Skip to main content

प्रयत्नांची मात परिस्थितीवर

प्रयत्नांची मात परिस्थितीवर
- गौरी गाडगीळ
गौरी... सामान्यपणाच्या सीमेच्या आतबाहेरची मुलगी.. विशेष शाळेतल्या शिक्षणाबरोबरच पोहणं, नृत्य शिकणारी... इथे तिथे नाही... चक्क ऑलिंपिकला जाऊन पदक घेऊन आली...
गेल्यापासून मी तिला शोधत होते, ``कार्यक्रम वेळेवर सुरू होईल; त्या आधी १५ मिनिटे आम्ही तिथे पोहोचू...'' असं तिच्या आईनं मला सांगून ठेवलं होतं. पण अजून ती आलेली नव्हती. ती स्वत: नाच करणार होती, म्हणजे चालताना तिला कुणाचा आधार लागणार नाही, ही मनाशी खूणगाठ! शिवाय पाच वर्षे भरतनाट्यम शिकते आहे. पोहून, ऑलिंपिकला जाऊन, एक मेडल मिळवून आली; आत्मविश्वास तर नक्कीच असणार चेहऱ्यावर...! पण केवढी असेल? आणि केवढी दिसत असेल? अनेक प्रश्न....
... आणि शेवटी, जरा उशिराच ती नृत्याच्या खास वेषातच आली... मग तिला ओळखायला वेळ लागला नाही. जवळ गेले...तिच्या आईशी बोलले, `भेटू' म्हटलं. तिच्या गालाला हळूच हात लावावा अशी मनापासून इच्छा झाली, पण अनोळखी लोकांनी असं केलेलं मुलांना आवडत नाही. आणि त्यातही ही जरा जास्तच लहरी असली तर?
ही गौरी गाडगीळ! ऑक्टोबर २००७ च्या शांघायच्या विशेष ऑलिंपिकमध्ये मेंटली चॅलेन्ज्ड नवतरुण मुलांच्या गटात तिचं पोहोण्यातलं सुवर्णपदक अगदी थोडक्यात गेलं; काही सेकंदांच्या फरकाने! पण ती दुसरी आली. पदक मिळालंच..... तिला खूप आनंद झाला... सगळयांनाच झाला. हा आनंद अगदी वेगळा होता. शब्दात न मांडता येण्याजोगा... इतर कुणालाही होईल त्यापेक्षा कितीतरी पटीनी अधिक! त्याचं कारणही तसंच होतं.
१६ वर्षांपूर्वी जळगावला स्नेहा गाडगीळ यांनी एका अपत्याला जन्म दिला... अपुऱ्या वाढीची, अपुऱ्या वजनाची, मेंदूच्या वरचा, मागचा भाग पुरता भरूनही न आलेला, हाडांनाही घट्टपणा नाही... कुठे हात लावता येणार नाही इतकी नाजूक आणि शिवाय डॉक्टरांना पहिल्याच दिवशी समजलेलं सत्य, ही मुलगी नॉर्मल नाही!
वडील पाहायला गेले, तेव्हा ते त्यांना समजलं, आईला मात्र सात दिवसांनी कळलं, तरी तब्बल तीन महिने गाढ निराशेत बुडून गेलेले. पण यातून लवकरच बाहेर पडायला हवं होतं. पुढे काय हा सगळयात मोठा प्रश्न होता.
स्नेहाताइंर्चं हे पहिलं अपत्य म्हणजेच गौरी, आणि तिचा या जगातला प्रवास सुरू झाला तो हा असा! इथून ऑलिंपिकला
जाईपर्यंतचा प्रवास म्हणजे तर फारच मोठा... त्यातले टप्पे, खाचखळगे माहीत करून घ्यायचे, म्हणून तर त्यांना भेटायचं होतं. थोड्या खटपटीनेच फोन नंबर मिळवला आणि फोन केला... तो भ्रमणध्वनी नेमका तिच्या वडिलांचा... त्यांनी तत्परतेने स्नेहाताइंर्ना फोन दिला आणि स्नेहाताइंर्नी व्यवस्थित पत्ता सांगितला.
नंतर वेळ नक्की करण्यासाठी केलेला फोन गौरीनेच घेतला. नक्की कोण...? आवाजावरून माझ्या लक्षात येईना... पण स्नेहाताई पाहिजेत म्हटल्यावर विचारणा झाली... ``म्हणजे माझी आई?... ती घरात नाहीये, केव्हा येईल माहीत नाही... तुम्ही कोण? तासा-दोन तासांनी फोन करा''... मग मी म्हटलं, ``परवा तुझा नाच बघितला, खूप छान झाला''... तेव्हा लगेच, ``थँक्यू स्वाती कर्वे!'' असं म्हणून तिनं नाव लक्षात ठेवल्याची खात्री पटवली.
घर शोधत गेले. दार उघडायला गौरीच होती. खरेच तिच्या चेहऱ्यावर उत्तम आत्मविश्वास, केसांची छान घट्ट वेणी. काल परवाच्या नृत्याच्या फुलणाऱ्या पोषाखात जरा बुटकीच वाटली होती... तेवढी नाहीये हे लगेच लक्षात आलं.
घर तसं मोठं असावं. पलीकडच्याच खोलीत असलेल्या थकलेल्या आजींची बाहेर येण्यासाठी धडपड चाललेली दिसत होती. खरं तर आजवर अनेक पत्रकार येऊन गेले असतील, पण आता काही कालावधीनंतर आज या नातीचं कौतुक त्यांनाही पुन्हा ऐकायला मिळणार होतं. आजी-आजोबा बाहेर येऊन बसले. गौरीनं मला पाणी आणून दिलं. तिची धाकटी बहीण पल्लवी हिच्याशीही ओळख झाली. ती थोडी गडबडीत दिसत होती. तिनं स्वत: दिवाळीच्या सुट्टीत काढलेलं छोट्या मुलांसाठीचं नियतकालिक तिला लवकर पूर्ण करायचं होतं. त्यावर संपादक म्हणून गौरीचं नाव होतं. तिची मैत्रीण जेव्हा ते काढते, तेव्हा त्या दोघा बहिणींची नावं असतात, मग आता इथे या दोघींची!
टीव्हीवर भारत-पाकिस्तान क्रिकेटची मॅच लागली होती. गौरीला प्रचंड रस... जिंकणं, हारणं, किती धावा, किती षटकं... त्याचे टीव्हीवर येणारे आकडे पाहणं, ओळखणं... हे सगळं घरच्यांच्या मदतीनं चालू असतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं त्याचा आनंद घेणं. पण माझ्याशी बोलायचं म्हणून कॉमेंट्नीचा आवाज बंद करून ती टीव्हीसमोर बसली.
या ऑलिंपिकच्या संपूर्ण निवडप्रक्रियेविषयी आधी माहीत करून घेऊया म्हटलं...
``ऑलिंपिकच्या मुख्य स्पर्धा जिथे असतात तिथेच एक वर्ष आधी या स्पर्धा घेतल्या जातात. चार वर्षांपूर्वी याची तयारी सुरू झाली... तालुका पातळी, मग राज्य पातळी, राष्ट्नीय पातळी आणि मग आंतरराष्ट्नीय... अशी चार वर्षे या सगळया निवडीत जातातच. गौरीची पोहोण्याची सुरुवात २००२ मध्ये झाली. तिच्या हालचाली, विचार यात एकूणच समन्वय साधेल, सुसूत्रता येईल... बोलणं-वागणं, विचार-कृती यामध्ये एकजिनसीपणा येईल यासाठी नृत्य आणि पोहोणं या क्रिया तिला खूप उपयोगी पडतील, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.'' स्नेहाताई सांगू लागल्या. खरं तर कुठल्याही नॉर्मल म्हटल्या जाणाऱ्या माणसाच्या आचार-विचारात किती एकवाक्यता असते? असा प्रश्न मला लगेच पडला. अर्थात ते झाकून टाकता यावं, इतकी हुषारीही त्यांच्याजवळ असते. पण गौरी सामान्य नव्हती... त्याच्या अलीकडची कि पलीकडची हे सिद्ध करायला मात्र तिनं थोडा वेळ घेतला इतकंच.
लहानपणापासून गौरीकडे अर्थातच खूप लक्ष द्यायला लागलं... पहिल्या एक दीड महिन्यातच तिची काळजी डॉक्टरांनी घरच्यांवर सोपवली. सुरुवातीच्या काळात तळहातावरच्या फोडासारखं जपणं, पहिली दोन वर्ष तर तिचं औषधपाणी, दोन्ही वेळचा मसाज... नंतर एक वेळचा मसाज तो जवळ जवळ पाच वर्ष... तरीही हा काही रोग नाही, यावर १००% बरं होण्याजोगं औषध कुठल्याही उपचारपद्धतीमध्ये नाही; याची जाणीव डॉक्टरांनी करून दिली आणि तिच्या प्रगतीसाठी काय करता येईल याचा विचार सतत सुरू झाला. त्याचबरोबर बी.एस्सी., एलएल. बी. असलेल्या स्नेहाताइंर्ना डॉक्टरांनी हेही सांगितलं, की आता तुम्ही नोकरी, करियर वगैरे विसरा. तुमच्या मुलीला तुमची सतत गरज लागणार, आणि तरच ती पुढे स्वत:ची स्वत: थोडी उभी राहू शकेल. नाहीतर आयुष्यभर तुम्हीच तिचं करत राहायचं, याची तयारी ठेवायची. या सगळयासाठी अर्थातच मनाची तयारी करावी लागली. पहिल्या वर्षातली तिची वाढ बऱ्यापैकी नॉर्मल होती. वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर इतर मुलांबरोबर ती शाळेत जाऊ लागली. तोवर जग अगदी मायलेकी दोघींचंच. काळ सोळा वर्षांपूर्वीचा.. अशा मुलांचा स्वीकार करणं तेव्हा आणखीनच अवघड... घरातले, नात्यातले बऱ्याच काळाने जवळ आले, काही आले, काही नाही आले.
१९९६ पर्यंत अप्पर के. जी. पर्यंत म्हटलं तरी दोन वर्षे तिनं स्पेशल आणि नॉर्मल अशा दोन्ही शाळा केल्या. नंतर मात्र दोन वर्षे गॅप पडली... तोवर जळगाव आणि सांगली असा त्यांचा प्रवास झाला होता.
तिच्यासाठीच पुण्यात यायचं या कुटुंबाने ठरवलं... आता शाळा शोधण्यापासून तयारी होती... डॉ. आनंद पंडीत यांचं नाव माहीत होतं. पण त्यांची शाळा स्लो लर्नर्सची, ती नॉर्मल
मुलांसाठीच... ज्यांचा फक्त आय. क्यू. कमी आहे अशांसाठी... मानसिक अपंगत्व असणाऱ्यांना तिथे जाता येणार नव्हतं. मग गौरीचं शिक्षण एक वर्ष नॉर्मल स्कूलमधे झालं... त्या शिक्षिकांना थोडी अधिक मेहनत घ्यावी लागली. गौरी सतत त्या वर्गशिक्षिकेबरोबर असायची. पण दुसऱ्या वर्षी मात्र त्रासच त्रास.. त्यावर्षीच्या वर्गशिक्षिकेला जास्तीचा वेळ नव्हता... त्यांचं पाठबळ नाही किंवा जरा दुर्लक्षच, म्हणून मुलंही त्रास द्यायची... खोड्या कर, चिमटे काढ, चिडवा-चिडवी कर... रिक्षामध्ये त्रास दे... वर्ष खूप वाईट गेलं. त्या शिक्षिकेनं निदान वर्ग बदलून घेण्याचं सुचवलं असतं, तरी सोपं झालं असतं. पण नाईलाजाने शाळा बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला... आणि नॉर्मल स्कूलमध्ये शिकू शकणारी ही मुलगी स्पेशल स्कूलमध्ये जाऊ लागली.
शाळेतलं शिक्षण चालू झालं. सेवासदनचं दिलासा केंद्र... शाळेत व्यायाम, खेळ, सुरुवातीला आकडे ओळख... यामध्ये इंग्रजी (म्हणजे इंडो अॅरेबिक) आणि मराठी असे दोन्ही आकडे होते, म्हणून जरा घोटाळा व्हायचा. पण असं सगळं शिक्षण सुरू झालं; भाषा, गणित, परिसर. चालू घडामोडींवर भर देत असताना मुलांना कशात गती आहे हे शोधणंही चालू असायचं. पण शाळेव्यतिरिक्त गौरीला कुठेतरी गुंतवणं आवश्यक होतं. ती कशात रमेल याचा शोध सतत चालू होता. अशा वेळी घरातल्यांना आणि त्यातही विशेषत: आईला मुलांमध्ये अडकून राहण्याला पर्याय नसतो. ही मुलं आईची असंही गृहीत धरलं जातं. त्यात वडिलांनी म्हणजेच शेखर गाडगीळ यांनी पुण्यात येऊन शून्यातून उभा केलेला उद्योग. एकीकडे नोकरी, त्यात पाच वर्षांनंतर पल्लवीचा जन्म झाला... तिला आणि त्याहीपेक्षा तिचं मन सांभाळताना तारेवरची कसरत सुरू झाली. पण या कुटुंबाचे काही नातेवाइकांशी खूप चांगले संबंध राहिले. `दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजीकडे राहायला जातो' असं सांगताना गौरी खुषीत येते. तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद लपत नाही... एकूणच ती आनंदीच दिसते. पण हे आता... आधीचे दिवस इतके सोपे नव्हते.
या मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. लवकर इन्फेक्शन होतं. त्यातही गौरीला सतत सर्दी... रात्र रात्र मायलेकी बसून काढायच्या... महिन्यातले १५ दिवस... असेच १२ महिने... वेळ घालवायला खास साधन नसे, म्हणून टीव्ही बघायचा... तो रात्री १२-१२ वाजेपर्यंत! या मुलांना झोप भरपूर लागते... अगदी १४ तास सुद्धा... पण या सगळयातून स्नेहाताइंर्नी स्वत:साठी वेळ काढायचा त्यातही प्रयत्न केला; गौरी शाळेत गेल्यावर त्या ड्न्ेस डिझायनिंग शिकत होत्या. पुण्यात सुरुवातीला गौरीच्या वडिलांचं ऑफिस घरातच होतं. तेही काम असे. लोकांपासून बाजूला, एकटं पडणं अगदी सहज शक्य होतं, असं मला वाटलं. पण त्या म्हणतात, ``गौरी एकटी कधीच राहिली नाही. आम्ही राहू तिथे एक तर शेजारची १५ मुलं आमच्या घरात किंवा सगळी खाली एकत्र खेळत... तशी तिची काळजी वाटली नाही... मुलंही तिच्याबरोबर रमली.'' आताही खेळायला जाऊन तिच्या इतर मुलांशी ओळखी वाढल्या. मूक-बधीर मुलांशी ती संवाद साधू लागली. त्यांच्या खेळाच्या वेळी किंवा शाळेच्या निमित्ताने एकत्र जमली तर मुलं आवर्जून तिला भेटतात.
गौरीच्या शिक्षणात, हालचालीत सुसूत्रता यावी, एकाग्रता यावी म्हणून आधी पोहोण्याची चौकशी केली... पण एप्रिल-मे महिन्याच्या गर्दीत तिच्याकडे लक्ष देणंही शक्य नव्हतं. म्हणून त्या आधी अचानक सुरू झालं नृत्य... महर्षीनगरमध्ये कल्याणी कृपालचे भरतनाट्यम्चे क्लासेस आहेत. नात्यातून तिची ओळख झाली... नणंदेने स्नेहाताइंर्ना सुचवलं. तरी नात्याचं दडपण येऊ नये, आणि जमलं तर करून बघावं, असा दृष्टिकोन ठेवून स्नेहाताइंर्नी तिला क्लासला घातलं. सगळया मुलींबरोबर आठवड्यातले पाच दिवस ती नृत्य शिकत होती... अगदी एकाच वर्षात २००३ मध्ये पुणे फेस्टिवलमध्ये `उगवते तारे' म्हणून तिचं एक नृत्यही झालं. पोचवणं, आणणं, वेळा सांभाळणं - स्नेहाताइंर्चं काम वाढत गेलं.
एवढ्या वर्षांत तिने छान प्रगती केली... `नाच रे मोरा'
हा पहिला नाच. मग `देवा तुझे किती सुंदर आकाश' - त्यात थोडं संगीत, `भोलानाथ'मध्ये संगीताचा भाग जास्त, `सत्यम् शिवम् सुंदरम्' हे पूर्ण भरतनाट्यम्वर आधारित, `काहे छेडोना...' हे भरत आणि कथकचं मिश्रण, तर आता `पायोजी मैने हे भजन...' कल्याणीनं खूप छान शिकवलं... अगदी गौरीच्या कलाने... ती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी, म्हणूनच तिला हे शक्य झालं असेल, असं स्नेहाताई म्हणतात.
त्याचवर्षी जूनच्या सुमाराला पोहोणं सुरू झालं. जोशीसर तिच्यावर मेहनत घेऊ लागले. ``गौरी पोहायला जायला तयार झाली... तिला शिकवायला शिक्षकही मिळाले. ४-५ दिवसांनी म्हणाले, ``आम्हांला काय म्हणायचंय ते एकमेकांना छान समजतंय, आता तुम्ही फी भरा, शिकेल ती.'' एरवी अशी मुलं पाण्याला खूप घाबरतात. दुसरी भीती असते ती आई-वडिलांना... जसं लहानपणी सगळं हाडपेर जागच्या जागी मजबूत नाही म्हणून ही मुलं पडू नयेत याची अवाजवी काळजी घेतली जाते, तसंच याही बाबतीत होऊ शकतं... उगीच पाण्यात कशाला पाठवा... काय व्हायचं ते जमिनीवर, आपल्या डोळयांदेखत होऊ दे, ही भावना असते. ती स्वत:लाही खूप जपतात. त्या अर्थाने ती धडपडी नसतात. त्यात तिची सर्दी १२ महिने... नात्यातूनही खूप विरोध झाला. पण गौरीची तयारी होती... आम्ही सुरुवात केली. तिची रोगप्रतिकार शक्ती वाढायचीच अधिक शक्यता होती.
२००२ मध्ये सुरुवात झाली. गौरी छान पोहू लागली... तिच्या शाळेची घाटगे फार्म्सवर सहल गेली... शाळेतून सांगितलं गेलं, ज्या मुलांना पोहता येत असेल त्यांनी पोहोण्याचा पोशाख जवळ ठेवा. गौरी सवयीनं अगदी उत्तम पोहोली... शाळेत कुणालाच हे ठाऊक नव्हतं... शिक्षक म्हणाले, ``अहो, या मुलांसाठी स्पर्धा असतात. तुम्ही बोलला नाहीत कधी, ही तर उत्तम पोहोते...''
`स्विमेड' नावाच्या संस्थेतर्फे राष्ट्नीय पातळीवरच्या स्पर्धाही घेतल्या जातात. आधी राज्य पातळीवर होतात. तसा याला जरा उशीरच झाला होता, पण शिक्षकांनी धडपड केली. लगेच आैंधच्या अलीकडे बालकल्याणच्या तलावावर कुणाला भेटायचं ते ठरलं, चाचणी झाली.. गौरीची प्रगती उत्तमच होती. ती एका वर्षात एकच स्ट्नेक शिकली होती. तांबेसरांनी नाव पुढे पाठवलं, दिल्लीला तिला पहिलं सुवर्णपदक मिळालं. मग बक्षिसं मिळतच राहिली.
``मानसिक अपंगत्व थोडं जरी असलं, तरी ही मुलं सामान्य मुलांच्या बरोबरीनं जाऊ शकत नाहीत; याला अनेक कारणं असतात. एरवी एखादा अवयव नसलेला अपंगसुद्धा एखाद्या खेळात सामान्य मुलांची बरोबरी करू शकतो. कारण बाकी सर्व जागच्याजागी असतं... डोकंसुद्धा शाबूत असतं. पण या मुलांची मुळात समज कमी.. स्पर्धा म्हणजे काय हे समजत नाही... आपण कशासाठी, काय करायला हवंय याची जाणीव नसते. लहरीपणा जरा जास्तच असतो. सगळी तयारी करून ऐनवेळी स्पर्धेत उतरतील असं सुद्धा नाही. काही नकोच... अशी सुद्धा भावना असते. यांना खेळण्यात थोडी सूटही द्यावी लागते, किंवा त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागते. आम्ही पाहिलेल्या स्पर्धेचीच गंमत सांगते. हॉकीचा खेळ होता. ज्यांच्याविरुद्ध गोल करायचा होता, त्यांचा गोलकीपर ऐनवेळी टाईमप्लीज घेऊन चक्क `सू सू' साठी गेलेला, आणि पलीकडची मुलं गोलकीपर जागेवर नाही म्हणून गोल करण्यासाठी थांबून राहिली... हे यांच्याच बाबतीत घडू शकतं... एकमेकांचं अतोनात प्रेम असतं.... खूप अॅटॅचमेंट असते... ती असावी की असू नये हे समजत तर नाहीच... मैत्रिणीला घेऊन तिच्याबरोबरच गोल करणार, म्हणून मुली मागून धावत येणाऱ्या मैत्रिणीसाठी थांबून राहतात. या सगळया शक्यता खेळात गृहीत धराव्या लागतात. तर असा यांचा खेळ आणि अशा स्पर्धा.'' स्नेहाताइंर्नी या स्पर्धेचं स्वरूप समजावून सांगितलं.
तरीही ती सोपी मात्र नव्हती. ब्रेस्ट स्ट्नेक, बॅक स्ट्नेक, बटरफ्लाय आणि फ्री स्टाइल असे सगळे प्रकार त्यात होते. `बटरफ्लाय'ला सगळया अवयवांचा समन्वय जरा जास्त लागतो...ते सर्वात अवघड. शिवाय त्यानं खांदे अधिक रुंद होतात, सामान्य मुलीही इकडे कमीच वळतात.
``अशा कारणांनी बाहेरगावी जाण्याची ती पहिलीच वेळ.. विशी-पंचविशीतल्या `हिच्यासारख्या' मुली तिथल्या शिक्षकांबरोबर एकट्या आल्या होत्या. मुलींबरोबर एक स्त्री शिक्षिका असते. त्यांच्याबरोबर अपंग मुलीही स्पर्धेसाठी आल्या होत्या. बरोबर आलेली स्वयंसेवक म्हणा, किंवा शिकवणारी, अटेंडन्ट मुलं सगळी बावीस-पंचविशीतलीच... आठ दिवसांसाठी आई-वडिलांनी कसं पाठवलं असेल या मुलींना, अशी मनातून खूप काळजी वाटली. पण त्या निमित्ताने तिथलं वातावरण लक्षात आलं. दूर कुठे राहून जा-ये करावी लागू नये म्हणून पोहोण्याचा तलाव आणि राहण्याची इमारत अगदी जवळ होती. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला अशी व्यवस्था तर मालाडला असताना राहायची सोय गोरेगावला, पण यायला जायला त्यांची बस... इथे सगळीकडेच मी तिच्याबरोबर गेले. एकटीच मुलगी, तिच्यासाठी एक शिक्षक अडून राहणार. शिवाय माझी अजून मानसिक तयारी नव्हतीच.'' स्नेहाताई सांगतात.
राज्य पातळीवरच्या स्पर्धा पुण्याला झाल्या आणि
त्यानंतरच्या मुंबईला... राष्ट्नीय पातळीची निवड तिथे होती. पुण्यातून गौरीची एकटीचीच निवड झाली होती. ऑगस्ट २००६ मध्ये गौरीच्या निवडीचं पत्र आलं.
यानंतर त्यांचे तीन क्रॅम्प्स होते. फेब्रुवारीमध्ये गोवा, जून महिन्यात बंगलोर आणि सप्टेंबरमध्ये दिल्ली... असे. सर्वांत पहिल्यामध्ये वागणूक बघितली गेली. नाहीतर या मुलांना सांभाळणं कठीण होऊन बसतं. आणि वीसमधली ८ मुलं तिथेच गळली. दिल्लीपाठोपाठ थेट शांघायला...'' आपल्याला जाता येईल की नाही ही आम्हांला भीती होती.... आम्ही गेलो, पण यावेळी मी तिच्याबरोबर नव्हते. काळजी होतीच... शिवाय तिचे लांब केस, रोज वेणी घालण्याचं काम... पण सगळं व्यवस्थित झालं... ती आम्हांला सोडून राहिली.''
२७-२८ तारखेपासून तिथे जाऊन तिथल्या हवेची, पाण्याची त्यांना सवय करायची होती. १ ऑक्टोबरला तिचे आई-वडीलही पोचले. पण तीन तारखेपर्यंत त्यांची भेट मात्र झाली नाही... तिथला भरगच्च दिनक्रम, मग उद्घाटन सोहळा, त्यात त्यांची सुरक्षाव्यवस्था...यामुळे तिला भेटताच आलं नाही. ``माझं गोल्ड अगदी थोडक्यात गेलं, पण पुढच्या वेळी मी नक्की प्रयत्न करणार.'' क्रिकेट मॅचमधून आमच्याकडे वळून गौरी अचानक उद्गारली! तिचे कान आईच्या बोलण्याकडेच होते तर!
गौरीची आणि तिच्यामुळे तिच्या आईची ही सगळी वर्षं खूप गडबडीत आणि धावपळीत गेली... पल्लवीला तर खूपच सहकार्य करावं लागलं... परिस्थितीची जाण तिला लवकर आली.
कित्येकदा... पल्लवीला आपली तयारी आपणच करावी लागे. स्वत:चं खाणं पिणं, आवरणं, पहाटेच आईने केलेला डबा, आपला अभ्यास... ``केलास का ? ``इतकं विचारायलाच तेवढी आईला फुरसत मिळायची. या पोहोण्यामुळे गौरीचे नृत्याचे क्लास मात्र ५-६ महिने बुडलेच. सातत्य हे या मुलांच्या बाबतीत तेवढच महत्त्वाचं असतं.
गौरीच्या आणखीही काही खास गोष्टी आहेत, आता ती गाणं शिकायला लागली आहे. नुकतीच सुरुवात झाली. स्नेहाताइंर्च्या मैत्रिणीनं म्हटलं, ``अगं, तिला तालाचं अंग आहे... गाण्यानं आवाज मोकळा होईल. गम्मत म्हणजे गौरीला या सगळयात रस आहे. तिला चित्र काढायला आवडतं... कॉम्प्युटरवर गेम्स खेळायला आवडत नाही, पण चित्र काढायला - रंगवायला बसते, माऊस वापरता येतो. आपल्याजवळ जे आहे, त्याचा माणसाला अभिमान असतोच. गौरीला तिच्या गोऱ्या रंगाचा आहे. काळं होऊ नये म्हणून ती चुकूनही चहा पीत नाही... अंगाला रंग, चिखल इतकंच काय पण उटणं लावायलासुद्धा तिला मुळीच आवडत नाही. एका डॉक्टरांनी तिला नुसत्या दुधावर तीन महिने राहायला सांगितलं. तिचा निग्रह मोठा आहे. तिनं ते ऐकलं आणि कसोशीने पाळलं, शरीराला सवय होण्यासाठी एक वेळ जेवणं, मग तेही सोडणं, पुन्हा तसंच सुरू करणं... असे सहा महिने त्यात गेले. पोहायच्या वेळी असंच, सरांनी सांगितलं, एकदा गार एकदा गरम पाणी असं कधीच करायचं नाही... आता नेहमी गार पाण्याने अंघोळ... तिनं तेही ऐकलं, तिची सर्दी कायमची बरी झाली. तिची आई म्हणते, गौरी नशीबवान आहे, तिला नेहमीच चांगली माणसं भेटली. पण गौरीचे प्रयत्न, निग्रह आणि आईची साथ हे काय कमी आहे? ज्या नेटाने गौरीने या गोष्टी केल्या, तो सामान्य माणसालाही लाजवील. आयुर्वेदिक औषधं, हे दुधावर राहाणं, पोहोणं, नाचणं... यामुळे तिचा अभ्यासही सुधारत गेला, दिसण्यात खूप चपळपणा, नेटकेपणा, आत्मविश्वास आला. तिच्या डोक्याचा आकार वाढला. मेंदूच्या विकासाचं हे लक्षण असेल? चेहऱ्यावर एक तेज आलं.... हे झाले दिसण्यातले बदल. अंतर्गत काही झालेच असतील. अभ्यासात अधिक अचूकपणा, समज वाढणं, गोंधळ कमी होणं... हालचालीत सुसूत्रता असे फरक पडत गेले. सगळयाचा फायदा खूपच झाला. पण दुसरीकडे गौरीचं मुलांशी बोलणं, सगळयांच्यात खेळणं हेही वेळ मिळेल तसं चालू राहिलं, जवळून फुलं, हार आणून देणं, घरात एक मदत म्हणून फोनवर बोलणं, यानं आजूबाजूच्या लोकांशीही तिची ओळख राहिली. गल्लीत किंवा कोपऱ्यापर्यंत तिला एकटं पाठवण्याची भीती राहिली नाही. गौरीनं पुण्याची, भारताचीही मान उंचावली आहे.... हे त्यातल्या किती जणांना माहीत असतं? आपल्या गोऱ्या रंगापलीकडे आणखी महत्त्वाचं आपल्याकडे बरंच काही आहे, हे आता हळूहळू तिच्या लक्षात येईल.
गौरीच्या मनात मात्र आता एकच विचार असतो, माझं आताचं सुवर्णपदक थोडक्यात गेलं, पण पुढच्यावेळी मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार.... ती प्रयत्न करेल आणि तिला ते नक्की मिळेल... इतका निग्रह, इतकं सातत्य एरवी दुसऱ्या कुणात सापडणार आहे? हं, पण आणखी एक सांगायचं राहिलं, गौरी आता स्केटिंगही शिकते आहे.... अॅथेन्सच्या या खास ऑलिंपिकमध्ये पुण्याला आता नक्की कुठली बक्षिसं मिळणार?
- स्वाती कर्वे, पुणे

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.