं भगतसिंग आणि गांधीजींची स्वर्गात भेट हे एकपात्री नाटक आणि राजस्थानहून आलेल्या लोकांनी केलेला `मोहन से महात्मा' ह्या कठपुतलीच्या कार्यक्रमांनी लोकांचं मन मोहून टाकलं.
शेवटच्या दिवशी समारोपाचा कार्यक्रम झाला. दुपारच्या जेवणानंतर आम्ही `आगाखान पॅलेस'मध्ये गेलो. तिथे महादेवभाई आणि माता कस्तुरबांच्या समाधीचे दर्शन घेतले. नंतर आम्ही `येरवडा' जेलमध्ये गेलो. कितीतरी कैदीच-कैदी पाहायला मिळाले. ज्या आंब्याच्या झाडाखाली महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचा `पुणे करार' झाला, ती जागा पाहिली. नारायणभाइंर्नी कैद्यासमोरील आपल्या कथनात येरवडा तुरुंगाला महात्मा गांधी `येरवडा मंदिर' म्हणायचे असे सांगितले.
हे सात दिवस मला खूप काही शिकवून गेले. नवीन-नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या. लोकांसमोर आपले प्रश्न, विचार नि:संकोचपणे मांडण्याची हिंमत आली. जे शिकले ते स्वत: आचरणात आणायचा प्रयत्न मी करत आहे. गांधीजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी खूप मेहनत, अभ्यास, चिंतन - मनन करत आहे. कारण पहिले स्वत: सखोल अभ्यास व आचरण यांनी मजबूत असलं पाहिजे. मगच आपले विचार लोकांना पटतील आणि लोकांच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसनही करता येईल.
- सुमेधा सुभाष पाटील, रायगड

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.