Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

कासा हा नराधम बाप

`मिळून साऱ्याजणी'च्या मार्च महिन्याच्या महिलादिन विशेषांकात, `मानुषी' या इंग्रजी मासिकात प्रसिद्ध झालेल्या मूळ लेखाच्या आधारे, श्रीमती शांता रानडे यांनी अनुवादित केलेली, प्रतिमा सिंग या असामान्य धैर्यवान बलात्कारित स्त्रीची कहाणी वाचली. प्रतिमासारख्या साध्यासुध्या मुलीला, प्रचंड राजकीय सत्ता हाती असलेल्या गुंड बापाविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे. तिच्या जोडीला महिला संघटना व प्रसारमाध्यमे आहेत. तिला न्याय मिळालाच पाहिजे.ही कहाणी वाचून, महाराष्ट्नतील अशाच एका प्रकरणाची आठवण आली.
१९९१-९२ मध्ये घडलेल्या या घटनेमध्ये, बलात्कारित अल्पवयीन मुलीने, गुन्हेगार बापाविरुद्ध न्याय मागितला. आणि त्यावेळी नागपूर येथे कार्यरत असलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. प्रतिभा रसाळ यांनी, त्यांच्यापुढे आलेल्या या प्रकरणाचे सामाजिक परिणाम जाणून घेऊन जो वेगळा निकाल दिला, त्याबद्दल वाचकांसाठी लिहीत आहे (सध्या न्या. रसाळ या मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्टात मुख्य न्यायाधीश आहेत.)
सुरेश काळे हे ४० वर्षे वयाचे, भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून १५ वर्षे सेवा केलेले गृहस्थ निवृत्त होऊन, नागपूरजवळील वाडी या गावी पत्नी व तीन मुलांसह स्थायिक झाले. सैन्यदलाचे निवृत्तिवेतन मिळत होतेच, शिवाय `पर्थ इंडिया' या कंपनीत त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीही धरली. खाऊन पिऊन सुखी म्हणावे असे हे कुटुंब होते. पत्नी आशा ऊर्फ वृंदा, बारा वर्षांची मोठी मुलगी संध्या, दहा वर्षांचा मुलगा प्रशांत आणि आठ वर्षांची धाकटी मुलगी सारिका असे हे कुटुंब मजेत असायला हरकत नव्हती, पण सैन्यात असतानाच सुरेशला लागलेले दारू पिण्याचे व्यसन आता हाती जरा पैसा मिळू लागल्यावर वाढले. आणि आधीच कडक असलेल्या त्याच्या स्वभावामुळे, बायको-मुले फारच धाकात राहू लागली. असे तर अनेक घरात असते. पण एक दिवस संध्या आईपाशी येऊन रडू लागली. आणि आपले बाबा आपल्याला जवळ घेऊन `कसेतरीच वागतात' असे सांगू लागली. आधी तर तिच्या आईचा-वृंदाचा ती सांगते त्यावर विश्वासच बसेना. आणि जे काय घडत होते, त्याचा अर्थ कळण्याचे अवघ्या बारा वर्षांच्या संध्याचे वय नव्हते. १९९१ सालची ही घटना. बरे, सारे काही घरातच चाललेले होते. तक्रार कुणापाशी करणार आणि विश्वास कुणाचा बसणार ?
वृंदाने नवऱ्याची खूप कान उघाडणी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला न जुमानता किंवा मुलीच्या रडण्या-भेकण्याला भीक न घालता, तो १२ वर्षांच्या संध्याशी अनैसर्गिक कृत्ये करीतच राहिला. आणि नंतर काही काळाने त्याने तिच्यावर बलात्कार करण्यापर्यंत मजल मारली. वृंदाला, डोळयांसमोर घडणाऱ्या या गोष्टी कशा थांबवाव्या तेच कळेना, आणि पति-पत्नीमध्ये रोज कडाक्याची भांडणे होऊ लागली. पोरीला घरीच ठेवले, तर हा नराधम बाप काही तिला सोडणार नाही हे जेव्हा वृंदाच्या लक्षात आले, तेव्हा तिने संध्याला नागपूरच्या बालसदनात ठेवून घेण्याविषयी अर्ज केला. पण आई-बाप दोघे एकत्र आणि सुस्थितीत असताना, तिला बालसदनात ठेवून घ्यायला तेथील व्यवस्थापक तयार होईनात. शेवटी वृंदाला त्यांना सत्य परिस्थिती सांगावी लागली. शिवाय मुलीला वडिलांपासून धोका असल्याबद्दलची तक्रारही तिने वाडी पोलीस स्टेशनला नोंदवली. मुलीचे असे बालसदनात राहणे सुरेशला आवडेना. तिला घरी घेऊन येण्याबद्दल तो वारंवार बोलत असे. चार महिने संध्याला बालसदनात ठेवल्यावर, आता सुरेश सुधारला असेल या आशेने वृंदाने तिला घरी आणले. आणि पुन्हा नको तेच सुरू झाले. प्रतिकार केला की दोघींना मारझोड करून घराबाहेर काढले जाई. आता तर संध्या वयात आल्याने धोका जास्तच वाढला. शिवाय, तिला पुन्हा बालसदनात ठेवून घेणेही आता शक्य नव्हते.
डोळयांसमोर रोज होणारा कोवळया वयातील मुलीवरील अत्याचार वृंदाला पाहवेना. आणि अशा या नरकवासात राहणेही सोसवेना. तेव्हा तिने तिच्या हाती होते ते करण्याचा, म्हणजे स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी, या कारणाने झालेल्या भांडणानंतर, तिने स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन काडी लावली. ९६ टक्के भाजलेल्या पत्नीला-वृंदाला मेयो जनरल हॉस्पिटलमध्ये आणून टाकून सुरेश स्वत: फरार झाला. २५ एप्रिल १९९२ रोजी ही घटना घडली आणि १ मे रोजी वृंदाने प्राण सोडला. मृत्युपूर्व जबानीत तिने सर्व घटना सविस्तर कथन करून, संध्यावर आपल्या देखत वारंवार बलात्कार करणाऱ्या आपल्या नवऱ्याविरुद्ध - सुरेशविरुद्ध जबानी दिली. त्यावरून दोघांमध्ये सतत होणाऱ्या भांडणांना व एकंदरच अशा जगण्याला वैतागून आपण स्वत:ला जाळून घेतल्याचे
तने सांगितले. त्यानंतर संध्याने वाडी पोलीस स्टेशनमध्ये, वडिलांविरुद्ध तक्रार नोंदविली. वैद्यकीय रुग्णालयात संध्याची नीट तपासणी केल्यावर, ती सांगत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना दुजोरा मिळाला. स्त्री पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी गोडसे यांच्याशी संध्या मोकळेपणाने बोलू शकली. त्यांनीच तिची जबानी नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक गोतमारे व खांडेकर यांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा करून आत्महत्या कशी घडली असावी ते व इतर घटना समजून घेऊन नोंदविल्या. पोलीस निरीक्षक मिश्रा यांनी पुढील तपासाचे काम केले.
आरोपी सुरेश काळे तात्काळ फरारी झाला खरा, पण असे लपून राहणे जास्त काळ शक्य होणार नाही असे लक्षात आल्यावर १३ जून १९९२ या दिवशी तो स्वत: होऊन वाडी पोलीस स्टेशनवर हजर झाला. त्यामुळे लोकांकडून पोलिसांवर होणारी टीकेची झोड थोडी कमी झाली. सुरेशचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व तपास पूर्ण करून पोलीस खात्याने आपल्या परीने पुरावे इ. गोळा केले व नागपूरच्या अतिरिक्त जिल्हा १ सत्र न्यायाधीश डॉ. श्रीमती प्रतिभा रसाळ यांच्यासमोर केस उभी राहिली. आरोपीनेही स्वत:च्या बचावासाठी नागपूरचे प्रख्यात वकील अॅड. जलतारे यांच्याकडे आपली केस सोपवली. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सरकारी वकील अॅड. श्रीमती पल्लवी खरे सज्ज झाल्या. अॅड. जलतारे यांनी वेगळीच कथा सांगितली. वृंदाची आई शारदाबाई हिने आपल्या जावयाकडे म्हणजे सुरेशकडे दहा हजार रुपये मागितले. ते देण्यास त्याने नकार दिल्यावर, शारदाबाई आणि वृंदा यांनी केवळ आपल्या मुलांनाच नव्हे, तर शेजारपाजारच्या लोकांनाही सुरेशविरुद्ध भडकवले, आणि खोटी तक्रार केली. परंतु, वृंदाच्या माहेरचे लोक कडक स्वभावाच्या सुरेशच्या वर्तणुकीला घाबरून त्यांच्या घरीच कधी जात नव्हते, मग पैसे मागणे - घेणे तर शक्यच नाही. शिवाय वृंदाने ज्या दिवशी स्वत:ला जाळून घेतले त्या दिवशी पतिपत्नींचे झालेले भांडणही शेजारच्या लोकांनी ऐकले होते.
सरकारी वकील अॅड. पल्लवी खरे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ज्या मुलीच्या संरक्षणासाठी बापाने आपले आयुष्य वेचावे, तिच्यावरच बलात्कार करून आरोपीने वडील-मुलगी या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. मुलगी तर खरे सांगतेच आहे, पण तिच्या आईची - वृंदाची मृत्युपूर्व जबानी, वैद्यकीय तपासणी या गोष्टी काय ते स्पष्ट करतात. मृत्युपूर्व जबानीत खरे तेच सांगितले जाते यावर विश्वास ठेवला जातो. याशिवाय मुलीला बालसदनात दाखल करताना आईने व्यवस्थापकांना सांगितलेले खरे कारण व तो अर्ज, मुलीला वडिलांपासून धोका असल्याचा आईने वाडी पोलीस स्टेशनला केलेला अर्ज या सर्वावरून ही केस सिद्ध होते. आरोपीने अत्यंत घृणास्पद व अमानुष कृत्य केले असून, समाजात अशा विकृत प्रवृत्तीची माणसे मोकळी राहिली, तर अनर्थ होईल. कायद्याचा धाक असावा म्हणून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी. आरोपीचे वकील अॅड. जलतारे यांनी, आरोपी जास्त काळ सैन्यदलात म्हणजे आपल्या कुटुंबापासून दूर होता. थोडक्यात अनेक वर्षे स्त्रीसुखापासून वंचित असल्याने, त्याच्यात ही विकृती निर्माण झाली असू शकते, तेव्हा न्यायाधीशांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, असा आरोपीचा बचाव मांडला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद न्या. प्रतिभा रसाळ यांनी लक्षपूर्वक ऐकले. पुरावे आणि बचाव आटोपून ५ ऑगस्ट १९९२ ही निकालाची तारीख निश्चित करण्यात आली.
नागपुरात या अभूतपूर्व घटनेने प्रचंड खळबळ माजलेली होती. आणि एखाद्या पिंजऱ्यात ठेवलेल्या हिंस्र प्राण्याला पाहायला जमावे, तसे, निकाल ऐकण्यासाठी न्यायालय खच्चून भरले होते. न्यायाधीश निकाल देताना म्हणाल्या, `पिता म्हणवणाऱ्या या माणसाने आपल्या कोवळया मुलीचे जीवन नासवून टाकले, पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केले आणि तिन्ही मुले अनाथ करून त्यांना बालसदनात ठेवण्याची वेळ आणली. समाजामधून अशी कीड वेळीच दूर करून तो निर्धोक करणे गरजेचे आहे. बलात्कार झालेल्या या मुलीचे शिक्षण सुरळीत होऊन ती सज्ञान झाल्यावर, तिचे लग्न होईपर्यंत आरोपीला मोकळे ठेवता येणार नाही.' तेव्हा बलात्काराच्या आरोपाखाली सुरेश काळे याला दहा वर्षे सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. याशिवाय पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याबद्दल पाच वर्षे सश्रम कारावास व ३०० रुपये दंड, तो न भरल्यास आणखी तीन महिने कारावास ठोठावला. सर्वसाधारणपणे अशा शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश दिले जातात. पण येथे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही शिक्षा आरोपीने वेगवेगळया म्हणजे पाठोपाठ एकूण १५ वर्षे भोगाव्या व न्यायालयीन कोठडीतील कारावासाचा कालावधी शिक्षेतून कमी करू नये, असेही खास नमूद करून, न्याय देण्याविषयीचा वेगळाच पायंडा पाडला असे म्हणता येईल. पालक-पाल्य, शिक्षक-शिष्य, डॉक्टर-पेशंट यांच्यातील नाती कायद्याच्या दृष्टिकोनातून `कस्टेडियन'ची समजली जातात. व हा कस्टडी - रेप म्हटला जातो. त्याला कायद्याने जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद ठेवली आहे.
- सुनेत्रा ओक, पुणे

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.