Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

मुख्तार माई

जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानातील एका मागासलेल्या गावातील मुख्तार माईने स्त्री जातीच्या अस्मितेसाठी असा संघर्ष केला की त्याचे पडसाद सगळया जगात उमटले.
आश्चर्य हे की गुज्जर समाजातील ही अशिक्षित स्त्री अजूनही त्या समाजात जिवंत राहिली. या लढवय्या स्त्रीने शिखरालाच हादरा दिला आहे. मुख्तार माईची ट्न्ॅजेडी अशी आहे की ऐन तारुण्यात तिला घटस्फोट घ्यावा लागला, कारण नकळत तिचे लग्न एका नालायक आणि पांगळया पुरुषाबरोबर लावून दिले होते, जो उठता-बसता तिला मारहाण करीत असे. परंतु मुख्तार माईला पुरुषाचा याहून बीभत्स चेहरा बघावा लागला, जेव्हा गावातील तथाकथित उच्चवर्णीय मस्तोई जातीच्या चार पुरुषांनी पंचायतच्या निकालाप्रमाणे तिच्यावर बलात्कार केला.
मुख्तार माईवर असा प्रसंग का आला ? तिच्याकडून अशी कोणती चूक घडली होती ?
तसे पाहिले तर तिने कोणताही गुन्हा केला नव्हता. गावातील या मस्तोई समाजाने असा आरोप केला की मुख्तार माईच्या बारा वर्षांच्या भावाने त्यांच्या मस्तोई समाजातील वीस वर्षीय मुलगी सलमाबरोबर काहीतरी `बातचीत' केली. मुख्तार माईच्या भावाचे नाव शकूर. या पाखंडी समाजातील एखाद्या मुलीकडे कोणा मुलाने पापणी वर करून बघणे शक्य नव्हते. इतकेच नव्हे तर लहान मुलांनी त्यांच्या वयाच्या मुलींबरोबर खेळणेसुद्धा योग्य नव्हते. मग हलक्या जातीतील गुज्जर समाजाने मस्तोई समाजातील मुलीबरोबर बोलण्याची हिंमत केली होती, याच्याहून मोठा गुन्हा कोणता असू शकतो ? या आरोपाला आणखी दृढ करण्यासाठी त्यांनी शकूरवर असा आरोप केला की त्याने सलमावर बलात्कार केला.
पण सत्य घटना दुसरीच होती. सलमाने ऐन तारुण्याच्या उन्मादात जी चूक केली होती तिच्यावर पडदा टाकण्यासाठी मस्तोई मंडळींनी शकूरसारख्या निष्पाप बालकावर हा आरोप ठेवला आणि कट रचला. आणि वीज पडली त्याच्या अठ्ठावीस वर्षाच्या बहिणीवर - मुख्तार माईवर जी घटस्फोटिता होती. गावातल्या मुलांना कुराणातील पाठ शिकवून ती आपले आयुष्य व्यतीत करत होती.
तिच्या जागी दुसरी कोणी स्त्री असती तर एवढा अत्याचार सहन करून डोकं फोडून घेऊन नशिबाला दोष देत बसली असती. पण अशिक्षित आणि असहाय असलेल्या मुख्तार माईने या अन्यायाची दाद मागण्यासाठी आणि पुरुषाच्या या पाशवी वर्तणुकीविरुद्ध कंबर कसली. ज्या ढोंगी समाजात बाईला पायातील वहाण समजली जाते अशा ठिकाणी तिच्या धाडसाचा असा परिणाम झाला की स्त्री चळवळीला एक नवी दिशा लाभली.
अशा या संघर्षशील मुख्तार माईची पूर्ण कथा आणि व्यथा छापून प्रकाशित झाली आहे, याचे श्रेय एका फ्रेंच लेखिकेला आहे. जिने फ्रेंचमध्ये हे सर्व लिहिले आहे. तिचं नाव आहे मारी तेरेज क्युनी. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद `इन दि नेम ऑफ ऑनर' - अजमत की खातिर उपलब्ध झाले आहे. त्याची किंमत आहे चोवीस अमेरिकन डॉलर म्हणजे एक हजार रुपये ! या पुस्तकात मुख्तार माईचे स्वकथन तिच्याच शब्दात दिले आहे. वास्तविक मुख्तार माईला फक्त तिची बोली भाषा `सरायकी' सोडून दुसरी भाषा येत नाही. पण फ्रेंच लेखिका फ्रान्सहून खास पाकिस्तानातील या ओबडधोबड गावात आली आणि मुख्तार माईबरोबर बसून दुभाष्याच्या मदतीने तिची आत्मकथा लिपीबद्ध केली.
पाकिस्तानी पंजाबात `मीरवाला' हे गाव मुज्जफरगढ जिल्ह्यात आहे. हा टापू भारतीय पंजाबच्या सीमेपासून फारसा दूर नाही. जवळपास पाच वर्षांपूर्वी २२ जून २००२ मध्ये मीरवाला येथील मुख्तार माईबरोबर ही भयंकर
दुर्घटना घडली. गावातील मस्तोई समाजातील लोक नेहमीच खालच्या जातीवर विशेषत: गुज्जरांवर अत्याचार करतात. इतर गावांप्रमाणे मीरवाला येथेही पंचायत आहे. ही पंचायत स्थानिक भांडणे सोडविण्याचे काम करते (असा त्यांचा दंभ आहे) आणि इतर गावातील पंचायतीप्रमाणे नेहमी असा न्याय-निवाडा करतात की त्यामुळे देशातील कायद्याचे कसे तीन तेरा वाजतात हे स्पष्ट होते. पोलीस त्यांच्या मुठीत असतात. मुख्तार माईच्या संदर्भात विचारपूस न करता पोलिसांनी शकूरला बेड्या घातल्या आणि पोलीस-ठाण्यात घेऊन गेले. तिथे या बारा-तेरा वर्षांच्या मुलाला निर्दयपणे मारहाण केली. आणि जबरदस्ती करून गुन्हा कबूल करायला लावला. असा गुन्हा जो त्याने केलाच नव्हता.
एवढेच करून भागणार नव्हते. मस्तोई समाजाला गुज्जरांची अजून नाचक्की करायची होती. म्हणून पंचायतीत थोडी चर्चा करून सगळयांच्या संमतीने असे ठरले की शकूरने जो गुन्हा केला आहे त्याला तेव्हाच माफ करायचे जेव्हा त्याच्या घरातील कोण्या स्त्रीने पंचायतसमोर येऊन आपला पदर पसरवून माफी मागावी.
शकूरच्या पित्याला पंचायतसमोर नतमस्तक होण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. या कामासाठी घरच्या लोकांनी मुख्तार माईला गळ घातली. ती घटस्फोटित आहे शिवाय तिला मूलबाळही नाही. घटस्फोटानंतर बापाच्या घरीच तुकडे मोडीत होती.
अशा प्रकारे एक निष्पाप स्त्री आपल्याच परिवाराकडून बळीचा बकरा बनली गेली. ११ जून ची काळ रात्र. मुख्तार माई आपल्या बापाबरोबर काका आणि एका व्यक्तीबरोबर पंचायतसमोर आली. मस्तोई लोक हातात बंदुका घेऊन क्रुद्ध नजरेने तिला न्याहाळत होते. मुख्तारने पंचायतसमोर माफी मागण्याच्या हेतूने पदर पसरला आणि खाली नजर घालून उभी राहिली. अशा तऱ्हेने क्षमायाचना केल्यानंतर या पंचायतमधल्या मातब्बर लोकांनी शिक्षा ऐकविली की मस्तोई समाजाच्या इज्जत-अब्रूचे तेव्हाच रक्षण होईल जेव्हा मुख्तार माईवर चार मस्तोई पुरुष बलात्कार करतील.
पुरुषांच्या या पाशवी निर्णयावर कोणीही आवाज उठवला नाही. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमतच नव्हती. मुख्तार माईचा बाप आणि काका चूप. विरोध तरी कसा करणार ! त्यांनी भाजून नसते काढले का ? किंवा गावातून हाकलून दिले असते.... मग दारोदार ठेचकाळत फिरावे लागले असते....
मुख्तार माई सुन्न झाली. पाय थरथर कापू लागले. तिची शुद्ध हरपू लागली होती तोच ती खाली पडायच्या अगोदर तिला पकडले आणि ओढत घेऊन गेले. बळी देण्यासाठी बकरी नेतात तशी. त्यानंतर तिच्यासोबत जे घडले ते तिच्याच शब्दात : ``मी एका रात्रीतून निघून दुसऱ्या रात्रीत प्रवेश केला. बाहेरच्या अंधारातून मला अशा एका अंधाऱ्या खोलीत नेऊन टाकले तिथून खिडकीतून येणाऱ्या चांदणीच्या प्रकाशात मी त्या चौघांचे चेहेरे ओळखले. दरवाजावर सशस्त्र पहारा होता. खाली तबेल्याच्या मातीच्या जमिनीवर माझ्यावर बलात्कार केला गेला. अब्दुल खालिक, गुलाम फरीद, अल्लादित्ता आणि मुहम्मद फैज यांनी. मला आठवत नाही की किती वेळ त्यांनी माझ्या शरीराचे लचके तोडले. एक तास ? अख्खी रात्र ? मी बेशुद्धावस्थेत होते. तरी त्या जनावरांचे चेहेरे कधी विसरू शकणार नाही.''
अशा तऱ्हेने एका निष्पाप स्त्रीला आपल्या कामवासनेची शिकार बनविल्यानंतर त्यांनी तिला अर्धनग्न अवस्थेत कोठरीबाहेर ढकलून दिले, तिच्या अंगावर तिची सलवार टाकली, तिथे जवळपास अडीचशे पुरुषांची पंचायत आहे. नग्न मुख्तार बापाला हाका मारीत होती. सुन्न झालेल्या बापाने आपली चादर तिच्या अंगावर टाकून तिच्या स्त्रीत्वाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला.
पूर्ण घर या घटनेमुळे स्तब्ध आहे. मुख्तार माई काहीही न खाता पिता तीन दिवसांपासून निश्चेष्ट पडून आहे. बाहेर गावातले लोक सांगत फिरताहेत की या लोकांचीच चूक होती. सलमा कुमारी होती. मुख्तारच्या भावाने जर तिच्याशी लग्न केले असते आणि मुख्तार जर कोणा मस्तोईच्या घरी गेली असती तर अशी पाळी आली नसती.
या देशात मुख्तार पहिली स्त्री नाही, जिच्यावर पुरुषांनी असे अत्याचार केलेत. मुख्तार माईने पाकिस्तानात स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराचे विवरणच दिले आहे.
सव्वीस वर्षांच्या जाफरान बीबीवर तिच्या `जीजा'नेच बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यावर तिला दगडांनी ठेचण्याची शिक्षा झाली. कारण ते मूल म्हणजे सैतानाचा पुरावा होता. म्हणून हे सर्वांनी कबूल करून टाकले की यात `जीजा'चा कोणताच अपराध नव्हता. छिनाल जाफरान ने जारकर्म करून पापकर्म केले होते. जाफरान बीबी दगडांच्या मारातून तर वाचली पण तिला तुरुंगात डांबण्यात आले जिथे ती सडत पडलीय आणि बलात्कार करणारा `जीजा' मस्त हिंडतोय.
त्याचप्रमाणे हत्येच्या बाबतीत एका पंचायतीने एका परिवाराला असा निर्णय ऐकवला की त्यांनी आपल्या सहा आणि अकरा वर्षांच्या मुलींना देऊन स्वत:ची सुटका करून घ्यावी. त्याप्रमाणे त्या कुटुंबातील अकरा वर्षांच्या मुलीचा निकाह सेहेचाळीस वर्षांच्या आणि छोट्या आठ वर्षांच्या मुलीचा निकाह मेलेल्याच्या आठ वर्षांच्या भावाबरोबर करण्यात आला. कुत्र्यांच्या भुंकण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हत्याकांड झाले आणि बळी गेल्या दोन मुली !
असे नाही की गावात फक्त अशिक्षित - अनोळखी महिलांवरच अत्याचार होतात. शाजिया नावाची एक सुसंस्कृत डॉक्टर कोणाची तरी पत्नी आणि एका मुलाची आई होती. बलुचिस्तानात एके ठिकाणी काम करीत होती. नवरा परदेशी गेला होता. एके रात्री एक तगडा तिच्या बेडरूममध्ये घुसला, ती किंचाळली, ओरडली तर त्याने तिचे तोंड दाबून तिला सांगितले की बाहेर घासलेटचा डबा घेऊन एक माणूस उभा आहे, ओरडलीस तर तुला जिवंत जाळून
टाकील. नंतर त्याने दोनदा बलात्कार केला. रायफलने तिला ठेचलेसुद्धा. मग टेलिफोनच्या वायरने तिचा हात बांधून तो टीव्ही बघत बसला आणि विव्हळणाऱ्या शाजियावर ब्लँकेट टाकून पळून गेला. जेव्हा गवगवा झाला तेव्हा तिचे सांत्वन करण्याच्या ऐवजी दूर कराचीच्या इस्पितळात भरती केले आणि सल्ला दिला गेला की चूप राहण्यातच तुझी भलाई आहे. तरीदेखील तिने आपल्या भावाला सांगून पोलिसात तक्रार नोंदविली. पण परिणाम काहीच झाला नाही. त्याहून नामुष्कीची गोष्ट म्हणजे तिच्या सासऱ्याच्या बापाने तिला म्हटले की तुझ्यामुळे खानदानाचे नाव धुळीला मिळाले आहे. तेव्हा तू नवऱ्याला तलाक द्यायला लाव. अशा परिस्थितीत डॉक्टर शाजियासारख्या सुशिक्षित स्त्रीच्या मनात आत्महत्येचा विचार येणे साहजिक आहे. पण तिच्या मुलाने आणि नवऱ्याने तिला तसे करू दिले नाही. तिच्याकडून लिहून घेतले की या घटनेची वाच्यता करणार नाही. आपली भलाई यातच आहे की आपण येथून निघून जावे.
आज शाजिया बहुतेक इंग्लंडमध्ये असावी. दु:खाची गोष्ट म्हणजे या जोडप्याला आपल्या मुलाला घेऊन जाण्याची परवानगी नाही.
बाईवर कसे कसे अत्याचार होतात त्याचे भयंकर उदाहरण मुख्तारच्या पुस्तकात आहे. वीस वर्षांची कौसर नावाची तरुणी मुख्तारला भेटायला आली होती. तिला अडीच वर्षांची एक मुलगी होती. आणि आता गर्भवती होती. तिच्या नवऱ्याचे शेजाऱ्यांशी भांडण झाले होते. हा माणूस नेहमी त्यांच्या घरी जेवायला आणि झोपायला येत असे. एके दिवशी कौसरच्या नवऱ्याने आपल्या या मित्राला सांगितले की, त्याला आता हा खर्च झेपत नाही. एकदा कौसर स्वयंपाक करत असताना चार बलुची तिच्या घरात घुसले. एकाने तिच्या नवऱ्याच्या मस्तकावर बंदूक धरली आणि दुसऱ्याने आपली बंदूक तिच्या छातीवर लावली, दुसऱ्या दोघांनी तिच्या डोक्यावरून आणि तोंडावर कपडा बांधला आणि कारमध्ये टाकून दुसऱ्या शहरात निघून गेले. तिथे दोन महिने एका खोलीत डांबून सतत बलात्कार करीत राहिले. कौसरला भीती ही होती की त्यांनी तिच्या नवऱ्याला आणि पोरालाही मारून टाकले असेल. ती आत्महत्या करणार होती पण जमले नाही. ते लोक तिच्यापुढे अशा रीतीने भाकरीचे तुकडे टाकीत जसे एखाद्या कुत्र्यापुढे टाकावेत आणि तिला कुत्र्याप्रमाणे जिभेने पाणी प्यायला लावायचे.
मग एके दिवशी पुन्हा डोकं-तोंड झाकून तिला कार मध्ये टाकले आणि शहराच्या एका निर्जन स्थळी टाकून दिले. कशीबशी पडतझडत ती आपल्या गावी आली. आपल्या नवऱ्याला आणि मुलाला जिवंत पाहून ती हरखली. पोलिसात रिपोर्ट दिलाच होता. पोलिसांनी काय लिहून तिचा अंगठा घेतला होता हे कळलेच नाही. चौघांमधून फक्त एकालाच तुरुंगात टाकले. कोर्टात केस सुरू झाल्यावर जज्ज म्हणाला, ``ही बाई खोटारडी आहे.''
मुख्तार म्हणते, ``ती बाई हा धक्का कधीच विसरू शकणार नाही. जशी मी विसरलेली नाही.''
अशिक्षित मुख्तार माई गप्प बसली नाही. सुरुवातीला ती सुद्धा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली होती. तिला माहीत होते की पाकिस्तानात कोणत्याच बाईला हे सिद्ध करता आले नसते की तिच्यावर बलात्कार झालाय, कारण पुरावा म्हणून चार पुरुषांची साक्ष असणे आवश्यक असते. तोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही. पन्नास टक्के स्त्रियांना असे अत्याचार सहन करावे लागतात.
या संकटांची तमा न बाळगता मुख्तार माईने गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी म्हणून तिने विडा उचललाय. ती अशिक्षित गरीब गुज्जर समाजातील आहे. तिच्याजवळ पैसाअडका काही नाही. तरीसुद्धा गावातील मस्तवाल मस्तोई जातीशी दोन हात करण्याच्या क्रांतीला तिने जन्म दिलाय. या घटनेचे पडसाद केवळ पाकिस्तानातच नाही तर सगळया विश्वात उमटले.
शकूर अजूनही पोलिसांच्या ताब्यात होता. ते त्याला तेव्हाच सोडतील जेव्हा त्यांना त्यांची दक्षिणा मिळेल. बारा हजारांची त्यांची मागणी आहे. बापाने कशीतरी रक्कम गोळा करून त्याला सोडविले.
या दरम्यान मीरवाला गावात झालेल्या या घटनेची कुणकुण पाकिस्तानी वर्तमानपत्रांना लागली. एके दिवशी अचानक पोलीस गावात आले आणि मुख्तार, शकूर, त्यांचे वडील आणि काकाला घेऊन गाडीत बसवले आणि `जतोई' पोलीस मुख्यालयात नेले. जिथे पत्रकार हजर होतेच. त्यांनी मुख्तारच्या तोंडून तिची कथा-व्यथा ऐकली. पत्रकारांना मजकूर मिळाला होता, ते गेले. नंतर मुख्तार माईला हे सांगण्यात आले की गावातल्या मस्तोइंर्ना हे सर्व कळलं आहे, ते काहीही करू शकतात म्हणून तू गप्प बस.
परंतु तिला आतून कसले तरी सामर्थ्य लाभले होते की काय ! ती सर्व शक्तीनिशी सर्वांना तोंड देण्यास तयार झाली होती. तिने विचार केला, आत्तापर्यंत मी दाबले गेले होते, आता तेवढ्याच ताकदीने विद्रोह करीन.
आश्चर्य म्हणजे जो बाप आतापर्यंत ताटाखालचे मांजर म्हणून जगत होता, तो सुद्धा आपल्या मुलीला पाठिंबा देण्यास तयार झाला. त्याला हे माहीत होते की पोलीस काही धुतल्या तांदळासारखे नाहीत.
त्यानंतर अनेक वेळेला मुख्तार माईला पोलिसांसमोर साक्ष द्यावी लागली. पोलीस घरी येतात, तिला घेऊन जातात, ठाण्यात संध्याकाळपर्यंत बसवतात आणि गावात परत आणून सोडतात. नकळत तिचा अंगठा कोऱ्या कागदावर घेतला गेला. एके दिवशी पोलीस अधिकारी मुख्तार माईला म्हणाला, ``बघ मुख्तार, आम्ही मस्तोइंर्ना चांगले ओळखतो. ते इतके वाईट नाहीत. तू त्यांच्यावर नाहक आरोप करते आहेस. उद्या कोर्टात तुझी केस होईल. जजसमोर शुद्धीवर राहून बोल. मी जे सांगतो तेच बोल. यातच तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं हित आहे. चुकूनसुद्धा सांगू नकोस की तुझ्यावर बलात्कार झालाय.''
मुख्तार माईला कळून चुकलंय की पोलीस आणि मस्तोई यांचे साटेलोटे चालले आहे. ती निर्भयतेने म्हणाली, ``मला काय
सांगायचं आहे ते माहीत आहे आणि ते मी पहिल्यांदाच सांगून टाकलंय. तुझी बकवास मी ऐकणार नाही.''
आता कोर्टात जजच्या समोर जे मुख्तार माईने सांगितले त्याचा मेळ पहिल्या साक्षी-पुराव्या बरोबर बसत नाही. पोलिसांनी या आधी आपल्या मनानेच लिहिले होते. त्यामुळे जजने तिच्या विरोधात निकाल दिला. परिणामी त्या सर्व मस्तोई पुरुषांना सोडून देण्यात आले; ज्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली होती. आता मुख्तार माईच्या कुटुंबाला भीती वाटत होती की गुन्हेगार सुटून आलेत, काहीही करू शकतील.
तोपर्यंत जगभरातल्या वर्तमानपत्रात, टीव्हीवर या प्रकाराची चर्चा झाली होती. पाकिस्तानातसुद्धा टीव्हीवाले, फोटोग्राफर, रेडिओवाले, पेपरवाले या घटनेला महत्त्व देऊ लागले होते. इतकेच नाही तर सरकारनेसुद्धा बदनामीच्या भीतीने मुख्तारचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी एक बाई आली आणि तिने पाच लाखांचा चेक तिला देऊ केला. मुख्तार माईला हे सर्व कळत होते म्हणून तिने तो चेक चुरगळून फेकून दिला. म्हणाली, ``मला हे काही नको, मला शाळा पाहिजे. मी आपल्या गावातल्या मुलींना शिकवू इच्छिते, त्यांच्यासाठी शाळा उघडायची आहे. द्यायचे असेल तर ते द्या.''
ती म्हणाली, ``आम्ही शाळेसाठी तुला मदत करूच. पण सध्या हे घे.'' या आश्वासनानंतर मुख्तार माईने चेक घेतला. पण ही गोष्ट लपून राहिली नाही. चेक आणणाऱ्या स्त्रीला मुशर्रफनेच पाठविलं होतं.
आता एमनेस्टी इंटरनॅशनलनेसुद्धा या बाबतीत लक्ष घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर मानवी हक्कासाठी संघर्ष करणाऱ्यांनीपण हालचाल सुरू केली. परिणाम असा झाला की, न्यायपालिकेने स्थानिक पोलिसांवर टीका केली की ही बाब रजिस्टर करायला इतका विलंब का लागला आणि कोऱ्या कागदावर एका अशिक्षित बाईचा अंगठा कसा घेतला ? पाकिस्तानच्या न्यायमंत्र्यांना हे ब्रिटिश टीव्हीवर सांगावे लागले की मस्तोई जातीच्या लोकांच्या पंचायतीने `तजवीज ए-राय' ला दहशतवाद्यांचा मामला समजून दोषींना कोर्टात खेचले जाईल.
अशा रीतीने मुख्तार माईची केस ही सरकारी केस झाली. त्यानंतर मुख्तार माई आणि तिच्या घरच्या लोकांच्या रक्षणासाठी पोलीस पहारा ठेवण्यात आला. एके दिवशी गव्हर्नरसाहेब लष्करासह पन्नास लोकांचा ताफा घेऊन आले. त्यांनी तिला आश्वासन दिले की दोषींना शिक्षा होईल. अशिक्षित मुख्तारने ओळखले की गव्हर्नरसाहेबांचे येणे म्हणजे नुसते नाटक आहे. ती म्हणते, ``गव्हर्नरांचे आश्वासन पोकळ आहे. ते तर पेपरमध्ये प्रसिद्धी आणि फोटो येण्यासाठी आले होते. मी माझ्या एकटीच्या सामर्थ्यावर लढेन.''
त्याच दरम्यान नात्याने मुख्तारचा मामा अचानक एक दिवस उगवला. घटस्फोटानंतर त्याचे कधी तोंडही तिने पाहिले नव्हते. त्याला अनेक पोरं होती. त्यातला एक विवाहित होता. जेव्हा त्याने पाहिले की गव्हर्नर घरी येऊन गेलाय, मोठ्या रकमेचा चेक पण मिळालाय. म्हणाला, ``तुटलेल्या फांदीला फेकून देता येत नाही. तिला घरातच ठेवायला हवे. जर मुख्तारची इच्छा असेल तर मी तिला दुसरी म्हणून सून करून घ्यायला तयार आहे.''
मुख्तारने ओळखले होते तो कशासाठी आलाय. तिने सरळ नकार दिला. तिला तर तिच्या गावात शाळा उघडायची होती.
आता मुख्तारची ही बाब दहशतवाद्यांच्या विरोधात उभी राहणार होती. त्यासाठी बलात्काराच्या संदर्भात चार पुरुषांच्या साक्षी-पुराव्याची गरज नव्हती. ही केस डेरा गाजी खाँ कोर्टात घेतली गेली. मस्तोई भाऊबंदकीतल्या चौदा जणांना बेड्या घालून कोर्टात उभे केले गेले. त्यातील चार जणांवर बलात्काराचा आरोप होता. त्यांचे नऊ वकील होते. त्यातील एक तरुण वकील ओरडून सांगत होता की या बाईने खोटा आरोप केला आहे. काही झालेच नाही. कोणी तिच्यावर जबरदस्ती केलेली नाही. त्याने यासाठी असे सांगितले की मुख्तार घटस्फोटिता आहे. ती समाजातल्या सर्वात खालच्या थरातील स्त्री आहे. त्याने असेही सांगितले की मस्तोई लोकांनी निकाल देण्यासाठी मुख्तारच्या भावाला शकूर बरोबर सलमाचा आणि मुख्तार ला आपल्या जातीतील कोणत्याही माणसाशी निकाह करण्यास सांगितले होते जे या बाईने ऐकले नाही.
शेवटी ३१ ऑगस्टला जज्जने निकाल दिला - सहा लोकांना मुख्तार बीबीवर बलात्कार करण्याच्या आरोपावरून पन्नास हजार रुपये दंड आणि मृत्युदंड ! बाकी लोकांना सोडून दिले.
मुख्तारला माहीत होते की मुस्तोई गप्प बसणार नाहीत, अपील करतील. ज्या आठ लोकांना सोडून दिले ते तिला जिवंत ठेवणार नाहीत. ती म्हणते, कधी रात्रीच्या काळोखात डोकावून बघत असते. कुत्रा भुंकला तरी भीती वाटते. अचानक एखाद्याचा अस्पष्ट चेहरा दिसतो.
त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे काही लोकांनी असाही आरोप तिच्यावर लावला की ती तर पैसे हडप करणारी बाई आहे. तिने बँकेत खाते उघडलेय. ती घटस्फोटिता आहे. तिने सरळ आपल्या नवऱ्याकडे जावे. एवढेच नव्हे तर ज्याने तिला घटस्फोट दिलाय तो मुख्तार संबंधात बडबड करत फिरतोय. आणि अशीही अफवा पसरवतोय की ही बाई हशीशचा नशा करते.
मुख्तार जगभर चर्चित स्त्री झाली आहे. तिला परदेशातून बोलावणी येतात. ती सुरुवातीला स्पेनला गेली होती. तिथे आंतरराष्ट्नीय महिला संमेलनात भाग घेतला. या संमेलनाचे सभापतीत्व जॉर्डनच्या राणीने केले होते. अजून मुख्तारची भीती गेलेली नाही. वास्तविक पोलीस तिच्या संरक्षणासाठी तैनात आहे.
मुख्तार माईची शाळा उभी राहात होती. त्या शाळेला पाहून ती आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतेय. स्वत: शिकली नाही
तरी गावातील मुलांना शिकविण्याचे स्वप्न आहे. याच काळात `न्यूयार्क टाइम्स'मध्ये निकोलस क्रिस्टालचा मुख्तार माईच्या संदर्भात लेख प्रकाशित झाला. पाकिस्तानात क्रॅनडाची उच्चआयुक्त महिलेचे लक्ष गेले. एके दिवशी मोठा प्रवास करून ती मीरवाला येथे आली. मुख्तारची हिंमत आणि तळमळ पाहून शाळेसाठी बावीस लाखांचा चेक देऊन गेली. त्यानंतर अमेरिकेहून दान आले आणि मुख्तारची इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण दिसून आले. शाळेत दोनशेपेक्षा जास्त मुली आणि जवळपास साठ मुलगे शिकत होते. यात मस्तोई समाजातील मुलीपण होत्या.
मुख्तारची केस हायकोर्टात गेली होती. एक, दोन आणि तीन मार्च २००५ला तिला लाहौर उच्च न्यायालयात सुलतान पीठासमोर हजर व्हायचे होते. तिच्याबरोबर हक्कासाठी लढणाऱ्या अनेक संस्था आणि देश-विदेशातील पत्रकार उपस्थित होते. शेवटी जो निकाल लागला तो ऐकून सर्वजण सुन्न झाले. लाहौर उच्च न्यायालयाने आतंकवादाच्या विरोधात कोर्टाच्या निकालाच्या उलट पाचही आरोपींना सोडून द्यावे असा निकाल दिला. फक्त एकालाच जन्मठेप सुनावली गेली. कोर्टात वादळ उठले. आणि जणू काय मुख्तारवर वीज कोसळली. ती संपादकांसमोर थरथर कापू लागली. तिचा वकील अपील करेल. परंतु त्या दरम्यान तिचे सतीत्व लुटणारे घरी जातील आपल्या फॉर्ममध्ये ! तिची शाळा आणि घरापासून शंभर फूटावर त्यांचे घर होते. ती नेहमी त्यांच्या हिंसक प्रवृत्तीची सावज बनून राहील. तिला न्याय हवाय. तिला वाटले होते की दहशतवाद्यांना फासावर चढवतील, कमीत कमी जन्मठेप तरी मिळेल.
ती म्हणते, ``मी स्वत:साठी नव्हते लढत. त्या एक एक स्त्रीसाठी लढत होते ज्यांना कायदा ठोकरतो. जिच्या स्वत्वाला बलात्काराचा पुरावा देण्यासाठी चार पुरुषांची साक्ष असणे आवश्यक आहे.
मुख्तारच्या बाबतीत बलात्कार सिद्ध होऊ शकला नाही. ती म्हणते, ``माझ्यावर पुन्हा जबरदस्ती केली जात आहे.'' मुख्तारची दारुण व्यथा, मन आक्रंदत आहे. ती कोर्टातच रडू लागली. जज म्हणतो, ``त्याने निर्णय तर दिलाय पण त्याच्या अंमलबजावणीचा आदेश दिलेला नाही. कैद्यांना अजून सोडलेले नाही.''
मुख्तारच्या आजूबाजूला आक्रंदत असलेल्या, अपमानित झालेल्या महिला भयंकर गोंधळ माजवीत आहेत. पाच मार्चला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्तारने सांगितले की, ती तिचा देश सोडून जाणार नाही. ती अपील करील. ती आपल्या घरी, आपल्या गावात राहू इच्छिते. हा माझा देश आहे. येथील जमीन माझी आहे. गरज लागली तर प्रेसिडेंट मुशर्रफला अपील करीन.
वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्हीवर ह्या लज्जास्पद निकालावर चर्चा चालू आहे.
या निकालामुळे देशात प्रदर्शनांची गर्दी आहे. मोठ्या आकाराच्या पोस्टर्सवर लिहिले आहे : हिंमत, मुख्तार माई हम तेरे साथ हैं । मुख्तार जिथे जाते तिथे पोलीस सावलीप्रमाणे तिच्या मागे असतात. मुख्तारला आश्चर्य वाटतंय की पोलीस तिचे रक्षण करतात की तिच्यावर लक्ष ठेवतात. मुख्तार खूपच थकलीय. एवढी मोठी लढाई लढताना तिचा देह पार झिजलाय.
आता मुख्तारचा वकील सल्ला देतोय की तिने सरळ मुशर्रफकडेच न्याय मागावा. पण मुख्तारला वाटतंय की सुप्रीम कोर्टाने पुन्हा तपास करावा. ती १७ मार्चला इतर लोकांबरोबर इस्लामाबादला पोहोचली. तिथे तिने गृहमंत्र्याला सांगितले की, त्याने निर्णय घ्यावा की गुन्हेगार मस्तोई कुठे गायब न होवोत आणि कोणाच्या तरी हाताने तिला मारून न टाकोत. मंत्री तिला आश्वासन देतात की मुख्तारच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. इतकेच नव्हे तर पंतप्रधानमंत्र्यांनीपण तिला आश्वासन दिले आहे की तिला कोणी हात लावू शकणार नाही.
त्याचा परिणाम चांगला झाला. पाचही गुन्हेगार मस्तोइंर्ना पोलिसांनी पकडून नेले आहे.
या दरम्यान मुख्तारला क्रॅनडा आणि अमेरिकेचे बोलावणे आले. पण तिचा पासपोर्ट जप्त केला गेला. कारण बाहेरच्या देशात जाऊन तिने आपल्या देशाची बदनामी करू नये. कोणीतरी चेष्टेने आणि व्यंगात्मक सुरात म्हटले की जर कोणा बाईला लखपती बनायचे असेल आणि व्हीसा घेऊन परदेशात जायचे असेल तर फक्त स्वत:वर बलात्कार होऊ द्यावा....
मला वाटतं हे स्वत: मुशर्रफने म्हटले होते. पण नंतर त्यांनी इन्कार केला. मुख्तारनेसुद्धा ठणठणीत शब्दात बजावले की मी त्या सर्व महिलांसाठी झगडते आहे, ज्या अशा प्रकारच्या अत्याचाराच्या सावज झाल्या आहेत. मी माझे गाव, घर, शाळा सोडून कोठेही जाणार नाही. दुसऱ्या देशात जाऊन माझ्या देशाची बदनामी करण्याचा माझा अजिबात हेतू नाही.... मानवतेच्या रक्षणासाठी आणि हक्काची पायमल्ली होऊ नये म्हणून, पंचायतच्या विरोधात माणुसकीची जपणूक करण्यासाठी आमच्या देशात ही पंचायत मध्ये येत आहे. मला खात्री आहे की माझ्या देशाची इच्छा मी पूर्ण करते आहे.'' ती अशीसुद्धा विचारणा करतेय की माझ्या देशाला माझा सवाल आहे की जर पुरुषाचा गौरव स्त्रीमुळे होतो तर पुरुष तिच्या स्त्रीत्वावर का बलात्कार करतो ? तिच्यावर जबरदस्ती का करतो ?
काही दिवसानंतर आनंदाची बातमी येते की सुप्रीम कोर्टाने मुख्तारच्या केसवर काळजीपूर्वक लक्ष देण्याचे ठरविले आहे. आता मुख्तारला सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अपेक्षा आहे. जी आठ माणसे सोडली होती, त्यांच्याबरोबर पंचायतची मंडळीसुद्धा तुरुंगात आहेत, ज्यांनी मुख्तारवर बलात्कार करण्याचा आदेश दिला होता.
डॉ. अरुणा लोखंडे, ठाणे

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.