उंबरठ्याशी शिक्षण आणणार्या - रजनी परांजपे
``काय? डोअर स्टेप? हे काय आहे ? हा प्रश्न मी या संस्थेत काम करायला लागल्यापासून अनेकदा ऐकला. विशेषत: फोनवरून कुणाकुणाशी बोलताना. पुण्यातच गेली पंधरा वर्षे संस्थेचं काम आहे, मुंबईत तर १९८८-८९ मध्येच संस्थेची स्थापना झाली. तरीदेखील या `फंडू' कामाबद्दल लोकांना काहीच कशी माहिती नाही? हा प्रश्न मला वारंवार पडायला लागला. पण जसजशी मी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष रजनीताई परांजपे यांच्याबरोबर काम करायला लागले तसतसा हळूहळू मला या प्रश्नाचा उलगडा व्हायला लागला.
या प्रश्नाचं उत्तर रजनीताइंर्च्या व्यक्तिमत्त्वात दडलेलं आहे. प्रसिद्धी पराङ्मुख..... `आपण बरे आणि आपले काम तर खूपच बरे' या धोरणांमुळे प्रसिद्धीच्या झोतापासून त्या सदैव दूरच राहिल्या. तरी या वर्षीचा हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचा `बाया कर्वे पुरस्कार' त्यांना मिळाल्यानंतर त्या प्रसिद्धीच्या कवडशात अल्प काळ तरी आल्या. `डोअर स्टेप स्कूल' हे नाव सुशिक्षितांना कुठेकुठे वर्तमानपत्रात या पुरस्काराच्या बातमीच्या निमित्तानं वाचायला मिळालं.
तर काय आहे हे डोअर स्टेप स्कूल ? आपल्या आजूबाजूची जी शेकडो मुले घरच्या विविध समस्यांमुळे शाळेपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा मुलांसाठी शाळाच त्यांच्या दारापाशी न्यायची हे संस्थेचं ध्येय. म्हणून
संस्थेचं नाव `डोअर स्टेप स्कूल'. `दारापाशी/उंबरठ्यापाशी शाळा' असं काहीसं मराठीत म्हणता येईल. शिक्षणापासून वंचित अशा मुलांना शिक्षण द्यायचं म्हटल्यावर संस्थेनं वस्त्या-वस्त्यातून, रस्त्यावर, फूटपाथवर, झाडाखाली, मंदिरात, बगिच्यात, मैदानात, बांधकामांच्या ठिकाणी, सर्वत्र, जिथे जिथे म्हणून शक्य होईल, जिथे जिथे म्हणून गरज भासेल, तिथे तिथे सगळीकडे वर्ग घेतले. २००४ साली पुण्यात केलेल्या एका सर्वेक्षणानंतर लक्षात आलं की बांधकाम मजुरांची मुलं हा शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांमधला बराच मोठा आणि खूप दुर्लक्षित घटक आहे, याचं महत्त्वाचं कारण असं की कामाच्या शोधात बांधकाम मजुरांचं सतत स्थलांतर होत असतं. परत हे स्थलांतर होण्याचा एखादा ठराविक कालावधी, महिना असतो असंही काही नाही. कामाच्या शोधात, ठेकेदाराशी भांडण झालं म्हणून, कधी कधी एका रात्रीतसुद्धा १२-१५ कुटुंबे स्थलांतरित झालेली दिसतात. हातावर पोट असल्यामुळे हे बांधकाम मजूर कुठेही अधिक काळ स्थिरावत नाहीत.
अशा मजुरांच्या मुलांना शिकविण्यासाठी `डोअर स्टेप स्कूल' प्रयत्नशील आहे. हे काम खूपच कठीण आहे. आपल्या मुलांचं शिक्षण हे त्यांच्या आईवडिलांच्या दृष्टीनं कधीच महत्त्वाचं नसतं. उलट आपण बांधकामावर काम करताना मुलांवर धाकट्या भावडांना सांभाळायची, पाणी भरणे, स्वयंपाक करणे आदी घरातली कामं करण्याची जबाबदारी असते. त्यामुळे मुलांच्या पालकांशी सतत संवाद ठेवून, मुलांना संस्थेच्या वर्गात पाठवण्याची त्यांची मानसिकता तयार करून घ्यावी लागते.
बांधकामाच्या ठिकाणी वर्ग लावण्यासाठी छोटी का होईना पण सुरक्षित जागा मिळवणं हे एक दिव्यच असतं. सगळीकडे वाळू, विटा, सिमेंट, खडीचे डोंगर, अर्धवट झालेलं बांधकाम, मोठमोठे खड्डे.... जेमतेम १० ु १० फूट पत्र्याची शेड उभारून वर्गाला सुरुवात होते. मोठ्या मुलांना २-३ तास तरी नीट शिकता यावं, म्हणून सहा वर्षाखालील मुलांसाठी बालवाड्या आणि गरज असेल तर साईटवर पाळणाघरेही चालवली जातात. बांधकामांवर मजुरीकाम करणारे बरेच जण हल्ली कर्नाटकातून, आंध्र प्रदेशातून महाराष्ट्नत कामाच्या शोधात आलेले आढळतात. यांच्या मुलांना शिकवताना येणारी मोठी अडचण असते भाषेची. मुलांना मराठीचा गंधही नसतो. त्यांची कन्नड, तेलगू वा तमिळ भाषा आपल्या शिक्षिकांना येत नसते. संस्थेच्या वर्गात त्यांना मराठी शिकवले जाते, कारण इथल्या महानगरपालिकेच्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. मुंबईतल्या सरकारी शाळा हिंदी माध्यमाच्या आहेत. तिथे `डोअर स्टेप स्कूल' चे सर्व अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग हिंदीतून चालवले जातात.
मुलांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न -
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या आणि संस्थेमध्ये अनौपचारिक वर्गात शिकणाऱ्या सर्वच मुलांना सरकारी शाळांतून दाखल करण्याचा संस्था सदैव प्रयत्न करत असते, कारण शालेय शिक्षणाची जागा अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग फार काळ घेऊ शकत नाही. महानगरपालिकेच्या शाळा जरी दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर असल्या तरीदेखील प्राथमिक शाळेतील मुलांना शहरातील बेलगाम, वाहत्या रहदारीमुळे, स्वत:चे स्वत: शाळेत जाणं व सुरक्षितरीत्या परत येणं अवघडच आहे. महानगरपालिकेच्या शाळेत दाखल केलेल्या मुलांची गळती होण्याचं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. मुलांची शाळेत ने-आण करण्यासाठी कष्टकरी कुटुंबांमध्ये दुसरं कुणी माणूस नसतं किंवा त्यासाठी दुसरी काही सोय करणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलांच्या सुरक्षित वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे
सरकारी शाळांतून मोठ्या प्रमाणावर मुलांची गळती होते.
शाळकरी मुलांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न खरं म्हणजे खूप गंभीर आहे, पण शासनानं याबाबत काहीच ठोस उपाययोजना केलेली नाही. मुलांची सरकारी शाळांतली गळती रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या `डोअर स्टेप स्कूल' ने स्वत: शाळेत दाखल केलेल्या मुलांसाठी तरी सुरक्षित वाहतुकीची सुविधा पुरवलेली आहे. संस्थेची फिरती शाळा, इतर दोन वाहने आणि सहा आसनी रिक्षा या कामासाठी सदैव तैनात असतात. अंदाजे ३०० मुलांची शाळेपर्यंतआणि शाळेतून ने-आण `डोअर स्टेप स्कूल' करते.
चाकांवरची किंवा फिरती शाळा - नेहमीच्याच स्कूलबसची अंतर्गत रचना पूर्णपणे बदलून बसमध्येच वर्ग लावण्याची व्यवस्था या फिरत्या शाळेत केलेली आहे. ड्नयव्हरच्या क्रॅबिनमागे फळा लावलेला असतो. वर्गात लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य ठेवायची सोय बसमधल्या छोट्या कपाटांमध्ये केली आहे. ज्या वस्त्यांच्या आसपास वर्ग लावण्यासाठी अजिबात जागा नसते अशा ठिकाणी या चाकांवरील शाळेचा खूपच उपयोग होतो. गेली तीन वर्ष ही फिरती शाळा चालविणाऱ्या बसचा मासिक खर्च (ड्नयव्हरच्या पगारासकट) `कमिन्स इंडिया फौंडेशन'तर्फे केला जात होता.
हा अनोखा प्रकल्प प्रथम मुंबईत सुरू झाला आणि मग २००१ साली पुण्यात. गेल्या पाच वर्षात ही फिरती शाळा पुण्यात निरनिराळया १६ ठिकाणी वापरण्यात आली आणि जवळ जवळ ७०० मुलांना शाळेची पहिली ओळख या `अनोख्या वर्गाद्वारे' करून देण्यात आली.
व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्या आर्थिक देणग्या आणि सहयोगावर `डोअर स्टेप स्कूल' चे कामकाज चालतं. संस्था झपाट्यानं विस्तारत आहे. आज पुण्यातच संस्थेचे अंदाजे २६० आणि मुंबईत १५० कर्मचारी आहेत. एकट्या रजनीताई सोडून सर्वजण पगारी कर्मचारी आहेत! संस्था स्थापन केल्यापासून आजतागायत रजनीताइंर्नी विनावेतन काम केलं आहे.
वाचनसंस्कार प्रकल्प -मुलांची `वाचन कौशल्ये' वाढवण्यासाठी - `डोअर स्टेप स्कूल'चा आणखी एक अत्यंत जोमानं बाळसं धरलेला उपक्रम म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांतून चालणारा `वाचनसंस्कार प्रकल्प' सरकारी शाळांत शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलांची अक्षरओळख पक्की न झाल्यामुळे कित्येकदा ही मुले वरच्या वर्गात जरी गेली असली तरी त्यांना जेमतेम स्वत:चं नाव लिहिता वाचता येतं. मुलांची वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी खास करून या प्रकल्पाची निर्मिती झाली. सध्या पुणे महानगरपालिकेच्या ४७ आणि पिंपरी
चिंचवड महानगरपालिकेच्या २९ शाळांत हा प्रकल्प अतिशय यशस्वीपणे चालवला जातोय. प्रत्येक इयत्तेच्या वर्गाला आठवड्यातून एकदा, सलग दोन तास या प्रकल्पाचा फायदा मिळतो. त्यांच्या वेळापत्रकातच या दोन तासांची तरतूद केली आहे. प्रत्येक वर्गावर दोन `पुस्तक पऱ्या' (हे अफलातून नावदेखील रजनीताइंर्नी सुचवलेलं) आठवड्यातून एकदा पुस्तकांची पिशवी घेऊन जातात. आज संस्थेच्या मालकीची जवळपास २०,००० पुस्तके आहेत. ज्यामध्ये १३३७ वेगवेगळया पुस्तकांची शीर्षके आहेत. सर्व पुस्तकांची वाचनाच्या पातळयांनुसार प्रतवारी केलेली आहे. तसंच प्रत्येक मुलगा वाचनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचीही काटेकोर नोंद ठेवलेली आहे. प्रत्येक मुलाच्या वाचनक्षमतेनुसार त्याला त्याच्या निवडीचं कुठलंही पुस्तक वर्गात वाचायला मिळतं तसेच एक आठवड्यासाठी घरीदेखील वाचायला दिलं जातं. या दोन तासांच्या अवधीत प्रत्येक मुलाचं ५-७ ओळींचं तरी किमान प्रकट वाचन घेतलं जातं. त्याला वाचताना येणाऱ्या अडचणींची, तसेच त्यानं केलेल्या प्रगतीचीही तपशीलात नोंद ठेवली जाते. वाचनाच्या बरोबरीनं भाषिक खेळ, गोष्टी, गाणी वर्गात नियमितपणे घेतली जातात. या सगळया वैविध्यामुळे मुले आठवड्यातून एकदा भेट देणाऱ्या `पुस्तक-पऱ्यांची' आतुरतेने वाट बघत असतात. तसेच त्यांच्या वाचन कौशल्यात खूप सुधारणा झालेली आहे, हे अगदी ठळकपणे जाणवतं. कारण मुले खूप उत्साहानं आणि आवडीनं पुस्तकं घरीदेखील वाचायला घेऊन जातात. एक आठवड्यानं आठवणीनं वाचनवर्गाच्या तासाला पुस्तकं बदलतात.
या प्रकल्पादरम्यान काम करत असताना एक गोष्ट अगदी ठळकपणे रजनीताइंर्च्या लक्षात आली व ती म्हणजे मुलांना पाठ्यपुस्तकाखेरीज मराठीतली वाचनाच्या पहिल्या टप्प्यातली (फक्त मुळाक्षरे व बाराखडीचे शब्द असणारी) इतर पुस्तकं अवांतर वाचनासाठी उपलब्ध नाहीत. पुस्तकांची तमाम दुकानं पालथी घातल्यानंतर लक्षात आलं की वाचनाच्या या पहिल्या टप्प्यातली अत्यल्प शीर्षकं बाजारात आहेत. पहिली, दुसरीचं पाठ्यपुस्तक मुलं सफाईदार वाचतात, असं भासतं कारण त्यांच ते जेमतेम पंधरवड्यात तोंडपाठ झालेलं असतं ! पण तीच अक्षरं इतर काही पुस्तकांत त्या मुलांना वाचता आली, ओळखता आली तर त्यांना मुळाक्षरांची किंवा शब्दांची पक्की ओळख झाली आहे असं म्हणता येईल. आणि हे येण्यासाठी मुलांना त्या त्या पातळीवरची खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजेत. वाचन हे एक कौशल्य आहे आणि कौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची सातत्यानं गरज असते आणि ती गोष्ट म्हणजे सराव, यावर रजनीताइंर्चा ठाम विश्वास आहे.
ही सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर रजनीताइंर्नी काय करावं? त्यांच्या खटपट्या स्वभावाला अनुसरून त्यांनी स्वत:च अशी वाचनाच्या पहिल्या टप्प्यातली सोपी पुस्तकं लिहिली आणि अत्यंत अल्प किंमतीत ती प्रसिद्धदेखील केली ! यामागचा हेतू असा की एखाद्या मुलाला वाचनाची आवड निर्माण होऊन पुस्तक विकत घ्यायची इच्छा झाली तर त्याला ते सहज शक्य व्हावे आणि त्यामुळेच कुठल्याही पुस्तकाची किंमत पाच ते सात रुपयांपेक्षा अधिक ठेवलेली नाही. मुळाक्षरांच्या पुस्तक संचात एका पुस्तकात फक्त मुळाक्षरांचे विविध साधे शब्द, दुसऱ्या पुस्तकात फक्त काना वापरून तयार होणारे, तिसऱ्या पुस्तकात फक्त वेलांटीचे, चवथ्या पुस्तकात फक्त उकाराचे शब्द या पद्धतीने हा संपूर्ण संच तयार केला. जोडाक्षर, हा वाचनातला एक कठीण टप्पा आहे हे ओळखून त्यांनी अनेक जोडाक्षरविरहित गोष्टी लिहिल्या एकही जोडाक्षर मध्ये येऊ न देता एखादी लहान का होईना पण पूर्ण गोष्ट लिहायची म्हणजे तारेवरची कसरतच! पण ही कसरत करत रजनीताइंर्नी स्वत: १६-१७ गोष्टी लिहिल्या. नुसत्या लिहिल्या एवढंच नव्हे तर स्वत:, वयाच्या ६० व्या वर्षी `पेजमेकर' वापरायला शिकून पुस्तकाचा मजकूर स्वत: टाईपसेट करून, क्लिपआर्टमधून चित्रं शोधून काढून, त्याची सुयोग्य रचनाही त्यांनी स्वत:च्या संगणकावर केली ! इंटरनेट, इ-मेलचा वापर तर त्या अत्यंत नियमितपणे आणि सफाईनं करतात.
कामाचा, अध्यापनाचा विषय रिसर्च मेथडॉलॉजी असल्यामुळे रजनीताइंर्चं आणि आकड्यांचं विशेष सख्य! आकडेवारीचे मोठमोठे तक्ते समोर आले की जणू ते आकडे त्यांच्याशी गप्पाच मारायला लागतात! शिवाय गणित पक्कं असल्यामुळे आकडेवारीकडे एक नजर जरी फिरवली तरी मुलांच्या गळतीचं प्रमाण कुठे वाढलंय, टक्केवारीत ते किती, मग गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कितीनं जास्त, कितीनं कमी हे सगळे संख्याशास्त्रावर आधारलेले निष्कर्ष त्यांच्या मनात तत्काळ उमटतात. मग एखाद्या सराईत शल्यविशारदाप्रमाणे त्यांच्या नजरेची सुरी त्या आकडेवारीवर फिरते आणि मग चिकित्सक विश्लेषणाला सुरुवात होते. एकीकडे हा सगळा गणिती, संख्याशास्त्रीय पुराव्यानिशी अभ्यासाचा दृष्टिकोन, तर दुसरीकडे लहान मुलांना वाचायला उपलब्ध नाहीत म्हणून स्वत:च कल्पनेच्या हिंदोळयावर बसून मुलांना परीराज्याची, प्राणी जगताची, जादूई जंगलाची सफर घडवून आणणाऱ्या, जोडाक्षरविरहित, सोप्या भाषेतील गोष्टींची पुस्तकं लिहिणाऱ्या रजनीताई! खूपच अनोखं रसायन आहे हे!
`डोअर स्टेप स्कूल' चे काम प्रामुख्यानं समाजातल्या दानशूर व्यक्ती/ कंपन्या यांच्या आर्थिक सहकार्यानं चालतं, पण त्याचबरोबर समाजाच्या विविध स्तरातली माणसं संस्थेशी स्वयंसेवक या नात्यानंही जोडलेली आहेत. यामध्ये गृहिणी, महाविद्यालयीन युवक, आय. टी. क्षेत्रातले उच्चशिक्षित कर्मचारी असं वैविध्य आहे. परदेशातीलही अनेक युवक युवती संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून वेगवेगळया प्रकारची कामं करतात. मुलांना, संस्थेच्या शिक्षिकांना कॉम्प्युटर, इंग्रजी शिकवणं वगैरे.
आज वयाच्या ७२ व्या वर्षी रजनीताई ज्या उत्साहाने कार्यमग्न असतात तो उत्साह कुणालाही अचंबित करणारा आहे. राहत्या घराच्या वरतीच संस्थेचं मुख्य कार्यालय थाटलं असल्यामुळे अनेकदा रविवारीदेखील काही जणांना सोयीचं म्हणून कार्यालयात बैठक घेताना, संगणकावर काम करताना, पाहुण्यांना संस्थेबद्दल माहिती देताना त्या आपल्याला आढळतात. दुसरा त्यांच्याबद्दल विशेष नमूद करण्यासारखा मुद्दा म्हणजे संस्थेच्या कामाला सुरुवात केल्यापासून आजपर्यंत त्यांनी एक नवा पैसादेखील मानधन घेतलेलं नाही. मुंबईत असताना तर नेहमीच बस, लोकलनं प्रवास, पुण्यात सुरुवातीला पायी, बसनं, मग रिक्षा आता ड्नयव्हर आणि मारुती कार आहे पण या वाहनखर्चाची, फोन खर्चाची तोशिस त्यांनी संस्थेला कधीच पडू दिली नाही.
संस्था सुरू करताना रजनीताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून (काहीसं भाबडेपणानं देखील!) वाटलं होतं की साधारण २० वर्षांनंतर संस्था बंद करावी लागेल, कारण तोपर्यंत सर्वच मुलं किमान साक्षर झाली असतील. पण सध्याचं वास्तव पाहता, संस्था बंद करणं तर दूरच पण जेव्हा अशा शेकडो `डोअर स्टेप स्कूल्स' या एकाच ध्यासानं काम करतील तेव्हा कदाचित या समस्येच्या अक्राळविक्राळ भीषणतेमध्ये तसूभर तरी फरक पडलेला असेल, असंच आता त्यांना मनापासून वाटतं.
संस्थेचं काम झपाट्यानं वाढत आहे. पुण्यातल्या बांधकामांचा वेग आणि व्याप्ती पाहिली की नाईलाजानं वेगवेगळया बांधकामांच्या ठिकाणी अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग सुरू करण्याची निकड संस्थेला जाणवते आहे. खरं तर शाळेत जाण्याच्या वयातलं कुठलंही मूल, कुठल्याही कारणानं शाळेबाहेर असेल, निरक्षर राहत असेल तर तो आपल्या राष्ट्नीय संपत्तीचा केवढा अपव्यय आहे हे किमान सुशिक्षित वर्गाच्या लक्षात यावं. एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न आपण सगळेच पाहत असताना या ढळढळीत वास्तवाची जाणीव जेवढी लवकर आपल्याला होईल, ही परिस्थिती बदलायला मी काय करू शकतो/शकते हा विचार सदैव डोक्यात घर करून राहीला तेव्हा आपोआपच अनेकांचे हात या कामासाठी पुढे येतील. स्वत:चं सुरक्षित, आरामदायी वर्तुळ सोडून असं काही करण्याची तळमळ असणाऱ्यांची आपल्या समाजाला फार फार गरज आहे असं रजनीताइंर्ना अगदी मनापासून वाटतं.
सभोवतालचं वास्तव जरी काळंकुट्ट भासलं तरी कामाच्या बाबतीत रजनीताई कधीच निराश होत नाहीत. स्वत:च्या मनात जागवलेल्या प्रकाशात त्या व्रतस्थ वृत्तीनं, आपल्या अनेक सहकाऱ्यांचे हात हाती धरून त्यांची वाट चालत राहतात. येणाऱ्या प्रत्येक दिवसाला न थकता कामाचं अर्घ्य वाहत राहतात. `अत्तं दीप भवं' या बुद्धाच्या शिकवणीचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे रजनीताई परांजपे. त्यांच्या समर्पित भावनेनं काम करणाच्या वृत्तीला शतश: प्रणाम !
रजनीताई परांजपे यांनी स्थापन केलेल्या `डोअर स्टेप स्कूल'ची माहिती वाचून अनेकांना उत्स्फूर्तपणे काही काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. अशांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
डोअर स्टेप स्कूल
११० परिमल, ओंध, पुणे ४११००७
दूरध्वनी : २५८९८७६२,२५८९३८६६
मोबाईल : ९७६६३३७४३१
- उज्ज्वला मेहेंदळे, पुणे


