Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

तारांगण - वास्तव आणि आभास

`रात्रीच्या अंधारात स्वयंप्रकाशित होणारे चंद्र-तारे तुमच्या बेडरुमच्या छतावर' अशा मथळयाची जाहिरात वाचली आणि मला गहिवरूनच आलं. स्वतंत्र माणूस घरात राहू लागला, त्याने आपल्या आजूबाजूला संस्कारांच्या, परंपरेच्या अभेद्य भिंती उभ्या केल्या आणि प्रसंगी जीव मुठीत धरुन का होईना तो त्या चौकटीतला आपला जीव सुरक्षित समजू लागला. मात्र आता चंद्र-तारे घरातल्या छतावर रंगवून निसर्गाशी जवळीक साधण्याची ही `अभिनव' पद्धत कुठेतरी विचारात पाडतीय. घराची सजावट कशी असावी याबद्दल घरागणिक वेगवेगळी मते असतातच. त्यामुळे आम्ही चंद्र-तारे छतावर मांडले तर तुमचं काय गेलं ? असा प्रश्न एखाद्या घरातून येऊ शकतो. आता याला खरंच काही उत्तर नाही. कारण तसं पाहिलं तर यात वैषम्य वाटण्यासारखं काय आहे असंही एखादा विचारेल. पण काही गोष्टी चटकन मनावर सूक्ष्मसा आघात करून जातात. काही महिन्यांपूर्वी, लक्ष्मी रस्त्यावर, मला वाटतं कुंटे चौकात एक मोठं होर्डिंग लावलं होत. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम असा त्याचा विषय होता. इथपर्यंत ठीक होतं. पण त्यातल्या मजकुरामधे तंबाखूमुळे होणारे कर्करोगादि आजार `पाकिस्तान भेज दो' असा आशय होता. तंबाखूविरुद्ध जनजागृती करणाऱ्यांविषयी जी आस्था जागी होत होती ती हा मजकूर वाचता वाचता लयाला गेली.
या दोन उदाहरणांचा आशयासंदर्भात काही संबंध नाही, पण मी मघाशी म्हटलं तसं काही गोष्टी चटकन् आघात करून जातात आणि अस्वस्थ व्हायला होतं. त्यातलाच या दोन गोष्टी.
माणसाचं सगळं न्यारंच. एकटा-दुकटा राहायचा, दिसेल ते खायचा, जागा मिळेल तिथे झोपायचा - बंधन कसलंच नव्हतं. `गरज' या शब्दाची व्याख्या करायची तेव्हा गरजच नव्हती. कारण भूक लागली की खायचं हे तो जन्मत:च शिकून आला होता. पुढे पुढे मात्र त्याच्या कल्पक मेंदूतून भन्नाट युक्त्या निघाल्या आणि `प्राण्याकडून सामाजिक प्राण्याकडे' हा त्याचा प्रवास सुरू झाला. या प्रवासातच त्याला आई-बाप, भाऊ-बहीण, `लग्ना'ची बायको असे शोधही लागले असणार. तो असे शोध लावत गेला. असं खरं तर म्हणायला हवं. घराचा शोधही त्यातलाच. आणि मग घरांचा एक समूह, असे समूह मिळून गाव, शहर, राज्य-राष्ट्न् वगैरे साखळी सुरू झाली. थोडक्यात अॅडम-इव्हपासून नवरा-बायकोपर्यंत आणि जंगलाकडून घरापर्यंत असा एक भला मोठा प्रवास माणसानी केलाय.
मात्र हा सगळा प्रवास सापेक्ष अंगाने झाला हे खरं. म्हणूनच तर एखाद्या समूहातील सर्वमान्य चालीरीती दुसऱ्या समूहामध्ये वाईट समजल्या गेल्या. आणि केवळ चालीरीती, सामाजिक बंधनं इथवरच फरक पडला असं नाही. जीवनशैलीमध्येच खूप सूक्ष्म फरक लक्षात येऊ लागले. `तुमच्या बेडरुमच्या छतावर चंद्र-तारे' ही ओळ वाचून रोज रात्री घराच्या अंगणात खाट टाकून चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघणारा आपल्याजवळच्या खेड्यातला एखादा मित्र पोट धरून हसेल. आता त्याला ई-मेल करता येत नाही, म्हणून आपणही त्याला हसू कदाचित, पण मुद्दा इतका वरवरचा नाही. म्हणजे `आमच्यात हे कमी तर तुझ्यात बघ - हे कमी' अशा गुद्दागुद्दीचा प्रश्न नाही. प्रश्न हा पडतो की माणूस जी काही निर्मिती करतो ती कशासाठी ? माणूस स्वत:ला गुंतवत गुंतवत अतिशय गुंतागुंतीचं जीवन उभं करतोय ते त्याला निसर्गापासून तोडतंय का ? सगळयांच्या हक्काचा चंद्र आणि चांदण्या `आमच्या बेडरुममधे' यात नक्की काय गंमत वाटतीय माणसाला ? चंद्र-सूर्याला, पशुपक्ष्यांना पुस्तकात - चित्रात माणसाने बंदिस्त केलंय्; पण त्यामागचा उद्देश शिक्षण हा होता. त्यामुळे असं पुस्तक किंवा चित्र बघून माणसाच्या निसर्गाविषयीच्या ओढीचं कौतुक वाटतं. पण इथे ते घडत नाही.
चार भिंती बांधून माणसाने घर बांधलं. कालांतराने त्या भिंतीपलीकडे दुसरंही घर आलं. मग ते घर या घराच्या भिंतीला येऊन चिकटलं. सामाजिक वृत्तीच्या माणसाने तडजोड करत तेही मान्य केलं. नंतर घराच्या बाजूला एक घर, त्यावर अजून एक घर, त्याच्याही बाजूला एक घर असं करत काडेपेट्या एकावर एक ठेवल्यासारखी डिझाईन्स तयार व्हायला लागली. सर्वच माणसांनी काही हे मनापासून स्वीकारलं असेल असं नाही. पण सामाजिक बदलाच्या, विशेषत: शहरीकरणाच्या प्रक्रियेत हे सगळं त्याला स्वीकारावंच लागलं. मोकळया हवेतून, मोकळया जागेतून दोन-चार खोल्यांच्या बंदिस्त ब्लॉकमधे दबकत दबकत आलेला माणूस तिथलाच होऊन गेला. आणि मुख्य म्हणजे `राहणे' याचा अर्थ `आसरा', `निवारा' असा होऊ लागला, त्याच वेळेला मला वाटतं निसर्गात जगणं म्हणजे असुरक्षित जगणं आणि घर बांधून जगणं म्हणजे सुरक्षित जगणं हे समीकरण पक्कं होऊ लागलं. ते खरंही ठरलं. घराचा शोध हा त्या अर्थाने एक सुंदर शोध होता. कारण त्याने माणूस या प्राण्यालाच फक्त आसरा दिला नाही, तर माणसामधल्या उपजत कल्पकतेला, बुद्धीला जे स्थैर्य हवं होतं ते दिलं.
अशा आपल्या या घरात होणारे बदल, घरातल्या माणसांमधले भेद हे सगळं विस्मयकारक वाटतं. उद्या आपल्या
घराच्या भिंती जर बोलू लागल्या तर त्या काय बोलतील हा एक रंजक प्रश्न आहे. घरातल्या सर्व मंडळींच्या `आतल्या' गप्पा अगदी जगजाहीर होतील. पत्राच्या पेटीने जर आपले तोंड उघडले तर एक चिमुकले विश्वरूपदर्शन घडेल, असं पुलंनी म्हटलंय. तसंच काहीसं मला घराच्या बाबतीत वाटतं. `ही घरं, ती घरं' या त्यांच्या अजून एका लेखात त्यांनी `इथे माझा घराचा शोध संपतो आणि माणसाचा शोध सुरू होतो' असं म्हटलंय तो टप्पा मलाही फार जवळचा वाटतो. संतांनी माणसांविषयी अपार कारुण्य मांडून ठेवलं आहे. अगदी गजबजलेल्या अशा इमारतीत, चाळीत, जेव्हा त्या त्या घरातली माणसं एक एक गोष्ट घेऊन मनात वस्तीला येऊ लागतात, तेव्हा थरारून जायला होतं. प्रत्येक घरांची गोष्ट वेगळी. त्या त्या कहाणीतला राजा वेगळा, राणी वेगळी. `आणि ते सुखाने नांदू लागले' हे किती घरांच्या बाबतीत खरं आणि पैशाचाच नव्हे तर प्रेमाचाही हिशेब मांडत चाललेलं जगणं बघणं किती घरांच्या नशिबी येत असेल, हा विचार अस्वस्थ करतो.
माणसांचा शोध जिथे सुरू होतो ती जागा मला बरेचदा नव्या बांधकामाच्या ठिकाणीच सापडते. नवीन इमारतीच्या बांधकामावरचे मजूर जवळच झोपड्या बांधून राहतात तिथे जावं असं मला अनेकदा वाटून गेलेलं आहे. त्यांना भेटायला कोण म्हणून, काय म्हणून जायचं असा प्रश्न पडतोच, पण त्यांना भेटावं असं मात्र वाटतं. महाराष्ट्न्, आंध्र प्रदेश मधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी जसं सुन्न व्हायला होतंय, तसंच मला त्या लहान झोपड्यांकडे बघून प्रश्नामधे बुडल्यासारखं वाटतं. बरं, हे प्रश्न घेऊन मार्क्सकडे जावं तर तिथेही एकातून दुसरा प्रश्न पडू लागतो, गांधींकडे जावं तर तिथेही तसं होतं. माणूस म्हणून या व्यक्तींची उंची आणि आपली उंची यातला फरकही लक्षात येतो आणि मग हताशपणे नव्या घराच्या वास्तुशांतीचं निमंत्रण स्वीकारत आज इथे, तर उद्या तिथे असं करत हिंडणाऱ्या या झोपड्यांचं प्रश्नचिन्ह मात्र कायम छळत राहतं.
बेडरुम सजवण्याकरता चंद्र-ताऱ्यांचा आभास निर्माण करणाऱ्या कल्पक डोक्याची गंमत वाटते, थोडासा रागही येतो आणि `गोंधळल्यासारखंही' होतं. आहे त्या व्यवस्थेमध्ये स्वत:चं जगणं बांधणाऱ्या सर्वांपैकी एकाने कुणीतरी अशी किंवा अशासारखीच दुसरीही एखादी कल्पना तयार केलेली असते. त्याला दोष देण्यात तसा काही अर्थ नाही. हा खरं तर व्यक्तिगत आणि सामाजिक मनाच्या घडणीचा प्रश्न आहे. अत्यंत कलाहीन आणि डोळयांना दुखावणारे जाहिरात फलक आपण बघतोच. गुजरातमधे पूर आला म्हणून पडून राहिलेल्या साड्या `पाण्याच्या भावात पुण्यात विकणार' अशीही एक जाहिरात अलीकडे बघितली होती. आता या सगळयाचं चूक-बरोबर कुणी ठरवायचं ? गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत जे बघायला मिळतं ते गणपती बघू शकत नाही याचं बरं वाटतं. या वर्षीच्या दहीहंडीमधे आमच्या घराजवळ, कॉलनीत नेहमीप्रमाणे दहीहंडी बांधली होती. रात्री अकरापर्यंत ती फोडण्यात काही यश मिळत नव्हतं. `मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर दहीहंडी फोडावी, तसे प्रयत्न सुरू झाल्याखेरीज गाणी लावण्यात येणार नाहीत' असं निवेदन मी लाऊडस्पीकरवरून ऐकलं आणि थक्कच झालो. दहीहंडी फोडण्याचं कौशल्य, कानठळया बसवणारा आवाज असेल तरच काम करू शकतं का ? बरं संगीताचं एक महत्त्व म्हणावं तर लेझीम, ढोल सारखं तालबद्ध असं काहीच नाही. सगळी गाणी म्हणजे रिमिक्स आणि इतर अचकट-विचकट गाणी. रात्री अकरा वाजता अनेक लोकांना त्रास देणारी. या सगळयाला काय म्हणायचं? घराच्या आतल्या माणसाचा शोध अवघड वाटतो तसंच रस्त्यावरच्या माणसाचा, वेगवेगळया प्रकारे स्वत:ला व्यक्त करणाऱ्या माणसाचा शोधही अवघड वाटतो.
अभिव्यक्ती ही नि:संशयपणे माणसाची गरज आहे, पण अभिव्यक्तीचा संबंध जेव्हा सहअस्तित्वाशी, सामाजिक बांधीलकीशी येतो आणि तिथे भान सुटतंय असं दिसतं तेव्हा त्रास होतो. माणसांना भुलवण्याकरता केलेली अभिव्यक्ती त्रासदायक खरीच, पण अनेकदा एखाद्या अभिव्यक्तीमागची कारणं समजून घेतली जात नाहीत. समजावून दिली जात नाहीत. याचं एक उदाहरण देतो. कॉलेजच्या पहिल्या - दुसऱ्या वर्षाला असताना आम्ही सगळे मित्र एका मित्राच्या घरी जमून अभ्यास करायचो. त्याच्या घरातलं वातावरण खूप मोकळं, खेळीमेळीचं. त्याचे आई-वडीलसुद्धा आम्हांला आमच्यापैकी एक असल्यासारखे वाटायचे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनवर त्यांच्या स्मरणार्थ गाण्याचे कार्यक्रम सुरू होते. त्यातल्या गाण्यांचा सुमार दर्जा, गायकीतल्या चुका या सगळयाची आम्ही चेष्टा करत होतो. यात मित्राच्या आई-वडिलांचाही पुढाकार होता. एखादी अभिव्यक्ती - नाटक, सिनेमा, गाणं, पुस्तक - जेव्हा आपल्याला आवडत नाही तेव्हा आपण त्याच्यावर टीका करतो. यात काहीच गैर नाही. आंबेडकरांविषयीच्या गाण्यांच्या बाबतीतही हेच घडले, पण आज विचार करताना असं वाटतं की मित्राच्या वडिलांनी जर आम्हांला आंबेडकरांच्या चळवळीचीही माहिती दिली असती तर बरं झालं असतं. त्या चेष्टा-मस्करीतून अर्धा-पाऊण तास आमचं मनोरंजन झालं असेल, पण मग ते योग्य नव्हे. समाजात अगोदरच वेगवेगळे तट पडलेले असताना, अशा घटना दुर्दैवाने त्याला खतपाणीच घालतात.
लोकांना भुलवणाऱ्या जाहिरातीतील अभिव्यक्ती आणि सामाजिक प्रतिक्रियेतून आलेली अभिव्यक्ती यात फरक करायला हवा. माणूस घरामधे राहू लागला आणि त्यातून अनेक व्यवस्था निर्माण झाल्या. या व्यवस्थांच्या म्हणूनही काही नवीन गरजाही निर्माण झाल्या. या चक्रामधे सापडल्यानंतर माणसाने आपल्या ऊर्मींना भौतिक सुखाकरता वापरून घेतले आहे. पण चंद्र आणि चांदण्यांना मोकळे सोडावे, असे सांगावेसे वाटते !
- उत्पल चंदावार, पुणे

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.