Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

संवाद

प्रिय वाचक,
आंतरराष्ट्नीय महिलादिनाच्या निमित्ताने, भारताच्या राजधानीत एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण परिषद योजण्यात आली होती. ८ आणि ९ मार्चला, दिल्लीच्या विग्यान भवनात `शोकेसिंग कटिंग एज सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी बाय वुइमेन' अशा नावाखाली ही परिषद पार पडली. राष्ट्नीय पातळीवरच्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ स्त्रियांना एकत्र आणणाऱ्या या परिषदेत मला सहभागी आणि साक्षीदार होता आलं. माझ्यासाठी ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची घटना होती. त्यासंबंधी, लगोलग तुम्हा सर्वांबरोबर संवाद करण्याची संधी मी घेणार, हे तर स्वाभाविकच आहे.
वृत्तपत्रांसाठी, दृक्श्राव्य माध्यमांसाठी या परिषदेचं महत्त्व किती, यावर त्यांनी यासाठी किती वेळ, किती जागा दिली ते ठरलं असणार. ते काहीही असलं तरी मला आपल्या वाचकांचा अर्थातच विश्वास आहे, की त्यांनाही या प्रकारच्या परिषदेची अपूर्वाई नक्की समजेल. गेली १८/१९ वर्षे `मिळून साऱ्याजणी'ने या प्रकारचे छोटे मोठे उपक्रम नेहमीच बघत, टिपत, आपले मानले आहेत. इतक्या मोठ्या राष्ट्नीय पातळीवरच्या आयोजनाएवढा `साऱ्याजणी' चा जीव मोठा नाही, पण त्याची गरज, त्याचं औचित्य कळण्याएवढी सजगता आपल्या वाचकांकडे निश्चितच आहे.
या परिषदेसंबंधीचा अधिक सविस्तर लेख मी नंतर लिहिणारच आहे, पण त्यापूर्वी त्याबाबतचा ताजा आणि लक्षवेधी तपशील किंवा त्याचे माझ्या मनात उमटलेले पडसाद मला तुमच्याजवळ बोलावेसे वाटत आहेत. ती आता माझी एक सवय आणि गरजच बनून गेली आहे. काही वेगळं, (मग भले ते आनंद देणारं किंवा अस्वस्थ करणारं असो) ऐकलं, वाचलं किंवा बघितलं की मी `संवादा'कडे येतेच!
तंत्रज्ञ शास्त्रज्ञांच्या या परिषदेसाठी पत्रकार म्हणून मला निमंत्रण होतं. एरव्ही तंत्रज्ञशास्त्रज्ञांच्या कार्यक्षेत्राशी माझा, काही बातम्या घडामोडी वाचण्यापलीकडे फारसा संबंध येत नाही. पण पत्रकारितेच्या या व्यवसायाचं मला यासाठीच अप्रूप वाटतं की, कितीतरी नव्या, अनोळखी, अल्पपरिचयाच्या क्षेत्रात किमान डोकावण्याची संधी यामुळे मला मिळते. या परिषदेमधल्या सहभागामुळे जणु काही एका वेगळयाच दालनात मला प्रवेश मिळाला. भारतामधल्या वेगवेगळया राज्यातून विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या सुमारे ३००/३५० स्त्रिया या परिषदेसाठी आल्या होत्या. काही महाविद्यालयातल्या प्राध्यापक स्त्रिया आणि काही विद्यार्थिनीही त्यात सहभागी झाल्या होत्या.
भारताच्या राष्ट्न्पती मा. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि भूशास्त्र या खात्याचे मंत्री कपिल सिब्बल आणि राष्ट्नीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष गिरीजा व्यास हे दोघे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर डॉ. मेहताब बामजी, (`नॅशनल टास्कफोर्स फॉर वुइमेन इन सायन्स' च्या अध्यक्ष) आणि श्री. रामसामी (विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव) यांचीही उपस्थिती होती. डॉ. रेणू स्वरूप यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. परिषदेचं उद्घाटन करताना, ना फीत कापली गेली, ना दीपप्रज्वलन करण्यात आलं. थेट भाषणांनी परिषदेच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात होण्यातलं वेगळेपण, माझ्या मनानं लगेचच टिपलं.
विज्ञान भवनाचं दिमाखदार सभागृह, हजार/दीड हजार लोक बसतील आणि सुखानं व्यासपीठावरचा कार्यक्रम बघू शकतील अशी आसनव्यवस्था, याला साजेसं भव्य व्यासपीठ, त्यावरची मुख्यत: शेकडो पिवळया पांढऱ्या गुलाबफुलांची ग्लॅडिओलाच्या मदतीनं केलेली आकर्षक पुष्परचना, सरकारी बँड पथकानं प्रत्यक्ष वाजवलेलं राष्ट्न्गीत. या साऱ्या राजधानीच्या आणि राष्ट्न्पतींच्या उपस्थितीला साजेशा गोष्टी, मीही प्रथमच बघितल्या. त्यात एक प्रचंड औपचारिकता होती, काहीसा डौलही होता.
यानंतरच्या दिवसभरात आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासून ते समारोपापर्यंतच्या वेळात, स्त्रियांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्त्ववान स्त्रियांनी आपल्या कामातल्या विषयांची मांडणी केली. त्यामध्ये मेंदूची निर्मिती, बदलत्या हवामानाच्या भारतातील जलस्रोतावर होणारा परिणाम, पेशींची आत्महत्या, नॅनोमरीरियलचा उपयोग, एरोडायनॅमिक्स, द मेकिंग ऑफ फ्लॉवरिंग स्टेम, शेती उत्पादनाच्या संदर्भात जीन्स आणि जिनोमिक्सचा विचार. वनस्पतींमधील व्हायरसचं संशोधन आणि त्याचा उपयोग, बायोटेक्नॉलॉजी आणि शेती, हवामानबदलाचा आरोग्यावर आणि मवेरियावर होणारा परिणाम असे कितीतरी संशोधनावर आधारित विषय पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, या तंत्रसाधनाच्या मदतीने मांडले गेले. त्यावर मर्यादित वेळेत चर्चा झाली.
या परिषदेसाठी आलेल्या सर्व सहभागी स्त्रिया स्वखर्चाने किंवा त्यांच्या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने आल्या होत्या. त्यांची दिल्लीतील राहण्याची आणि ने-आणीची व्यवस्था निमंत्रकांनी केली होती.
८ आणि ९ मार्चच्या या परिषदेमध्ये पहिल्या दिवशीचं एक सत्र माझ्यासारख्या या मूळ विषयाच्या पलीकडच्या माणसालाही समजेल आणि रस वाटेल असं होतं. या सत्रामध्ये रोहिणी गोडबोले, विनीता शर्मा, विजयालक्ष्मी रविंद्रनाथ आणि जस्टिस सुजाता मनोहर या सगळयांचीच मांडणी गंभीरपणे लक्ष देण्यासारखी होती. या क्षेत्रात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात यावं आणि भरीव योगदान करावं यासाठी काय उपलब्ध आहे, काय करायला हवं आहे - हा केंद्रबिंदू होता. वक्ते आणि श्रोते यांच्यामध्ये यावर चर्चा चांगली रंगली.
दुसऱ्या दिवशी आणखी एका विषयामुळे या परिषदेमधल्या मांडणीमध्ये एक वेगळेपणा आला. चार वेगवेगळया मोठ्या उद्योगव्यवसायात, जवळपास अत्युच्य जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या स्त्रियांनी काही प्रमाणात व्यक्तिगत जडणघडण आणि कामातील जबाबदारी, ताणतणाव इ. ची अनुभवपूर्ण मांडणी केली.
कोणत्याही परिषदेचा माझा अनुभव साधारण असा असतो की तिथे काही ऐकलेलं/वाचलेलं असतं, त्याहून अधिक प्रत्यक्ष ऐकायला आणि बघायला मिळतं. त्यामुळे कधी माहिती आणि विचार अधिक स्पष्ट होतात किंवा पूर्णपणे नव्याने प्रथमच भेटतात. त्याबरोबरच काही विचार नव्याने सुरू होतात आणि प्रश्न पडतात. या पलीकडे माणसं भेटणं हा तर माझा अतिशय जिव्हाळयाचा विषय. यातही काही नव्या ओळखी, तर काही ओळखींचं नूतनीकरण, असं दोन्ही घडतं. इथे मला जो अनुभव येतो तो विशेषत: शिक्षकांना आणि डॉक्टरांनाही येत असणार. त्यांना त्यांचे विद्यार्थी भेटतात. पेशंट्स भेटतात. मला माझे वाचक किंवा कार्यकर्ते भेटतात. कधीकधी तर पुण्यातलीच पण आजवर प्रत्यक्षात न भेटलेली माणसं अशा दूरच्या किंवा जवळच्या ठिकाणीही भेटतात. इथे मला अशाच पुण्यातल्या, हैदराबादमधल्या, मुंबईतल्या आणि अर्थातच दिल्लीतल्या वाचक भेटल्या. सुमारे सहाशे-सातशे शास्त्रज्ञ तंत्रज्ञांच्या या राष्ट्नीय मेळयामध्ये तशी मी एकटीच होते. मी दिल्लीबाहेरची होते आणि या `सायंटिस्ट कम्युनिटी'च्या ही बाहेरची होते आणि तरी मला `आपले' लोक भेटलेच. माझ्या या छापील शब्दांमधल्या व्यवसायामुळे अशी `माणसं' भेटण्याची संधी मिळते. `साऱ्याजणी' शी असा धागा जोडला गेला की खरंच कसं अगदी सुईमध्ये सहज दोरा ओवून गेल्यासारखं वाटतं! धागे जपण्याची, टाका न चुकता, तुकडा दूर न जाता, गोधडी बनवत राहण्याची जबाबदारीही स्पर्शून जाते. गोधडीची ऊब सतत आठवत राहते.
बोलताना असो की हिंडताना असो असं `साऱ्याजणी' पाशी आलं की मला कसं आपल्या गल्लीत, आपल्या घरापाशी आल्यासारखं वाटतं. `साऱ्याजणी' ला मला कधी विसरता येत नाही आणि विसरावंसं वाटतही नाही, कारण एका अगदी महत्त्वाच्या आणि पोटातल्या विषयाशी त्याची नाळ, त्याची भूमिका अतूटपणे जोडलेली आहे, स्त्रीचं अस्तित्व, तिचं या जगातलं स्थान, तिचा विकास, आत्मसन्मान याविषयी मला मन:पूर्वक आस्था आहे. पण प्रत्यक्षात `स्त्री' नावाच्या माणसाची बहुसंख्येनं घरी, दारी, बाजारी, देशात, परदेशात आणि अगदी शास्त्रज्ञांसारख्या बुद्धिमानांच्या मेळाव्यातही म्हणावी तशी कदर नाही, बूज नाही. दुय्यमपणाची, दर्जाहीनतेची, माणूस म्हणून असणाऱ्या जबाबदारीची तिला असायला हवी तेवढी बोच नाही, सल नाही, असं वाटतं. स्वत:ला स्त्रीवादी म्हणा, म्हणू नका. ज्या कुणी तुम्ही आहात, तुमच्या कष्टानं, बुद्धीनं, कर्तृत्वानं जिथे कुठे पोचला आहात, त्याचं मला अपार कौतुक आहे, अभिमान आहे पण या वाटचालीत तुम्हाला इतरांना काहीच अडथळे आले नाहीत? ते नसते किंवा या पुरुषप्रधान व्यवस्थेत ते तुम्हाला ओलांडता आले असते, तर तुम्ही आणखी मोठ्या झाल्या असतात, `वाढू' शकल्या असतात! ते घडलं नाही याची मला खंत वाटते. तीसुद्धा तुम्हाला मिळू शकणारी कीर्ती/पैसा हे मिळालं नाही यासाठी आहेच पण त्यापेक्षा आणखी एका गोष्टीसाठी अधिक आहे. `स्त्री' असलो तरी प्रथम तुम्ही आम्ही साऱ्याजणी माणूसच आहोत. या जगाच्या प्रगतीत योगदान करण्यासाठी या पुरुषप्रधान व्यवस्थेत, `स्त्री' नावाच्या (पिचत काही अपवाद वगळता) साऱ्या स्त्रियांची संधी पुरतेपणी त्यांच्या हातात येत नाही. त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत नुकसान होतंच होतं, पण त्याहूनही मोठी हानी ज्या क्षेत्रात त्या काम करतात त्याची आणि अर्थातच देशाची आणि जगाचीही होते! त्यांचं हे मोठं होणं, वाढणं केवळ व्यक्तिगत पातळीवरच महत्त्वाचं नाही. त्या खऱ्या अर्थानं माणूस झाल्या तर माणूस म्हणून विकासाच्या संधीला मुकलेल्या साऱ्या इतरांची त्यांना जागती बोच जाणवत राहील/राहावी. हा अडवलेला विकासाचा प्रवाह कधी नकळत तर कधी जाणून बुजून सतत अडवला जातो आहे. हे सारं जेवढं खेड्याच्या, गावाच्या पातळीवरच्या स्थानिक स्वराज्यसंस्थेत निवडून गेलेल्यांपैकी काहींना उमगायला लागलं आहे, तेवढंही कित्येक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञच नव्हे तर इतर क्षेत्रातल्या बुद्धिमान कर्तृत्ववान स्त्रियांना कळत नाही का, असं मी फार प्रामाणिकपणे पण आस्थेपोटी म्हणते आहे! हे आपल्यालाच कळलं नाही, वळलं नाही, तर इतरांकडून आपण काय अपेक्षा करणार?
हे या साऱ्यांनाही लवकरात लवकर कळेल, तर फार फार बरं होईल, पण माझी खात्री आहे की हे `साऱ्याजणी' च्या वाचकांना नक्की समजेल. त्यापैकी कितीक जणींना हे कळायला उशीरही झाला असेल. पण म्हणूनच त्यांना त्याचं महत्त्व जरा अधिकच समजलं असेल. दूरवर कुठेतरी तांबडं फुटतंय या विश्वासापोटीच तर माझ्यातला आशावाद चिरतरुण राहिला आहे.
म. फुले यांनी `स्त्री'च्या माणूसपणाला जाग आणली त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी घटनेतून स्त्री-पुरुष समतेचं आश्वासन दिलं. १४ एप्रिल हा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे. त्या निमित्तानं हे आश्वासन सार्थ करू या !

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.