मी आणि आई
वेगळया दृष्टीच्या... प्रयोगशील पालक-शिक्षिका असणाऱ्या... मुलांनी गुंतून जावं अशा व्यक्तिमत्त्वाच्या... मुलांच्या विविध बुद्धिमत्ता, संवेदनशीलतेनं, कल्पकतेनं विकसित करणाऱ्या हिरव्या हाताच्या, निसर्गस्नेही जीवनशैली अंगिकारणाऱ्या... महात्माजींच्या चळवळींचे संस्कार असणाऱ्या... योग्या-योग्यतेच्या निवडीची क्षमता मुलीत रुजवणाऱ्या आपल्या `मैत्रीण' आईविषयी तटस्थ भावनिकतेनं लिहिलेला हा लेख...
``ताई कधी वारली गं? काय झालं होतं तिला?'' मी गाडी धूत असताना अचानक एक प्रश्न माझ्या कानावर पडला. ममी जाऊन आता सात वर्षांनंतर कोण विचारतंय म्हणून मागे वळून पाहिलं तर वाडीत राहणारा सूरजमल. माझ्याच वयाचा, मारवाडी, मतिमंद असलेला, प्राथमिक शाळेतला माझा वर्गमित्र. मतिमंद असलेल्या आपल्या दोन्ही मुलांना कोणत्याच शाळेत प्रवेश मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या सूरजमलच्या वडिलांनी ममीला विनंती केली, आणि ममीने त्या दोन्ही मुलांना आपल्या शाळेत इतर नॉर्मल मुलांबरोबर शिकविण्याचे आव्हान स्वीकारले, आणि यशस्वीही केले. आपल्या बाइंर्बद्दल विचारणारा सूरजमल आज स्वत:चा धंदा, व संसार नीट पार पाडत आहे.
सूरजमलची आणि माझीही ताई, म्हणजे आई-स्नेहलता राणे. आम्हा दोघींचा सहवास एकून जवळपास पंचेचाळीस वर्षांचा. सात वर्षांपूर्वी ती गेली तेव्हा माझा भाऊ उल्हास म्हणाला; ``ममी गेली नि या वयातही मला पोरकं झाल्यासारखं वाटलं!''. तो अगदी माझ्या मनातलंच बोलला. पंचेचाळीस वर्षांच्या या सहजीवनात आमच्या नात्याची किती बदलती रूपं होती ! माझ्या जडण-घडणीतही तिचे असणे कितीकवेळा जाणवते !
मन मागे जातं, लहानपणचे दिवस आठवतात. आम्ही भोईवाड्यात राहत होतो. त्यावेळी वस्ती पूर्णपणे गिरणी कामगारांची आणि मूळ आग्री व िख्र्चाश्न समाजाची. साधी, कष्ट करून जगणारी माणसं. पन्नास वर्षांपूर्वी तर शिक्षणाचं वारंही नव्हतं. अशा काळात ममीने हौस म्हणून भोईवाडा गावात लहान मुलांसाठी `बालवाडी' सुरू केली. १९५० मध्ये तिने ही शाळा सुरू केली. ती देखील भाई गावंड यांच्या घरात, पपांचा विरोध होईल म्हणून पपंाना न सांगताच. बालवाडी ही कल्पनाच त्या वेळी या कामगारवस्तीत नव्हती. मग डब्यात मुलांना काय द्यायचं इथपासून ते मुलांच्या आणि पालकांच्या बोलण्यात सहजपणे असलेल्या शिव्यांबाबत ती पालकांशी संवेदनशीलतेने बोलायची. १९५४-५५ साली माझ्या वेळच्या तिच्या गर्भारपणात तिला शाळा बंद करायची वेळ आली, तेव्हा पालकांनी घरी शाळा घ्या असा हट्टच धरला. तेव्हा कुठे पपांना तिच्या या उद्योगाचा पत्ता लागला. ममीने त्यांना शाळा सुरू करण्याची कल्पना पटवून दिली. त्यानंतर मात्र पपांनी ममीला नेहमीच मदत केली. पहिली गोष्ट म्हणजे त्याचवेळी तिला स्वत:ची शाळेची छोटीशी जागा घेऊन दिली. माझी रवानगी दुपट्यात असल्यापासून ममीच्या या नव्या शाळेत झाली. माझा तिसऱ्या वर्गापर्यंतचा अभ्यास तिने या शाळेतच करून घेतला, आणि चौथ्या वर्गात महानगरपालिकेच्या शाळेत मला आईच्याच दाखल्यावर थेट प्रवेश मिळाला.
शिक्षणाचा ओनामा देणारी माझी पहिली गुरू माझी आईच होती. तिने ताराबाई मोडकांचं, `शिशूविहार' जवळून पाहिलं होतं. तिथल्या वेगळया शिक्षणपद्धतीला तिने स्वत:च्या पद्धतींची जोड दिली. ममीच्या या शाळेचा अवतार अगदी साधा, पत्राशेडचा होता. पण आम्ही सगळेच विद्यार्थी ममीकडून खूप काही शिकत होतो. ममीने बाहुलीचे खेळ कधी मुला-मुलींना दिले नाहीत. तिच्या शाळेत आम्ही छोट्या जात्यावर धान्य दळायचो, भरतकाम व हाताने शिवणकाम करायचो, बागकाम करायचो, चिकणमातीच्या विविध गोष्टी बनवायचो, लेझीम खेळायचो. त्या १९५५ दरम्यानच्या काळातही ममीने उत्कृष्ट लाकडी मेक्रॅनो शाळेत आणला होता. तिच्या मदतीने आम्ही त्याचा वापर करून घर, ट्न्क, क्रेन अशा अनेक वस्तू करायचो.
तने सावंतवाडीहून लाकडी फळे, भाज्या आणल्या होत्या. ती किंवा खरीखुरी फळं आणि भाज्या आम्हांला भाजीवाले म्हणून खेळताना, गाणी म्हणताना हाताळायला मिळत.
निसर्ग, काम, नाती याबद्दल सहजपणे मुलं शिकतील अशी सुंदर गाणी ममी हावभावासहीत करून घ्यायची तेव्हा वर्गात खूप मजा यायची. मला काही गाणी विशेष आठवतात. एक होतं ``वाजंत्री मी लहान, आलो लंकेहून''. या गाण्यात खूप वाद्य नि त्यांचे आवाज होते. गाणं म्हणताना ते प्रत्येक वाद्य हातात घेऊन एकाने खऱ्या वाद्याचा आवाज करायचा, सगळा वर्ग तोंडाने ते आवाज काढून, वाद्य वाजवण्याचा अभिनय करून मग वर्ग डोक्यावर घ्यायचा. अलीकडे आमच्या एक खूप ज्येष्ठ वर्तणूक वैज्ञानिकाने आम्हां सर्व वर्तणूक वैज्ञानिकांना अशाच पद्धतीने वाद्यवृंदाचा खेळ खेळायला लावला. तेव्हा तिशीपासून पंचाहत्तरीपर्यंतच्या आम्ही सर्वांनी तसाच हॉल डोक्यावर घेतला, आणि मला ममीचा वाजंत्रीवाला आठवला. ``चला चला उद्योगाला, शरीर लावू कामाला'' किंवा ``गमती जमती खेळूया'' ही तिची अभिनय गाणी आमची अतिशय आवडती होती. तिच्या सगळया गीतांमध्ये आज मला जाणवते ती बोजडपणा न आणता सहजतेने मनात रुजवलेली वेगळी संस्कृती नि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, विशेष म्हणजे, आमच्या या शाळेत वेळोवेळी `शांती' ची वेळ असायची, आम्ही तेव्हा डोळे मिटून काही वेळ शांत बसायचो.
ममीचं व्यक्तिमत्त्वच असं होतं की मुलं तिच्यात गुंतून जात. अनेक गोष्टी आम्ही सगळी मुलं फक्त स्पर्शातून व्यक्त करायचो. हळूच ममीच्या जवळ जाऊन तिच्या हातावर हलकेच स्पर्श करून येणारी, मध्येच जवळ जाऊन तिच्या मांडीवर डोकं घुसळून येणारी, रोज येताना तिच्यासाठी फुलं घेऊन येणारी अनेक मुलं मला अजूनही आठवतात. ममीही या सगळयाला मायेने प्रतिसाद देई. अनेकदा तिच्या विद्यार्थ्यांना तिच्या घरी येऊन राहायचं असायचं. त्यांचा हट्ट फार झाला की ती त्यांना घरी आणतही असे, त्यांना हवे ते पदार्थ रांधून घाली. शेवटी त्यांच्या मनाविरुद्ध पालक त्यांना रात्री घरी घेऊन जात.
घरी किंवा शाळेत, मी ममीला रागवताना, हात उगारताना कधी पाहिलंच नाही. घरी उच्छाद, दांडगाई करणाऱ्या, हिंसक बनणाऱ्या अनेक मुलांना पालक विश्वासाने ममीकडे सोपवत. ती मुलं ही ममीकडे आल्यावर एखाद्या हिंस्रक वाघाचा प्रेमळ वाघ व्हावा तशी बदलत. ममीच्या शिक्षाही वेगळया असत. तिने स्वत: बनविलेल्या कडू काढ्याने भरलेली बाटली शाळेत कायम असायची. चूक झाली की तो काढा ममी देई. फार दांडगट मुलांसाठी एक खांब होता, त्यावर एक दोरीचा वेढा होता. फार दांडगाई केल्यावर या दोरीच्या वेढ्यात मुलांनी स्वत:ला घालून घ्यायचं असा नियम. गंमत म्हणजे, बहुतेक मुलांना चूक झाली हे कधी सांगावं लागलं नाही, ती आपणच पेला घेऊन ममीकडे आपल्या शिक्षेचा काढा मागत. मी शिकत असताना माझ्या वर्गातला अत्यंत व्रात्य मुलगाही, आपली चूक झाली की स्वत:च खांबाजवळ जाऊन दोरीच्या वेढ्यात स्वत:ला घलायचा. चुका करण्यात, त्या मान्य करण्यात आणि शिक्षा घेण्यातही अपराधी भावना, राग, कडवटपणा याचा मागमूस तिच्या वा मुलांच्याही मनात नसे.
पालकांशी तिचे अगदी जवळचे संबंध होते. शाळा सुटल्यावर होणारा रोजचा संवाद तर होताच. पण मुलांच्या सहली, मुलांचे कार्यक्रम बसवणं यात पालक सहभागी असत. शाळेच्या व्यतिरिक्त वेळात ममी शिवण, कागदांची फळे-फुले बनविणे अशा अनेक गोष्टींचे वर्ग घेई, त्यात अनेक पालक सहभागी होत. भरतकाम, विणकाम, रांगोळया यातलं तिचं कसब व्यावसायिक पातळीवरचं होतं. विद्यार्थी, पालक आणि तिच्या कलाकृतींची अनेक वेळा प्रदर्शनेही शाळेत होत. ममीच्या शाळेचे २-३ तासांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे परळ-भोईवाडा भागात गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात मानधन देऊन ठेवले जात.
ममीने तिच्या वयाच्या पंचाहत्तरी पर्यंत शाळा चालवली. भोईवाड्यात अनेक घरे अशी आहेत की त्यात ममीच्या विद्यार्थ्यांच्या तीन पिढ्या आहेत. भोईवाड्यातल्या बाजारातल्या दुकानदारांपासून ते विद्यापीठातल्या प्राध्यापकांपर्यंत तिचे विद्यार्थी सर्वदूर आहेत. अलीकडे बाजारात भाजी घेताना एक तरुण
दुकानदार म्हणाला ``तुम्ही राणेताइंर्ची मुलगी ना, मी त्यांचा विद्यार्थी'' अजूनही भोईवाड्यासाठी आमचं घर हे राणेताइंर्चं घर, आणि मी राणेताइंर्ची मुलगी हीच ओळख आहे, मला ती आवडते.
आज जेव्हा मी ``विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता'' यावरचं संशोधन वाचते तेव्हा लक्षात येतं की ममीने आमच्या या विविध बुद्धिमत्ता फार संवेदनशीलतेने, कल्पकतेने विकसित केल्या. लिहा-वाचायला, गणितं करायला मी ममीच्या शाळेत कधी, आणि कसं शिकले ते मला कळलंदेखील नाही. परीक्षा, घोकंपट्टी, या कशाचंच ओझं तिने मनावर लादलं नाही. ममीच्या संगतीत मुलांच्या आंतरिक ऊर्मी उमलून येत, त्यांना त्यांच्या कुवतींचा शोध लागे. तिच्या बरोबर असताना त्यांना स्वत:ची चूक लक्षात येई व अपराधीपणाची भावना मनात न आणता त्या चुकीतून ते शिकत. हे सर्व ममीला एक शिक्षक म्हणून साधलं हे तिचं फार मोठ यश मी मानते. मुलांच्या मनाशी गहिरा संवाद झाल्याशिवाय हे होणं शक्य नाही हे मला आज कळतं, आणि म्हणूनच या सगळयाचं एक विशेष महत्त्वही वाटतं.
माझ्या वयाच्या सहा-सात वर्षांपर्यंतच्या काळात ममीचं आणि माझं नातं दुहेरी होतं, घरी आई आणि शाळेत शिक्षिका. सगळयात अवघड प्रकरण होतं म्हणजे माझा ``मी मुलगा आहे'' हा अट्टाहास. मी मुलासारखे कपडे घालून, स्वत:ला `सतीश' असं नाव घेतलं होतं. माझ्या हट्टापायी ममीला शाळेत त्याच नावाने माझी हजेरी घ्यावी लागायची. मी वर्गातल्या मुला-मुलींबरोबर मुलगा आहे असं समजूनच वागायचे. हे दिवस ममीने खूप कौशल्याने हाताळले. बाहेर गेल्यावर ती मला मुलींचे छान कपडे, दागिने दाखवायची. पण मला त्याचं आकर्षणच नव्हतं. मी तिला सांगायचे,``मी मोठा झाल्यावर तुझ्यासाठी हे आणीन''. वर्गातल्या मित्रांबरोबर त्यांच्या पद्धतीने शू करायला गेल्यावर मला पहिल्यांदा कळलं की आपल्याला आपल्या मित्रांसारखं वागायला जमत नाही. याच मोक्याच्या वेळी तिने मला मुलगे आणि मुलींची शरीरं वेगळी असतात; आणि माझं शरीर हे मुलीचं आहे हे अत्यंत संवेदनशीलतेने समजावून दिलं. `मी मुलगाच आहे' या माझ्या अट्टहासाला त्यावेळी चांगलाच धक्का बसला. हे सत्य स्वीकारणं मला जडच गेलं.
त्याच काळात आमच्या शेजाऱ्यांकडे एक डॉक्टर दांपत्य यायचं. त्यांनी माझ्याकडे एक पिल्लू सोडलं, की शस्त्रक्रिया करून मुलीचा मुलगा करता येतो. हे समजल्यावर तर मी रोज उठून हट्टच करायला लागले, की मला शस्त्रक्रिया करायची आहे म्हणून. या काळात माझ्या प्रश्नांंना उत्तर देणं फार अवघड होतं. पपातर अनेक वेळा चिडून मला मारायचेच. लहानपणीचे बरेचसे मार हे मी फक्त कपडे कोणते घालायचे या हट्टापायी खाल्ले. अशावेळी पपांना समजावणं, आणि शांतपणे माझ्या अंगावर उमटलेल्या वळांवर मलमपट्टी करायचं काम ममीचं असायचं. ती फारसं काही बोलत नसे, पण तिची नजर आणि स्पर्श माझ्या
दुखावलेल्या मनाला तिची माया, सहसंवेदना आणि पपंाना थांबवण्यातली हतबलता गहिरेपणाने सांगून जात. ममीने मात्र याबाबतीत सबुरी दाखवली. चौथीमध्ये जेव्हा मला दुसऱ्या शाळेत जायची वेळ आली, तेव्हा ती मला आधी नव्या शाळेत घेऊन गेली. तिथे सगळया मुली फ्रॉक घालतात, तसा शाळेचा नियम आहे हे तिने मला समजावून सांगितलं. नव्या शाळेत जायच्या उत्साहात शाळेपुरते तरी मुलींचे कपडे घालणं मी मान्य केलं.
हा तिढा तसा सोपा नव्हता. मी सहावीत असतानाच वयात आले, आणि माझं स्त्रीचं शरीर पूर्ण अर्थाने मला मान्य करावंच लागलं. पण मला नटायचं नव्हतं, दागिने घालायचे नव्हते, कुंकू लावायचं नव्हतं, पतंग-भोवरा-गोट्या असे तथाकथित `मुलग्यांचे खेळ' च खेळायचे होते. यातल्या एकाही गोष्टीबाबत ममीने कधीच नाराजी दाखवली नाही, वा कशालाही आडकाठी केली नाही. तसे पपा-ममी स्वयंपाकासह घरातली सगळी कामं बरोबरीने करायचे. तरीही दोघांच्याहीकडून काहीवेळा मला व माझ्या भावांना मिळणारी वागणूक वेगळी असायची, दुजाभाव असायचा. भाऊबीज, राखी असे पुरुषांना मोठेपणा देणारे सण यायचे. मी अशाप्रसंगी बंड करून उठायचे, असल्या कोणत्याही गोष्टी करायला नकार द्यायचे. ममीने यातल्या एकाही प्रसंगात आपल्या चुकीचे वा चुकीच्या प्रथांचे समर्थन केले नाही. आपल्या `पालकत्वाची' अधिकारशाही गाजवली नाही आणि स्वत:चा तोल ढळू दिला नाही. तिला पटत होते ते बदल ती स्वत:च्या वागण्यात करीत होती. परंपरेने स्त्रियांची म्हणून ठरलेली कामे आज प्रदीप, उल्हास हे माझे दोन्ही भाऊ सहजतेने करतात. हौसेने पपन्न रांधतात, स्त्रियांना सन्मानाने वागवतात. मी सुरुवातीपासूनच तबला वाजवणं, कारखान्यात इंजिनिअरिंगची सर्व कामं सहजतेने करणं, घर घेण्यापासून देश-परदेशात एकटीने टुरिस्ट म्हणून प्रवास करताना एकटी असण्याचे ओझे होऊ न देणं अशा परंपरेने `पुरुषी' ठरलेल्या गोष्टी अगदी सहजतेने करते. आम्हा भावंडांमधील स्त्रीगुण व पुुरुषगुणांच्या विकासाचं बरंचसं संतुलन पाहिलं की मला त्या पाठीमागे ममी-पपांचे आधुनिक विचार, आचरण व स्वत:ला बदलण्याची तयारी दिसते.
लैंगिकतेच्या मनोविश्वाचा मी सध्या अभ्यास करते आहे. अभ्यासक म्हणून माझा आंतरिक प्रवास पाहिला की प्रकर्षाने जाणवते ते सुरुवातीच्या काळातील आपण मुलगा आहोत हे मनाचे झपाटलेपण. ममीने कौशल्याने माझ्या मुलगी असण्याच्या वास्तवाची जाण करून दिल्यावर, वास्तव बदलण्यासाठीची माझी बालवयातली धडपड. हे झपाटलेपणा इतक्या लहान वयातलं की त्याचा उगमच समजत नाही. जणू काही मी ते जन्मतानाच बरोबर घेऊन आले. वयात आल्यावर मात्र, माझ्या मनातलं मुलगा होण्याचं आकर्षणच संपलं. सर्वसाधारणत: अनुभवाला येणारी पुरुषी आक्रमकता, अरेरावी, वर्चस्वाचा गर्व यापेक्षा मला समन्वय साधणारं, अहिंसक, आणि प्रसंगी कणखर होणारं स्त्रीत्व जवळचं वाटलं. मी ते मनापासून, सार्थ अभिमानाने स्वीकारलं. यानंतर मात्र सुरू झाला स्त्री-पुरुषांबाबतच्या चाकोरीबद्ध प्रतिमांशी असहमती आणि बंडाचा काळ.
माझ्या आयुष्यातले हे टप्पे माझ्यासाठी किती अवघड होते हे तर मी अनुभवलंच आहे. आपण जसे आहोत तसे जगण्याचा, व दुसऱ्यांनी मी आहे तशी मला स्वीकारावे या आग्रहाचा तो काळ. बरं तो आग्रहही भावनिक, शारिरिक, आर्थिक या सर्व दृष्टीने अवलंबित वयातला. परंतु पालकांनाही असे टप्पे हाताळणं हे अतिशय अवघड आहे याची मला आता कल्पना आहे. ममीने त्या काळात हे सर्व हाताळताना दाखवलेली संवेदनशीलता, संयम, वैचारिक परिपप्ता या सगळयाबाबत आज माझं मन अतोनात कृतज्ञतेने भारलेलं आहे. तिच्या या वृत्तीमुळेच कुठचेही मनोगंड माझ्या मनात निर्माण झाले नाहीत. एव्हढंच नाही तर समाजाच्या ढाच्यात न बसणाऱ्या पण माझ्या मनाला, बुद्धीला योग्य वाटणाऱ्या गोष्टी सहजतेने करण्याची सहज वृत्तीही निर्माण झाली.
घरी व शाळेत ममी मला अनेक गोष्टींची ओळख करून देई. सभेत बोलण्याचे धडे तिनेच मला दिले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गणेशोत्सव, नवरात्रौत्सव,
आंतरशालेय स्पर्धा यात मी बक्षिसं घ्यायचे ते तिने करून घेतलेल्या तयारीवरच. नाटकात काम, व्यासपीठावर गाणी म्हणणं यातला सभाधीटपणा तिनेच तर शिकवला. सुटीत ममी असंख्य संुदर पुस्तकं वाचायला द्यायची, चित्रकला शिकवायची. मला खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून टाटा हॉस्पिटलच्या हिरवळीवर धावायला न्यायची. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी मी फक्त तिच्या सहवासातून शिकले. ममी म्हणजे आत्मविश्वास, उमेद, उत्साह आणि जीवनावरचं प्रेम याचं प्रतीक होतं. दर वर्षी उन्हाळयाच्या सुटीत ती आम्हा भावंडांना घेऊन कोकणात होडावडे या माझ्या आजोळात यायची. काजूच्या रानात तिच्याबरोबर काजू गोळा करायला जाणं, तिने केलेल्या फणस-आंबे पोळयांची व इतर वाळवणांची राखण करणं, विहिरीवरून पाणी आणून बाग शिंपणं ही कामं केली की आम्ही हुंदडायला मोकळे व्हायचो. संध्याकाळी आम्ही सगळे टेकडीवर फिरायला जायचो, रात्री खळयात आजोबा व ममीबरोबर गाणी म्हणत बसायचो. इतक्या वर्षांनंतरही मी होडावड्याला राहते तेव्हा ममी, आजी, आजोबा यांच्याबरोबरचा तो रम्य काळ आठवतो.
तिचा हात `हिरवा' होता, बागकामाची तिला मनापासून आवड होती. शाळेजवळही तिची छोटीशी बाग होती. फुलझाडं तर होतीच, पण पावसाळयात ती अनेक भाज्याही करायची. सुटी संपवून गावाहून परतताना ती अनेक ठिकाणी बिया पेरून निघायची. आज होडावड्याला, उल्हासच्या कर्नाळयाच्या फार्ममध्ये तिच्या हातची खूप झाडं डोलत आहेत, फळत आहेत.
निसर्गस्नेही जीवनशैली हा विषय आता मी जसजसा समजून घेत आहे, तसं माझ्या लक्षात येतंय की ममीने आयुष्यभर निसर्गस्नेही जीवनशैली अंगीकारली होती. मुंबईत राहतानाही ती पाणी काळजीपूर्वक वापरायची, शक्य तितका तिचा पुनर्वापर चालायचा. दुकानातून येणाऱ्या पुड्यांचे कागद, दोरे, पाठकोरे कागद, वह्यांचे उरलेले कागद, या सगळया गोष्टींचा पुनर्वापर व्हायचा. सुटीमध्ये ती जुन्या साड्यांच्या संुदर गोधड्या शिवी. अगदी वेण्या व गजरे यांचा दोरा देखील ती सोडून परत वापरायची. गॅस व केरोसीन स्वयंपाक करताना ती किंचितही वाया जाऊ देत नसे. भाज्यांचे देठ, बिया अशा टाकून दिल्या जाणाऱ्या भागांचे पोषणमूल्य तिला माहीत होते, स्वयंपाकात कौशल्याने त्यांचा वापर करून आम्हांला ती ते जाणीवपूर्वक खायला लावायची. औषधी वनस्पतींची तिची जाण तर फारच चांगली होती. रानात उल्हासच्या बरोबरीने ती दुर्मिळ वनस्पती ओळखून त्यांचे औषधी उपयोग सांगायची. दंतमंजन, केशतेले ही तिने कायम घरी बनवून वापरली. त्वचारोग, ताप, अतिसार, आव, पडसे-खोकला, सूज अशा आजारांवर शक्यतो औषधी वनस्पतींची औषधेच ती स्वत: बनवून वापरी. तरुण वयात मला या तिच्या वागण्याचा कंटाळा यायचा, ही सर्व कंजूषपणाची लक्षणे आहेत असं मी मानायचे. आज जेव्हा मला निसर्गस्नेही जीवनशैलीचे महत्त्व कळतंय, तेव्हा कृतिप्रवण होणे फारसं कठीण जात नाही, याचं मुख्य कारण म्हणजे ममीने न बोलता तिच्या आचरणातून केलेले पर्यावरणीय संस्कार.
खरं सांगायचं तर `जगायचं कसं' याची दिक्षाच या माझ्या पहिल्या गुरूने दिली. माझ्या अंतरातील वैचारिक, भावनिक आणि अध्यात्मिक ऊर्मीशी स्वत:ला जोडण्याची कला शिकवली, आणि त्यानुसार जगण्याचे धैर्यही दिले. ही शिदोरी मला अगदी आयुष्यभर पुरली, पुरेल. आज मी नोकरी सोडून, हृदय सांगेल त्या दिशेने जाण्याचा अवघड प्रवास करत आहे, त्यातली स्थित्यंतरं हाताळणं मला म्हणूनच शक्य होत आहे.
ममीच्या संस्कारातला सगळयात मोठा गाभा होता तो म्हणजे शिक्षणाचं महत्त्व. आमची पार्श्वभूमी मराठा समाजातील शेतकऱ्यांची. कोकणातून जगण्यासाठी मुंबईत चाकरमानी म्हणून आलेल्या पहिल्या पिढीतले माझे वडील, मोठ्या कष्टाने रात्रशाळेत जाऊन, हाताने पुस्तकं लिहून मॅटि्न्कपर्यंत शिकलेले.
आमच्या समाजात शिक्षणाचे महत्त्वही फारसे नव्हते. अशा काळात ममी-पपांनी मुलांना खूप शिकवायचा ध्यासच घेतला. आजूबाजूच्या ब्राह्मण कुटुंबांकडे ममी माझं लक्ष वेधायची, ते शिक्षणाच्या आधारावरच पुढे आले आहेत हे दाखवून मनात जिद्द निर्माण करायची. अभ्यास मुळापासून व नियमित करण्याची शिस्त तिनेच लावली.
शाळेच्या मोठ्या नावांचं तिला मुळीच अप्रूप नव्हतं. माझ्याबाबतीत तर तिने तीन धाडसी प्रयोग केले. पहिला प्रयोग म्हणजे तिसरीपर्यंत स्वत:च शिकवायचा. तो अभ्यास खूप लवकर संपला, आणि मी तिच्याकडे मला शाळेत घाल म्हणून भुणभुण लावली. इतक्या लहान वयात मला कोणी प्रवेश देणं शक्यच नव्हतं. मग तिने मला ३-४ महिने होड्यावड्याच्या शाळेत पाठवायचं ठरवलं. शाळेत जायला मिळणार या आनंदात मी एकटीने आजी-आजोबांकडे राहायचं कबूलही केलं. ते ३-४ महिने खेड्यातली ती शाळा मजेत उपभोगली. चौथीचे वर्ष मी पोयबावडीच्या महापालिकेच्या शाळेत गेले. त्यामुळेच की काय शहरातल्या आणि खेड्यातल्या गरिबांशी माझं सहज नातं जुळतं. मी आय.आय.टी.त. पीएच.डी करीत असताना माझे मार्गदर्शक होते प्राध्यापक आयझॅक. ते उत्कृष्ट लेखक, प्रबंधाच्या दहा तरी उजळण्या झाल्या असतील. एकदा मी त्यांना म्हटलं, या माझ्या लिखाणात व्याकरणाच्या त्रुटी राहणं स्वाभाविक आहे, मी मराठी माध्यमात आणि त्यातून अशा साध्या शाळांमधून शिकले आहे. त्यांना हे सगळं कळल्यावर जरासा धक्काच बसला.
एरव्ही पपांशी सबुरीने घेणाऱ्या ममीने शिक्षणासंदर्भात मात्र बंडखोरी केली. पपांचा कल सुरुवातीला मुलींना फारसं शिकविण्याचा नव्हता. माझी मोठी बहीण आशा. तिला शालान्त परीक्षेत चांगले यश मिळाले. पण पप्पांचा काही तिला पुढचे शिक्षण द्यायचा विचार नव्हता. ममीने खंबीरपणे विरोध केला. त्यांना समजावून दिलं आणि आशाचा महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आम्हा सर्व भावंडांचं संगीत शिकणं, हिंदीच्या परीक्षा देणं, चित्रकलेच्या परीक्षा देणं हे सगळं ममीने पपांना कळू न देताच छुपेपणाने केलं. पपांशी सतत संवाद साधत ती त्यांना अनेक गोष्टींना सहमत करीत असे. त्यामुळेच असेल, मी काय शिकायला हवं, कोणता व्यवसाय निवडायला हवा याचा आग्रह दोघांनीही कधीच धरला नाही. जे करावसं वाटलं ते मी मुक्तपणे करू शकले.
माझ्या पीएच.डी.च्या प्रबंधाला मी अर्पणपत्रिका लिहिली `माझे पालक : स्नेहलता व विनायक यांना' माझा मित्र म्हणाला `माझ्या आई-वडिलांना' एव्हढंही पुरेल. मी म्हटलं `नाही पुरेसं. माझ्या साध्य झालेल्या सगळया गोष्टीत आईचं योगदान फार मोठं आहे, पण आपल्या व्यवस्थेत आईच्या नावाची साधी नोंदही कुठे होत नाही. म्हणून मला तिच्या नावाची नोंद हवी'.
ममीवर गांधींच्या चळवळींचे संस्कार होते. समाज व देशावरच्या प्रेमाची संथाही तिने आम्हा सगळया भावंडांना दिली. ६२ साली चीनबरोबरच्या युद्धाच्या दिवसांत ममीने जवानांसाठी शेकडो स्वेटर विणून दिले. माझ्या मोठ्या भावांनाही तिने विणायला शिकवलं, आणि त्यांनीही जवानांसाठी स्वेटर विणले. पाकच्या युद्धाच्या वेळी शास्त्रीजींनी आठवड्यातून एकदा देशासाठी उपासाचं आवाहन केलं, नि आमच्या घरी दर सोमवारी देशासाठी उपास सुरू झाला.
तिच्या जीवनातला गाभा होता तो म्हणजे तिची ईश्वरावरील असीम श्रद्धा. तुकारामासारखं तिचं वैयक्तिक दु:ख, गाऱ्हाणी, तक्रारी, हट्ट सगळं देवापाशीच चालायचं. लहानपणाचा एक प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात आहे. मी तीन-चार वर्षांची असताना मला कुत्रा चावला, त्या काळात पोटावर १४ इंजेक्शन घ्यायला लागायची. पहिल्याच दिवशी ममीने डॉक्टरांकडे जाताना
मला सांगितलं, इंजेक्शन घेताना डोळे मीट, आणि रामाच्या नावाचा जप कर मग तुला काही होणार नाही. मी सगळी इंजेक्शन्स ममीने निर्माण केलेल्या रामनामावरच्या विश्वासावर डोळयांतून पाण्याचा एक थेंबही न काढता घेतली. वयाच्या टप्प्यांवर मी आस्तिक-नास्तिकतेच्या मनोभूमिकेतून गेले. एकदा तिच्या देव्हाऱ्यातल्या खूप जुन्या, मूळ रंग-रूप गेलेल्या मातीच्या गणेश मूर्तीबाबत मी तिला म्हटलं, `ही मूर्ती विसर्जित का करीत नाहीस?' त्यावर तिचं उत्तर ऐकून माझं मन भरून आलं. मी ४-५ वर्षांची असताना घरात गणपती आणायचा हट्ट धरला, म्हणून माझ्या गणेश उत्सवासाठी म्हणून आणून दिलेली ती मूर्ती. ममीने तिचं विसर्जन न करता देव्हाऱ्यात ठेवली. ममी म्हणाली, `तेव्हाच्या तुझ्या निरागस भक्तीची आठवण आहे ती. त्या मूर्तीच्या रूपाला महत्त्व नाही'.
एका बाजूला अशी देवभक्ती, बाबामहाराजांवरची भोळी श्रद्धा नि दुसरीकडे रूढीविरुद्ध बंडखोरपणा असं एक वेगळं रसायन तिच्या स्वभावात होतं. मासिक पाळी, सुयर-सुतक या काळात असलेला देवपूजेला मज्जाव तिच्या मनाला कधीच पटला नाही. देवावर तिने प्रेम आणि भक्ती केली, त्याच्या रागा-कोपाची तिला कधीच भीती नव्हती. तिचे देव वर्षानुवर्ष उत्तर-दक्षिण होते. एकदा कोणी धार्मिक व्यक्तीने तिला देवांचं स्थान बदलायला सांगितलं, तर ती मला म्हणाली `सगळया दिशा देवानेच तर निर्माण केल्या, मग कसलं आहे शुभ-अशुभ!'
माझं तिचं नातं खूपच गंमतीदार होतं. ८-९ वर्षांच्या वयातही मी तिच्याकडे तू मला भरव म्हणून हट्ट धरायचे कधीमधी, आणि ती तो पुरवायची. पण शाळेतल्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध मी धीटपणे दाद मागायला हवी, या तिच्या अपेक्षेत तिने तडजोड केली नाही. हायस्कूलमध्ये असताना, काही घटनांमध्ये तिने मला मुख्याध्यापकांपर्यंत जाऊन दाद मागायला लावली होती. परिणामांची पर्वा न करता अन्यायाविरुद्ध दाद मागितलीच पाहिजे असा तिचा नेहमीच आग्रह असायचा.
कॉलेजात जायला लागल्यावर आजूबाजूच्या मुलांना, पिचत मुलींनाही मी सिगारेट ओढताना पाहायचे, त्यांच्या चेहऱ्यावरच्या धुंद भावामुळे मला सिगारेटचं एकप्रकारचं आकर्षण वाटत होतं. शेवटी मी एकदा ममीला न राहवून म्हटलं, मला खूप उत्सुकता आहे सिगारेट ओढल्यावर कसं वाटतं याबद्दल. तिने चक्क मला सिगारेट ओढून बघण्याची परवानगी दिली. मी तिच्या समोरच घरात सिगारेटचे झुरके घेऊन पाहिले. पपांना सांगून दारूचीही चव मी अशीच घरात घेऊन पाहिली. ३०-३२ वर्षांपूर्वीच्या काळात, ममी-पपांच्या या वागण्याचं मला आज वर्तणूकशास्त्राची अभ्यासक म्हणून फार महत्त्व वाटतं. १८ वर्षे वयानंतर मुलांना काय करावं वा काय करू नये अशा उपदेश करून त्यानुसार त्यांनी वागावं अशी अपेक्षा करण्याने काही साधत नाही. स्वत:साठी काय योग्य-अयोग्य आहे हा विचार करण्याची व त्यानुसार निवड करून वागण्याची क्षमता मुलांमध्ये येणं हे महत्त्वाचं, कारण तेच आयुष्यभर टिकून राहतं असं आम्ही मानतो. नेमकं तेच त्यांना साधलं होतं. कदाचित माझ्या १८ वर्षांपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी जी काही भावनिक गुंतवणूक आमच्या नात्यात केली होती, त्यामुळे आमच्या नात्यात एक पारदर्शीपणा व गाढ विश्वास होता. आपली मुलं बहकणार नाहीत, कशाच्या आहारी जाणार नाहीत, याची निश्चितीही त्यांना असावी आणि प्रत्यक्षात झालंही तसंच.
लहानपणी अतिशय सश्रद्ध असलेली मी, वयानुसार आस्तिकता-नास्तिकता यांच्या चढ-उतारातून गेले, अंधश्रद्धा विरोधी लढ्यात उतरले. माझ्या एका लेखामधील तिच्या अंधश्रद्धेशी असलेला माझा लढा उघडपणे लिहिला. कोणीतरी तिला हे विचारलंही, की तुम्ही हे कसं चालवून घेता. पण तिने माझ्याकडे याबाबत कधीच हरकत घेतली नाही. माझ्या भूमिकेतील अनेक गोष्टी तिला मनातून पटत नव्हत्या, पण तिने आपलं मत कधीही माझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. माझं वय वाढत गेलं तशी ममी आईपेक्षा मैत्रीण झाली. तिच्या आणि पपांच्या नात्यातल्या काही गोष्टी सहज बोलू लागली. माझा लग्न न करण्याचा निर्णय खूप आधीपासून मी घरात सांगितला होता. त्यावर तिने कधीच विरोध दाखवला नव्हता. एक दिवस मात्र ती माझ्याशी या विषयावर सविस्तर बोलली, मी पुढच्या आयुष्याचा कसा विचार केला आहे हे तिने समजून घेतलं. मग मात्र तिने नेहमीच मला या विषयावर सपोर्ट केलं.
आज मी मानसशास्त्र, वर्तणूकशास्त्राचा अभ्यास करते तेव्हा लक्षात येतं, नाती-गोती हे सगळयात अवघड प्रकरण. रूढार्थाने ममी फारसं शिकली नव्हती, पण तिचं माझं नातं तिने किती सुंदर विकसित केलं. माझ्या लहानग्या, अवलंबित वयात तिने जीवनाच्या सगळया अंगांच्या आनंदाची बोट धरून ओळख करून दिली, प्रेम आणि ऊब दिली. अनेक गोष्टी तर तिने शिकविल्या नाहीतच, मी तिचं आचरण पाहून शिकले. तारुण्यात येतानाची माझी बंडखोरी तिने काळजीपूर्वक व विश्वासाने हाताळली, प्रसंगी जोखीमही पत्करली. तारुण्यात मैत्रिणीसारखा संवाद केला. मी मिळवती झाले तेव्हा मला जे काही तिच्यासाठी करायचं होतं तेही तिनं मनमोकळेपणे, आनंदाने स्वीकारलं. हे सगळं ती खरंच कुठे शिकली असेल?ं
पपा गेल्यानंतरची तिच्या आयुष्यातली शेवटची तीन वर्षं मी व ममी आमचं दोघींचंच सहजीवन होतं. संगीत आणि
ईश्वरावरील श्रद्धा हा आम्हा दोघींना जोडणारा धागा होता. संगीताची साथ कधीच सोडू नको, तेच तुला ईश्वरापर्यंत पोचवेल असं ती मला नेहमी म्हणायची. मी गायला बसले की हमखास `प्रार्थना देवा तुला ही' हे जुनं गाणं मला म्हणायला लावायची, ते ऐकताना तिच्या डोळयांतून धारा वाहायच्या. सहसा वृद्धावस्थेत माणसं मृत्यूबद्दल बोलायचं टाळतात, पण ममी तिच्या मृत्यूबाबत अगदी सहजपणे बोलायची. ममीला देहदान आणि नेत्रदान दोन्ही करायची खूप इच्छा होती. देहदानाची कल्पनासुद्धा सहन व्हायची नाही, पण ती अगदी सहजपणे म्हणायची, होऊ देत ना माझा उपयोग डॉक्टर होणाऱ्या विद्यार्ध्यांना! ऐश्वर्या रायची नेत्रदानाची जाहिरात दूरदर्शनवर लागली, की ती मला तिच्या नेत्रदानाच्या इच्छेची नेहमी आठवण करून द्यायची.
गेली कित्येक वर्षं आमच्याकडे घरकामाला असलेली राजश्री आमच्या कुटुंबातील एक असल्यासारखीच आहे. ममी गेल्यानंतर तर ती मला खूपच सांभाळून घेते, आजारपणात विशेष काळजी घेते. अलीकडेच ती मला सहज म्हणून गेली, ममीला मी वचन दिलंय की मी जिवंत असेपर्यंत तुमची काळजी घेईन. तिचे शब्द ऐकून मला भरून आलं. ममीला माझ्या एकटीने राहण्याची काळजी वाटत होती हे तिने आधी कधीच मला जाणवू दिलं नव्हतं. ममी गेल्यानंतर गेली सात वर्षं मी भल्या मोठ्या घरात एकटी राहते याचं अनेकांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं पण मी एकटी असतेच कुठे ? ममीने अंत:करणात जाणवून दिलेला देव, आणि स्मृतीतली ममी कायमच तर माझ्या सोबतीला असतात.
३-४ आठवडे कोमा आणि नंतर मृत्यूकडे नेणाऱ्या तिच्या शेवटच्या अर्धांगाच्या झटक्यापर्यंत ममी कार्यरत होती. हौसेने पदार्थ बनवून खिलवणं, नव्या कला शिकणं, वाचन हे शुद्धीतल्या शेवटच्या क्षणापर्यंत चालूच होतं. जीवनातला आनंद आणि उमेद संपली नव्हती. कोमात निपचित पडलेल्या तिला पाहणं अवघड व्हायचं. ती गेल्यावर उल्हास एकदा मला म्हणाला, मला शक्य असतं तर सगळे संकेत, रूढी, नियम बाजूला ठेवून मी ममीचं दफन तिच्या शाळेच्या जवळ केलं असतं. मृत्यूनंतर ममीचं नेत्रदान झालं. कोमात गेल्यानंतरच्या शारीरिक अवस्थेमुळे करायचं म्हटलं तरी देहदान शक्य नव्हतं. सारखं वाटत राहतं, तिच्या डोळयांतून कोण जग पाहत असेल? ममीची जीवनदृष्टीही त्या व्यक्तीला मिळाली असेल का ?
- डॉ. प्रेरणा राणे,
मुंबई


