Skip to main content

अंबी, अक्का आणि त्यापलीकडचे काही

अंबी कर्नाटकातल्या आणि आक्का महाराष्ट्नतल्या. दोघींची आयुष्यंही समकालीन. त्यांच्या आयुष्यात एका टप्प्यापर्यंत खूप साम्य सापडतं आणि त्यापलीकडे दोघींचे जीवनप्रवाह काहीसे वेगळया स्वरूपात बदललेले दिसतात. दोघींची चरित्रं वाचता वाचता लेखिकेनं याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
काही दिवसांपूर्वी एक पुस्तक हातात पडलं, त्याचं नाव `अंबी'. पाहताक्षणीच त्याचं निराळेपण जाणवलं. विमला मूर्ती या लेखिकेनं स्वत:च ते प्रकाशित केलंय, एवढंच त्याचं वेगळेपण नव्हतं तर त्याचं रंगरूपदेखील निराळं होतं. एक जुना काळा-पांढरा फोटो मुखपृष्ठावर होता. बहुतेक पुस्तकांवर असतो तसा मलपृष्ठावर लेखिकेचा फोटो नव्हता आणि आत नुसतं लिखाण नव्हतं तर जुने सेपिया रंगातले काही फोटो, एका पानावर १९२४ आणि १९३२ साली इंग्रजीत नोंदवलेल्या जमाखर्चाचा हिशेब आणि जागोजाग मला वाचता न येणाऱ्या कानडी लिपीत लिहिलेला एक शब्द - अंबी! लेखिकेनं आपल्या आजीचं इंग्रजी भाषेत लिहिलेलं हे चरित्र पाहता पाहता माझं वाचून संपलं!
कर्नाटकातल्या तुमकुर या गावी १८८९ साली जन्मलेली अंबाबाई हे चौदापैकी चौथं अपत्य होतं. कृष्णराव आणि रुक्मिणीबाई या जोडप्याचं. अंबाबाई १९७० साली निवर्तल्या. बाकी सहा बहिणींच्या तुलनेत त्यांचं आयुष्य इतकं निराळं होतं की लेखिकेला त्याविषयी आवर्जून लिहावंसं वाटलं!
अंबीच्या सरधोपट आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्यांच्या नवऱ्याच्या अकाली मृत्यूमुळे. १९१३ साली श्रीयुत श्रीनिवासराव यांचा तळयात बुडून अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी अंबी अवघ्या २४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पदरी दोन लहान पोरं होती आणि तिसऱ्या खेपेला त्या गरोदर होत्या. त्या काळाचा विचार केला तर अशा गोष्टी एकत्र कुटुंबात कुणाच्या ना कुणाच्या वाट्याला यायच्याच. अशा ब्राह्मणांच्या विधवा बायकांनी अलवण नेसून विकेशा अवस्थेत दिवसरात्र कष्टाचं आयुष्य जगायचं हेही सर्वसाधारण ठरलेलं असायचं. विधवेच्या मुलांना एकत्र कुटुंबात आधार मिळायचा पण काही प्रमाणात आश्रिताची वागणूकही सहन करायला लागायची. मराठी मुलुखात हे घडायचं तसं कानडी मुलुखातही घडायचं. पण अंबी तसं मानहानीचं आयुष्य जगल्या नाहीत.
`अंबी' हे पुस्तक वाचनीय ठरतं ते त्या मळलेल्या वाटेने गेल्या नाहीत म्हणूनच! आईपेक्षाही वडिलांनी जास्त मानसिक आधार दिला, अंबी आई-वडिलांकडे राहिल्या, सकेशा विधवा म्हणून जगल्या, अर्धवट राहिलेलं शिक्षण पुरं करून मुलींच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवली आणि भक्कमपणे आपल्या पावलावर उभ्या राहिल्या. लेखिकेनं आपल्या आजीला पाहिलं ते स्वतंत्र, स्वाभिमानी, कर्तबगार शिक्षिकेच्या भूमिकेत, आणि घरातल्या गोष्टी सांगणाऱ्या, खाऊपिऊ घालणाऱ्या, लाड करणाऱ्या आजीच्याही भूमिकेत. अंबींच्या आयुष्याची पटकथा वाचतांना एकत्र कुटुंबातली अनेक माणसं येतजात असतात आणि पटकथेत रंग भरत असतात. पुस्तकाच्या आकर्षक रंगारूपाबरोबरच हे पटकथेचे रंग अनुभवायला मजा येते. पण माझा आनंद केवळ तेवढ्या कारणासाठी नव्हता. तुमकुर आणि बंगलोरच्या आसपासच्या या माणसांची आयुष्यं मला फारच ओळखीची वाटत होती.
अंबी तुमकुर, बंगलोरला होत्या त्या काळात माझ्या आजोळची माणसं पुण्यात राहत होती. अंबींच्या आयुष्याची तुलना मी सहजगत्या आक्कांच्या आयुष्याशी केली. आक्का म्हणजे कमलाबाई देशपांडे, नात्यानं माझ्या आईच्या आत्याबाई. आक्कांचा जन्म १८९८ चा. त्यांचे यजमानही १९१३ साली, आक्कांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी वारले. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त काही महिन्यांचा होता. आक्कांनीही अंबींसारखंच मुलापासून लांब राहून शिक्षण पुरं केलं, पुढे युरोपात प्रागला जाऊन डॉक्टरेट मिळवली. आक्काही सकेशा विधवा म्हणूनच जगल्या. वरवर साधर्म्य दिणारी अंबी आणि आक्कांची आयुष्यं अधिक खोलवर तौलनिक विचार करता कशी दिसतात?
मी लहान असतांनाच १९६५ साली आक्का वारल्या. माझ्या त्यांच्याविषयीच्या आठवणी त्या थोड्या काळापुरत्याच मर्यादित आहेत. आक्कांचं चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे (`कमलांकी', ले. विद्या बाळ, मौज प्रकाश गृह १९७२). अंबी आणि आक्का यांच्या आयुष्यांची तुलना करायला या दोन्ही पुस्तकांनी चालना दिली.
प्रकर्षाने जाणवलेला एक फरक म्हणजे अंबींचं आयुष्य मुख्यत्वे त्यांच्या कुटुंबाभोवती घोटाळतांना दिसतं. त्यांनी स्वत: आयुष्यात इतर विधवांच्या तुलनेत निराळा मार्ग चोखाळला तरी आसपासच्या त्यांच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या विधवांविषयी या पुस्तकात उल्लेख सापडत नाहीत. विशिष्ट परिस्थितीत पडल्यावर स्वत:साठी शिक्षणाचं महत्त्व अंबींना पटलं तरी आपल्या मुलींनी पुष्कळ शिक्षण घ्यावं, गरज पडली तर पायावर उभं राहण्यासारखी परिस्थिती त्यांच्याकडे असावी असा आग्रह त्यांनी अजिबात धरला नाही. लेखिका विमला मूर्ती यांनाही त्याचं आश्चर्य वाटलेलं पुस्तकातल्या वारंवार उल्लेखांवरून लक्षात येतं! याउलट लिहा-वाचायला येऊ लागलं की शिक्षण पुरे असं ना आक्कांच्या माहेरच्यांना वाटत होतं ना सासरच्यांना. लग्नापूर्वी मराठी शाळेचं शिक्षण पुरं केलेल्या आक्का लग्नानंतर पतीच्या प्रोत्साहनानं, सासरच्या मंडळींच्या आधारानं, इंग्रजी शाळेत जाऊन मॅटि्न्कच्या दिशेनं प्रगती करत असतांना त्यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. पुढील आयुष्यात साताऱ्यात कन्याशाळा सुरू करून त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या संदर्भात भरघोस कार्य केलं.
अंबी आणि आक्का यांची आयुष्यं ज्या जमान्यात गेली त्या काळात कर्मकांडं, उपास-तापास, पूजाअर्चा या गोष्टी बहुतेक सर्व ब्राह्मणी आयुष्यांचा महत्त्वाचा भाग असायच्या. अंबी स्वत: विधवा असल्या आणि उत्तर आयुष्यात आई-वडिलांच्या घरात न राहता स्वत:च्या घरी राहत असल्या तरी सोवळया ओवळयासारख्या कर्मकांडांचा त्यांच्यावरचा परिणाम अजिबात कमी झाला नाही. आक्कांच्या आईसुद्धा खूप सोवळंओवळं मानणाऱ्या होत्या, नित्यनेमाने देवळात जात. पण आक्कांनी स्वत:च्या घरात असं सोवळंओवळं पाळलं नव्हतं. काठपदराच्या रंगीत नऊवारी साड्या आक्का नेसायच्या हे मलाही आठवतं. सरस्वतीबाई या सकेशा विधवा आणि कृष्णाबाई या लाल अलवणातल्या विकेशा विधवा आक्कांकडेच राहायच्या. स्वयंपाकापासून सगळया घराचा ताबा सरस्वतीबाइंर्कडेच असायचा! इतकंच नव्हे तर १९२५ साली आक्कांच्या धाकट्या भावाचं लग्न झालं त्यावेळी आक्का मांडवात करवली म्हणून उभ्या होत्या. एकूण सणवार आक्कांच्या कुटुंबात साजरे व्हायचेच. पण धर्मात/स्मृतीत काय सांगितलंय आणि त्यापलिकडे शास्त्राधार नसलेल्या रुढी काय आहेत हे शोधायचा आक्कांचा प्रयत्न असायचा. वेळप्रसंगी रुढी मोडायला आक्का मागेपुढे बघत नसत!
आणखी एका महत्त्वाच्या संदर्भातही मला अंबींच्या आणि आक्कांच्या आयुष्यांत फरक जाणवला. स्वातंत्र्याच्या चळवळीनं देशातल्या अनेक लोकांना झपाटून टाकलं होतं, अशी विसाव्या शतकातली पहिली पाच दशकं होती. कारवार, म्हैसूर भागात टिळक आणि गांधींच्या नेतृत्वाने भारावून गेलेली अनेक माणसं राजकीय चळवळीचा भाग होती. कर्नाड सदाशिव रावांसारखी इतरही अनेकजणं सामाजिक सुधारणांना हातभार लावत होती. उमाबाई कुंदापूर, नागम्मा पाटील, गौराम्मा वेंकटरामय्या, कमलादेवी चट्टोपाध्याय यासारख्या स्त्रियाही स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत्या. त्यापूर्वीच्या ५० वर्षांत म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातही ब्राह्मोसमाजी विचारपद्धतीचा पुरस्कार करणारे गोपाळस्वामी अय्यर, बायकांच्या शिक्षणाचा पुरस्कार करणारे महर्षी कर्वे यांना मानणारे अंबील नरसिंह अय्यर यांसारखी कार्यकर्ती माणसं त्या भागात काम करीत होती. परंतु अंबींच्या कुटुंबावर किंवा स्वत: अंबींवर या सामाजिक पार्श्वभूमीचा खोलवर परिणाम झाल्याचं लक्षात येत नाही. १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य, फाळणीनंतर झालेल्या दंगली, त्या संदर्भातली गांधींची भूमिका, त्यांचे उपोषण या सगळयांचे उल्लेख पुस्तकात येतात ते लेखिकेच्या नजरेतून, अंबींच्या नव्हे. शाळकरी नाती प्रभात फेरीला गेल्या तरी राजकीय घडामोडींचं त्यांना फारसं आकलन होत नसल्यामुळे अंबींनी इतिहासाच्या शिक्षिकेच्या भूमिकेतून माहिती देणे एवढ्यापुरतेच राजकीय संदर्भ मर्यादित आहेत. पुस्तकाच्या लेखिकेने
जाणूनबुजून असे संदर्भ टाळले असतील असं वाटायला अजिबात जागा नाही आणि म्हणूनच तात्कालिक राजकीय घडामोडींचा अंबींच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला असेल, त्यांच्या आयुष्याच्या चाकोरीत त्यामुळे बदल झाले असतील असं जाणवत नाही.
आक्कांचं आयुष्य या बाबतीत अंबींपेक्षा निराळं होतं. आक्का न. चिं. केळकरांची मुलगी होत्या. पुण्यात राहत होत्या. केळकर केवळ टिळक अनुयायी नव्हते ते `केसरी'चे संपादकही होते. आक्का त्या अर्थानी राजकारण ऐकत आणि पाहत वाढत होत्या. चौथीपर्यंत शाळा शिकल्यावर स्वदेशी चळवळीचा परिणाम म्हणून त्यांनी हुजूरपागेत जाऊन इंग्रजी शिकायला साफ नकार दिला होता! पुढे लग्नानंतर मॅटि्न्कच्या अभ्यासाची तयारी चालू ठेवली होती. मॅटि्न्कनंतर महाविद्यालयात जाण्याची वेळ आली. महर्षी कर्वे यांनी त्याच वर्षी, १९१७ साली नवीन विद्यापीठाची स्थापना केली होती. पुढील शिक्षणासाठी फर्गसन महाविद्यालय की हिंगणे विद्यापीठ असा प्रश्न उभा राहिला तेव्हा वडिलांशी सल्ला-मसलतीनंतर त्यांनी हिंगणे विद्यापीठाची निवड केली. त्या वेळी हे विद्यापीठ पुढे चालेल अशी खात्री नसूनसुद्धा! पुढील आयुष्यात आक्का प्रत्यक्ष राजकारणात फारशा कधी पडल्या नाहीत तरी मुलींसाठी साताऱ्याला शाळा सुरू करण्यापासून शिक्षणक्षेत्रात नानाविध प्रकारचं काम आणि श्रुतीस्मृतींपासून स्त्रियांच्या कायद्यांपर्यंत अनेक विषयांवर संशोधन आणि लेखन यामार्फत त्यांचं समाजकारण आयुष्याच्या शेवटापर्यंत चालू होतं.
संस्कृतीनं मिळत्या-जुळत्या दक्षिण भारतातल्या दोन प्रदेशात एका कालावधीत जन्मलेल्या या दोन स्त्रिया. दोघी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या, लवकर वैधव्य आलेल्या, पुढे स्वत:च्या पायांवर उभं राहण्याची हिंमत बाळगणाऱ्या आणि ते करून दाखवणाऱ्या. त्यांच्या दृष्टिकोनात एवढे मूलभूत फरक का पडले? आक्कांचं घरदार राजकारणात सक्रिय भाग घेणारं होतं म्हणून त्यांना एवढी मजल मारणं शक्य झालं का? फुले, आगरकर, कर्वे यांसारखी सामाजिक सुधारणांवर भर देणारी, बायकांची सामाजिक परिस्थिती सुधारावी म्हणून कार्य करणारी माणसं पुण्यात होती, तशी म्हैसूर, कारवार भागात अंबींच्या आजुबाजूलाही होती. आक्का समाजकार्यात पडल्या आणि अंबी पडल्या नाहीत हा केवळ योगायोग नसून तो परिस्थितीचा परिणाम होता असं मानलं तर त्यामागची कारणं काय असू शकतात?
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात `आधी राजकीय बदल की आधी सामाजिक?' यावरून टिळक आणि आगरकर यांच्यात वाद होत असत. अंबी आणि आक्का यांच्या आयुष्यांनी जी निरनिराळी वळणं घेतली, त्या संदर्भात त्या वादाचा विचार करावासा वाटतो. अंबींचं कुटुंब आणि आक्कांचं कुटुंब यातील महत्त्वाचा फरक म्हणजे बाईनं शिकणं आणि स्वावलंबी होणं याचं महत्त्व त्यांच्या कुटुंबात मानलं गेलं ते अंबींच्या निमित्ताने. कारण अंबींची विशिष्ट परिस्थिती. याउलट आक्कांनी खूप शिकावं असं पहिल्यापासून त्यांच्या वडिलांना तर वाटत होतंच पण लग्न झाल्यावर त्यांच्या पतीनं डॉ. आनंदीबाई जोशी, सीताबाई परांजपे यांची उदाहरणं देऊन बी. ए., एम. ए. पर्यंत तरी आपल्या बायकोनं शिकावं अशी इच्छा व्यक्त केली होती.
तसं बघायचं तर राजकीय-सामाजिक मंथन पुण्यात घडत होतं तसंच बंगलोरातदेखील घडत होतं. पण सार्वजनिक व्यासपीठांवरून समाजपरिवर्तनाची कितीही आवाहनं केली, तरी जे परिवर्तन व्हायचं त्याची सुरुवात कुटुंबाच्या चौकटीतच व्हावी लागते, सामाजिक बदल सार्वजनिक रूपात सहसा सुरू होतांना दिसत नाहीत, याचं एक फेलत असं की एखाद्या व्यक्तीनं, विशेषत: `कर्त्या पुरुषानं' सुधारणावादी दृष्टिकोन स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात बाळगला, तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा मोठाच परिणाम होऊ शकतो आणि तरीही `समाज' अजून लांबच असतो. कर्त्या सुधारकांचं महत्त्व यामुळं आणखीन कळीचं ठरतं. राजकीयदृष्ट्या न. चिं. केळकर टिळक पक्षाचे असले, तरी वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर ते काही प्रमाणात का होईना कर्त्या सुधारकात मोडत, आणि आक्कांचा हिंगणे विद्यापीठात प्रवेश घ्यायचा निर्णय हे याचं द्योतक मानता येईल. याउलट अंबींचे वडील जुन्या वळणाचे असावेत, जरी सर विश्वेश्वरय्या आणि जस्टिस नंजुनदय्या या नामवंत परिचितांची मतं स्वीकारून त्यांनी अंबींच्या केशवपनाला फाटा दिला आणि त्यांना शिक्षणा-नोकरीला उद्युक्त
केलं तरी सुधारकी कुटुंबात जन्मल्याचा आक्कांना, सामाजिक सुधारणांच्या रस्त्यावर प्रवास करताना मोठाच फायदा झाला. अंबींच्या बाबतीत मात्र समाजसुधारक प्रवृत्तीच्या व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबात अभाव असल्यामुळे, धडाडी दाखवून अंबी शिकल्या आणि आपल्या पायावर उभ्या राहिल्या तरी आक्कांसारखा सहज समाजपरिवर्तनाच्या वाटेवर मोठा पल्ला गाठणं जमलं नसावं. परिस्थिती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवत राहते, प्रगतीचा मार्ग ठरवते. सामाजिक प्रगतीच्या काल आणि व्यक्तीनिरपेक्ष मार्गावर चालायचा निर्णय प्रत्येकानं आपापला घ्यावा लागतो हे खरं असलं तरी प्रत्येक माणूस कुठे चालायला सुरवात करतं यावर देखील त्या माणसाची मजल कुठवर जाईल हे काही प्रमाणात अवलंबून असतं. अंबी आणि आक्काच्या उदाहरणांवरून तर असं फारच वाटतं. ओघानंच हेही येतं की घराघरात सामाजिक बदलाचं वारं पोचवणं. शक्य झालं तर समाजाचा अधिकाधिक भाग या काल-व्यक्ती-निरपेक्ष पुरोगामी रस्त्यानं वाटचाल करू शकेल. या मार्गानं चालणं समाजाच्या दुर्बल, पददलित घटकांना सोपं व्हायचं असेल, पित्तृसत्ताक समाजरचनेत स्त्रियांची आणि जातिनिहाय समाजरचनेत मागास गटांची मनोवृत्ती बदलायची असेल, तर सार्वजनिक व्यासपीठांवर बोलली जाणारी पुरोगामिता कुटुंबांमधल्या अधिकारी व्यक्तींच्या गळी उतरावयाची, त्यांना `कर्ते सुधारक' करायची मोठीच गरज मग भासते.
अंबी या पुस्तकवाचनाच्या निमित्ताने जवळ जवळ १०० वर्षांपूर्वीच्या काळातल्या सामाजिक परिस्थितीकडे जास्त डोळसपणे पाहण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. अंबी आणि आक्का यांची तुलना केवळ या कारणांचा शोध घेतानाचा एक भाग आहे. एरवी त्या दोघी आपापल्या परीनं अतुलनीय आहेत!
(`अंबी' आणि `कमलाकी' ही दोन्ही पुस्तकं अक्षरस्पर्श वाचनालयात उपलब्ध आहेत.)
- डॉ. विनीता बाळ,
दिल्ली

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.